Thursday, 9 February 2017

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रास उत्कृष्ट प्रतिसाद हॉकी, फुटबॉल , कुस्ती खेळाचे प्रशिक्षण शिबिरास सुरवात


उस्मानागाद.दि.9:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद  आयोजित हॉकी, फुटबॉल, कुस्ती, खेळांच्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे उद्घाटन दि. 6 फेबुवारी 2017 रोजी सांय. 5.30 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि  प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा हॉकी / फुटबॉल संघटननेचे सचिव श्री. जावेद शेख व प्रा. रवि चव्हाण, वाशी तालुका यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे  करण्यात आले.
 याप्रसंगी  हॉकी, फुटबॉल, कुस्ती खेळाचे मिळुन एकुण 180 प्रशिक्षणार्थी शिबिरास सहभागी आहेत. ही प्रशिक्षण शिबीर  दि 6 ते 15 फेबुवारी,2017 या कालावधीत  सकाळी व संध्याकाळी दोन्ही सत्रात  सुरु आहे.  प्रशिक्षणार्थींना संपूर्ण अद्यावत क्रीडा साहित्य, सकाळी  पोष्टिक आहार दिला जात आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी  सांगितले आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. जावेद शेख यांनी  खेळाडूंनी जिद्दीने सराव केल्यास यश नक्कीच मिळते असे सांगितले. या प्रशिक्षण शिबिरासाठी  राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक, फुटबॉल- श्री. एम.झेङ शेख, हॉकी- श्री. झेङ आय. कुरेशी, कुस्ती - श्री. एस. एम. वांजळे  यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जात आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा गरजूंनी लाभ घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी –सुनिल यादव



उस्मानागाद.दि.9:- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम एम.डी.ए.2016-17 अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय, उस्मानाबाद यांनी  दि.10 ते 14 फेब्रुवारी 2017 या दरम्यान आयोजित केलेल्या सामुदायिक हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा जिल्हयातील गरजू जनतेनेही लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी केले.
                 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एम.डी.ए. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ.विजय भराटे, डॉ.विद्या शिंदे, महिला व बालविकास चे   श्री. शहापूरकर, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                   या  हत्तीरोग  नियंत्रण कायर्यक्रम  यशस्वीतेसाठी  ग्रामीण भागात जिल्हास्तरीय 5 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 97 पर्यवेक्षक व 1 हजार 914 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरी भागात जिल्हास्तरीय 3 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 11 पर्यवेक्षक व 214 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जबाबदार वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्हयाची लोकसंख्या 17 लाख 56 हजार 352 असून अपेक्षीत लाभार्थी 16 लाख 33 हजार 408 आहेत. या कामासाठी स्वयंसेवक, कर्मचारी (दोन कर्मचारी एक टीम) 2 हजार 128 आहेत व पर्यवेक्षक (20 कर्मचारी 1 पर्यवेक्षक ) असे एकूण 108 अधिकारी/कर्मचारी  स्वयंसेवक आहेत.

              प्रारंभी  जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण  कार्यक्रमाची  रुपरेषा  विशद  केली  व शेवटी  उपस्थितांचे  आभार  मानले. 

जिल्हयात कॅशलेसबाबत युवक देणार नागरिकांना प्रशिक्षण


उस्मानाबाद. दि.8:-  जिल्हयातील नागरिकांनी  कॅशलेस व्यवहारावर भर दयावा, यासाठी जिल्हयातील एनएसएनच्या युवकाकडून नागरिकांना कॅशलेसबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 जिल्हयातील एनएसएनच्या युवकांच्या 24 संस्थांच्या प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात येणार आसून, यातील युवकांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.जी टिम अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुवर्णपदक   व राज्यशासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती परिविक्षाधिण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

 मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात सोमवार दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजीत 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयुष प्रसाद म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील यवतमाळ व उस्मानाबाद या दोन जिल्हयाची 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' साठी निवड केली आहे. यवतमाळ येथील कामकाज सुरू झाले आसून, उस्मानाबादेत ही दोन आठवडयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर मोठया शहरामधील नागरिकांनी आता कॅशलेस व्यवहारावर मोठा भर दिला आहे. या व्यवहारामध्ये ग्रामिन भागातील नागरिक मागे राहू नयेत, यासाठी 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' हाती घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत असलेले गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासाठी जिल्हयातील  24 संस्थांमधील एनएसएनच्या युवकांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेला 15 ते 20 युवकांची एक या प्रमाणे दोन टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार होणाऱ्या टीमला मंत्रालयातील तीन मुख्य ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. यात विविध बँकाची ऑनलाईन  व्यवहार, शासनाचे भिम ॲप व इतर कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तयार होणाऱ्या   टीमपैकी जी टीम    सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचेल त्या टीमला जिल्हाधिकारी यांचे सुवर्णपदक मिळणार आहे. तर राज्य शासनाकडून प्रमाणपत्रही मिळणार असल्याचे प्रसाद     यावेळी म्हणाले.

Wednesday, 8 February 2017

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील टपरीधारक व रिक्षाचालकांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा





      उस्मानाबाद,दि.8:-काही दिवसांपूर्वी  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेची मोहिम हाती घेऊन प्रशासकीय इमारत परिसरातील  स्वच्छता करून अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला होता. आता या परिसरातील टपरीधारक आणि रिक्षाचालकांनी  स्वच्छतेकरिता  नियमित श्रमदानाची  प्रतिज्ञाच  केली आहे.
       जिल्हा माहिती  कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पुढाकाराने त्यांच्या आवाहनास  प्रतिसाद म्हणून  या परिसारातील  प्रत्येक टपरीधारक व रिक्षाचालक  यांनी  हिरीरीने  सहभाग  नोंदवून  या परिसराची  स्वच्छता  केली.
       या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.गणेश गोरे, श्री. भिमा पडवळ, श्री. प्रदीप लष्करे, श्री.शशिकांत पवार, श्री.खोत या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह अनिकेत जाधव, रिजवान शेख, मोहमंद तांबोळी, अभिजित जाधव, समीर तांबोळी, दीपक जानरारव, विलास साबळे, नितीन कांबळे, पांडूरंग शिंदे, अण्णा सोनटक्के, शेख जाफर, शेख इ्स्माईल, शेरअल्ली पठाण, वजीरभाई, दाजी देशपांडे, शरद राठोड, अविनाश फडनीस, सचिन सोनटक्के, अमोल कांबळे, महाराज चहावाला  या सर्व टपरीधारक व रिक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छतेसाठी सहभाग नोंदविला तसेच यापुढेही आम्ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न तर करूच परंतु नागरिकांनाही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन व प्रबोधन करू असा निश्चयच केला.


मुलींना सन्मानाने जगण्यासाठी आपले योगदान दयावे - डॉ. प्रशांत नारनवरे






उस्मानाबाद. दि.8:-  मुलींना जनमानसात सन्मानाने जगण्यासाठी अधिकारी वर्गाने आपले योगदान जास्तीत जास्त दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आयोजित जिल्हास्तरीय मनोधैर्य टिम  प्रशिक्षण कार्यशाळेत उदघाटन प्रसंगी केले.
          महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात आयोजित मनोधैर्य प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख होते.
                उदघाटन पर प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याची भूमिका अधिकारी वर्गाची असून यामध्ये डॉक्टरांची भूमिका तर अत्यंत महत्वाची आहे, डॉक्टरांनी आपले वैद्यकीय अहवाल संबंधित विभागांना वेळेत दयावेत, हे काम दैनंदिन कामाइतकेच महत्वाचे आहे, डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालावरून संबंधित विभाग तपासाचे नियोजन करू शकतात, अहवालामध्ये त्रुटी ठेवता कामा नये.
          पिडीतांना दंड करण्याची किंवा शिक्षा ठोठावण्याची जबाबदारी  केवळ न्यायालयाची नसून आपणा सर्वांची आहे. अपराध्यास दंड, शिक्षा होणे नितांत गरजेचे आहे. या कर्तव्‍यासाठी जिल्हयातील डॉक्टरांना प्रशिक्षण दयावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल संबंधित डॅाक्टरांनी  लवकरात लवकर तयार करून पाठवावेत. न्याय देण्याचे काम त्वरीत  करावे, आपल्या सहीची किंमत जाणा, पिडीत मुलगी आपली मुलगी आहे असे समजून सदसदविवेक बुध्दीने अहवाल दयावा, असे ही जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
            यावेळी अध्यक्षीय प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक पंकज देशमुख म्हणाले की, वैद्यकीय विभागाचे काम पोलीस विभाग करु शकत नाही, वैद्यकीय विभागाने वैद्याकीय अहवाल वेळीच प्राप्त करून देणे महत्वाचे आहे. वैद्यकीय अहवाल उशिरा प्राप्त झाल्यास न्यायदानाची प्रक्रिया मंदावते, यामुळे आपले मत, आपला अहवाल डॉक्टरांनी ताबडतोब दिल्यास पिडीतांना न्याय मिळण्यास मदत होईल.
    या प्रशिक्षण कार्यशाळेस सरकारी वकील ॲड. जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद सोपल यांचे समयोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्यासह जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी  संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
    प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सुर्यवंशी यांनी प्रशिक्षण कार्यशाळेची प्रस्तावना करून शेवटी आभार ही व्यक्त केले.


Tuesday, 7 February 2017

जनमत चाचणी आणि मतदानोत्तर चाचणी व निष्कर्ष प्रसिध्द करण्यावर बंदी


          उस्मानाबाद.दि.7:- जिल्हा परिषद व  पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये पहिला टप्पा दि.14 फेब्रुवारी 2017 रात्री बारा वाजेपासून मतदान समाप्तीपर्यंत जाहीर प्रचार करण्याकरिता तसेच जनमत चाचणी आणि मतदानोत्तर चाचणी घेणे व त्याचे निष्कर्ष प्रसिध्द करण्यावर बंदी राहील असे आदेशित करण्यात आले आहे.
           जिल्हयातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, माहितीपत्रके, फलक किंवा  तत्सम प्रसिध्दी, खाजगी किंवा सरकारी रेडिओ, टि.व्ही केबल, डिटीएच, प्रादेशिक किंवा स्थानिक केबल टि.व्ही. सॅटेलाईट, एसएमएस, इंटरनेट, फेसबूक आणि तत्सम उपलब्ध सोशल मिडीया यांच्याद्वारे जनमत चाचणी व मतदानोत्तर चाचणी यांचे कुठलेही निष्कर्ष प्रसिध्द   करता येणार नाहीत, असेही   आदेशित करण्यात आलेले आहे असे आचार आचारसंहिता कक्ष प्रमुख जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मतदानाचा संकल्प करण्याची प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न



          उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने मतदार जनजागृत्ती कक्षाच्या प्रमुख श्रीमती भोसले एस.एस.व सहकारी सदस्य यांच्या पुढाकाराने दि.5 फेबु्वारी 2017 रोजी निवडणूक अधिकारी श्री.आरविंद लाटकर यांनी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा संकल्प करण्याची प्रतिज्ञा दिली.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष बनसोडे, गटविकास अधिकारी चकोर, नायब तहसिलदार श्री रामदासी  आदी यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील सर्वात पहिले "लोकराज्य संगणक व्यवस्थापन शास्त्र कॉलेज" बनले उस्मानाबादचे मदर कांचन कॉलेज


       उस्मानाबाद,दि.7:-लोकराज्याचा प्रचार आणि प्रसिध्दी उस्मानाबाद जिल्हयात मोठया प्रमाणात होत आहे." लोकराज्य " मासिकाचे महत्व उस्मानाबाद मध्ये सर्वत्र सर्वमान्य होऊ लागले आहे. या जिल्हयातील अतुल अशोक अजमेरा या युवकाने आपल्या आजीच्या नावाने मदर कांचन कॉलेज, उस्मानाबाद सुरू केले. संगणक शास्त्र (सी.आय.टी) व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) यांचे शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जात आहे. या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षांची आवड ओळखून श्री. अजमेरा यांनी या मुलांना "लोकराज्य" या शासनाच्या मुखपत्र असलेल्या मासिकाची ओळख करून दिली. आणि त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी संपर्क साधला.
          या विद्यार्थ्यांना श्री. सानप यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती तर दिलीच परंतू कोणत्याही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी माहिती व जनसंर्पकच्या महान्युजवेबपोर्टल,लोकराज्य तसेच महाराष्ट्र अहेड, दिलखुलास आकाशवाणीवरील तर जय महाराष्ट्र हा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा कशाप्रकारे त्यांना उपयोग होऊ शकेल याची ही सविस्तर माहिती दिली.
        याच प्रेरणेतून आज श्री.आजमेरा यांनी श्री.सानप यांच्याकडे या विद्यार्थ्यांना लोकराज्य सभासद करुन घेण्याकरीता त्यांचा नावाची यादी तसेच धनादेशही सुपूर्द केला अशा प्रकारे उस्मानाबाद मधीलच नव्हे तर राज्यातील पहिले लोकराज्य संगणक व व्यवस्थापन शास्त्र कॉलेज बनन्याचा बहूमान मदर कांचन कॉलेज, उस्मानाबाद यांनी मिळविला आहे.याबद्दल सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.या यशामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

मनोधैर्य योजनेंतर्गत अधिकाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा


          उस्मानाबाद,दि.7:- महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मनोधैर्य टिम अधिकाऱ्यांसाठी दि.8 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी  10.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे.
         पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असुन यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड. शरद जाधवर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले आहे. 

महाराष्ट्र डिजीधन जागृत्ती अभियान कार्यशाळेचे आयोजन


          उस्मानाबाद.दि.7:-दिनांक 8 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी ठिक 1.30 वा. शि.म.रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे महाराष्ट्र डिजीधन जागृत्ती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी या महाविद्यालयामधील एन.एस.एस. विभागप्रमुख व स्वयंसेवक यांना या अभियानाचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे. तसेच तालूक्यातील शंकरराव पाटील सिनिअर व ज्युनिअर महाविद्यालय, भूम व परंडा या तालुक्यातील ज्या महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. विभागप्रमुख व स्वयंसेवक ही या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील .
         प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.प्रशिक्षणासाठी मा. मुख्यमंत्री कार्यालय यांचे प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी येणार आहेत. तरी कार्यशाळा सुरळीतपणे पार पाडण्याची जवाबदारी आपली राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.

Monday, 6 February 2017

बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिशन आरोग्य सप्ताहनिमित्त विशेष महाआरोग्य शिबिर


उस्मानाबाद,दि.6 : ते आले,त्यांनी पाहिलं. त्यांनी जिंकून घेतलं सारं हे वाक्य  तंतोतंत सार्थ ठरविणारे लंडनचे डॉक्टर सालाबादप्रमाणे यावर्षीही सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. हार तुरे नको की पुष्पगुच्छ नको ,भाषण नको की कसले प्रदर्शन नको,आल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात करणारे 85 वर्षाचे लंडनचे डॉक्टर डॉ.जॉन क्लेग आजही तरुणालादेखील लाजवतील  एवढया तडफेने काम करतात. चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा कायम तसाच. लहान मुलांसोबत खेळतात, रमतात त्यांना बक्षीस देतात आणि शस्त्रक्रिया करतानादेखील लोण्यात सुरी  फिरवावी  इतक्या  सहजतेने मोठी शस्त्रक्रिया पार पाडतात. आजपर्यंत सास्तूर येथे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास 800 बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे. सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व जॉन क्लेग यांचे एक अतूट नाते  निर्माण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या मार्गदर्शनाखली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
        सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालय येथे  बळीराजा चेतना अभियान अंतर्गत संकल्प निरोगी उस्मानाबाद जिल्हयाचा, मिशन आरोग्य, विशेष आरोग्य सप्ताह च्या सहाव्या दिवशी 0ते 12 वयोगटातील अपंगत्व ( दिव्यांग ) असलेल्या बालकांची तपासणी व शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन लंडनचे डॉ. जॉन क्लेग, अस्थिव्यंग तज्ञ डॉ. मयुरेश वारके ,मलतज्ञ डॉ. प्रमोद काळे तसेच उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राज गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोपल, लोहारा ग्रा.रु. चे वैदयकीय अधीक्षक डॉ. यु. व्ही सूर्यवंशी, निवासी अपंगशाळा सास्तूरचे मुख्याध्यापक श्री. बालाजी नादरगे, स्पर्शचे कार्यक्रम अधिकारी श्री. अच्चुत आदटराव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी 342 बालकांची तपासणी व उपचार करण्यात आले.
              या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी लंडनचे डॉ. जॉन क्लेग, डॉ. हिमांशू, डॉ.कलपेश, डॉ.शहाबाज तसेच मुबंईचे डॉ .मयूरेश वारके, प्रमोद काळे, डॉ.रोहित व त्यांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ देवनारचे प्रेसीडेंट श्री. ए. व्ही. सुरेश,सतिश लांबा, नागेश भटट, प्रबोध रोटे, अमर रोटे इत्यादी शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी मदत करीत आहेत. स्पर्श ग्रामीण रूग्णालय सास्तूर येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी हे रूग्णांना विविध व्यायाम तसेच शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी  याबददल मार्गदर्शन करीत आहेत, तसेच आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरून या शिबिराबददल जनजागरणही करण्यात येत आहे.
        समाजकल्याण विभागातर्फे चालत असलेल्या उस्मानाबाद, बीड, लातूर, सोलापूर जिल्हयातील अपंग शाळामधून या शिबिराची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही या शिबिरासाठी रूग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरासाठी निवासी अपंग शाळा सास्तूर व मुख्याध्यापक श्री. बालाजी नादरगे यांचेही सहकार्य लाभत आहे. कुठलेही बालक उपचाराविना जाणार नाही याची दक्षता स्पर्श गामीण रूग्णांलयाच्या कर्मचाऱ्यामार्फत घेतली जात आहे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी  व्ही.डी.ओ. कॉन्फरन्सद्वारे रूग्णांशी संवादही साधला.

लेखा परीक्षण अहवाल नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध



          उस्मानाबाद.दि.6:- कृषी विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद या कार्यालयाचे सन 2015-16 या आर्थिक वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल स्थानिक निधी लेखा उस्मानाबाद या   कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.  लेखा परीक्षण आहवाल  तसेच मागील सर्व वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल कृषी विभाग जिल्हा परिषद, उस्मानाबाद या कार्यालयात सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन  वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे, असे  आवाहन  जिल्हा कृषी विकास  अधिकारी  श्री. खोत यांनी  केले.

हत्तीरोग दुरीकरणासाठी एकदिवसीय औषधोपचार मोहीम


उस्मानागाद.दि.6:- हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दि.10 ते 14 फेब्रुवारी  या कालावधीत जिल्हयातील  संपूर्ण गावांमध्ये एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
              या औषधोपचार मोहिमेंतर्गत जिल्हयातील सर्व गावांमध्ये दि.10 ते 14 फेब्रूवारी  या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात  हत्तीरोग प्रतिबंधक डी. ई. सी. व अल्बेडझॅल  गोळया खाऊ घालण्याकरीता घरोघरी आरोग्य  विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक येणार आहेत.

              तरी त्यांच्या समक्षच दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर अजारी रुग्ण वगळून सर्वानी डी. ई. सी. व अल्बेडझॅल  गोळयाचे सेवन करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी केले आहे.

Sunday, 5 February 2017

"न्याय सेवा सदन"चे न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न्‍








उस्मानाबाद,दि.5:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वैकल्पिक वाद निवारण केंद्र या नूतन इमारतीचे उदघाटन मा. न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्ते फीत कापून या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. 
            याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  प्र. सदस्य सचिव श्री. एस. आर. पडवळ, , अध्यक्ष, विधीज्ञ  मंडळ श्री. अजित खोत, जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील श्री. जाधवर,जिल्हा पोलीस अधीक्षक  श्री. पंकज देशमुख, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. थोरात व श्री. लांडगे,उपकार्यकारी अभियंता तसेच कान्ट्रॅक्टर श्री. नाईकवाडी, जिल्ह्यातील सरकारी अभियोक्ता, सर्व  विधीज्ञ, पत्रकार,न्यायालयीन  कर्मचारी  वृंद  व  नागरिक  हे  उपस्थित  होते.
                      या उदघाटन प्रसंगी बोलताना मा. न्यायमूर्ती. श्री. व्ही. के. जाधव यांनी मध्यस्तांची भुमिका विशद केली व त्यामुळे न्यायालयावरती होणारा वाढत्या कामकाजांचा व खटल्यांचा भार कमी होईल व त्यामध्ये विधीज्ञांची भूमिका महत्वाची असून त्यांचे सहकार्य महत्वाचे आहे असे सांगीतले. तसेच त्यांनी आजच्या समाजामध्ये  तरुण जोडप्यामध्ये  घटस्फोटाचे  प्रमाण  वाढलेले आहे  व त्यामुळे  समाजामध्ये  त्याचा  विपरित परिणाम होत असून, वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत  त्यांच्यामध्ये  समेट घडवून  विवाह  संस्था मजबूत  होण्यास  मदत  होईल.
                      प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख यांनी वैकल्पिक वाद निवारणाबाबतचे महत्व सांगून पक्षकारांना त्याचा मोठा लाभ होवून त्यांचा वेळ, श्रम, पैसा  यांची  बचत  होईल  असे  सांगितले.
                      याप्रसंगी विधीज्ञ मंडळाचे  अध्यक्ष ए. व्ही. खोत यांनी विधिज्ञांतर्फे लोकन्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत  जास्त  खटले  कमी  करण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

                      या कार्यक्रमाचे आभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्र. सदस्य  सचिव  श्री. एस. आर. पडवळ  मानले.