Saturday, 25 March 2017

उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयेाजन


उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांचेकडील 241 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेउन निवड करणार आहेत.
एसबीआय लाईफ  इन्सूरन्स कंपनी ली. उस्मानाबाद  मध्ये ॲडवायजर  पदांची संख्या 30, पात्रता इ.10/12वी किंवा पदवी पास, सन ऍ़ल्यमिनियम  ॲन्ड फॅब्रिकेशन, प्लायग्लास ॲन्ड  हार्डवेअर  बार्शी  नाका, उस्मानाबाद या कंपनीत  अकाउंटटसाठी एक स्त्री, एक पुरूष, पात्रता बीकॉम/ एमकॉम पास, सेल्समन दोन, पात्रता इ. 12 वी पास, पेंटर एक, आयटीआय ट्रेड,  ग्लास  कटर एक, पात्रता  आयटीआय ट्रेड, हेल्पर 4, पात्रता 10 वी पास, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत किल्लारी, ता.औसा जि.लातुर (प्रशिक्षण अनिवार्य)- मेसन 50, पात्रता  इयत्ता 5 वी  किंवा  आयटीआय  मेसन, बार बेंडीग 50, पात्रता इयत्ता 5 वी पास, वेल्डींग 50, पात्रता इयत्त 10 वी  किंवा  आयटीआय  वेल्डर, नर्सींग  सहायक - 50, पात्रता इयत्ता 8 वी पास (फक्त मुलींसाठी) या  सर्व  पदासाठी  वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे अशी राहील.
वेतन  शैक्षणिक  व  पदाच्या योग्यतेनुसार देण्यात येईल कॅन्टीन, निवास, ट्रान्सपोर्टेशन इत्यादी  सोई/सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या  वेळी  कंपनीचे  अधिकारी/उद्योजक  सविस्तर  माहिती  व  मार्गदर्शन करतील.

        शैक्षणिक पात्रतचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्पलॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 02 पासपोर्ट साईझ फोटो इत्यादी. सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स  कॉपीसह  प्रत्यक्ष  जिल्हा  कौशल्य  विकास रोजगार व  उद्योजकता  मार्गदर्शन  केंद्र, मध्यवर्ती  प्रशासकीय  इमारत, तळ मजला, उस्मानाबाद येथे  गुरूवार  दिनांक 30 मार्च 2017 रोजी  सकाळी  11 वाजता  स्वखर्चाने  हजर  राहून खाजगी  क्षेत्रातील  रोजगारांच्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र : 02472–222236 वर संपर्क करावा, असे आवाहन  सहायक  संचालक, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार  व  उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र  उस्मानाबाद यांनी केले आहे.

आर.टी.ई.नुसार 25 टक्के मोफत प्रवेश पात्र पालकांनी दि.3 एप्रिल 2017 पर्यंत प्रवेश घ्यावा -सचिन जगताप


                                                            
उस्मानाबाद,दि.25:बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणांतर्गत  दुर्बल  आणि  वंचित घटकांना विनाअनुदानीत  आणि  कायम  विनाअनुदानीत  शाळांमध्ये  किमान 25  टक्के प्रवेश  तरतूद आहे.  त्याप्रमाणे  ऑनलाईनव्दारे  पहिल्या  लॉटरी  मधील  फेरी  क्र.2 नुसार  निवड झालेले किंवा न झालेल्या पालकांना त्यांच्या नोंद केलेल्या मोबाईलवर क्रमांकावर दिनांक 23 मार्च 2017  रोजी  SMS  पाठविण्यात आले आहेत.
 पात्र  पालकांनी   दिनांक 3 एप्रिल 2017  पर्यंत  त्यांच्या  ॲपलिकेशन  नंबर  व  पासवर्ड वापरुन शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या स्वाक्षरीचे ॲडमीट  कार्ड  काढावे  व  सोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे  तहसिलदार  यांचे सन 2015-16 चे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवाशी  पुरावा, रंगीत  फोटो  व  अपंगत्व  असल्यास  प्रमाणपत्र  इत्यादी  कागदपत्र  सादर करुन   निवड   झालेल्या  शाळेत  प्रवेश  घ्यावा.

ज्या  विद्यार्थ्यांची  निवड  झालेली  आहे अशा विद्यार्थ्यांची  यादी  मुख्याध्यापक  यांच्या  लॉगिंनवर  दिसत आहे. दिनांक 3 एप्रिल 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्राची व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या  स्वाक्षरीचे  ॲडमीट  कार्डची  तपासणी  करुन  सदरील विद्यार्थ्यांस मुख्याध्यापक लाँगीन  वर  जाऊन  कागदपत्रे  पूर्ण  असल्यास  Admitted   म्हणावे, कागदपत्र  पूर्ण  नसल्यास  मुख्याध्यापकांना  दिलेल्या  मुदतीच्या  शेवटच्या  दिवशी Rejected म्हणावे. काही  पालक विहीत  मुदतीत  शाळास्तरावर  प्रवेशासाठी आलेच नाही तर अशा पालकांना मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावरुन  दूरध्वनीवरुन   संपर्क  साधावा  तरीही  दिलेल्या मुदतीत  न आल्यास त्यांना  Not Approached  म्हणावे.मुख्याध्यापक  लॉगिंन वर एकही विद्यार्थी Pending राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  सचिन  जगताप  यांनी  केले  आहे.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


उस्मानाबाद, दि.25:- जिल्हयात  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सन 2016 मध्ये एकूण 1 हजार 77  क्षयरूग्ण शोधून उपचार करण्यात आले आहेत.
            या कार्यक्रमांतर्गत  जिल्हा  क्षयरोग  कार्यालय  येथे धन्वंतरी व क्षयरोगाच्या जंतूंचे संशोधक डॉ.राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार हार घालून जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. याप्रसंगी एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते .  या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या हस्ते  हिरवा  झेंडा  दाखविण्यात  आला.
यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले,सहायक संचालक डॉ.खडके,जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे,अधिष्ठाता आयुर्वेद महाविद्यालय श्रीमती डॉ. पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी, माता  व बाल संगोपन अधिकारी के. के. मिटकरी, अतिरिक्त  जिल्हा  आरोग्य  अधिकारी  डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप एन. एन. बोरकर,  अधिकारी डॉ. दीपक पंडीत, जिल्हा रूग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती शेख,श्री. काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनजागरण रॅलीमध्ये शासकीय परिचारिका प्रशिक्षण केद्र, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, शिवाजीराव घोगरे नर्सिंग कॉलेज,जीवनज्योत नर्सिंग कॉलेज,के.टी. पाटील नर्सिंग कॉलेज,बील गेटस नर्सिंग  कॉलेज,येथील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक यांचा सक्रिय सहभाग होता.
जिल्हयातील क्षयरोग  पथके, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य  केंद्रावर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली , रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम  यशस्वी  होण्यासाठी  जिल्हा  क्षयरोग  कार्यालयाचे एन. एच. जोशी, डी. एस. व्हटकर, श्री. साबणे, श्री. चव्हाण, श्रीमती हंचाटे,श्री. नलावडे, श्री. पवार, श्रीमती द्वासे, श्री. काझी यांनी  विशेष  परिश्रम घेतले. 

Thursday, 23 March 2017

24 मार्च 2017 रोजी नळदूर्ग किल्ल्यावर पत्रकार अभ्यास दौरा समारोप


          








उस्मानाबाद दि. 23:- जिल्हा माहिती कार्यालय आयोजित पत्रकार अभ्यास दौरा दि. 16,20 व 22 मार्च 2017 रोजी केला होता. आज दि 24 मार्च 2017 रोजी नळदूर्ग किल्ला परिसरात अभ्यास दौ-याचा समारोप लातूर विभागाचे उपसंचालक ( माहिती) तथा प्रभारी संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय औरंगाबाद विभागाचे  यशवंत भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
          या पत्रकार अभ्यास दौरा समारोप कार्यक्रमास सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि.चे मॅनेजिग डायरेक्टर कफील मौलवी,डायरेक्टर जयधवल करमरकर, भरत जैन, जनसपर्क अधिकारी अनिल विपत, औरंगाबाद पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित कुमार खंदारे व सोलापूर दै. सकाळचे संपादक अभय दिवाणजी उपस्थित राहणार आहे.
          महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेंतर्गत या कंपनीमार्फत नळदूर्ग किल्‍ल्याचे जतन व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. व नळदूर्ग किल्‍ल्यास पर्यटन क्षेत्रात उच्चांकावर नेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. नळदूर्ग किल्ला हा 17.39 अक्षास व 76.25 पूर्व रेखांक्षावर ‍स्थित आहे. निजामाच्या कालावधीत नळदूर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. सध्या नळदूर्ग किल्ला हे स्मारक महाराष्ट्र  प्राचीन स्मारके, पुराण वस्तु शास्त्र व औवेशेस अधिनियम 1960 नुसार पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांच्या नियंत्रणात आहे.
            जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हयातील पत्रकारांसाठी  पत्रकार अभ्यास दौरा दि. 16 मार्च 2017 रोजी  हिंगळजवाडी  ता. उस्मानाबाद- कडकनाथ कुकुटपालन, कसबे तडवळे ता. उस्मानाबाद- बंदिस्त शेळी पालन, गौर ता. कळंब- कांदा बीज उत्पादन व येरमाळा ता. कळंब – उस्मानाबाद जिल्हयातील आय एस. ओ पोलीस स्टेशन  येथे आयोजित केला होता.
          दि. 20 मार्च 2017 रोजी सारोळा ता. उस्मानाबाद- बियाणे उत्पादन प्रक्रिया, पाडोळी ता. उस्‍मानाबाद- मागेल त्याल शेततळे व उस्मानाबाद येथील हातलाई (डोंगर). दि. 22 मार्च 2017 रोजी  मानकेश्वर ता. भूम – तुती लगवड, लोणी ता. परंडा- अंगणवाडी, वांगी ता. भूम – जैविक किटकनाशके कंपोस्ट खत व वालवड ता. भूम भाजीपाला उत्पादन व विक्री या बाबतचा अभ्यास दौरा झाला आहे.

           दि. 24 मार्च 2017 रोजी बेंबळी ता. उस्मानाबाद- नामानंद फूडस व नळदूर्ग ता. तुळजापूर येथील किल्ल्यास भेट व पाहाणी दौरा केला असून येथे पत्रकार अभ्यास दौरा कार्यक्रमाचा सांगता समारोप होणार आहे. तरी जिल्हयातील पत्रकार बंधूंनी या दौ-यास मोठया संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप  यांनी केले आहे.

नवजात बाळाच्या स्वागताचा उस्मानाबाद पॅर्टन “जन्मोत्सव” डॉ. आणि रूग्ण नाते मित्रत्वाचे -डॉ.प्रशांत नारनवरे



                     
उस्मानाबाद,दि.23:-सध्या डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. मात्र उस्मानाबादमधील  जिल्हा रूग्णालय आणि येथील स्त्री रूगणालय येथील वातावरण  मात्र अत्यंत खेळीमेळीचे सहकार्याचे असल्याचे दिसून येते, येथे नवजात बाळाच्या स्वागताचा जन्मोत्सव साजरा करताना पाहून मन कृतकृत्य झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा रूग्णालयाच्या वतीने नवजात बाळाच्या जन्माचा जन्मोत्सव साजरा करण्याचा अभिनव उपक्रमास आज सुरूवात झाली, या उपक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती  अधिकारी मनोज शिवाजी  सानप,बालरोग तज्ञ डॉ.अशोक धुमाळ,बालरोग तज्ञ  डॉ.दिग्गज पाटील,स्त्री रोग तज्ञ डॉ.पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ.बागल मॅडम, स्त्री रोग तज्ञ डॉ.टिके मॅडम हे  उपस्थित  होते.
डॉ.नारवरे म्हणाले की, सध्या डाक्टर्स आणि रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक यांच्यामधली  संबंध काहीसे तणावपूर्व होत आहेत. याला वेगवेगळी परिस्थिती कारणीभूत आहे हे निश्चित मात्र तरीही रूग्ण आणि‍ रूग्णांचे नातेवाईक यांचे मानसिक संतुलन सांभाळणे  ही  रूग्णालयातील सर्वांचीच जबाबदारी आहे. रूग्णांलयात  रूग्णालयाचाच सर्वोच्च  प्राधान्यायाने  विचार व्हायला हवा, विज्ञानाच्या पलिकडे जावून रूग्णाचे मनही जपले पाहिजे फक्त आौषधांनी नव्हे तर सामाजिक भान/आस्था या भावनेतूनही उपचार व्हायला हवेत. असे सांगून डॉ.नारनवरे म्हणाले की, समाजशास्त्र/सामाजिक शास्त्र याचाही डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात समावेश होणे ही काळाजी गरज बनली आहे.
उस्मानाबादमधील जिल्हा रूग्णाल्याने विविध उपक्रमांच्या खुल्या माध्यमातून गांभिर्याने वैद्याकीय क्षैत्राचे समाजकारण केले आहे, या रूग्णालयाने ई-ब्लड बॅक, आधार@ईबर्थ सारखे अत्यंत अभिनंदनीय उपक्रम सुरू करून वैद्यकीय क्षेत्राचे तसेच उस्मानाबाद जिल्हयाचे नाव उज्ज्वल केले आहे, याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या  रूग्णालयातील  सर्व डॉक्टर्स, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले. प्रास्ताविकात डॉ.माले  यांनी  डॉक्टर व रूग्ण,त्यांचे नातेवाईक यांचे संबंध मैत्रीपूर्ण व्हावे याकरिता रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जातात, रूग्णालय जास्तीत जास्त स्वच्छ राहील याकरीता जिल्हा रूग्णालय प्रशासन करीत असलेले प्रयत्न याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तसेच त्यांनी उपस्थित रूग्णांच्या नातेवाईकांना आवाहन केले की,नातेवाईकांनीही वार्डची काळजी घ्यायला हवी, आपले रूग्णालय आपणच स्वच्छ ठेवायला हवे, रूग्णालय आपलेच आहे  या भावनेतूनच रूग्णालयाशी आणि येथील सर्व  डॉक्टर्स,नर्सेसशी  मैत्रीचे संबंध प्रस्थापित  करावेत.
या आवाहनास प्रतिसाद देवून रूग्णालयात दाखल दोन रूग्णाच्या नातेवाईकांनी इलेकट्रॉनिक  वजन  काटा, तसेच  लहान बाळांचे  कपडे  रूग्णालयास  भेट दिली.

या  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  मंदाकिनी शिंदे  यांनी केले .या कार्यक्रमात सहायक अधिसेविका श्रीमती मंदाकिनी शिंदे, श्रीमती व्हि.के.साबळे, श्रीमती एस.एम.बागडे, श्रीमती एस.बी जावरकर, श्रीमती के.शेख, श्रीमती व्हि.आर.दलभंजन, श्रीमती एस.डी. भालेराव, भोसले, श्रीमती सिरसाठ,श्रीमती संगीता चिरके तसेच जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा,संतोष जाधव,बालाजी निरफळ हे ही उपस्थित होते.

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थींनी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक दयावे. -आयुष प्रसाद


उस्मानाबाद,दि.23:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, यांच्याकडील शासन निर्णय दि.18 जून 2016 नुसार संगायो, इंगायो, श्राबायो, या योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान DBT (Direct Benefit Transfer)  प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दि. 1 एप्रिल 2017 पासून जमा करण्यात येणार आहेत.
      दि. 22 मार्च रोजी उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे बँक मित्र यांची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसिलदार आयुष प्रसाद यांनी बैठक घेवून त्यांचे कडे संबंधीत गावचे लाभार्थींची यादी देवून संगायो, इंगायो, श्राबायो, या योजनेच्या लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडणेबाबत सूचना दिल्या.
            उस्मानाबाद तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, अपंग व विधवा निराधार योजनेच्या लाभार्थींनी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेचे संबंधित बँक मित्राशी संपर्क करून  बँक खाते काढून घ्यावेत व सदर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी यांचेकडे दि.31 मार्च 2017 पुर्वी जमा करावे, असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसिलदार आयुष प्रसाद यांनी केले आहे.  

2 एप्रिल रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण


उस्मानाबाद,दि.23:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. 2 एप्रिल 2017 रोजी संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार आहे.या मेहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले  यांनी  दिली आहे.
      पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेसाठी उस्मानाबाद जिल्हा व शहरी विभागात, उस्मानाबाद-59, तुळजापूर -23, नळदुर्ग-18, उमरगा -19, मुरूम-15, कळंब-18, भूम-8, परंडा-8, असे  एकूण 168 लसीकरण बुथ (केंद्र)  स्थापन करण्यात येणार आहेत.

      याशिवाय बसस्थानक, बाजार, बांधकाम, टमटम थांबा, सेल्स इत्यादी ठिकाणी ट्रान्झीट टिम ची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व पालकांनी दि.2 एप्रिल 2017 रोजी आपल्या नजिकच्या लसीकरण केंद्रावर जावून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस अवश्य पाजून घ्यावा, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले  यांनी  केले आहे.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जागतिक वन दिनानिमित्त स्वच्छता मोहीमेसह वृक्षलागवड कायर्क्रम



उस्मानाबाद,दि.22:-जागतिक वन दिनाचे औचित्य साधून येथील वनीकरण विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक व निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. निकत, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. उडानशिवे, संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत गाऊन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेबाबत घोषणा देवून इमारत परिसर दणाणून सोडला व स्वच्छता मोहीम हाती घेवून इमारत परिसरातील चारहीबाजूचा परिसर स्वच्छ केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीत "कावळा करतो काव-काव, माणसा एक तरी झाड लाव", "गुटखा खा, जा मरून", "खाल्ला गुटखा, आला झटका", "उंची लोग, उंची पसंद, उंची बिमारी " व "इकडे तिकडे पाहू नका, इकडे तिकडे थुंकू नका" अशा प्रबोधनपर घोषणा दिल्या. यावेळी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी श्री.बी.बी. जाधव, शिल्पनिदेशक एस.टी. राऊत, डॉ. विलास जोंधळे,के.डी. नाईक, दयानंद विधाते उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी देशभक्तीपर एकपात्री एकांकिका सादर करून उपस्थितांची दाद  मिळवली. या एकांकिका  सादरी करणा नंतर  विद्यार्थींनी कु. रजनी भंणगे, कु. मोनिका गुट्टे, मिना गरगटे व सौ. स्वाती भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांमधून अविनाश जावळे, अजय राऊत, अजिंक्य भातलवंडे, विनोद गिरी यांनी मनोगत व्यक्त करुन जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांचे आभार व्यक्त केले.


शेवटी सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनीना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.              

Monday, 20 March 2017

महिला बचत गटांच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज -कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु



उस्मानाबाद,दि.19:-महिला बचतगटांनी निर्माण केलेलल्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच घटाकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर,उमेद,कृषी विभाग,आत्मा,स्वयंशिक्षण प्रयोग  यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केद्र,तुळजापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी  उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती  सावित्रीबाई  फुले व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आत्माचे प्रकल्प  संचालक विजय हिरेमठ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. चोले, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक ढवण, कृषी  विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ  प्रा.सचिन सूर्यवंशी,डॉ.अनिता जिंतूरकर,डॉ.विलास टाकणखार,प्रा.अपेक्षा कसबे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ.वेंकटेश्वरलु म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा व मराठवाडयातील महिला बचतगट विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सक्षम आहेत.त्यांना शासनाच्या विविध योजनेतून पाठबळही मिळत आहे. मात्र बचत गटानी निर्माण केलेल्या मालाला योग्य  भाव (मार्केटिंग) मिळण्यासाठी योग्य बाजारपेठेची गरज आहे.ही बाजारपेठ उपलबध करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मोठ-मोठया कंपनीच्या  वस्तू न खरेदी करता, महिला गटांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात,जेणे करून त्यांना मार्केटिंगची अडचण येणार नाही.

यावेळी डॉ.ढवण म्हणाले की, वैचारिक सक्षमिकरणाची  प्रक्रिया पूर्ण झाली तर आर्थिक्‍ सक्षमिकरण होण्यास मोठी मदत होणार आहे.

यशस्वी महिला गटांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विवम घनकचरा व्यवस्थान,औरंगाबादच्या श्रीमती.निर्मला कांदलगावकर,विद्यापीठ कार्यकारणी सदस्य आनंद चोंदे,शास्त्रज्ञ डॉ.अप्पाजी चारी, जिल्हा परिषदचे स्वच्छ भारत मिशनचे रमाकांत गायकवाड व महिला शेतकरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर भाषन केले.

या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला बचतगटानी बनविलेल्या विविध  वस्तूचे दहा स्टॉल लावण्यात आले होते.वस्तू खरेदीसाठी तुळजापूर व परिसरातील  महिलांनी  या  स्टॉलवर  मोठी  गर्दी  केली  होती.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व उमेदचे तालुका समन्वयक संदिप दाभाडे यांनी केले,तर सूत्रसंचालन व आभार रमेश पेठे यांनी मानले. यावेळी  या महिला  मेळाव्याला महिला  बचतगट, शेतकरी  महिला  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होत्या.