Friday, 2 February 2018

जिल्हा कोषागार कार्यालयास कोषागार दिनी ISO मानांकन प्रदान





कोषागार कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे यश प्राप्त
- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
          उस्मानाबाद, दि.02 :-  कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत केली, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेशिवाय जादा तास काम करुन कार्यालयाचे रुपडे बदलून कार्पोरेट कार्यालयाचा दर्जा मिळवण्यासाठी जी मेहनत घेतली त्यामुळेच ISO मानांकन हे यश प्राप्त झाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी येथे केले.  
1 फेब्रुवारी 1962 साली लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना झाली, 1 फेब्रुवारी 1965 रोजी मुख्य वित्त व लेखा सेवा सुरु करण्यात आली त्याअनुषंगाने 1 फेब्रुवारी 2018 रोजी कोषागार दिन निमित्त कोषागार कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे, इतिहास संशोधक प्रा. सतिश कदम यांची प्रमुख  उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी मी ज्यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो त्यावेळी मी कोषागार कार्यालयास भेट दिली होती, त्यावेळी मी कोषागार अधिकारी यांना काही सुचना दिल्या त्या सुचनांचे पालन करुन कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करुन शासकीय कार्यालयाचे रुप बदलले, आज कोषागार कार्यालय हे जिल्हयातील आदर्श शासकीय कार्यालय असून येथील सेवा हया उत्तम दर्जाच्या आहेत. अभिलेख अद्ययावतीकरण, पेन्शन लायब्ररी यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यालयाने राबविले असून इतर कार्यालयांनीही मार्गदर्शन घेऊन आपल्या कार्यालयात देखील असे उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.   
कोषागार कार्यालयांतर्गत सर्व अभिलेख अद्ययावत करुन ते सहजपणे कोणत्याही कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील या पध्दतीने मांडणी केली आहे, कामानिमित्त येणाऱ्या सेवानिवृत्तीधारकांसह विविध कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना बसण्याकरीता व्यवस्था व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम कोषागार कार्यालयाने केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी बोलताना केले.
चलन व्यवस्थेत प्राचीन काळापासून होत असलेला बदल अधोरेखित करुन कोषागाराचे महत्व व निजाम काळातील कोषागार व आत्ताच्या कोषागार कार्यालयाशी संबंधित अनेक ऐतिहासिक दाखले याप्रसंगी बोलताना इतिहास संशोधक प्रा. सतिश कदम यांनी यावेळी दिले.
औरंगाबाद विभागातील पहिले ISO 9001:2015 मानांकन प्राप्त कोषागार कार्यालय म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ISO 9001:2015 प्रमाणपत्र  प्रदान करुन कोषागार कार्यालयाचा गौरव करण्यात आला.  

या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, मराठवाडा निवृत्तीवेतनधारक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास दानवे, एस.बी.आय. बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिलकुमार पांडे, ॲक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक किशोर पाटील, एच.डी.एफ.सी बँकेचे शाखा व्यवस्थापक महादेव मगे, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, सहाय्यक संचालक स्थानिक निधी व लेखा किरण घोटकर, अप्पर कोषागार अधिकारी आप्पासाहेब पवार, निलेश साखरे, कोषागार विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.   

Tuesday, 30 January 2018

कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळालेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन

उस्मानाबाद दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. 

कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद






उस्मानाबाद, दि.30 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद व जिल्हा विधीज्ञ मंडळ, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथील बस स्थानक प्रांगणात शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ याबाबत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश शब्बीर अहमद औटी हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष निलेश बारखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचे एकूण 16 स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले होते.
            समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी, विकास योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात व जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा या मुख्य हेतूने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
            देशाचा प्रत्येक नागरिक हाच देशाचा उर्जा स्त्रोत आहे. आपल्या राष्ट्राला सुखी व समृध्द बनवायचे असेल तर प्रथम गरीबी निर्मुलन खूप महत्वाचे आहे. आर्थिकदृष्टया दूर्बल घटकांसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कोणत्याही योजनेचा उद्देश समाजातील प्रत्येक दूर्बल घटकांपर्यत विविध योजना राबवून त्यांना दशनिर्मितीत सामिल करुन घ्यावयाचे. योजना  प्रभावीपणे राबवून त्याचा फायदा गरजू लोकांपर्यत पोहोचविणे, त्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती उंचावणे व त्यांना देशनिर्मितीत सामावून घेणे त्यामुळेच देशाचा सर्वांगीण विकास होईल व आपल्या स्वप्नातील भारत साकार होईल. सन 2022 मध्ये आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहोत, त्यामुळे त्या पर्वामध्ये आपल्या देशातील अंतीमातील अंतीम व्यक्ती आनंदाने सामील व्हावा, त्यांचयावरील दूर्बलतेचा शिक्का, दडपण असणार नाही, तो सामाजिकरित्या सशक्त असेल, आत्मनिर्भर असेल, स्वावलंबी असेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर श्री. एस.बी. देसाई यांनी प्रास्ताविकात केले.
            उस्मानाबाद जिल्हयातील नागरीक बऱ्याचअंशी शेती व शेतीवरील व्यवसायांवर आधारित आहेत. जिल्हा प्रशासन जलयुक्त शिवार, बळीराजा चेतना अभियान यासारख्या अनेक योजना प्रभावीपणे राबवित आहे. उस्मानाबाद जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांनी जरबेरा फुल शेती, दुध उत्पादक कंपनी यासारखे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन भरघोस उत्पादन घेतले आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन विविध शासकीय योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून कामकाज करीत आहे, शेतकऱ्यांनीदेखील शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेवून समृध्द होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी केले.
            सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क, अधिकार याची जाणीव व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेने जास्तीत-जास्त योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पूढे आले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी केले.
            मेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणाकडील सामाजिक कायदे व योजनांसह सर्व शासकीय विभागातील कल्याणकारी व विकास योजनांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास, एकात्मिक बाल विकास, महसूल, दूरसंचार, ग्रामीण विकास, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा रेशीम विकास महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, कामगार कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र या विभागांचे या मेळाव्यात स्टॉल्स लावण्यात आले होते. 
यावेळी जिल्हा न्यायालयातील विधीज्ञ, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, पोलीस, नगर परिषदेचे कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

कुष्ठरोग निवारण दिन साजरा


उस्मानाबाद, दि.30 :-  बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत कुष्ठरोगाचे प्रमाण 1 पेक्षा कमी आणणे हे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. कुष्ठरोगाचे प्रमाणे 1 पेक्षा कमी करण्यासाठी राज्यात विविध अभियान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येत आहेत. मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.
            दरवर्षी दि. 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन व 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येतो. यामध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती दिली जाते.
            30 जानेवारी कुष्ठरोग दिनाच्या निमित्ताने आजरोजी काकडे प्लॉट येथे जिल्हास्तरीय प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. वडगावे यांनी कुष्ठरोगाविषयी माहिती सांगीतली. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी कुष्ठरोगाबाबत संदेश वाचन केले त्यानंतर सर्वांनी कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ घेतली.
            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, डॉ. मिटकरी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. खडके, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग व शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रभातफेरीस हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रभातफेरी शहरातील भाई उध्दवराव पाटील शाळा, नगर परिषद शाळा क्र. 17, आदर्श कॉलनी परत भाई उध्दवराव पाटील शाळा अशी काढण्यात आली.
            शेवटी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थ्यांचे आभार मानुन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक व कुष्ठरोग कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.