उस्मानाबाद,दि.6:- उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेपणाची व
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, शासनाच्या सर्व योजना
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात येत आहेत याचा
सर्वांना फायदा ही होत आहे, पत्रकारबांधव ही शासन व प्रशासनाचे लोकोपयोगी उपक्रम
जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी चोखपणे बजावित आहेत, यापुढे ही बजावतील असे
प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार
संघाच्या वतीने आयोजित दर्पणदिनाच्या कार्यक्रमात श्री.सानप बोलत होते. यावेळी
प्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय
रणदिवे, सचिव संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, पत्रकार राजाभाऊ
वैद्य, संतोष हंबिरे, उपेंद्र कटके, प्रशांत कावरे, मल्लिकार्जून सोनवणे, प्रवीण
पवार, विजय मुंढे, सुभाष कदम, संतोष खुने, आकाश नरोटे आदीसह पत्रकार उपस्थित होते.
यावेळी श्री. सानप म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीमध्ये
पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे
समाजामध्येही सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन समाज प्रगतीकडे झेपावत असतो. याचाच
एक भाग म्हणून शासन व प्रशासनाकडून समाज उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात,
या योजना समाजापर्यंत पोहचल्या तरच त्याचा समाज विकासासाठी योग्य उपयोग होणार आहे,
यामुळे विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक
दृष्टीकोनातून वृत्तांकन करणे गरजेचे आहे. यामुळे शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना
मदत होईल व जिल्हयावर लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून जाईल तसेच आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख यापुढे राहणार नाही, शेतकऱ्यांनाही पत्रकारांच्या
सकारात्मक दृष्टीकोनाचा फायदा होईल यामुळे त्यांचे पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही.
यावेळी शहरातील वृत्तपत्र
विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष जाधव यांनी
केले. यावेळी मोठया संख्येने जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.*****
