Friday, 10 August 2018

युवक-युवती बनणार माहिती दूत सरकारी योजनांचा विद्यार्थी करणार प्रचार-प्रसार


         सरकारी योजनांच्या माहितीचा प्रसार करत माहिती दूत होण्याची संधी राज्यभरातील युवकांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या योजनांची माहिती दुर्गम भागात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माहिती दूत उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून युवकांकडून सरकारी योजनांच्या माहितीचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
युनिसेफ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने एक ऑगस्टपासून राज्यभरात माहिती दूत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी योजनांचे बहुतांश लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्ररेषेखालील आणि दुर्गम भागातील रहिवाशी आहेत, या सर्वांना सरकारी योजनांची माहिती व्हावी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व कॉलेजातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे काम या युवक-युवतींकडून केले जाणार आहे. राज्यात सहा हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यात वीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी किमान पाच ते सात टक्के विद्यार्थी म्हणजे एक लाख युवक माहिती दूत या उपक्रमात सहभागी होण्याची शक्यता  आहे. या उपक्रमाव्दारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजसेवेची एक उत्तम संधी मिळू शकेल तसेच शासकीय योजनांच्या अभ्यासामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीही चालना मिळणार आहे.
                                                              ***

बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद शासकीय योजनांची शेतकऱ्यांना मिळतेय पुरेपूर माहिती


          जिल्ह्यामध्ये शासन बळीराजा चेतना अभियान राबवित असून हे अभियान पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आणि क्रांतीवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील आंबेहोळ, आंबेवाडी, बावी, बेगडा, बेंबळी, चिखली, दाऊतपूर, देवळाली, धारूर, कौडगाव, नितळी, पाटोदा, पिंपरी, पोहनेर,  सुर्डी, शेकापूर, सोनेगाव, जहागीरदारवाडी, कसबेतडवळे,सांजा, तेर,अनसूर्डा, नांदूर्गा, बरमगाव, वडाळा, खानापूर,लासोना, गावसूद, वडगाव, टाकळी वाघोली,कोंड, कावलदरा,कौडगाव,बावी, वरवंटी, वाडीबामणी, रामवाडी, कावळेवाडी,, सांगवी, बामणी, येवती, मेंढा, वाखरवाडी, येडशी, भंडारी या गावांमध्ये तर भूम तालुक्यातील सांडेसांगवी, डोकवाडी, अंजनसोंडा, चाँदवड, सोनेवाडी, वंजारवाडी, दिंडोरी, उळूप,जांब, आंतरगाव, बरमपूर या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून पोवाडे, भारुड, कीर्तन, भजन या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद आणि जिद्द निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांस गटविकास अधिकारी श्री. चकोर,श्री. आर.एस.कांबळे,  विस्तार अधिकारी श्री. भांगे,श्री.बावीकर, वरील सर्व गावांचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी आणि महिला यांनी उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला. या मान्यवरांनी जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्याची आत्महत्या थांबविण्याबाबत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचवावे यासाठी शेतकऱ्यांना सकारात्मक मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक शिवाजी पाटील यांनी या माध्यमातून  शासकीय योजनांबाबतची  माहिती देणारे असे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
                                                              ***

Sunday, 5 August 2018

पालकमंत्री अर्जून खोतकर आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या प्रयत्नाने जिल्हयात काऊ क्लब संकल्पना सिध्दीस जाणार



उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हयापैकी एक जिल्हा आहे. जिल्हयात आर्थिक उत्पन्नाचे दरडोई प्रमाण कमी आहे. उद्योगधंद्याचे प्रमाणही कमी असून मराठवाड्यातील मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य उत्पन्न शेतीद्वारेच होते तसेच या भागातील अनिश्चित पावसामुळे शेतीचे उत्पन्न योग्य पद्धतीने मिळत नाही.त्यामुळे शेतीपूरक उद्योगाची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री अर्जून खोतकर आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद जिल्हयासाठी काऊ क्लब ही संकल्पना राज्य शासनाकडे मांडली व त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अर्जुन खोतकर, सहपालकमंत्री महादेव जानकर,मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी,मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव भूषण गगराणी, पशुसंवर्धन सचिव श्री.कुरुंदकर,आयुक्त श्री.उमप यांच्या उपस्थितीत राज्य शासनाकडून या प्रकल्पास अनुदान देण्याबाबत सहमती मिळाली आहे. मंत्रालयात नुकतीच याबाबत बैठक संप्पन्न झाली.
       दुर्मिळ होत असलेल्या गीर गायीचे संवर्धन करून त्याद्वारा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दुग्धजन्य पदार्थ, गायीच्या गोमूत्र व शेणापासून आयुर्वेदिक औषधी, सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करून त्या उत्पादित पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,हा काऊ क्लब चा मुख्य उद्देश आहे. 
             यासोबतच कृषी पर्यटन, ऑरगॅनिक फार्मिंग, ऍग्रो प्रोसेसिंग युनिट, पंचकर्म सेंटर व ट्रीटमेंट सेंटर सुद्धा काऊ क्लब्‍ अंतर्गत तयार करण्यात येणार आहे.  
            उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्येकडे वळलेल्या कुटुंबांचे टाटा सोशल सायन्स द्वारा सर्वेक्षण झालेले आहे. काऊ क्ल्ब अंतर्गत्‍ अशा कुटुंबातील निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येऊन  त्यांचेद्वारा काऊ क्लबचे संचलन होईल. उत्पादित मालाच्या फायद्यातून त्यांना नफा वाटप केले जाईल,त्यामुळे त्यांचे आर्थिक बळकटीकरण होईल. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या गीर गायीचे संवर्धनही होण्यास मदत होईल.
       भारतीय आयुर्वेदात गोमय पदार्थाचे मोठे महत्त्व आहे काऊ क्लबमध्ये सर्व पदार्थांची निर्मिती झाल्यानंतर महत्त्वाच्या फूड कंपन्या व सौंदर्य प्रसाधन कंपन्या यांच्यासोबत करार होऊन या प्रकल्पास मार्केट लिंकेज  केले जाईल. त्याचसोबत या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रही तयार होईल.
    उस्मानाबाद जिल्हयात दुधाचे मोठे उत्पन्न होते मात्र येथे पूरक उद्योग नसल्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. त्याचसोबत काऊ क्लब पशुसंवर्धन विभागाचाही पायलट प्रोजेक्ट होईल.  
     या प्रकल्पास जिल्हा नियोजन समिती, बळीराजा चेतना अभियान या  योजनांचा निधी वापरला जाईल तसेच राज्य शासनानेही या प्रकल्पास मदत करण्याबाबत सहमती दर्शविल्याने उस्मानाबाद जिल्हयात लवकरच काऊ क्लबच्या माध्यमातून आयुर्वेदाचे पंचकर्म सेंटर तयार होऊन जवळपास चाळीस प्रकारची उत्पादने येथे तयार होतील व  केंद्र शासन कृषी विभागाच्या NACOF मंडळाचे सल्ला, सहाय्य व इतर सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.