Saturday, 5 August 2017

तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजन


उस्मानाबाद. दि. 5:- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी सोडवून त्यांना तत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी 'लोकशाही दिन'  जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. जिल्हयाचा लोकशाही दिन हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो. कार्यपध्दती सुलभ व्हावी यासाठी तालुकास्तरावरही लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे, असे उमरगा  तहसीलदार श्री. अरविंद बोळंबे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयस्तर तसेच जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर, दुस-या सोमवारी विभागीय आयुक्तस्तर व तिस-या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन होणार आहे. या दिवशी  सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.तालुकास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असतील. लोकशाही दिनाचा कार्यक्रम संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात येईल.
अर्ज  विहित नमुन्यात म्हणजे  नमुना  प्रपत्र 1 अ ते  1 ड  मध्ये  असावा. अर्जदाराची  तक्रार  अथवा निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असावे व चारही  स्तरांवरील  लोकशाही  दिनाकरिता अर्ज  15  दिवस आधी 2 प्रतींमध्ये पाठविणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही  दिनानंतर 1 महिन्याने जिल्हास्तरीय/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्जदाराला अर्ज करता येईल. या लोकशाही  दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त यांच्या व त्यानंतर दोन महिन्यांनी मंत्रालयस्तरीय लोकशाही दिनात अर्जदारास अर्ज करता येईल.
लोकशाही  दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स,  सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर. यानुसार जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत ते संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत करण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनासाठी उप विभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पाटबंधारे, कृषि, सहकार, बांधकाम, पाणीपुरवठा या विभागांचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता  लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी  त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही.
                जनतेकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोचपावती प्रपत्र 2 प्रमाणे देण्यात येईल. सर्व स्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या  विभागाच्या  विभाग प्रमुखांकडे सदर अर्ज पाठविण्यात येईल व विभागप्रमुख या अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल, अर्जदाराची  विनंती,  त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करुन लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील.
            अर्जदाराला अंतिम  उत्तर लोकशाही  दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याचा आत देण्यात येणार आहे. जनतेने  द्यावयाच्या अर्जाच्या नमुना  प्रती त्यांना  विनासायास  विनामुल्य उपलब्ध आहेत, लोकशाही दिनाच्या माध्यमातून आपल्या तक्रार, निवेदनांचे सामोपचाराने  निराकरण  करावे, असेही  प्रसिध्दीस  दिलेल्या पत्रकात  म्हटले  आहे.

मुरघास युनिट व विद्युतचलीत कटबाकुट्टी यंत्रासाठी प्रस्ताव सादर करावेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त


            उस्मानाबाद, दि. 05:- राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत मुरघास युनिटची स्थापना करणे व कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन या योजनेचा लाभ देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे त्याकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विसतार) पंचायत समिती यांच्याकडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
            मुरघास युनिटची स्थापना करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 5 आणि अनुसूचित जातीमधील 2 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट उस्मानाबाद जिल्हयासाठी देण्यात आलेले आहे. विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 40 आणि अनुसूचित जातीमधील 10 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट उस्मानाबाद जिल्हयासाठी देण्यात आलेले आहे.

            मुरघास युनीटसाठी इच्छूक लाभार्थ्यांनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे तर विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्रासाठीच्या इच्छूक लाभार्थ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  यांच्याकडे दि. 07 ऑगस्ट 2017 ते दि. 25 ऑगस्ट 2017 या कालावधीत सादर करावयाचे आहेत. अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती याबाबतचा तपशील संबंधित पंचायत समितीमध्ये उपलब्ध आहे. 

स्पर्धा परिक्षांमध्ये यशप्राप्तीसाठी उर्दू लोकराज्य अत्यंत उपयुक्त- मुख्याध्यापक मीर एजाज अली




उस्मानाबाद, दि. 05:- अल्पसंख्याक समाजातील विशेषत: उर्दु भाषिकांना आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त उर्दू भाषेतून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र अत्यंत उपयुक्त आहे असे प्रतिपादन मुध्याध्यापक मीर एजाज अली यांनी केले. 
            उस्मानाबाद येथील अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूलमध्ये आज जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबादच्या वतीने उर्दू लोकराज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  शिक्षक सय्यद फैसलअली, पठाण अखिल, शेख तलत फातेमा, शेख आर्शिया, जिल्हा माहिती कार्यालयातील भिमा पडवळ, आश्रुबा सोनवणे, सिध्देश्वर कोंपले, सचिन मोरे उपस्थित होते.
            पुढे बोलताना मीर सर म्हणाले की, या मासिकाच्या माध्यमातून  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अल्पसंख्यांकाच्या योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, विविध उपक्रम, शासन निर्णयासह विविध सामाजिक, सांसकृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल. शासनाने उर्दू भाषिकांसाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित व्हावे याकरिता या शाळेतील शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होणे गरजेचे आहे. अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूल या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी या मासिकाचे वर्गणीदार होतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
            उर्दू भाषिकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या व लोकराज्यची उर्दू आवृत्ती प्रत्येक उर्दू भाषिकांपर्यंत पोहोंचावी आणि विद्यार्थी व युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. उर्दू भाषेत दर्जेदार आणि अचूक ज्ञान देणारा लोकराज्य हे एकमेव मासिक आहे. या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असून वर्गणीदांना दरमहा अंक पोस्टाने घरपोच पाठविण्यात येतो. उर्दू भाषेचे जतन-संवर्धन व भाषेला चालना देण्याची यामागची शासनाची भूमिका आहे. उर्दू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय, सामाजिक, सांस्कृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल त्यासाठी उर्दू भाषिक व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित करावे, व सर्वांनीच वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक यासेरोद्यीन फहद मखदूम काझी यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना उर्दू लोकराज्य मासिकाचे अंक भेट म्हणून देण्यात आले.

            या कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.  

Thursday, 3 August 2017

खाजगी विद्यार्थ्यांनी 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत


उस्मानाबाद, दि. 03:- खाजगी विद्यार्थ्यांनी 12 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत, ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज दि. 31 जुलै 2017 ते दि. 21 ऑगस्ट 2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावयाची आहेत. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून दि. 01 ऑगस्ट 2017 ते दि. 23 ऑगस्ट 2017 या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in या वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजी मधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरावा असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

खाजगी विद्यार्थ्यांनी 10 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत


उस्मानाबाद, दि. 03:- मार्च 2018 साठी माध्यमिक शालान्त परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत, ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज क्रं. 17 ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबत सूचना काढून आपल्या माध्यमिक शाळेमार्फत याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज दि. 31 जुलै 2017 ते दि. 21 ऑगस्ट 2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावयाची आहेत. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून दि. 01 ऑगस्ट 2017 ते दि. 23 ऑगस्ट 2017 या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळेमध्ये जमा करावी. संबंधित संपर्क केंद्रांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत मंडळाकडे जमा करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजी मधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरावा असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

शेतकऱ्यांना 10 हजार रुपयाचे कर्ज तात्काळ देण्याचे शासनाचे निर्देश


उस्मानाबाद, दि. 03:- जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना शासन हमीवर 10 हजार रुपयाचे कर्ज तातडीने देण्याचे निर्देश सर्व राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना शासन निर्णय 14 जून 2017 व शुध्दीपत्रक दि. 20 जून 2017 नुसार प्रापत झालेले आहेत.  
            शासन निर्णय 28 जून 2017 अन्वये राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राबविणे बाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासन निर्णयानूसार खरी पिकासाठी 10 हजार रुपयाचे तातडीचे कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपले गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत/ग्रामीण/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संपर्क साधावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 चे विहीत नमुन्यातील कर्जमाफीचे अर्ज, सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व विकास सेवा सहकारी संस्था, सर्व बँका व CSC,SPV केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेल आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निंबधक सहकारी संस्था व त्यांचे कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

            कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरताना येणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकऱ्यांनी नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे. 

पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते


उस्मानाबाद, दि. 03:-  जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, उस्मानाबाद यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होते.  
            यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांचे नैराश्य त्यांचा एकलकोंडेपणा दूर होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी जास्तीत-जास्त प्रयत्न करुन पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर देखील शिक्षकांनी भर देऊन पुढील काळात यापेक्षाही जास्त जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा निकाल लागला पाहिजे असे प्रतिपादन करुन सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
            यावेळी पुर्वउच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी चे गुणानुक्रमे पहिले 5 शिष्यवृत्तीधारक, पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी चे गुणानुक्रमे पहिले 5 शिष्यवृत्तीधारक, शालान्त परीक्षा मार्च 2017 मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले 23 विद्यार्थी, जिल्हा परिषदेच्या एकूण 5 शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक, 100 टक्के गुण घेणारे खाजगी शाळेतील 6 विद्यार्थी, खो-खो खेळाची राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली प्रणीता पवार व स्वत:चा जीव धोक्यात घालून भावाला वाचवल्या बद्दल प्रगती गायकवाड या सर्वांना पुष्पहार, प्रशस्तीपत्र, डिक्शनरी व प्रशस्तीपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.    
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी केले. सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर आभार शिक्षणाधिकारी (निरंतर) कादर शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, सक्षणा सलगर, अस्मिता कांबळे, उध्दव साळवी, दत्ता देवळकर, कैलास पाटील, अभिमन्यु शितोळे, ज्ञानदेव राजगुरु उस्मानाबाद पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, लोहारा पंचायत समिती सभापती ज्योतीताई पत्रिके, उपसभापती कळंब भगवान ओव्हाळ, नगरसेवक सिध्देश्वर कोळी, शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन जगताप,  शिक्षणाधिकारी (मा.) औदुंबर उकिरडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व त्यांच्या पालकांनीही उपस्थिती दर्शविली होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची 117 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे सहाय्यक पुरुषोत्तम रुकमे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळानुरुप बदलले पाहीजे-राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.2:- प्रत्येक गोष्ट डिजीटलायझेशन प्रमाणे बदलली असून येणाऱ्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळानुरुप बदल केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उमरगा येथे 16 व्या महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 
           उमरगा येथे 16 व्या महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उस्मानाबादे उपविभागीय अधिकारी  चेतन गिरासे, उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी आदिंसह सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, येणारा काळ हा डिजीटल युगाचा असल्याने आपल्याला संगणकीकृत ऑनलाईन डिजीटल सातबारे, महसूलचे सर्व दाखले डिजीटल स्वरुपात द्यावे लागणार असल्याने काळानुरुप महसूलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनेदेखील बदलले पाहिजे, त्याचबरोबर लोकसेवा हक्क कायदा आल्याने आपल्याला सर्व कामे वेळेत करावी लागणार आहेत. त्यासाठी कामात गतीमानता आणून सर्व कामे पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
            त्यानंतर महसूल विभागात काम करणाऱ्या प्रत्येक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महसूल विभागातील गुणवंत पाल्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना डिजीटल सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार उमरगा तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे यांनी व्यक्त केले.  यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उस्मानाबादचे उपविभागीय   अधिकारी चेतन गिरासे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोहिते आदिंनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Tuesday, 1 August 2017

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डिजीटल 7/12 चे वाटप



उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी कार्यालयात 01 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत डिजीटल 7/12 चे वाटप जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले.
          उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी, किणी, बुकनवाडी, कावळेवाडी, कोळेगाव, वाखरवाडी, घाटंग्री, देवळाली, खामसवाडी येथील खातेदारांना प्रातिनिधीक स्वरुपात डिजीटल 7/12 जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित खातेदारांशी संवाद साधला.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी, अविनाश पाठक, प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे, मंडळ अधिकारी नाईकनवरे, चौरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  
          यावेळी जिल्हाधिकारी  श्री. राधाकृष्ण गमे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी, अविनाश पाठक, प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.