Friday, 21 June 2019

सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना दैनंदिन जीवनात रुजवा - जिल्‍हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे








सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना दैनंदिन जीवनात रुजवा
- जिल्‍हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद, दि.21- सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना ही आपल्या दैनंदिन जीवनात रुजायला हवी आणि याचे धडे बालवयापासूनच दिले गेले पाहिजेत, असे उद्गार जिल्‍हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज येथे काढले.
पाचव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सरकारी वकील ॲङ शरद जाधवर, नितीन काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, तहसिलदार विजय राऊत, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲङ रवींद्र भोसले, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक धनंजय काळे, विकास कुलकर्णी, सहाय्यक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी ,ब्रह्माकुमारी च्या सुरेखा बहेनजी, ॲड. व्यंकटराव गुंड हे उपस्थित होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा व जिल्‍हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी योग दिनाच्या निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. विकास गपाट, पतंजलीचे राज्य प्रभारी नितीन तावडे, राम ढेरे यांनी उपस्थितांकडून योग क्रिया करून घेतल्या. त्याचप्रमाणे डॉ. सायली मोरे यांनी ध्यानाचे महत्त्व सांगून उपस्थितांकडून ध्यान क्रिया करून घेतल्या.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे चंद्रशेखर सुरवसे, अनुरत्ना नागटिळक, विवेक गोवर्धन, रोहिदास सौदागर, अशोक रणसुभे, रविराज देडे, चंद्रकांत गिलबिले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीराम सोनटक्के, रोटरी क्लबचे अभिजित पवार, एकता फाउंडेशनचे अभिलाष लोमटे, प्रजापिता ब्रह्मकुमारी चे सुरेश जगदाळे, प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे




भवानीसिंग राजपुरोहित, उस्मानाबाद मॅरेथॉनचे  गिरीश आष्टगी,भारत स्काऊट अँड गाईड चे उपाध्यक्ष अविनाश हंगे, अनुसया शिरसाट, जनार्दन इरले, वैभव लांडगे, रविकांत सुरवसे, प्रशांत मते, विजयकुमार कोळगे, सोमनाथ कुंभार, अश्विनी थोरात यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले.
****


वृत्त क्रमांक 383

मुरघास तयार करण्याच्या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
                                                        -जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी 
        उस्मानाबाद, दि.21-   राष्ट्रीय कृषी विकास योजना 2019-20 अंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना द्यावयाचा आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जाच्या स्वरूपातील प्रस्ताव आपल्याशी निगडित असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि.22 जून  ते 01 जुलै 2019 या कालावधीत सादर करावेत, तसेच अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती याबाबतचा सविस्तर तपशील संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असेल.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव यांनी केले आहे.
                                        ****

 वृत्त क्रमांक:-384

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मद्यविक्री बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
उस्मानाबाद,दि.21- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व सिंदफळ, उमरगा



तालुक्यातील तुगाव, वाशी तालुक्यातील पारगाव, भूम तालुक्यातील आष्टा व बावी  या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होत असून त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वी 48
तास अगोदर मद्य विक्री करण्यास मनाई/कोरडा दिवस म्हणजेच दि. 21 जून रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 23 जून 2019 रोजी चा मतदानाचा संपूर्ण दिवस व दि. 24 जून रोजी मतमोजणी असल्याने मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी होणाऱ्या  ठिकाणी म्हणजेच उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा,वाशी, भूम,कळंब  या शहरातील सर्व प्रकारचे घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे व त्यावरील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
****

वृत्त क्रमांक 385
किलप्ले पेस्टीसाईड, इंदोर फोरेट (प्रोटोन) उत्पादित
सोरेटच्या  जिल्हयात  विक्री बंदीचे आदेश जारी
तपासणी अहवालात आढळून आले 0% घटक
उस्मानाबाद,दि.21- महावीर कृषी सेवा केंद्र, कळंब येथील कृषी सेवा केंद्राची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाडगे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. जाधव यांनी अचानक तपासणी केली होती. त्यामध्ये किलप्ले पेस्टीसाईड, इंदोर उत्पादित फोरेट 10 टक्के G  (ब्रँड- प्रोटोन 10G), बॅच नंबर KPP -38, या किटकनाशकाचा साठा आढळून आला.   
किटकनाशक कायदा 1968 अन्वये हा नमुना काढून कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीकरिता पाठविला होता. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला  असून विश्लेषण अहवालानुसार फोरेट किटकनाशकाचे शून्य टक्के घटक आढळून आल्याने याचे जिल्हाभरात तात्काळ विक्री बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 3 हजार 447 किलो (रुपये रक्कम 2 लाख 41 हजार 290) विक्री बंदीचे आदेश पारित करण्यात आले, असून कीटकनाशक कायदा 1968 व नियम 1971 अन्वये पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी या बॅचचे फोरेट शेतकऱ्यांनी खरेदी करू नयेत तसेच शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करीत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी, बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पावती, पिशवी,टॅग          



त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावेत, बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी,त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी, नामांकित कंपनीची बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत, कमी वजनाच्या निविष्ठा, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्रीबाबत तक्रार असल्यास नजिकच्या तालुका कृषी अधिकारी/पंचायत समिती  कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाडगे यांनी केले आहे.
                                           ****

वृत्त क्रमांक-386
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेतून गो-शाळा अनुदानासाठी
इच्छुक गो-शाळाधारकांनी अर्ज करावेत
      उस्मानाबाद,दि.21- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, ही नवीन योजना सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून जिल्ह्यातील तीन विभागीय महसूल मंडळातून प्रत्येकी एक याप्रमाणे अनुदानासाठी गो-शाळांची निवड करण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी,कळंब, उपविभागीय अधिकारी, उमरगा या महसूल विभागात ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत पशुधनासाठी नवीन शेड बांधकाम, चारा व पाण्याची व्यवस्था, कडबाकुट्टी यंत्र, मुरघास प्रकल्प, गोमूत्र व त्यावरील प्रक्रिया प्रकल्प इत्यादी बाबींसाठी अनुदान मिळणार आहे. या अनुषंगाने इच्छुक गो-शाळाधारकांनी संबंधित तालुक्याच्या पशुधन  विकास अधिकारी, (विस्तार) यांच्यामार्फत परिपूर्ण प्रस्ताव उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन या कार्यालयास दि.30 जून पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे यांनी केले आहे.
****

वृत्त क्रमांक-387
शेतकऱ्याची फसवणूक केलेल्या परवानाधारक
आडते, मदतनीस, व्यापाऱ्यांचे परवाने रद्द
      उस्मानाबाद,दि.21- मालाचा कडता म्हणून 50 क्विंटल पोत्यामागे एक किलो कडता घेत असल्याबाबत व सॅम्पल म्हणून टोपलीत व्यापाऱ्याकडे नेलेला माल व्यापाऱ्याने परत न दिल्याबाबत तसेच हवा असल्याच्या नावाखाली लिलावात मागणी केलेल्या भावापेक्षा कमी भावात खरेदी केल्याबाबत श्री. महेश वीरेश गव्हाणे, राहणार मुरूम या शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.



या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आता एम.व्ही.पाटील, अ वर्ग आडत,मुरूम, श्री. विठ्ठल नरसिंग पाटील, मदतनीस, मुरूम, एल. एस. मिनियार, सं.गणेश लक्ष्मीकांत मिनियार, अ वर्ग व्यापारी, मुरूम, गोविंद दाळमिल,सं.श्रीकांत श्रीकिशन मिनियार,अ वर्ग व्यापारी, मुरूम या
चारही परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून त्यांना 01जून 2019 पासून बाजार समिती, मुरूम च्या आवारात नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात भाग घेता येणार
नाही,त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही, अशी नोटीस कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम चे सचिव यांनी दिली आहे.
अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम च्या आवारात परवानाधारक आडते, मदतनीस, व्यापारी यांनी शेतकऱ्याच्या केलेल्या फसवणुकीबाबत शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत जिल्ह्याच्या सर्व स्तरातून शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
****