Saturday, 30 December 2017

मागासवर्गीय विद़यार्थींनींना चांगल्या सुविधा उपलब़ध करण्याची जबाबदारी सर्वांची -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले



उस्मानाबाद.दि.30:- वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार  बडोले यांनी केले

तुळजापूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात शुक्रवारी (दि. 29) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितिन काळे, देवानंद रोचकरी, ॲड.अनिल काळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (लातूर) श्री.एल.आय.वाघमारे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बडोले यांच्या हस्ते वसतिगृहाच्या इमारतीच्या कोनशिलाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना मंत्री श्री. बडोले म्हणाले की, तुळजापूर वसतिगृहासाठी 10 कोटीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर आहे तो लवकरच मंजूर करून घेण्यात येईल. विविध ठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी शासनाने निधी दिलेला आहे. काही स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करुन लवकरच ही कामेही पूर्ण होतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील वसतिगृहाबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष दयावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. बडोले म्हणाले, जिल्ह्यातील विविध मागण्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, मुंबईतील इंदू मिलच्या ठिकाणचे काम पुढच्या महिन्यात सुरु होईल. त्याचबरोबर या जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी कायमस्वरुपी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना येत्या 2 वर्षात घरे मिळण्याच्या द्ष्टीने निश्चित व धोरणात्मक काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याची कामे शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणारआहे. यामुळे मागासवर्गीय विद्य़यार्थ्यांना त्यांच्याच तालुक्यात राहून शिक्ष्ण घेता येणार आहे, असेही यावेळी श्री. बडोले यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, गोरगरीब, वंचितांच्या, मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शासन कटिबध्द आहे .यात प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. 50 वसतिगृहाचे काम त्वरेने पूर्ण करुन मुलींना शिक्षणासाठी योग्य ते प्रोत्साहन देण्याचा शासन प्रत्यक्ष कृतीतून आणि कर्तव्य पूर्ण करीत आहे.

लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूस शासनाने दत्तक घेतले आहे.स्पर्धा परिक्षेसाठी मागास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे शासन सतत प्रयत्नशील आहे.मागासवर्गिय मुला मुलींनी जास्तीत जास्त  शिक्षण घ्या, मोठे व्हा, असेही यावेळी राज्यमंत्री श्री.कांबळे यांनी सांगितले.

आमदार श्री. चव्हाण व ठाकूर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले व ही अत्यंत चांगली वास्तू उभारल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले, आभार मानले.

यावेळी  आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण, स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वभिमान सबळीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजूरी आदेश, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे धनादेश, अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप मंत्री श्री.बडोले, राज्यमंत्री श्री.कांबळे  व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. मते यांनी केले. सूत्रसंचलन श्री.बी.टी.नादरगे यांनी तर आभार बाबासाहेब थोरात यांनी मानले.  

Friday, 29 December 2017

सर्वांनी मिळून मोठया प्रमाणावर वृक्षलागवड करु या, झाडे जगवूया -अर्चनाताई पाटील



         उस्मानाबाद,दि.29:- उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून पुसायची असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मोठया प्रमाणवर वृक्षलागवड करायला हवी आणि झाडे जगविण्याचीही जबाबदारी घेतली पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती.अर्चनाताई पाटील यांनी आज येथे केले.
            विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग व वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र उस्मानाबाद, कळंब, भूम यांच्या वतीने 13 कोटी वृक्षलागवड, ग्रीन आर्मी सभासद नोंदणी तसेच राष्ट्रीय हरित सेना उपक्रम असे एकदिवसीय प्रशिक्षण आळणी येथिल मध्यवर्ती रोपवाटिका येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबादचे बांबूचे जनक आणि प्रगतशील शेतकरी राजशेखर पाटील हे उपस्थित होते.
            श्रीमती.पाटील पुढे म्हणाल्या की, उस्मानाबाद मधील जनतेने आपापल्या उपलब्ध जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्षलागवड करुन ती सांभाळायला हवीत.रोपवाटीकांची माहिती घेवून जास्तीत जास्त रोपे रोपवाटीकेतून घेवून जावीत.अशा प्रकारे मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासणा केल्यास उस्मानाबाद हरित उस्मानाबाद म्हणून नक्कीच ओळखला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण श्री.अशोक घुले यांनी केले. या शिवाय प्रगतीशील वनशेती शेतकरी आणि उस्मानाबाद मधील बांबूचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्री.राजशेखर पाटील आणि 13 कोटी वृक्षलागवड व राष्ट्रीय हरित सेना उपक्रम या विषयावर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण कु.प्रियंका गंगावणे यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना करण्यात आले.
            या कार्यक्रमास उस्मानाबाद, कळंब, भुम आणि वाशी या भागातील सामाजिक वनीकरण शाळा, राष्ट्रीय हरित सेनेचे सभासद तसेच वन विभागाचे अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

“दुष्काळाकडून समृध्दीकडे”छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न



         उस्मानाबाद,दि.29:- जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाणी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळाकडून समृध्दीकडे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आ. राणाजगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, यांच्या हस्ते करण्यात आले. 
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सुभाष चोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात दुष्काळावरील उपाययोजना आणि वॉटर कप स्पर्धेत सर्वसामान्यांनी केलेले योगदान, दुष्काळ या समस्येवर मात करण्यासाठी आतापर्यंत विविध गावांनी एकजुटीने येवून केलेल्या कामांचे छायाचित्रांचा समावेश होता. या प्रदर्शनाची सुरूवात विविध जिल्हयांमध्ये दि.13 डिसेंबर पासून सुरु झाली असून या वर्षी महाराष्ट्रातील एकूण 75 तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा होणार आहे.

हे प्रदर्शन दि.30 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

Thursday, 28 December 2017

वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या विभागाचा निधी इतर विभागाकडे वर्ग केला जाईल-पालकमंत्री दिवाकर रावते


         उस्मानाबाद,दि.28:-  सर्व शासकीय यंत्रनांनी  जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करावीत, कामे चांगले व दर्जेदार करुन घ्यावीत. तसेच जे विभाग वेळेत कामे पूर्ण करणार नाहीत त्या विभागांचा निधी चांगले कामे करणाऱ्या इतर विभागाकडे वर्ग करण्यात येईल, असे निर्देश परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, प्रशासनाला गतिमान करण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा अधिकाऱ्यांनी गावात जावून कामाचा आढावा घ्यावा.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच बैठक घेवून रिक्त पदे भरले जातील, महाआरोग्य शिबिरासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पिण्याच्या पाण्याची तपासणी करुन ते पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाहावे नसेल तर त्या ठिकाणी हे पाणी पिण्यास योग्य नाही अशा प्रकारचे फलक लावावे, अशी सूचना श्री. रावते यांनी यावेळी केली.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत सन 2017-18 करीता 16 कोटी 29 लाख 20 हजार रुपये  मागणी केली होती त्यापैकी 4 कोटी 67 लाख 80 हजार रुपये मिळाले असल्याचे यावेळी सांगितले.बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतला देण्यात येणारा निधी हा त्रस्त कुटुंबाच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 साठी 148 कोटी 13 लाख निधी मंजूर होता. त्यापैकी वित्तीय तरतुद 115 कोटी 40 लाखाची झाल्याचे यावेळी सांगितले.  त्याचबरोबर यावेळी  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती, बळीराजा चेतना अभियान, किमान आधार भूत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत नियामक परिषद बैठक, कर्ज माफी  आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनीही जिल्हा वार्षिक योजनाचे कामे वेळेत पूर्ण करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

तालुका स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत विजेत्या गावांना पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न



उस्मानाबाद,दि.28:- जिल्ह्यातील तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून पात्र ठरलेल्या पंचायतीना पालकमंत्री दिवाकर रावते, सहपालक मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पारितोषिक वितरण करण्यात आले.
        तुळजापूर तालुक्यातील आलीयाबाद, लोहारा तालुक्यातील कास्ती (बु), उमरगा तालुक्यातील तलमोड, कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी, भूम तालुक्यातील पाथ्रुड, वाशी तालुक्यातील सोनारवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी तर उस्मानाबाद तालुक्यातून तेर व दारफळ या ग्रामपंचायतीना विभागून तालुका स्मार्ट ग्राम पारितोषक यावेळी आयोजित कार्यक्रमात देण्यात आले. स्मार्ट ग्राम पंचायतीला दहा लाखाचे पारितोषिकाचे यावेळी वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आदीसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. 

Wednesday, 27 December 2017

ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी - अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक



उस्मानाबाद :- ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने वस्तू आणि दर्जेदार सेवा मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज केले.

जिल्‍हा पुरवठा  कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  राष्‍ट्रीय  ग्राहक  दिनानिमित्त  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली  कार्यक्रमाचे आयोजन  करण्‍यात आले होते.  यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष डॉ. विजय लाड,  ग्राहक पंचायतच्या सह संघटक मेघा कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य प्रा. संपतराव जळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा पुरवठा अधिकारी  श्रीमती. शिल्पा करमरकर,  तहसिलदार सुजित नरहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्‍वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

यावेळी पुढे बोलताना श्री. पाठक म्हणाले की,  ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने आणि दर्जेदार सेवा किंवा वस्तू पुरविणे अपेक्षीत असते. परंतु असे न झाल्याने  ग्राहकाच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यामुळे  ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी आणि फसव्या जाहिरातींना बळी पडु नये. सध्या मोठया प्रमाणात ग्राहकाकडून ऑनलाईन वस्तूंची खरेदी केली जात आहे, नेट बँकींग, एटीएम आदीचा वापर वाढला आहे त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहावे व आपले हक्क समजून घ्यावे.
ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष  डॉ.लाड  यावेळी  बोलताना म्हणाले की,  ग्राहकांच्या हिताचे रक्षण  करण्यासाठी  विविध  कायदे व नियम अस्तित्वात आहेत. ग्राहकांने  वस्तु खरेदी करण्यासाठी जे मुल्य  दिलेले आहे त्याच्या बदल्यात योग्य वजनात व मापात वस्तु मिळणे  ग्राहकाचा कायदेशिर अधिकार व हक्क आहे. त्यासाठी  ग्राहकाने जागरुक राहून ग्राहक चळवळ उभी करावी व शोषणमुक्त समाजाची निर्मिती करावी, असे ही त्यांनी सांगितले.

राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य प्रा. जळके यांनी सांगितले की, ग्राहकांने वस्तू खरेदी केल्यानंतर त्या प्रत्येक वस्तुची पावती घ्यावी व जागरुक ग्राहक बनावे.

यावेळी  ग्राहक पंचायतच्या सह  संघटक मेघा कुलकर्णी  यांनीही  मार्गदर्शन केले. अन्‍न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग, प्रा‍देशिक परिवहन अधिकारी, वजने व मापे विभागभारतीय आयुर्विमा महामंडळ, गॅस व राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती. करमरकर यांनी  केली. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे आणि पुरवठा विभागाच्या वर्षा शितोळे यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.