Friday, 21 August 2026
पीयुसी साठी सुधारीत दरवाढ
पीयुसी साठी सुधारीत दरवाढ
धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका ) महाराष्ट्र शासनाच्यादिनांक 17 जुलै 2026 रोजीच्या पत्रानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाच्यानिर्देशानुसार राज्यतील मोटार वाहनांच्या वायुप्रदुषण नियंत्रण तपासणी प्रमाणपत्राच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली.
दुचाकी वाहनांसाठी नवीन सुधारीत दर 60 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारी वाहने यासाठी 150 रुपये,डिझेलवर चालणारी वाहने यासाठी 180 रुपये पीयुसी साठी असे नवीन सुधारीत दर असून या दरवाढीची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशीक परिवहन अधीकारी यांनी केले आहे.
000000
महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी
महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी
धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये 'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांना यंत्रसामग्री खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'एक गाव, एक कृषी अवजारे बँक' या संकल्पनेनुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्प गावातील एमएसआरएलएम (उमेद) व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या घटकासाठी पात्र आहेत. एका गावातून एकापेक्षा अधिक गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. यापूर्वी ऑनलाइन लॉटरीद्वारे 03 महिला गटांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित पात्र गावस्तरीय कृषी अवजारे बँक घटकासाठी एफपीओ-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दि.३१ ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण केलेल्या प्रकल्प किमतीच्या ६० टक्के अनुदान देय राहणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला शेतकरी केवळ शेतीपुरत्या मर्यादित राहता शेतीपूरक व्यवसाय, यंत्रसामग्री व्यवस्थापन व सेवा क्षेत्रातही पुढे याव्यात, हा उद्देश आहे. कृषी अवजारे बँके मुळे महिला गटांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होण्यासोबतच गावातील शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री वेळेवर भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे.
या अंतर्गत लहान किंवा मोठा ट्रॅक्टर तसेच किमान तीन कृषी अवजारे घेता येईल, योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी श्रीराम हेलाले, (मो नं.8275179717) प्रकल्प विशेषज्ञ कृषि व्यवसाय,धाराशिव यांना संपर्क साधावा .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला बचत गटांनी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) विष्णु मिसाळ यांनी केले आहे.
00000
‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश
‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश
पाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी आणि माती संवर्धनाची चळवळ केवळ सरकारी उपक्रम न राहता ती जनमानसाची चळवळ व्हावी, या उद्देशाने धाराशिव येथे ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.सकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिक, विद्यार्थी,अधिकारी- कर्मचारी, खेळाडू तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जलसंधारणाच्या संदेशाला लोकसहभागाची जोड मिळाली.
धाराशिव येथे आज शुक्रवार,२१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकॅथॉनला उत्साहात सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे सुहास चव्हाण, जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अभियंता सायली जाधव,हर्षदा पाटील,जीवन काकडे,शाखा अभियंता ज्योती जाधव,कांचन मलजे आणि बलराम पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सहभागी नागरिकांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात आली.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमपासून सुरू झालेली वॉकॅथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौक,सेंट्रल बिल्डिंग,रामनगर, आनंदनगर,समतानगर मार्गे पुन्हा श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे पोहोचली. या मार्गावर जलसंधारण,पाणी बचत आणि माती संवर्धनाचा संदेश देत सहभागी नागरिकांनी उत्साहाने वॉकॅथॉन पूर्ण केली.नागरिकांसह शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी,विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ हा मूलमंत्र आहे.या माध्यमातून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे.पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे तसेच जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होते.पाण्याचा वापर प्रत्येकाने गरजेनुसार आणि काटकसरीने करणे ही काळाची गरज आहे.२६ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या पाणी संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी जलसंधारण अभियानांतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.ग्रामीण भागात जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करणे,लोकसहभाग वाढविणे आणि पाण्याची बचत करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ या उपक्रमामुळे दीर्घकालीन फायदे झाल्याचेही श्री.महामुनी यांनी सांगितले.
प्रथम दहा सहभागींचा गौरव
‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा सहभागी विजेत्यांना रोख बक्षीस,प्रमाणपत्र,पदक आणि सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.शौर्य उमेद पायल,श्रुती पाटील, रणवीर खंडाळकर,प्रगती वाघमारे, क्रांती घावटे,सुजाता लोखंडे,सानिया फुलारी, अनुजा मस्के,हनुमंत माने आणि राकेश जानराव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले,तर आभार वैशाली महामुनी यांनी मानले. पाणी आणि मातीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,हा संदेश या वॉकॅथॉनच्या माध्यमातून धाराशिवकरांनी प्रत्यक्ष सहभागातून अधोरेखित केला.
*******
Subscribe to:
Posts (Atom)






