उस्मानाबाद. दि. 5:- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,
अडचणी सोडवून त्यांना तत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी 'लोकशाही दिन' जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय
आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. जिल्हयाचा लोकशाही दिन हा
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो. कार्यपध्दती सुलभ व्हावी
यासाठी तालुकास्तरावरही लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे, असे उमरगा तहसीलदार श्री. अरविंद बोळंबे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या
सोमवारी मंत्रालयस्तर तसेच जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर, दुस-या सोमवारी
विभागीय आयुक्तस्तर व तिस-या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन होणार आहे. या
दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास
त्यानंतरचा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.तालुकास्तरीय
लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असतील. लोकशाही दिनाचा कार्यक्रम
संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात येईल.
अर्ज विहित नमुन्यात म्हणजे नमुना
प्रपत्र 1 अ ते 1 ड मध्ये
असावा. अर्जदाराची तक्रार अथवा निवेदन
वैयक्तिक स्वरुपाचे असावे व चारही
स्तरांवरील लोकशाही दिनाकरिता अर्ज 15
दिवस आधी 2 प्रतींमध्ये पाठविणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने
जिल्हास्तरीय/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्जदाराला अर्ज करता येईल. या
लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय
आयुक्त यांच्या व त्यानंतर दोन महिन्यांनी मंत्रालयस्तरीय लोकशाही दिनात अर्जदारास
अर्ज करता येईल.
लोकशाही
दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात
नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले
जाणार नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच
विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर. यानुसार जे
अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत ते संबंधित विभागाकडे
आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत
करण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनासाठी
उप विभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पाटबंधारे, कृषि, सहकार,
बांधकाम, पाणीपुरवठा या विभागांचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती
असणार आहे. ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येणार नाही.
जनतेकडून प्राप्त झालेल्या
अर्जाची पोचपावती प्रपत्र 2 प्रमाणे देण्यात येईल. सर्व स्तरावरील लोकशाही
दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाच्या
विभाग प्रमुखांकडे सदर अर्ज पाठविण्यात येईल व विभागप्रमुख या अर्जातील
विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल,
अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या
बाबींचा विचार करुन लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील.
अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही
दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याचा आत देण्यात येणार आहे. जनतेने द्यावयाच्या अर्जाच्या नमुना प्रती त्यांना
विनासायास विनामुल्य उपलब्ध आहेत,
लोकशाही दिनाच्या माध्यमातून आपल्या तक्रार, निवेदनांचे सामोपचाराने निराकरण
करावे, असेही प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले
आहे.

