Saturday, 30 December 2017

मागासवर्गीय विद़यार्थींनींना चांगल्या सुविधा उपलब़ध करण्याची जबाबदारी सर्वांची -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले



उस्मानाबाद.दि.30:- वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार  बडोले यांनी केले

तुळजापूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात शुक्रवारी (दि. 29) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितिन काळे, देवानंद रोचकरी, ॲड.अनिल काळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (लातूर) श्री.एल.आय.वाघमारे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बडोले यांच्या हस्ते वसतिगृहाच्या इमारतीच्या कोनशिलाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना मंत्री श्री. बडोले म्हणाले की, तुळजापूर वसतिगृहासाठी 10 कोटीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर आहे तो लवकरच मंजूर करून घेण्यात येईल. विविध ठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी शासनाने निधी दिलेला आहे. काही स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करुन लवकरच ही कामेही पूर्ण होतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील वसतिगृहाबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष दयावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. बडोले म्हणाले, जिल्ह्यातील विविध मागण्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, मुंबईतील इंदू मिलच्या ठिकाणचे काम पुढच्या महिन्यात सुरु होईल. त्याचबरोबर या जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी कायमस्वरुपी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना येत्या 2 वर्षात घरे मिळण्याच्या द्ष्टीने निश्चित व धोरणात्मक काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याची कामे शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणारआहे. यामुळे मागासवर्गीय विद्य़यार्थ्यांना त्यांच्याच तालुक्यात राहून शिक्ष्ण घेता येणार आहे, असेही यावेळी श्री. बडोले यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, गोरगरीब, वंचितांच्या, मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शासन कटिबध्द आहे .यात प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. 50 वसतिगृहाचे काम त्वरेने पूर्ण करुन मुलींना शिक्षणासाठी योग्य ते प्रोत्साहन देण्याचा शासन प्रत्यक्ष कृतीतून आणि कर्तव्य पूर्ण करीत आहे.

लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूस शासनाने दत्तक घेतले आहे.स्पर्धा परिक्षेसाठी मागास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे शासन सतत प्रयत्नशील आहे.मागासवर्गिय मुला मुलींनी जास्तीत जास्त  शिक्षण घ्या, मोठे व्हा, असेही यावेळी राज्यमंत्री श्री.कांबळे यांनी सांगितले.

आमदार श्री. चव्हाण व ठाकूर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले व ही अत्यंत चांगली वास्तू उभारल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले, आभार मानले.

यावेळी  आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण, स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वभिमान सबळीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजूरी आदेश, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे धनादेश, अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप मंत्री श्री.बडोले, राज्यमंत्री श्री.कांबळे  व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. मते यांनी केले. सूत्रसंचलन श्री.बी.टी.नादरगे यांनी तर आभार बाबासाहेब थोरात यांनी मानले.