Thursday, 7 December 2017

अर्जुन मस्के आणि उषा मस्के यांच्या जीवनाचा डोळस प्रवास…

आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ-जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील



 उस्मानाबाद, दि.7 :- आरोग्य विषयक विविध योजना व सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जिल्हाभर सुरु असून या आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने पुष्पक मंगल कार्यालय येथे जननी सखी योजनेचा शुभारंभ व आशा दिन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ.चंद्रकला नारायणकर, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री महेंद्र धुरगुडे, अभिमान्यू शितोळे, अस्मिता कांबळे, सुरेखा जाधव, शितलताई  पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कोलते, आरोग्य उपसंचालक श्री.व्ही.एम. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा सौ. पाटील म्हणाल्या की, सद्यस्थितीत केंद्र शासनाची जननी सुरक्षा योजना कार्यरत आहे. यात एससी, एसटी व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेस व तिची काळजी घेणारे आशांना 600 रुपये मदत मिळते पण इतर गरोदर मातांच्या बाबतीत आशांना मदत मिळत नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून जननी सखी योजना सुरु करणारी उस्मानाबाद जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही जाती धर्माच्या महिलांची शासकिय दवाखान्यात प्रसुती झाल्यास आशाताईना 300 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे शासकिय दवाखान्यातील प्रसुतीचे प्रमाण ही वाढेल व जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यास मदत होवून लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत होईल.

आरोग्य विषयक विविध योजना व सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्या बरोबरच आशाताईनी  आरोग्य सखी म्हणून ही काम करावे, असे ही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, आशा स्वयंसेविका यांनी गावातील दुर्धर आजाराची माहिती आरोग्य विभागाकडे पोहंचविण्याचे काम करावे, त्यामुळे आशा दुर्धर आजारी रुग्णांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यात येतील. त्याचबरोबर आशाताईंनी स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के गाव हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. आशाताईना 500 रुपये मानधनासाठी ही प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोलते यांनी यावेळी आरोग्य सेवा बळकट होईल यासाठी सर्वांनी काम करावे असे सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या आशा, गट प्रवर्तक, तालुका समुह संघटक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य उपसंचालक कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा समुह संघटक सतिष गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक मोठया संख्येने उपस्थित होत्या.