उस्मानाबाद,दि.15:-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा
प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस
अधीक्षक पंकज देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या
मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात जनतेला
शासकीय योजनांविषयीचे जनजागरण व्हावे याकरिता “संवाद पर्व” हा उपक्रम राबविण्यात आला.जनतेचा विश्वास …जनतेशी संवाद “संवाद पर्व” या उपक्रमास उस्मानाबादकरांनी उत्स्फूतर् प्रतिसाद
दिला.
यानिमित्ताने या अभियानात जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, जिल्हा रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी
गणेश काकडे आणि सहायक पोलीस निरिक्षक विरयानी
कदम हे सहभागी झाले होते. जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या या अभियानाची
सुरूवात गणेशनगरमधील शिवसह्याद्री गणेश मंडळात पहिला कार्यक्रम घेवून करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे कैलास पुरी, चेतन
साळुंखे, शिवाजी मुळे, प्रवीण तट, संजय लोखंडे, डॉ. विवेक माने हे कार्यकर्ते व
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी “संवाद
पर्व” कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांना समजावून
सांगितला.त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा जनतेने अभ्यास करावा,शासनाच्या कोणकोणत्या
संकेतस्थळावरून शासकीय योजनांची माहिती मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे
उपक्रम कोणकोणते आहेत याविषयी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यानंतर श्री बाल
हनुमान गणेश मंडळ,गवळी गल्ली या गणेशोत्सव मंडळात “संवाद
पर्व” हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी उस्मानाबाद पोलीस
अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलच्या
प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक
विरयानी कदम यांनी उपस्थित नागरिकांना
सायबर सेल आणि त्याचे काम,सायबर गुन्हे याबाबतची माहिती देवून प्रबोधन केले,याशिवाय
स्त्रियांविषयीच्या कायद्यांचीही माहिती त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित
असलेल्या महिलांना दिली.
त्यानंतर जिल्हा रूग्णालयाचे कार्यक्रम
अधिकारी श्री.गणेश काकडे यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या
सुविधा,आरोग्य विभागातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा, हेल्पलाईन क्रमांक
याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी मंडळाचे भालचंद्र हुच्चे,काशिनाथ दिवटे
मन्मनाथ पाळणे,गजानन गवळी,विष्णुदास सारडा बंडू गवळी हे पदाधिकारी उपस्थित होते.उस्मानाबादमधील
प्रतिष्ठित असलेल्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून अशा प्रकारचा उपक्रम राबविला
जाण्याची ही पहिलीच वेळ असून याबाबत हे शासन जनतेच्या विकासासाठी संवेदनशील
असल्याची खात्री झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अशाच प्रकारे सम्राट गणेश मंडळ, सावरकर
चौक, शिवसह्याद्री गणेश मंडळ, गणेश नगर,शिवप्रताप बाल गणेश मंडळ, सांजा चौक या ठिकाणीही
“संवाद पर्व” उपक्रम राबविण्यात आला.या
सर्व ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी पशुसंवर्धन
विभागाची माहिती, या विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्हा रुग्णालयाचे
कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे नागरिकांना देण्यात
येणाऱ्या सुविधा,आरोग्य विभागातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा, हेल्पलाईन
क्रमांक याविषयी, सहायक पोलीस निरिक्षक
विरयानी कदम यांनी सायबर सेल आणि त्याचे
काम,सायबर गुन्हे याबद्दल तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी “संवाद पर्व” कार्यक्रमाचा उद्देश,
शासनाच्या कोणकोणत्या संकेतस्थळावरून शासकीय योजनांची माहिती मिळू शकते, माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाचे उपक्रम कोणकोणते आहेत याविषयी जनतेचे प्रबोधन केले. या
सर्व उपक्रमात दूरदर्शनचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी विशेष सहकार्य केले.
या
सर्व गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले,शासनाचे
अभिनंदन केले, माहिती जनसंपर्क महासंचालनालय,जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा
प्रशासन यांनी गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख उत्सवाच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम
खरोखरीच अत्यंत स्तुत्य असल्याचे जाहीरपणे सांगितले.