Wednesday, 26 September 2018

दि.26 सप्टेंबर 2018 परंडा तालुक्यातील सेना खैरी उर्फ चांदणी नदीपात्राच्या परिसरात कलम 144 लागू

           परंडा तालुक्यात सिना, खैरी,उल्फा, चांदणी या नद्या असून या नद्यांच्या पात्रांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. तांदुळवाडी,खासगाव, सोनगिरी, रुई दुधी, भोत्रा,  देवगाव, वडनेर या वाळूगटातून अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतुकीच्या  प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी, संदेश प्राप्त होत आहेत.अवैध वाळू चोरी वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी त्यांच्या अधिकारानुसार 21 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6.00 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परंडा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी, खासगाव, सोनगिरी,भोत्रा देवगाव, वडनेर,शेळगाव, चिंचपूर या गावातील नदीपात्रामध्ये किंवा वाळू गटाच्या ठिकाणी वाहनाने प्रवेश करण्यास, अवैध उत्खनन करण्यास तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध केला आहे. 
           हा आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणतेही वाहन जसे जेसीबी, पोकलेन, ट्रक, ट्रॅक्‍टर व इतर, मजूर, ठेकेदार, वाहनचालक व अन्य चार चाकी वाहन व व्यक्तीस प्रतिबंधित ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी -कर्मचारी,पोलीस अधिकारी-कर्मचारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तसेच तहसील कार्यालय, परंडा यांनी नियुक्त केलेल्या पथकास तसेच त्यांच्या वाहनास लागू होणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.

1993 च्या भूकंपात अनाथ निराधार झालेल्या मुला-मुलींसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन -- आपले घर

1993 च्या प्रलयंकारी भूकंपात अनाथ, निराधार झालेल्या मुला मुलींचे संगोपन व शिक्षण करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने साने गुरुजी जयंती दि. 24 डिसेंबर 1993 रोजी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे आपले घर चालू केले. निवास भोजन व शिक्षण यांची  चांगली सोय करण्याबरोबरच त्या मुला मुलींच्या सर्वांगीण विकासाला उत्तेजन मिळावे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून चांगल्या प्रकारे त्यांना जगता यावे,अशी त्यांची तयारी करण्याचा कटाक्ष आपले घर ने नेहमीच ठेवला आहे. अशा निराधार मुली मुलांचे जीवन वाया जाऊ नये,यासाठी आपले घर सुरू राहणे गरजेचे आहे.
दहावीपासून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी नवीन मुले मुली येतात.बारा ते पंधरा स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचा संच आत्मीयतेने आपले घरचे कार्य सांभाळत आहेत.आपले घर मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचा आपले घर शी सदैव संपर्क आहे, त्यांच्यापैकी जे नळदुर्गच्या जवळ राहतात ते आपल्या घरच्या कामकाजात आपुलकीने भाग घेतात. समाजातील दानशूर धनिक वर्गाबरोबरच शिक्षक, प्राध्यापक, सेवारत व निवृत्त सरकारी कर्मचारी, बँका वगैरेचे कर्मचारी यांनी या सामाजिक बांधिलकीचे ऋण मानून किमान 2 हजार 500 रुपयांची देणगी आपले घर च्या पत्त्यावर पर्यायाने या अनाथ निराधार मुला-मुलींकरिता द्यावी, ही विनंती आपले घर च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ही देणगी कर 80 जी आर या सवलतीस पात्र आहे.(आपले घर च्या राष्ट्रसेवा दल आपले घर स्टेट बँक ऑफ इंडिया नळदुर्ग खाते क्रमांक 5 2 0 0 0 0 0 4 4 आयएफसी कोड एसबीआय) ही रक्कम बँकेत भरल्यानंतर ९४२२३६६८१० या मोबाईल क्रमांकावर कृपया एसएमएस करावा. तसेच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर जनजागृतीचे अभियान चालविणे आवश्‍यक आहे, त्यादृष्टीने लातूर भूकंपाच्या स्मृतिदिनी रविवार 30 सप्टेंबर 2018 रोजी सोलापूर येथे एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे तसेच आपल्या घरच्या रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त स्मरणिका काढण्यात येणार असून त्यात माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व कार्यकर्त्यांचे अनुभव कथन याबरोबरच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर मूक- बधिर, मतिमंद मुले, बाधित मुले यांच्या संगोपनासाठी चालविल्या जाणाऱ्या संस्ताचालकांचे अनुभव तसेच या क्षेत्रातील विशेषतज्ञ व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या प्रकट मुलाखती देण्यात येणार आहेत. व्यापारी आणि सहकारी संस्थांनीही या स्मरणिकेस जाहिरातीच्या स्वरूपात सहकार्य करावे.रौप्य महोत्सव समारोप समारंभ रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी आपले घर, नळदुर्ग येथे होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही घेण्यात येणार आहे.या सर्व उपक्रमात यथाशक्ती सहभागी होऊन आपले घरला सहकार्य करावे,असे आवाहन आपले घरचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात "नाफेड " च्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन

  राज्यात खरीप हंगाम 2018-2019 मध्ये विविध जिल्ह्यात नाफेड या संस्थेच्या वतीने मूगउडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहेसदरील मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभूत दराने करण्यात येईलमूगउडीद व सोयाबीनचे आधारभूत दर व नोंदणी कालावधी पुढीलप्रमाणे आहे- पीक-मूग, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -6975/-नोंदणी कालावधी -25/09/2018 ते 09/10/2018, पीक-उडीद, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -5600/- नोंदणी कालावधी -25/09/2018 ते 09/10/2018, पीक- सोयाबीन, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -3399/-नोंदणी कालावधी -01/10/2018 ते 31/10/2018.
सर्व शेतकऱ्‍यांना  कळविण्यात येते की, सर्व खरेदी नलाईन पद्धतीने होणारआहे,शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावीनोंदणीचाप्रारंभिक कालावधी 15 दिवसांचा असेलतसेच अपवादात्मक प्रकरणी त्यानंतर आलेल्या शेतकऱ्यांच्याअर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या 15 दिवसांत करण्यात येईल. तद्नंतर नोंदणी होणार नाही,नोंदणीकरिता आधारकार्डची प्रत व मूग/उडीद/सोयाबीन या पिकाी नोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे, शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे,नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईलशेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे त्याच केंद्रावर माल आणावयाचा आहे.एसएमएस शिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल, शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला,चाळणी करुन व सुकवून 12 पेक्षा जास्त आर्द्रता नसलेला माल आणावा. तसा माल नसल्यास परत पाठविण्यात येईल.
 याशिवाय शेतकऱ्यांना असेही कळविण्यात येते की, खरेदी संस्था माल आणल्यानंतर शेतकरी नोंदणीकृत आहे किंवा कसे?,एसएमएस दिल्यानंतर माल आणला किंवा कसे?, शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार व खरेदीच्या मर्यादेनुसार माल आणला किंवा कसे?, 7/12 च्या पिकपेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद आहे किंवा कसे?,
गुणवत्ता नियंत्रकाच्या मते माल एफएक्यू दर्जाचा आहे किंवा कसे? या बाबी तपासून त्याची पूर्तता होत असेल तरच खरेदीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच इलेक्ट्रनिक वजनकाट्यावर मोजणी झाल्यानंतर मालाची नोंद वजनासह करुन काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल, खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन सबएजन्ट/खरेदी संस्थेवर राहील, शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधारकार्डाशी संलग्न बँक खात्याद्वारेच देण्यात येईल, त्यामुळे आपले बॅक खाते आधारकार्डशी संलग्न असल्याची त्यांनी खात्री करावी, पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची 7/12 व स्थळ पाहणी करुन महसूल व कृषि विभागाकडून पडताळणी करण्यात  येईल.
तरी या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

जिल्हयात आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आ. सुरजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा नुकतेच आमदार सुरजितसिंह ठाकूर  यांच्या हस्ते आणि माजी खासदार डॉ पद्मसिह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ संजय कोलते,भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,अनिल काळे, अॅड.व्यंकटराव गुंड, यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयुष्यमान भारत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे पाटील यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश करंजकर,स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राहुल वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ .धनंजय पाटील ,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ .गुरुराज थत्तेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, खंडेराव चौरे, नितीन भोसले, प्रविण पाठक, राहुल काकडे,इंद्रजित देवकते,ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील १लाख ३४ हजार कुटुंब २०११ साली झालेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणानुसार जनगणनेनुसार पात्र आहेत. तसेच  आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्नितरित्या राबविण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व जिल्हा स्त्री रुग्णालय अंगीकृत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दि. २० सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार लवकरच खाजगी रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहेत. जिल्हयातून आठ नगरपालिका क्षेत्रातील 153 वार्डातून 19 हजार 193 कुटुंबांची तर ग्रामीण भागातील 729 गावातून 1 लाख  12 हजार 891  कुटुंबांची  या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु ५ लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण,योजनेमध्ये १ हजार १०० च्या वर आजारांना मोफत शस्त्रक्रिया/उपचार, योजना पूर्णपणे संगणीकृत, इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, केंद्राचा ६०% तर राज्याचा ४०% हिस्सा, योजना पूर्णपणे नि:शुल्क, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश

(गुडघा,खुबा,कोपर प्रत्यारोपण), आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलाग्नितरित्या राबविण्यात येणार आहेत, अंगीकृत रुग्णालयात आयुष्यमान मित्रांची नेमणूक, मानसिक आजारावरील उपचारांचा समावेश, अधिक माहितीसाठी टोल फ्री
नंबर : १४५५५ / १५५३८८ ही या योजनेची वैशिष्टये आहेत. शेवटी आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी केले.

Monday, 24 September 2018

उमरगा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक 27 सप्टेंबर रोजी


तालुकास्‍तरीय भ्रष्‍टाचार निर्मूलन समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेण्यात येते. माहे जुलै ते सप्टेंबर मधील तिमाही बैठक दिनांक 27 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय, उमरगा येथे आयोजित करण्यात आली आहे, असे तहसिलदार संजय पवार यांनी कळविले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र घेऊन जावेत


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे जुलै 2014 ते जुलै 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे डीटीईटी नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. या प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया चालू आहे.
तरी वरील कालावधीत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी संस्थेमध्ये येताना सोबत आयटीआय उत्तीर्ण मार्क मेमो व एडमिशन रजिस्ट्रेशन नंबर आयडी प्रूफ घेऊन कार्यालयीन वेळेत यावे तसेच संबंधित उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारावे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद चे प्राचार्य श्री. रविशंकर सावळे यांनी कळविले आहे.

Sunday, 23 September 2018

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


महिला विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिला समाज सेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रदान करण्यात येतात.
राज्यस्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रातकिमान 25 वर्षे उललेखनीय कार्य करणाऱ्या  समाज सेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रू. 1 लाख रोख, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‍विभागीय स्तर पुरस्कार:- महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे ‍ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना रू.25001/- , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ पुरस्कार दिला जातो.
जिल्हास्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रात 10 वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला समाजसेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराप्रित्यर्थ रू. 10,001/- रोख , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देण्यात येतो.
          वरीलप्रमाणे सन 2015-16, 2016-17 व सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र महिला समाजसेविका व स्वयंसेवी  संस्था यांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह तीन प्रतीत दि.25/9/2018 पर्यंत प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. तसेच‍ अर्टी शर्ती व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, खोली क्रं. 10 तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

बेळगांव येथे युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा


उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात  येते की, मराठा लाईट इन्फंट्री रेजीमेंटल सेंटर, बेळगांव (कर्नाटक) येथे दि.24 सप्टेंबर 2018 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर भरती सोल्जर जी.डी. सोल्जर (क्लर्क जीडी) व सोल्जर ट्रेडसमन या पदासाठी होणार आहे.
तरी उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/ विधवांच्या इच्छुक पाल्यांनी / भावांनी  दि. 24 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजी स्टेडियम, मराठा  लाईट इन्फन्ट्री रेजीमेंटल सेंटर येथे सोबत रिलेशन प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी व डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, अविवाहीत दाखला, चारित्र्याचा दाखला,  खेळाचे/ NCC चे प्रमाणपत्र असल्यास, आधारकार्ड, पॅनकार्ड, 15 रंगीत  फोटो, 18 वर्षापेक्षा कमी वय असल्यास वडिलांचे संमतीपत्र, नावात बदल असल्यास 10 रू.चे स्टॅम्प पेपरवर  शपथपत्र, वडील व भाऊ यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, दोन वर्षातील खेळाडूंचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे फोटो, नाव व नात्यासहित व इतर सर्व कागदपत्रे सोबत घेवून भरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  उस्मानाबाद यांनी केले आहे.
                                                          ***


फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू


               सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव, अगामी नवरात्र महोत्सव व दिपावली सण या काळात दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी आणि कायदा  व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.  

हे आदेश दिनांक 20 सप्टेबर  2018 चे 00.05 वाजले पासून ते दिनांक  03 नोव्हेंबर  2018 च्या 24.00 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीला किरायाने/ भाडयाने ठेवतांना घर मालक, लॉज चालक संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालक यांनी वास्तव्यास राहणा-या व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबत माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला न देता भाडयाने/ किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
 तसेच उस्मानाबाद जिल्हयात कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुय्यमप्रती मोटार वाहनांच्या तसेच जूने वाहन भंगार मध्ये खरेदी- विक्रीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला
माहिती न देता खरेदी- विक्री करण्यास मनाई करण्यास आले आहे. आक्षेपार्ह सिडी/ गाणे वाजविल्यामुळे जातीय-धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हयात कोणत्याही कार्यक्रमात अथवा कोणत्याही ठिकाणी आक्षेपार्ह सिडी/ गाणी/ संगीत वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे.  तसेच मागील एक महिन्यात विक्री केलेल्या सिमकार्ड धारकांची माहिती साद करणे बंधनकारक राहील. सायबर कॅफी मालकास आपली ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वरील कालावधीत शोभेची दारु विनापरवाना साठा तसेच ड्रोनचा विना परवाना वापर करण्यास मनाई येत असल्याचे  अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.