Thursday, 7 December 2017
आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ-जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील
उस्मानाबाद, दि.7 :- आरोग्य विषयक विविध योजना व
सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविकांच्या
माध्यमातून जिल्हाभर सुरु असून या आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा
मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम
केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी
आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने
पुष्पक मंगल कार्यालय येथे जननी सखी योजनेचा शुभारंभ व आशा दिन जिल्हा परिषदेच्या
उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी त्या
बोलत होत्या. प्रारंभी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या
समाजकल्याण सभापती सौ.चंद्रकला नारायणकर, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री महेंद्र
धुरगुडे, अभिमान्यू शितोळे, अस्मिता कांबळे, सुरेखा जाधव, शितलताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संतोष कोलते, आरोग्य उपसंचालक श्री.व्ही.एम. कुलकर्णी, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा
सौ. पाटील म्हणाल्या की, सद्यस्थितीत केंद्र शासनाची जननी सुरक्षा योजना कार्यरत
आहे. यात एससी, एसटी व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेस व तिची काळजी घेणारे
आशांना 600 रुपये मदत मिळते पण इतर गरोदर मातांच्या बाबतीत आशांना मदत मिळत नाही
म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून जननी सखी योजना सुरु करणारी उस्मानाबाद जिल्हा
परिषद ही राज्यातील पहिली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही जाती धर्माच्या महिलांची
शासकिय दवाखान्यात प्रसुती झाल्यास आशाताईना 300 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे
शासकिय दवाखान्यातील प्रसुतीचे प्रमाण ही वाढेल व जिल्ह्यातील बालमृत्यू व
मातामृत्यू रोखण्यास मदत होवून लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत होईल.
आरोग्य विषयक विविध योजना व
सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्या बरोबरच आशाताईनी आरोग्य सखी म्हणून ही काम करावे, असे ही
त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, आशा स्वयंसेविका यांनी गावातील दुर्धर
आजाराची माहिती आरोग्य विभागाकडे पोहंचविण्याचे काम करावे, त्यामुळे आशा दुर्धर आजारी
रुग्णांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यात येतील. त्याचबरोबर
आशाताईंनी स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के गाव हागणदारी
मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. आशाताईना 500 रुपये मानधनासाठी ही प्रयत्न करण्यात
येतील असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. कोलते यांनी यावेळी आरोग्य सेवा बळकट होईल यासाठी
सर्वांनी काम करावे असे सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)