Saturday, 1 July 2017

सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड


उस्मानाबाद.दि.1:- राज्यशासनाची 4 कोटी वृक्ष लागवड मोहिम दि. 01 ते 07 जुलै 2017 या कालावधीत सुरु असल्याने  उस्मानाबाद जिल्हयात सहपालकमंत्री श्री. महादेव जानकर यांच्या हस्ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्रांगणात वृक्ष लागवड करुन मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
            या वृक्षारोपन लागवड कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हयाचे पालक सचिव  महेश पाठक, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस  अ‍धीक्षक पंकज देशमुख, विभागीय वन अधिकारी राजेश्वर आतेलीकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. डी.डी. कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी सहपालकमंत्री श्री. जानकर यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात भेट देवून पाहणी केली. उस्मानाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालय सर्व सोयींनी युक्त करु यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगीतले. प्रत्येक रुग्ण कक्षात जावून त्यांनी रुग्णांशी संवाद साधून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची आणि जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा -सहपालकमंत्री महादेव जानकर


                                                                  
उस्मानाबाद.दि.1:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामे शासनाने दिलेल्या विहीत मुदतीत गुणवत्तापूर्वक पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर  यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार अभियान कामाचा आढावा बैठक सहपालकमंत्री श्री.जानकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार,उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, वन विभागीय अधिकारी राजेश्वर सातेलीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार अभियान,जलसंधारण या कामा करिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही त्यामुळे हे कामे वेळेत पूर्ण करावेत. या कामात जे अधिकारी कुचराई करतील त्यांची गंभीर दखल घेवून निलंबनाची  कारवाई करण्यात येईल, असे ही श्री.जानकर यावेळी म्हणाले.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत जिल्हयात सन 2015-16 यावर्षी 69.90 किमी लांबीची 7 कामे मंजूर होते त्यामध्ये प्रगतीपथावर 6 कामे असून त्यांची लांबी 63.20 आहे तर  1 काम पूर्ण झाले असून त्यांची लांबी 6.70 किमी इतकी आहे.सन 2016-17 मध्ये बॅच 1 मध्ये 5 कामे मंजूर असून त्यांची लांबी  74.10 असून हे कामे प्रगतीपथावर आहेत.तर सन 2016-17 बॅच -2 मध्ये 6 कामे मंजूर असून त्यांची लांबी  67.30 आहे तर सन 2016-17 बॅच-3 मध्ये 4 कामे मंजूर असून त्यांची लांबी 42.31  अशी असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये मागील वर्षाप्रमाणे 182 किमीचे उद्दिष्य्ट  जिल्हयासाठी देण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 मध्ये जिल्हयातील 217 गावामध्ये  एकूण मंजूर आराखडयानुसार कामे 21 हजार 25 इतकी होती त्यासाठी मंजूर आराखडयानुसार 144.85 रुपये कोटी रक्कम होती.यामध्ये पूर्ण कामांची संख्या 21 हजार 25 असून खर्च ही पूर्ण झाला आहे.सन 2016-17 मध्ये 191 गावाची निवड करण्यात आली  यामध्ये 16 हजार 795 कामांचा आराखडा तयार करण्यात आला यासाठी 237.89 कोटी रुपये रक्कम आराखडा मंजूर करण्यात आला, यामध्ये 9 हजार 49 कामे पूर्ण झाले असून 4 हजार 643 कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण कामावर 43.41 कोटी रुपये रक्कम खर्च झाले आहेत. सन 2017-18 मध्ये 178 गावांची निवड  करण्यात आली असून यामध्ये 7 हजार 570 कामे असून यासाठी 25610.29 लक्ष रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे तर मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 3 हजार 700 शेततळयाचे उददीष्टये असून 2 हजार 207 कामे पूर्ण झाले असून 480 कामे  चालू असलेल्या शेततळयाची संख्या आहे.अनुदान अदायगी केलेल्या शेततळयाची संख्या 863 असून वितरित निधी 369.01 रुपये लक्ष असल्याचे यावेळी सांगितले.
            यावेळी तालुकानिहाय कामांच्या गतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माहितीचे सादरीकरण श्री. कुलकर्णी यांनी केले तर जलयुक्त शिवार अभियानाच्या योजनेच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  जमदाडे यांनी केले.
            तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील महादेव सुतार यांनी प्रशासन आणि जनता यांनी एकत्रीतपणे काम करुन वृक्षसंगोपण व संवर्धन कशा प्रकारे केले जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती यावेळी दिली. 

Thursday, 29 June 2017

डिजिटलायझेशनसाठी सर्व शाळा सौरऊर्जेने जोडणार उस्मानाबाद जि.प. साठी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याकडून पथदर्शी प्रकल्पाची घोषणा


उस्मानाबाद,दि. 29 :- 2030 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रत्येकाला सुरक्षित आणि शाश्वत वीज देण्यात येणार असून उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना डिजिटल करण्यासाठी सौरऊर्जेने जोडण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घेाषणा राज्याचे ऊर्जा मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उस्मानाबादेत केली.
            विश्रामगृहावर आयेाजित लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठक व त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकल्पासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्यास त्यास महावितरण आणि महाराष्ट्र शासन सहकार्य करेल. याचबरोबर सर्व नळ योजनांनाही योग्य क्षमतेच्या सौर पंपाने जोडण्याचा निर्णय त्यानी घेाषित केला.
 जिल्हयात 16000 प्रतिक्षा यादीतील कृषीपंपाना जोडण्यामागील वर्षभरात देण्यात आल्या असून उर्वरित 4000 पंपानाही अपेक्षित निधी उपलब्ध करुन देण्यात येतील. वीज अपघात ठिकाणे शोधून तेथील तारा,  रोहित्रे हटवून ग्राहकांना सुरक्षित वीज सेवा देण्यासंदर्भातही त्यानी महावितरण अधिकाऱ्यांना सूचित केले. जिल्हयात लवकरच 500 सौर कृषी पंप बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यानी यावेळी दिली. प्रत्येक शाखा कार्यालयाने दर महिण्यास एक वीज ग्राहक मेळावा घेवून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात याव्या, त्याचे निरोप सर्व वीज ग्राहकांना देण्यात यावेत, त्यावर अधीक्षक आणि मुख्य अभियंत्यांनी नियंत्रण ठेवावे, असेही आदेश मंत्री महोदयानी यावेळी दिले.  वीज विकासाची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीनी कायम लक्ष दयावे, असे आवाहनही ऊर्जा मंत्री श्री.बावनकुळे यांनी केले.

यावेळी  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, मुख्य अभियंता राजाराम बुरुड, गणपतराव  मुंडे आदी       उपस्थित होते.

Wednesday, 28 June 2017

नऊ वीज उपकेंद्रांचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न



उस्मानाबाद.दि.28:- महावितरणतर्फे उस्मानाबाद जिल्हयात दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक वीज विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नऊ वीज उपकेंद्रांचे भूमीपूजन अधीक्षक अभियंता कार्यालय परिसरात बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे,महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक (भा.प्र.से) श्री.ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी 1 वाजता जिल्हयातील कोंड,देवळाली,आवाडशिरपूरा, पाचपिंपळा,हासेगाव,काकडे प्लॅट उस्मानाबाद,उमरगा,तुळजापूर,भूम येथील वीज उपकेंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड, पारेषणचे गणपतराव मुंडे, पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.डी.डी.हांमद,अधीक्षक अभियंता बीडचे अजिनाथ सोनवणे, उस्मानाबादचे प्रकाश पौनीकर यांच्यासह सर्व अधिकारी पदाधिकारी, वीज ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार राहुल मोटे,आमदार सुजितसिंह ठाकूर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम बुरुड यांनी केले.

वीज ग्राहक तक्रार निवारण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या सूचना



उस्मानाबाद.दि.28:- महावितरणतर्फे वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित तक्रार निवारण उपक्रमास वीज ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दाखल झालेल्या वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावरील तक्रारींची दखल घेत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री.ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से) यांनी ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्याच्या सूचना महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
          उस्मानाबाद जिल्हयातील वीज ग्राहकांची गाऱ्हाणी ऐकून प्राप्त तक्रारी सोडविण्याचा दिलासादायक कार्यक्रम महावितरणतर्फे दि.28 जून 2017 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.या कार्यक्रमास सह व्यवस्थापकीय संचालक श्री.बकोरिया यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,दत्ता कुलकर्णी, यांच्यासह लातूर  परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड,पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.डी.डी. हांमद, बीडचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे,  अधीक्षक अभियंता प्रकाश पौनीकर,कार्यकारी अभियंता श्री. गुप्ता यांच्यासह पंचायत समिती, नगर परिषदेच्या सदस्यांसह अनेक सरपंच, कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले.
          यावेळी अनेक तक्रारदारांनी महावितरणकडून होत असलेल्या अनियमित कामासह, रोहित्रे, त्यांची मंजूरी, उपलब्धता, त्याची वाहतूक, गुणवत्ता यासह नवीन उपकेंद्र उभारणीबाबत सूचना केल्या. अनेक ठिकाणी नियमित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सांगण्यात आल्या.कृषीसह रहिवाशी, व्यावसायिक वीज जोडण्यासंदर्भात विलंब होत असल्याचेही ग्राहकांकडून सांगण्यात आले. काही वीज ग्राहकांनी अधीक्षक अभियंता उस्मानाबाद यांच्याबाबतही तक्रारी केल्या.
          या सर्व तक्रारींची दखल सह व्यवस्थापकीय संचालकांनी घेवून त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी आणि महावितरण प्रशासन यांच्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे यांनी समन्वयवादी भूमिका घेत जिल्हयात सुरळीत आणि सुरक्षित वीजसेवा देण्याची महावितरणकडे अपेक्षा व्यक्त केली.

Tuesday, 27 June 2017

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम, ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन


मुंबई, दि.27 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा  प्राचीन,  ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ईमेल वर दि. 15 जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक(माहिती) सागरकुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा.

सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी


उस्मानाबाद.दि.27:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड,नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २५ जुलै २०१७ ते ०३ ऑग्स्ट  २०१७  या कालावधीत SSB कोर्स क्रं. 43 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील इच्छुक उमेदवारानी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक   २० जुलै   2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध check list आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन तयाची दोन प्रतीमध्ये प्रिंट  तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ठ डाऊन लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन नंतरच मुलाखतीस हजर रहावे.
केंद्रामध्ये एस एस बी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र मुलाखतीला/कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे- कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सविसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेचे असावे,एन. सी. सी. (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस एस बी  साठी शिफारस केलेली असावे,टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे,यनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एस एस बी साठी शिफारस केल्याल्या यादीत  नाव असावे.
अधिक माहितीसाठी  प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253/2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सु.मो.गोडबोले यांनी केले आहे.

"रोपे आपल्या दारी" योजनेंतर्गत सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्‌घाटन



           उस्मानाबाद, दि. 27 :- येथे वन विभागाच्या वतीने रोपे आपल्या दारी उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्‌घाटन  विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले.
            वन महोत्सवात 4 कोटी वृक्ष लागवड या वर्षी दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत करण्यात येणार असून या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने "रोपे आपल्या दारी" उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सुरु करण्यात आले असून या रोप विक्री केंद्रात आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, गुलमोहर, रेन ट्री, काटीसावर, करंज, शिवन, कांचन, कडूनिंब, बोर आदीचे रोपे  केवळ 6 ते 16 रुपये या  दरात देण्यात येणार असून याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत वृक्ष लागवड करुन मोठया प्रमाणावर वन महोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी विभागीय वन अधिकारी सातेलीकर यांनी केले.
यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण श्री.ए.एस.निकत, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक पवार,  वन परिमंडळ अधिकारी उस्मानाबाद श्री.ए.ए.घोडके, वन परिमंडळ अधिकारी तुळजापूर श्री.एम.ए.खोबरे, वनरक्षक श्री.एस.आर.कुलकर्णी, वनरक्षक आर.एन.शिन्दे, वनरक्षक एस.एच.साळूंके, वनमजूर आर.एस.माळी,  जेष्ठ पत्रकार महादेव नरोटे, अरविंद चौधरी, बिभिषण लोकरे, निसर्गप्रेमी श्री.खोत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांची विक्री करण्यात आली.

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा


           उस्मानाबाद, दि. 27 :राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार 28 जून 2017 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 28 जून 2017 रोजी पहाटे 5 वाजता सी.एस.टी.एम. लातूर एक्सप्रेसद्वारे उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालय उस्मानाबाद येथे आगमन व DDUJY योजनेअंतर्गत देवळाली,कोंड ता.उस्मानाबाद, पाचपिंपळा,ता.परंडा व आयपीडीएस योजनेअंतर्गत भूम ता.भूम, हसेगाव ता.कळंब, उमरगा,उस्मानाबाद उपकेंद्रचे भूमीपूजन.स्थळ- अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यास्तव राखीव वेळ. स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण उस्मानाबाद यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. उस्मानाबाद येथून लातूरकडे प्रयाण करतील.

Monday, 26 June 2017

राजर्षी शाहू महारज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


   उस्मानाबाद,दि.26:- राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार महसूल राजकुमार माने,नायब तहसिदार आर.बी.पाचभाई, जाधव  आदीसह  कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
                                           ****

सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन


उस्मानाबाद,दि 26:-येथील सामाजिक न्याय भवन येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्जवलनाने राजर्षी शाहू महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
        यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष नेताजी पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते,विशेष अधिकारी (शानिशा) अमीत घवले,प्राध्यापक अर्जुन जाधव, शंकरराव खुणे,चंद्रप्पा गायकवाड उपस्थित होते.
        यावेळी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  प्राध्यापक जाधव यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सखोल मार्गदर्शन केले तसेच मारन्वरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते यांनी केले तर आभार विशेष अधिकारी अमीत घवले यांनी मानले. 

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन व समता दिंडीत उत्स्फूर्त सहभाग


उस्मानाबाद,दि.26: राजर्षी शाहू महाराज यांच्या 143 व्या  जयंतीनिनित्त  सामाजिक न्याय  दिनी आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रागणात भव्य एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीच्या प्रस्थानाच्यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हिरवी  झेंडी दाखवून  मार्गस्थ केले. शाहू महाराजांनी  दीनदलितासाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले तसेच विधवा पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिले,शाहू महाराज हे सामाजिक   राजा  होते  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गमे यांनी  केले.
        यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तससिलदार सुजित नरहरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते, शिक्षणविस्तार अधिकारी संतोष माळी, मल्लीनाथ काळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी जाधव,दिनकर होळकर, मुख्याध्यापक जी.एम.परीट, सूधिर पडवळ तसेच कर्मचारी उपस्थित होते.
        या दिंडीमध्ये 14 शाळांमधील 1 हजार 100 विद्यार्थ्यांचा सहभाग होता,यामध्ये विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या समतारथाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीच्या मार्गक्रमणात जिल्हाधिकारी व प्रमुख उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
        प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिक्षणाधिकारी माध्यमिक औंदुबर उकिरडे यांनी आभार मानले.