Saturday, 17 December 2016

“कॅशलेस उस्मानाबाद@ मोबाईल ॲप” चा वापर सर्व जनतेने करावा - जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे






उस्मानाबाद,दि.17:-  रोखरहित  महाराष्ट्र मोहिमेंतर्गत मोबाईल ॲप तयार करणारा उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिला असून रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयातील सर्व जनतेने या ॲप चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथे केले.
             शनिवार (दि.17) रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन विभागाच्या सभागृहात कॅशलेस कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने व राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्राच्या मदतीने डिजिटल उस्मानाबाद अंतर्गत " कॅशलेस उस्मानाबाद@मोबाईल " या मोबाईल ॲप चे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (पुन्नर्वसन विभाग) श्री.अरविंद लाटकर, लिड बँकेचे व्यवस्थापक श्री. विजयकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.राजकुमार माने, सी.एस.एस. चे जिल्हा समन्वयक हेमंत मोटे, महा-ऑनलाईनचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, सी.एस.एस. चे लातूर  जिल्हा समन्वयक प्रशांत राजगुरू आदींची  यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, डिजिटल उस्मानाबाद या मोहिमेंतर्गत केंद्र शासना मार्फत राबविल्या जात असलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमास, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व एन.आय.सी.च्या पुढाकाराने मोबाईल ॲप च्या निर्मितीने एक वेगळी दिशा निश्चित मिळणार आहे. या ॲपमध्ये कॅशलेस सुविधा, डिजीटल भरणा पध्दती, नागरिकासाठी ई-सुविधा, महत्वाचे दुरध्वनी क्रमांक, लाईव्ह श्री. तुळजाभवानी दर्शन, ऑनलाईन 7/12 पाहणे, ऑनलाईन तक्रार नोंदवणे, ई-आधार डाऊनलोड करणे, आपली आधार माहिती अद्यावत करणे, ऑनलाईन माहिती अधिकार, शासन निर्णय पाहणे, संजय गांधी योजना, आदी योजनेबाबत सुविधाची माहिती असल्याने भविष्यात सर्व नागरिकांना याद्वारे महत्वाची व मोलाची मदत होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
                या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती. वृषाली तेलोरे यांनी केले. कार्यक्रमास ई-सुविधा केंद्र चालक, स्वस्त धान्य  दुकानदार, कॉलेजचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.*****

 उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई,
25 स्कूल बसेसची योग्यता प्रमाणपत्रे रद्द
 उस्मानाबाद.दि.17:- अधिक संख्येने विद्यार्थी बसवण्यासाठी सीट काढून बाकडे बसविणाऱ्या जिल्हयातील 25 स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या जिल्हयातील स्कूल बस, व्हॅन व रिक्षांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने  कठोर कारवाई सुरू केली आहे.  
जिल्ह्यात प्रत्येक स्कूल बसची कसून तपासणी करण्यात येत आहे.ठिकठिकाणी दोन पथकांच्या माध्यमातून टेहळणी करण्यात येत असून गेल्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी कारवाई करून 25 स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही बसचालकांनी आतील कुशनचे सीट काढून चक्क बाकडे लावले असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक विद्यार्थी बसवण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा आदी ठिकाणी कारवाई करून स्कूल बसचे फिटनेस रद्द करण्यात आले आहे.
जिल्हयात अनेक ऑटोरिक्षा व टमटममधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत आहे.खचाखच विद्यार्थ्यांना कोंबले जात आहे. एमएच 25-टी. 0598, एमएच 25-टी. 1105, एमएच 25-टी.0674, एमएच 25-टी. 9590, एमएच 25-टी.0720, एमएच 25-टी. 0597, एमएच 25-टी. 0670, एमएच 25-टी. 0941, एमएच 25- टी. 1838, एमएच 25-टी. 0826,एमएच 25- टी. 0745, एमएच 25-टी. 0740, एमएच 25-टी. 0748, एमएच 25-टी. 0933, एमएच 25- टी. 1117, एमएच 25- टी. 0741, एमएच 25- टी. 0722, एमएच 25- टी. 0718, एमएच 25- टी. 0694, एमएच 25- टी. 1104, एमएच 25- टी. 0659, एमएच 25- टी. 0588, एमएच 25- टी. 0727, एमएच 25- टी. 0676, एमएच 25-टी. 0861 उप प्रादेशिक  विभागाकडून या वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 56 नुसार ही वाहने यांत्रिकदृष्ट्या  दुरुस्त होईपर्यंत या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र व परवाना योग्यता प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले असल्याचे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे आणि उप प्रादेशिक  परिवहन मोटार वाहन निरीक्षक श्री. इंद्रजित आमते  यांनी कळविले आहे .*****
वृत्त्‍ क्र.968                  कर्ज मागणीसाठी  अर्ज दाखल करावेत
उस्मानाबाद,दि.16 :-महात्मा फुले मागासवर्ग  विकास  महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील आर्थिक दूर्बल घटकांसाठी योजना राबविली जाते विविध व्यवसायाकरिता महामंडळ व बॅंकेमार्फत अनुदान व कर्ज वितरित करण्यात येते. महार, नवबौध्द, बुरूड बेडाजंगम, माला जंगम , या जातीमधील गरजू लाभार्थींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महामंडळाच्या नियमानुसार जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड, आधार कार्ड, जागेचा पुरावा, दोन छायाचित्रे, कोटेशन, अनुभव प्रमाणपत्रासह महामंडळाच्या कर्ज मागणी अर्ज परिपूर्ण भरुन जिल्हा कार्यालयात दाखल करावा. कर्ज मागणी करीता वय मर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत आहे. कर्ज मागणीसाठीचा अर्ज महामंडळाच्या www.mphulebedc.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग  विकास  महामंडळ यांनी केले आहे. ****


वृत्त्‍ क्र.969               तब्बल 16 तास काम; इतिहासात प्रथमच
मोठया प्रक्रियेतून 429 शिक्षकांना पदोन्नती
उस्मानाबाद,दि.17:-शिक्षण विभागातील 11 अधिकारी, 25 विस्तार अधिकारी, 15 लिपिकांनी 16 तास सलग काम करुन 429 शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पार पाडली.  बालकांच्या मोफत शिक्षणाच्या हक्काच्या कायद्यानुसार सहावी ते आठवीला विज्ञान व गणिताला शिक्षक देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार देशात महाराष्ट्राने ही प्रक्रिया सुरूवातीला राबवण्याची योजना तयार केली. याबाबत  महाराष्ट्र हे  पहिले राज्य ठरले आहे . सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विज्ञान व गणिताला विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मिळाले आहेत. अशी धडक प्रक्रिया राबवणारा उस्मानाबाद राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन सर्वसाधारण सभांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी हजारो शिक्षकांची प्रतिक्षा असलेली 12 विज्ञान अहर्ताधारक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रिया अखेर दि. 16 डिसेंबर रोजी पार पडली. मात्र ही प्रक्रिया जिल्हा परिषदेतील विविध अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली आहे . गुरूवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेला पूर्ण  होण्यासाठी  शुक्रवारी सकाळचे सहा वाजले. या प्रक्रियेत  सहभागी  झालेला  कोणताही  घटक  अधिक  वेळ  लागल्यामुळे उव्दिग्न न होता प्रक्रिया संपल्यावर उत्साहात दिसत होता.
            सामान्य  प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, शिक्षणाधिकरी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्यासह तालुक्याचे आठ गट शिक्षणाधिकारी असे  जिल्हयातील 11 अधिकारी, तालुका व जिल्हा कार्यालयात काम करणारे 5 विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील 15 वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, पाच शिपाई यांनी सलग सोळा तास यशवंतराव चव्हाण सभागृहात बसून  ही प्रक्रिया राबविली आहे.
पदोन्नतीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 54 शिक्षक पात्र ठरविण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्वांकडून विकल्प मागविण्यात आले होते. त्यापैकी 683 शिक्षकांनी दर्जावाढीसाठी होकार दर्शविला .यातून 516 पदे भरणे अपेक्षित होते. यामुळे 429 जणांची दर्जावाढ होऊ शकली. सेवा ज्येष्ठता व अन्य नियमांनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया झाली. प्रत्येक शिक्षकाला समोर बोलावून समुपदेशन करण्यात येत होते. शिक्षकांचे समाधान झाल्यावर पदवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात येत होते. त्यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित होते.****
वृत्त्‍ क्र.970
 कीडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी
 फवारणी आवश्यक
उस्मानाबाद,दि.16 :- जिल्ह्यात  कीड रोग  सर्वेक्षण  व सल्ला प्रकल्प सन 2016-17 अंतर्गत  तूर पिकाच्या केलेल्या निरीक्षणावरुन सध्या हरभरा  पिकावर  काही ठिकाणी  घाटे अळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी  पुढील उपाय योजना  सुचविण्यात  आले आहेत –
घाटे अळीसाठी  निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पी.व्ही. 500 मिलिलीटर  प्रती हेक्टर याप्रमाणे  फवारणी करण्यात यावी , पक्षी थांबे प्रति हेक्टर 50 उभारावेत ,  या किटकनाशकाचे प्रमाण साध्या  पंपासाठी  असून पेट्रोल पंपासाठी किटकनाशकाची मात्रा तीन पट करावी , असे  उपविभागीय कृषी अधिकारी , उस्मानाबाद यांनी कळविले आहे.****
वृत्त्‍ क्र.971
वरुडा येथील शासकीय आश्रमशाळेस जिल्हाधिकारी यांची  भेट
उस्मानाबाद,दि.16:-शासकीय /अनुदानित  आश्रमशाळा  तसेच शासकीय  वसतिगृहातील विद्यार्थींनींबाबत  होणाऱ्या  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा सल्लागार  समिती गठीत करण्यात आलेली आहे . या समितीतील अध्यक्ष व सदस्यांनी  दिनांक 16 डिसेंबर रोजी वरुडा येथील  माध्यमिक आश्रमशाळेस भेट देऊन तपासणी केली .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ,  उप जिल्हाधिकारी श्री. सचिन बारवकर ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी  श्री. आर.आर. सोनकवडे ,विधी अधिकारी श्रीमती  सोनाली पाटील, जिल्हा परषिद सदस्य श्रीमती कांचनमाला सांगवे,  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) ,  समाज कल्याण निरीक्षक   श्री. दत्तात्रय कुंभार   आदी उपस्थित होते.
या तपासणीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  या आश्रमशाळेतील  विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  त्यांनंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या आश्रमशाळेच्या इमारतीची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करुन घेणे , विद्यार्थ्यांची दरमहा वैद्यकीय तपासणी करणे , आश्रम शाळेतील पट संख्या वाढण्यासाठी  पारधी वस्त्यांना भेट देऊन मुलांना शाळेस येण्यास प्रोत्साहीत करणे ,  गैरहजर मुलांचे सर्वेक्षण करुन प्रवेश वाढविणे ,  उन्हाळी सुट्टीमध्ये  भोसला  मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय धर्तीवर  शिबिरांचे आयोजन  करणे , अंगणवाडीतून बाहेर पडणाऱ्या मुलांचा सर्व्हे करुन पुढील वर्षी हे मुले या आश्रम शाळेत प्रवेश घेतील याबाबत विशेष प्रयत्न करावेत , 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना  विशेष प्रशिक्षण देण्यात यावे ,  त्यांचा  शारिरीक , बौध्दीक व शैक्षणिक विकास घडवावा ,  मुलींचे  लैंगिक शोषण  होणार नाही यासाठी उपाय योजना कराव्यात इत्यादी सूचना यावेळी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना   दिल्या .***
वृत्त्‍ क्र. 972
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष 
अद्ययावत  करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.16:-  महाराष्ट्र शासनाच्या  सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच राज्यातील सर्व  जिल्हा परिषदांमधील  अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष  दरवर्षी  अद्ययावत  करण्यात येणार आहे .  या माहिती कोषामध्ये  नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर  आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी  आस्थापनेवरील , रोजंदारीवरील , अंशकालीन , मानसेवी इ.)  तसेच तदर्थ  तत्वावर  नेमणूका  करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या  कर्मचाऱ्यांची  माहिती दिनांक  1 ऑक्टोबर 2016  या संदर्भ दिनांकास अनुसरून  गोळा करण्यात  येणार आहे .  नियोजन  विभागाने याविषयी  दिनांक 3 डिसेंबर 2016 रोजी  शासन परिपत्रक  निर्गमित  केले आहे .  राज्य स्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय , मुंबई , विभागीय  स्तरावर  संबंधित  जिल्हा सांख्यिकी कार्यालय  कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष  तयार करण्याची  कार्यवाही करणार आहेत .  शासकीय कर्मचाऱ्यांचा  सर्वंकष  माहितीकोष  तयार करते वेळी  माहिती नोंदणीकरीता  महाराष्ट्र शासनाच्या  www.mahasdb.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर EMDb   या नावाने  ऑनलाईन  संगणकीय  आज्ञावली  उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
 जिल्हा सांख्यिकी  कार्यालय, लातूर  यांच्याकडून  जिल्ह्यातील  सर्व आहरण व संवितरण  अधिकारी यांनी लॉगीन युजर आयडी  व पासवर्ड  तात्काळ प्रात करुन ऑनलाईन संगणकीय  आज्ञावलीमध्ये माहिती  नोंदणी  दिनांक  16 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत पूर्ण  करावयाची आहे .  जिल्हा  सांख्यिकी कार्यालय , उस्मानाबाद  यांच्याकडून दिली जाणारी माहिती  भरल्याचे प्रमाणपत्र  माहे जानेवारी 2017 च्या वेतन  देयकासोबत  व माहिती बरोबर  असल्याचे प्रमाणपत्र  माहे मे 2017 च्या वेतन  देयकासोबत  जोडणे आवश्यक आहे .  अन्यथा  सदर वेतन  देयके कोषागार  कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालय  येथे पारीत केली जाणार नाहीत .
शासन परिपत्रकाच्या  वेळापत्रकाप्रमाणे  सर्व आहरण व संवितरण  अधिकारी यांनी कार्यवाही  करुन  शासकीय  कर्मचाऱ्यांचा  सर्वंकष  माहितीकोष  तयार करण्यास  सहकार्य करावे, असे आवाहन  उस्मानाबादच्या जिल्हा सांख्यिकी अधिकारी  श्री. वा.प्र. जाधव यांनी यांनी केले आहे .***

वृत्त्‍ क्र.973
राज्यातील  सर्वात पहिली  लोकराज्य ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅच
उस्मानाबाद मध्ये
उस्मानाबाद,दि.16:-  महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय  मुखपत्र  असलेल्या  लोकमान्य: लोकराज्य  या मासिकाची ओळख  असलेल्या  अंकाचे महत्व लक्षात  घेवून  उस्मानाबाद मध्ये  या वर्षातील  राज्यातील  सर्वात  पहिली लोकराज्य ब्युटी पार्लर  प्रशिक्षण  बॅच  बनली आहे .
नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद केंद्रातर्फे महिलांचा  विशेष  ब्युटी पार्लर  प्रशिक्षण वर्ग  आयोजित  करण्यात  आला होता .  त्यावेळी  समारोपास  जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  यांना आमंत्रित  करण्यात  आले होते .  त्यावेळी त्यांनी या महिलांना  महाराष्ट्र शासन ; माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती  कार्यालय , इतर  शासकीय विभाग  याविषयी  माहिती दिली.  त्याचवेळी  त्यांनी  लोकराज्य मासिकाचे  महत्वही त्यांना पटवून दिले .  त्यावर या संपूर्ण  प्रशिक्षण  वर्गाने  लागलीच लोकराज्यचे  वार्षिक सभासदत्व   स्वीकारले आणि ही बॅच  राज्यातील  व उस्मानाबादमधील  सर्वात पहिली लोकराज्य  ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅच झाली .
यावेळी  रामचंद्र कुलकर्णी ,  प्रतिभा जाधव ,  सायली सलगर ,  काझी कुलसुम ,मनोजकुमार  सरवदे ,  पायाळ विनोद ,  वाघ वैभव ,  कुंभार सोमनाथ ,  अश्विनी  थोरात ,  उमरदंड  रुपेश ,  प्रविण  माने , कार्तीक गिराम , सुबोध खुने,  गिराम  पल्लवी ,  विरेश गायकवाड , पांचाळ लक्ष्मण ,  शितल जोकार ,  सरोजिनी  मोहिते ,  अर्चना  मैदाड ,  कल्पना  उंदरे , मनिषा  ठेले , शितल माने हे उपस्थित होते .
 हा लोकराज् अंक  आम्हाला  तर उपयोगी पडेलच मात्र आमच्या ब्युटी पार्लरमध्ये  जे ग्राहक  म्हणून येतील  त्यांनाही हे मासिक  वाचता येईल आणि त्यातून  त्यांनाही  शासनाबद्दलची  अधिकृत  माहिती मिळेल. असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला.*****
वृत्त क्र.974       शाळा व महाविद्यालयाने शिष्यवृत्तीसाठीचे  प्रस्ताव सादर करावेत
उस्मानाबाद.दि 16:- जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सन 2016-17 करिता महाविद्यालयास  माध्यमिक  व  उच्च  माध्यमिक  शिक्षण मंडळ  व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी मंजूर केलेल्या शिक्षण शुल्कानुसार आपल्या महाविद्यालयाच्या लॉगीन आयडी वरती  शुल्क भरण्यात यावा व त्याची एक प्रत समाज कल्याण कार्यालयास  तात्काळ सादर  करण्यात  यावी.
            सन 2016- 17 या शैक्षणिक वर्षातील  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे  भारत सरकार शिष्यवृत्तीचे  अर्ज  तात्काळ संगणक प्रणलीद्वारे भरण्यात यावे  व सदर  शिष्यवृत्तीचे  प्रस्ताव  या  कार्यालयास  मंजुरीस्तव  सादर  करण्यात यावेत. प्रस्ताव सादर करताना त्यासोबत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक,  बॅंक  खात्याशी संलग्न केलेला पुरावा सोबत जोडण्यात यावा.विहीत  कालावधीत  शुल्क  मान्यतेसाठी  प्रस्ताव  व  विद्यार्थ्यांचे अर्ज  सादर न केल्यास या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृती, शिक्षण शुल्क अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणारी नाही असे, सहायक आयुक्त श्री. शिवाजी शेळके यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 975      

Friday, 16 December 2016

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उस्मानाबादचे 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण



उस्मानाबाद,दि.16:- जिल्ह्यास  सन 2015-16 साठी 44 लाख रुपयांचे ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट देण्यात आले होते . जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली 80.12 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे . हे उद्दिष्ट  पूर्ण केल्याबद्दल  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचा शाल , श्रीफळ  व स्मृती चिन्ह देऊन  यावेळी विशेष सत्कार करण्यात आला . तसेच 2016 च्या  ध्‍वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले , कमांडर गुरुदत्त सालोखे,  राज्य  परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे हे उपस्थित होते .
प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले म्हणाले की ,  परकीय आक्रमणापासून  देशाचे  संरक्षण  करताना , अंतर्गत शांतता  व सुव्यवस्था प्रस्थापित करताना शूर सैनिक  स्वत:च्या  परिवारापासून  हजारो मैल अंतरावर राहून देशसेवा करीत  असताना कित्येक सैनिक हुतात्मे होतात तसेच त्यांना अपंगत्व येते . अशा या शूर  सैनिकांबद्दल  कृतज्ञता  व सद्भावना  व्यक्त  करुन त्यांचे ऋण  फेडण्याच्या उदात्त  भावना व्यक्त   करण्यासाठी  सशस्त्र  सेना ध्वजदिन  निधी  संकलित करुन सैनिकांच्या  कल्याणकारी  योजना  या निधीतून राबविण्यात  येतात. अशा या  सैनिकांच्या व राष्ट्राचा मानबिंदू  असणाऱ्या  ध्वजाचा ध्वजदिन निधी संकलन दरवर्षी करण्यात येते .  याचे औचित्य साधून शहीद सैनिकांना  यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. कॅप्टन सुनिल गोडबोले  यांनी ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. 
यावेळी सन 1971 च्या 16 डिसेंबर रोजी भारतीय  लष्कराने  पाक सैन्यावर  विजय मिळविला . त्याला  आज 45 वर्षे पूर्ण  झाली आहेत .  या युध्दामध्ये  उस्मानाबाद जिल्ह्यातील चार  सैनिक शहीद झाले . तसेच  इतर युध्द  मोहिमांमधील शहीद  वीरांच्या वीरपत्नी  , वीरमाता  व वीरपिता  यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .  यामध्ये  वीरपत्नी  श्रीमती प्रभावती  निकम , श्रीमती गयाबाई  सोनटक्के , श्रीमती बेबीताई नारंगवाडे , श्रीमती ललीता जाधव , श्रीमती  रतन महाडिक ,  श्रीमती रेहना बेगम ,  श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड,  श्रीमती कांताबाई कदम ,  वीरपिता श्री. काशिनाथ कोकरे , वीरमाता  श्रीमती  माताबाई नागरगोजे  यांचा यावेळी  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांस उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले . यामध्ये माजी सैनिक श्री. ज्ञानदेव गुंड यांचा पाल्य कु. प्रभात  याने इयत्ता 10 वी च्या  परीक्षेत 96.40 टक्के  गुण मिळविल्याबद्दल त्याला रुपये 10 हजार , माजी सैनिक  श्री. पोपट लोमटे यांची पाल्या  कु. धनश्री  हिने इयत्ता 10 वी मध्ये 96.20 टक्के गुण मिळविल्याबद्दल तिला रुपये 10 हजार, प्रशस्तीपत्रक , शाल व श्रीफळ देऊन  मान्यवरांच्या  हस्ते  सत्कार करण्यात आला. तसेच  माजी सैनिक श्री उत्तम काळे यांची पाल्या  कु. दिपीका हिला परदेश शिक्षणासाठी मदत म्हणून रुपये 50 हजार , माजी सैनिक श्री. संजय साळुंके यांची पाल्या कु. शितल  हिच्या वैद्यकीय  व्यावसायिक शिक्षणास आर्थिक मदत रु. 40 हजार,  माजी सैनिक  श्री. धनराज भोसले यांची पाल्या कु. वैष्णव हिच्या सैनिकी शिक्षणासाठी आर्थिक  मदत  रु. 15 हजार ,  माजी सैनिक  गुलाब शेख यांचा पाल्य  कु. सूरज  याच्या  अभियांत्रिकी व्यावसायिक शिक्षणास  मदत रुपये 20 हजार ,  माजी सैनिक नंदकुमार लाटे यांचा पाल्य श्री. अक्षय  याच्या वसतिगृह खर्च प्रतिपूर्तीसाठी मदत     रु. 8 हजार रुपये एवढी आर्थिक मदत  सैनिक कल्याण कार्यालयाच्या कल्याणकारी  निधीतून  करण्यात आली .
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सन 1971 च्या भारत -पाकिस्तान युध्दाची विस्तृत माहिती देवून देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जात असल्याने या निधीच्या संकलनात सर्वांनी योगदान द्यावे , असे आवाहन  यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते म्हणाले की , पुढील ग्रामसभेत  आजी / माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी  गावपातळीवर, तालुकास्तरावर व जिल्हास्तरीय  समिती गठीत करुन  त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले .
ध्वजदिन निधी 2016 निधी संकलन  शुभारंभ व ध्वजदिन निधी 2015 चे उत्कृष्ट संकलन केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते , राज्य  परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष बनसोडे , जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप ,   तुळजापूरचे तहसिलदार   श्री. दिनेश झांपले, शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप व श्री. औदुंबर उकिरडे आदी कार्यालय प्रमुखाना प्रोत्साहनपर पारितोषिक  देऊन त्यांचाही यावेळी  गौरव करण्यात आला . या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध कार्यालयाचे  कार्यालय प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी , माजी सैनिक संघटना, नागरिक, माजी सैनिक -विधवा बहुसंख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

*****

Thursday, 15 December 2016

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा 15 हजार रुग्णांना लाभ





उस्मानाबाद,दि.15:- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक प्रकारच्या आजारातून रुग्णांना लाभ मिळाला आहे.आतापर्यंत 15 हजार रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी दिली आहे.
            राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि 21 नोव्हेंबर 2013 पासून सुरु करण्यात आली आहे . योजनेला दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी 3 वर्षे पूर्ण होत आहेत.या योजनेत 971 अतिगंभीर व अतिविशिष्ट प्रकारच्या रुग्णांवर या योजनेतून उपचार केले जातात.राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाचा समावेश यात करण्यात आला आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातून व शहरातून या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या रुग्णालयातून लाभ देण्यात येतो. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील 971अतिगंभीर  आजारी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत . जिल्ह्यातील 5 रुग्णालयांतून  3 हजार 261 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या योजनेतून दि.21 नोव्हेंबर 2013 ते 14 डिसेंबर 2016 पर्यत 15 हजार 184 रुग्णांवर विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दि. 10 ऑक्टोबर 2015 ते 30 नोव्हेंबर 2016 या दरम्यान उस्मानाबाद 870, कळंब 553, तुळजापूर 388, परंडा 357, उमरगा 316, भूम 303, वाशी 269, लोहारा 139  अशा एकूण 3 हजार 195 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया  करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे संबंधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत - रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्त्योदय, अन्नपूर्णा),पांढरे रेशनकार्ड व 7/12 उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी), ओळखपत्र – (आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँक पासबूक व इतर शासनमान्य ओळखपत्र), लहान मुलांसाठी (6 वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला,आई किंवा वडिलांचे ओळखपत्र, फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये त्रुटी असतील तर संबंधित तहसिलदारांचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका  असणे आवश्यक आहे .
या योजनेसाठी जिल्हयातील जिल्हा रुग्णालय- उस्मानाबाद, सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानाबाद, सुविधा हॉस्पिटल- उस्मानाबाद, निरामय हॉस्पिटल-उस्मानाबाद व चिंचोळी हॉस्पिटल, उमरगा अंगीकृत रुग्णालयाचा समावेश असून या योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 वर संपर्क साधावा, असे आवाहन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी केले आहे.
***
वृत्त क्र.959
कडबाकुट्टी  यंत्र / मुरघास युनिट
योजनेसाठी 17 डिसेंबर 2016 रोजी बैठक
उस्मानाबाद,दि.15:- राष्ट्रीय पशुधन अभियान  योजना सन 2016-17 अंतर्गत  विद्युतचलित  कडबाकुट्टी  यंत्राच्या  वापरास प्रोत्साहन  आणि मुरघास  तयार करण्याचे युनिट  स्थापन  करणे या योजनांच्या  अंमलबजावणीसाठी  जिल्हा पशुधन  अभियान  समितीअंतर्गत  गठीत  निवड समितीमार्फत  लाभार्थींची  निवड  करण्यासाठी  दि. 17 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त कार्यालय  , आनंद नगर  उस्मानाबाद  येथे दुपारी 12.30 वाजता  बैठक आयोजित  करण्यात आली आहे .
या निवड प्रक्रियेसाठी  अर्जाच्या  स्वरुपात  प्रस्ताव  सादर केलेल्या लाभार्थ्यांपैकी  योजनेचा लाभ  घेण्यासाठी पात्र  ठरलेल्या  लाभार्थींनी जास्तीत जास्त  संख्येने  हजर राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे .
**
वृत्त क्र .960
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद  निवडणूक 2016
18 डिसेंबर 2016 रोजी होणार मतदान
            उस्मानाबाद , दि. 15:-   जिल्ह्यात महाराष्ट्र वैद्यकीय  परिषद  निवडणूक -2016 ची निवडणूक  दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 ते 5.00 या वेळेत  घेण्यात येणार   असून उस्मानाबाद येथे दोन  मतदान केंद्रे ठेवण्यात  आली आहेत .  मतदान  केंद्र क्रमांक -1 निवासी  वैद्यकीय  अधिकारी , (बाह्य संपर्क )  जिल्हा सामान्य  रुग्णालय , उस्मानाबाद  आणि मतदान केंद्र  क्रमांक -2  आयुष विभाग , जिल्हा सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद.
जिल्ह्यातील वैद्यकीय परिषदेकडे नोंद झालेल्या  व्यावसायिक  एमबीबीएस डॉक्टर्स मतदारांनी  या दिवशी मतदान करावे ,असे आवाहन  उप जिल्हा निवडणूक अधिकारी , उस्मानाबाद यांनी केले आहे . *****

वृत्त क्र . 961
पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत 
उपाययोजनेकरिता फवारणी करण्याचे आवाहन
            उस्मानाबाद , दि. 15:-  राष्ट्रीय कृषी  विकास  योजनेंतर्गत  भूम उपविभागात  आंबा  फळपिकांवरील  कीडरोग सर्वेक्षण , सल्ला व  व्यवस्थापन प्रकल्प सन 2016-17 राबविण्यात येत असून या अंतर्गत  वाशी , कळंब  व परंडा तालुक्यात  प्रत्येकी  एका कीड सर्वेक्षकामार्फत तसेच उपविभागातील  चारही तालुक्यांत कीड नियंत्रकांमार्फत  आंबा  पिकावरील  प्रमुख किडे तुडतुडे , फूलकिडे तसेच  भुरी  व बुरशीजन्य  करपा या रोगांसाठी  सर्वेक्षण  करण्यात येत आहे . त्या माहितीच्या आधारे  विश्लेषण  करुन दर सोमवारी व गुरुवारी   पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत  उपाययोजना  सूचविण्यात येत आहेत .  याबाबतची अधिक माहिती www.ncipm.org.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
             दिनांक 5 डिसेंबर 2016 रोजीच्या प्राप्त  सर्वसाधारण  कीडरोग  सल्ल्यानुसार , आंबा  फळ‍पिकांवर  तुडतुडे  या कीडीचा  प्रादूर्भाव  दिसून  येण्याची शक्यता  आहे त्यासाठी  डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के (प्रवाही) 9 मिलिलीटर किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के (प्रवाही) 15 मिलिलीटर प्रति 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी, असे आवाहन  उपविभागीय कृषी अधिकारी , भूम यांनी केले आहे .
****


वृत्त क्र . 962

उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाची
विभागीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
            उस्मानाबाद.दि.15:- संचालनालय  लेखा  व  कोषागारे  कर्मचारी कल्याण  समितीमार्फत  हिंगोली येथे दि. 10 व 11 डिसेंबर 2016 रोजी  संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात उस्मानाबाद  येथील जिल्हा कोषागार कार्यालयाने विविध स्पर्धा प्रकारात  घवघवीत  यश  संपादन केले  आहे.  क्रिकेट व व्हॉलीबॉल  स्पर्धेत  उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रथम  क्रमांक  मिळविला आहे.
            वैयक्तिक  क्रीडा  प्रकारात देखील  कोषागार  कार्यालयाने यश  संपादन  केले आहे. यात 100 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. आय. मोहमद व 200 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. के. सरनाईक यांनी द्वितीय क्रमांक,100 मीटर रिले महिला गटात श्रीमती एस.जी. घोगरे,श्रीमती ए.एन. नरवाडे,श्रीमती  के.बी. गायकवाड, श्रीमती ए.एच. पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला, गोळा फेक पुरूष गटात श्री. व्ही. आर. पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला , थाळी फेक पुरूष गटात व्हि. आर. पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला.,कॅरम एकेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे यांनी द्वितीय, कॅरम दुहेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे, के.डी. मगर यांनी व्दितीय क्रमांक पटकविला, कॅरेम दुहेरी महिला गटात श्रीमती  एम.व्ही. कुलकर्णी व श्रीमती के. बी. गायकवाउ यांनी द्वितीय क्रमांक , टेबल टेनिस एकेरी पुरूष  गटात श्री. एन.बी. बारकुल यांनी प्रथम क्रमांक, बॅडमिंटन एकेरी पुरूष गटात एस. मोहमद यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
            उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने  मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार , अप्पर कोषागार अधिकारी श्री. अप्पासाहेब पवार  व  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे  जिल्ह्यातील अधिकारी – कर्मचारी तसेच  नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे.****


Wednesday, 14 December 2016

जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण


जिल्ह्यातील  सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले
कॅशलेस  व्यवहाराचे प्रशिक्षण
 उस्मानाबाद.दि.14:- देशात 500 आणि 1000 रुपयांच्या   नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना  ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी ई- बँकिंग, मोबाईल बँकिंग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रशिक्षण  दिले जात असल्याचे  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या या दोन्ही प्रशासन प्रमुखांनी रोखीने होणारे व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्ती करण्यात येईल,सर्वप्रथम सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाईल ज्या पाल्यांच्या पालकांचे बँकेत खाते नसतील अशांची खाती बँकेत उघडली जातील . प्रत्येक शनिवारी म्हणजेच कौशल्य विकास दिनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षक ई-लर्निंगच्या माध्यमातून नेटबँकींग, मोबाईल बँकींग यासारख्या डिजिटल पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील , ज्यामध्ये नोटांची निर्मिती कशी झाली ,  नोटांचा इतिहास , प्लॅस्टिक मनी ही संकल्पना , एटीएम कार्डबाबत माहिती एटीएम कार्डची  काळजी कशी घ्यायची ,  एटीएम कार्ड वापरण्याची पध्दत, एटीएम कार्डचे फायदे इत्यादींबाबतची माहिती इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना  जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चलनीकरणाबाबतची भीती निघून जाईल तसेच  कॅशलेस पध्दतीबाबत जनजागृती होईल . याशिवाय  प्रत्येक विद्यार्थी शाळेत दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती आपल्या पालकांना देतील त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील ही निश्चलनीकरणाची व कॅशलेस व्यवहारांबाबतची भीती दूर होण्यास मदत होईल.
या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी (प्राथ) सचिन जगताप ,  शिक्षणाधिकारी (माध्य)ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप, जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर ,  स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले,  उपशिक्षणाधिकारी , गट शिक्षणाधिकारी आणि सर्व शाळांचे  मुख्याध्यापक   आदी उपस्थित होते .
सर्व शाळांच्या  मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणानंतर शिक्षकांना आणि  शिक्षकांकडून  विद्यार्थ्यांना  व पालकांना असा  हा कॅशलेस व्यवहारासंबंधीचा प्रशिक्षण उपक्रम  राबविला जाणार आहे .
****



वृत्त क्र.952
पोलीस पाटील पदांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
            उस्मानाबाद.दि.14:- उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद अंतर्गत उस्मानाबाद व तुळजापूर या तालुक्यातील पोलीस पाटलांची 131 रिक्त पदे भरावयाची असून, बँकेला सलग तीन दिवस सुट्टया आल्यामुळे  इच्छूक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यासाठी  मुदतवाढ दिली असून दि.14 डिसेंबर ऐवजी शनिवार दि. 17 डिसेंबर 2016 पर्यंत पोलीस पाटील या पदासाठीचे अर्ज स्विकारण्यात येणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.****      
वृत्त.क्र. 953
अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस पदभरती
            उस्मानाबाद , दि. 14:-  एकात्मीक बाल विकास  सेवा योजना  प्रकल्प मुरूम या कार्यालयांतर्गत  मौ. होर्टी येथील  अंगणवाडी क्र. 113 मधील  मदतनीस एक,  मौ.वागदरी  येथील  अंगणवाडी क्र.108 मधील  मदतनीसचे एक पद, मौ. कोथळी येथील अंगणवाडी क्र.70 मधील मदतनीसचे एक पद, मौ. दाळींब येथील अंगणवाडी क्र. 8 मधील  मदतनीसचे एक पद, मौ. तुगांव येथील अंगणवाडी क्र. 48 मधील  मदतनीसचे एक पद  अशा मदतनीसाच्या एकूण पाच रिक्त पदांसाठी  संबंधित गावात ग्रामपंचायत , इतर व बाल विकास प्रकल्प  अधिकारी कार्यालयात या पदभरतीबाबतचे जाहीर प्रगटन डकविण्यात आले आहे.   
            या प्रगटनात  सविस्तर अटी  व शर्ती नमूद  करण्यात आलेल्या  आहेत .  तरी इच्छूकांनी  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मुरूम येथून  विहित  नमुन्यातील  अर्ज घेऊन योग्य त्या  कागदपत्रांच्या पूर्ततेसह  दि. 14 ते 23 डिसेंबर 2016 या मुदतीत  अर्ज सादर करावेत, असे आवाहन  बाल विकास  प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुरूम यांनी केले आहे.****                                                               
वृत्त.क्र. 954      जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक
            उस्मानाबाद , दि. 14:- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक दि.29 डिसेंबर 2016 रोजी दुपारी  12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी, अभिकथने पुराव्यासह  या बैठकीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  *****
वृत्त.क्र. 955      शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीस मुदतवाढ
उस्मानाबाद , दि. 14:- मुख्य  निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी  दि. 8 डिसेंबर 2016 रोजीच्या पत्रान्वये शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम नोंदणीस दि. 12 जानेवारी 2017 रोजीपर्यंत अंतिम करण्यास मुदतवाढ दिली आहे.  पुनरिक्षण  कार्याक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.23 नोव्हेंबर  ते 19 डिसेंबर 2016 , दावे व हरकती निकाली काढण्याचा   दिनांक व पुरवणी यादी तयार  करणे व छपाई करणे दि.6 जानेवारी 2017  व  मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी  दि. 12 जानेवारी 2017  रोजी असेल , असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.*******



वृत्त.क्र. 956                  अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले
            उस्मानाबाद , दि. 14:- सकनेवाडी शिवार येथे वाडीवाटच्या शेताच्या बाजुला बाभळीच्या झाडाखाली अज्ञात इसमाचे प्रेत दि.6 डिसेंबर 2016 रोजी आढळून आले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- या मयत व्यक्तीची उंची 168 सें.मी., शरीर बांधा सडपातळ, रंग काळा, वय 34 वर्षे, अंगात पिवळया  इटकरी रंगाचा चौकडा शर्ट, इटकरी रंगाची अंडरवेअर, श्री शक्ती कंपनीचा हाफ बाहीचा बनियन आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कुणास काही माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे  आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.पवार यांनी केले आहे.
                                                          ******
वृत्त.क्र. 957         नेहरु युवा मंडळाच्या शेतकरी विकास कार्यक्रमास प्रतिसाद
            उस्मानाबाद , दि. 14:-  विश्व मृदा दिवसाचे औचित्य साधून दि.5 डिसेंबर 2016 रोजी ओम नगर येथील  नेहरु युवा मंडळाच्या वतीने शेतकरी विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वडगाव(सि) व शेकापूर येथील 101 शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माती परीक्षण कार्यालयातील विजय पाटील, सहायक कुमोद नारनवरे, नेहरु युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, वैभव लांडगे, रवि सूर्यवंशी, बाळकृष्ण साळूंके, राहूल इंगळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****



फर्स्ट पर्सन हेडमास्तरांची भरली “कॅशलेस शाळा” …


डिसेंबर महिना तसा थंडीची चाहूल लागणारा महिना .. निसर्गाच्या कृपेने आज सूर्यदर्शन न होता ढगाळ वातावरणात हलक्याशा रिमझिम सरी पडत असताना दुपारची 12 ते 12.30 ची वेळ.. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्ह्यातील शिक्षकी पेशात विचार सांगणारा वर्ग इकडे तिकडे लगबगीने धावत पळताना दिसले .. मी काही कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जात असताना .. चार-पाच व्यक्तींचा एक गट समोरुन आला ..  त्यातील एकाने मला विचारले नियोजन समितीचे सभागृह कोठे आहे? मी त्यांना सांगितले की ते पहिल्याच मजल्यावर आहे .. मी त्यांना सहज विचारले की, नियोजन विभागाच्या सभागृहात काय आहे ? त्यातील एकाने चटकन उत्तर दिले, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत  प्रशिक्षण आहे . हे ऐकून मी तात्काळ नियोजन सभागृहात पोहोचली..  जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेबही तेथे  शिक्षणाधिकारी जगताप साहेब,  माध्यमिकचे शिक्षणाधिकारी उकिरडे साहेब,  उपशिक्षणाधिकारी कुंभार मॅडम यांच्यासह मंचावर उपस्थित होते ...   
 जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रायते  यांच्या प्रमुख  मार्गदर्शनातून  सर्व कार्यालय  प्रमुखांनी आपआपल्या  विभागांना  कॅशलेस करण्याचा  संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षणास  जिल्ह्यातील 1 हजार 813 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. हे सर्वजण या प्रशिक्षणातून कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबतचे म्हणजेच ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबतचे धडे बँक अधिकाऱ्यांकडून घेवून आपआपल्या  शाळेतील एकूण 10 हजार 100 शिक्षकांना हे धडे शिकवतील … आणि हे शिक्षक जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना   आणि  जिल्ह्यातील इतर खाजगी व विनाअनुदानित शाळेतील  विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी हे धडे देणार आहेत …
दिनांक 8 नोव्हेंबर 2016 पासून  देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. रोखीने होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्तीही करण्यात आली  आहे.   तसेच विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक कॅशलेस व्यवहारांबाबत प्रशिक्षण देतील तेव्हा हेच विद्यार्थी घरी जाऊन आपल्या पालकांना या कॅशलेस व्यवहारांबाबतची माहिती देतील .. त्यामुळेही ग्रामीण भागातील जनेतेमध्ये मोठ्या प्रमाणात या कॅशलेस व्यवहारांची माहिती पोहोचेल आणि त्यांच्या मनातील कॅशलेस व्यवहारांबाबतची भीतीही दूर होण्यास मदत होईल .. जे जे आपणांसी ठावे .. ते ते सर्वांसी सांगावे .. शहाणे करुन सोडावे .. सकळजण … या ओळी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सार्थ ठरतील अशी अपेक्षा यावेळी मला वाटू लागली …
एरवी मुलांना कधी प्रेमाने तर कधी दम भरुन शिकवणारे शिक्षक , मुख्याध्यापक आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना व प्रशिक्षकांना  कॅशलेस व्यवहारांबाबत आणि  ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम च्या वापराबाबत अगदी उत्सुकतेने प्रश्न विचारताना दिसत होते …
या प्रशिक्षणास जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर ,  स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले , शिक्षणाधिकारी  श्री.सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री.ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप , उपशिक्षणाधिकारी (प्राथ) श्रीमती  रोहिणी कुंभार आदी उपस्थित होते .
या प्रशिक्षणातून कॅशलेस व्यवहारांबाबतचे जे प्रशिक्षण या मुख्याध्यापकांना देण्यात  आले आहे  त्याचा फायदा शाळकरी मुलांना व त्यांच्या पालकांना नक्कीच होईल आणि देशभरात चाललेल्या या चलनकल्लोळाचा सुरुवातीला जो काही त्रास जनतेस सहन करावा लागला तो या कॅशलेस व्यवहाराच्या ज्ञानामुळे आर्थिक व्यवहारात त्यात सुलभता येईल  व पूर्वीच्या  ज्या पारंपारिक पध्दती होत्या त्याच पध्दती नंतर सर्वांना अवघड आणि वेळखाऊ होत्या याची जाणीव होईल …
            या प्रशिक्षणामध्ये एटीएम कार्ड स्वाईप करुन डिजिटल व्यवहाराचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना पाहावयास मिळाले. याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हातोहात पैशांचा व्यवहार करण्यापेक्षा फक्त मशीनद्वारे योग्य ती माहिती इनपूट करुन वेळ व श्रम वाचविणारे पैशांचे हस्तांतरण सर्वांना पाहावयास मिळाले. हे व्यवहार झाल्याची पोहोचही मोबाईलवर संदेशाद्वारे मिळत असल्याची खात्रीही उपस्थितांना झाल्याचे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर कुतुहलाचे भाव दिसून आले ...जसे लहान मुलांना एखादी कविता किंवा उजळणी पाठ केल्यानंतर शिक्षकांनी शाबासकीची थाप पाठीवर मारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्या बालमनाला जो आनंद होतो अगदी तसाच आनंद उपस्थित मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरुन  यावेळी ओसंडून वाहत होता...
 सर्वजण या नवीन अर्थव्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील आणि शासनाकडून अर्थधोरणांमध्ये सातत्याने बदल केले जात असताना त्याचा व्यर्थ ऊहापोह न करता विकासाची हीच संधी आहे, असे समजून  शासनाच्या डिजीटल व्यवहारांच्या मोबाईल बॅंकींग, ई-वॉलेट, स्वाईप मशीन, एटीएम डेबीट कार्ड, युपीआय अॅप, इंटरनेट बॅंकींग इत्यादींचा अवलंब करतील अशी आशा मला यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांकडे पाहून वाटू लागली होती..
सशक्त राष्ट्र उभारणीच्या या एका मार्गावर  सर्वांची यशस्वी वाटचाल  होवो याकरिता सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
           
                                                                                                --आशा बंडगर,
                                                                                                सर्वसाधारण सहायक  तथा
                                                                                                माहिती सहायक (अ.का.),
                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय ,
      उस्मानाबाद


****