Friday, 26 January 2018

नीती आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्हयांच्या यादीतून उस्मानाबादला बाहेर काढण्यासाठी कटीबध्द होवू- पालकमंत्री दिवाकर रावते

पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न



उस्मानाबाद, दि.26 :-  नीती आयोगाने ज्या 125 मागास जिल्हयांची यादी जाहीर केली आहे त्यात उस्मानाबाद जिल्हयाचा क्रमांक 78 वा आहे, आपण सर्वांनी या जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करुन या यादीतून लवकरात-लवकर बाहेर पडण्यासाठी कटीबध्द होवू या, या जिल्हयाला स्वावलंबी प्रगत जिल्हा म्हणून नावलौकीक मिळवून देवूया, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक  दिनाच्या 68 व्या वर्धापन दिन  आज जिल्ह्यात सर्वत्र  उत्साहाने साजरा करण्यात आला.  यानिमित्त  विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले. येथील  पोलीस संचलन मैदानावर  पालकमंत्री दिवाकर रावते  यांच्या हस्ते  मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे उपस्थित होते.
प्रारंभी  सकाळी 9.15 वाजता  पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते  ध्वजारोहण  होताच पोलीस  दलाने  राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाचे महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल,जलद प्रतिसाद  पथक, श्वान पथक,दंगल नियंत्रण  पथक  आदी पथकांच्या  संचलनाची  मानवंदना  पालकमंत्री श्री. रावते यांनी स्विकारुन यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर देशातील व महाराष्ट्रातील ज्या मान्यवरांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावरील पथसंचलनात ज्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सर्वांचेही श्री. रावते यांनी अभिनंदन केले.
पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करताना भारतीय मतदाराला संसदीय लोकशाहीने मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे याची जाणीव ठेवून या अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा, त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे.  याबरोबरच निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणूका घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनीही निर्भिडपणे काम करण्याची गरज आहे आणि सध्याच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये त्याप्रकारे सुलभ सुविधाही उपलब्ध आहेत. म्हणून सर्वांनी मिळून भारतीय लोकशाहीचा अभिमान बाळगून तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया.
देशातील काही राज्यात चित्रपटावरुन उसळलेल्या हिंसाचार आणि कायदा हातात घेणाऱ्यां समोर सत्ताधाऱ्यांनी पत्करलेली सपशेल शरणागती या दोन गोष्टी देशासमोरील आणि राज्यघटनेसमोरील आव्हाने अधोरेखित करणाऱ्या आहेत. कायद्याच्या राज्याला आव्हान देणारी झुंडशाही बळकट होत असल्याचे चित्र 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना समोर येणे कमालीचे दुर्देवी आहे. धर्म, जात, भाषा, वंश, संस्कृती यासह अनेक बाबतीत विविधता असलेल्या भारताला समान धाग्यांनी गुंफणारी आणि समतेचे तत्व प्रत्यक्षात आणणारी भारतीय राज्यघटना हे आपले वैशिष्ट्य आहे. देशातील वंचितांना, उपेक्षितांना गरिबातल्या गरिबांना ताठ मानेने जगण्याचा अधिकार देणाऱ्या, कायद्यासमोर सर्वांना समान लेखणाऱ्या आणि चौकट ठळक करणाऱ्या या राज्यघटनेतील मूल्यांची बूज न राखणाऱ्या घटना वाढत असल्याची पार्श्वभूमी प्रजासत्ताक दिनाला आहे, असे सांगून  श्री. रावते यांनी जिल्हयातील महसूल, आरोग्य, कृषी, बळीराजा चेतना अभियान, शेतकरी कर्जमाफी, जिल्हा परिषद, मुद्रा बँक योजना, पशुसंवर्धन विभाग, जलयुक्त शिवार, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सहकार विभाग, शिक्षण विभाग आदि क्षेत्रांमध्ये झालेल्या उल्लेखनीय कामांबद्दल संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जिल्हयातील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजीटल यंत्रणा उभी करण्यासाठी 3 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे, याशिवाय जिल्हयातील 51 पशुवैद्यकीय संस्था आय.एस.ओ. दर्जा मिळेल अशा पध्दतीने त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे तसेच पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 364 गटांना उस्मानाबादी शेळीचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी वितरीतही करण्यात आला आहे, दुसऱ्या टप्प्यात 759 गटांना उस्मानाबादी शेळीचे वितरण करण्यात येणार आहे, यासाठीही आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत आपल्या जिल्हयातील एकूण 82 हजार 676 शेतकऱ्यांना 315 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त झाला आहे, जिल्हयात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची अंमलबजावणी चांगल्या रितीने सुरु आहे अशा विविध बाबींचा उल्लेख केला.
त्याचप्रमाणे नानाजी देशमुख योजनेंतर्गत हवामान आधारीत शेतीची मोहीम लवकरच या जिल्हयात सुरु होणार असून बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येसारखा कलंक पुसण्यासाठी शासन आणि प्रशासन जिल्हयात विविध योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगून श्री. रावते यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील जास्तीत-जास्त नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी  यासाठी राबविण्यात येत असलेल्या लोकराज्यग्राम, लोकराज्यशाळा, लोकराज्य महाविद्यालय यासारख्या अभिनव उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अवयवदानासारख्या पवित्र अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करुन या जिल्हयाचे  नाव जागतिक पातळीवर प्रसिध्द करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.  
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित संचलनात विविध  विभागांचे  आकर्षक  चित्ररथही  सहभागी झाले होते.  संबंधित  विभागांच्या  योजनांची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ  सर्वांचे लक्ष वेधून  घेत होते. यात  जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत  मिशन कक्ष,  आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग,अग्निशमन, बॉम्बशोधक, पोलीस  विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम पथक,आपत्ती व्यवस्थापन पथक,वन विभाग,जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुसज्ज रुग्णवाहिका,  महिला छेडछाडविरोधी पथक, उप प्रादेशिक परिवहन विभाग,  होमगार्ड्स , स्काऊट गाईड्स आदी सहभागी झाले होते .  
या समारंभाला उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बनसोडे, श्री. अजिंक्य पवार, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन गोडबोले, महिला व बाल विकास अधिकारी श्री. सावंत, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. रेड्डी, श्री. पवार, तहसिलदार सुजित नरहरे, राहुल पाटील, अभय मस्के, नेहरु युवा केंद्राचे विकास कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, विभागांचे  अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
यावेळी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. रावते  यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017 चे उदिष्ट महाराष्ट्रात व औरंगाबाद विभागात सर्वात प्रथम पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे, 7/12 संगणकीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचविणे व पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वयाने उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांच्याबरोबरच सहाय्यक पोलीस निरीक्षक एफ.बी. मेंगडे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही.एन. देशमुख, पी.व्ही. ओव्हळ, व्ही.डी. मोहिते यांचा तर सि.सि.टी.एन.एस. प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणी केल्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. मिरकले, सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विरयानी कदम, गुन्हे दोष सिध्दीमध्ये गुणवत्तापूर्ण काम केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उत्कृष्ठ तपास केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस. मानभाव यांचा, महिला व मुलींविषयीच्या अपराधांमध्ये जनजागृती बाबत उत्तम काम केल्याबाबत महिला सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल एम.एस. दामोदरे-पानसे, जिल्हा क्रिडा पुरस्कारांतर्गत कु. विशाल शिंदे, चेतन सपकाळ, कुमारी शितल शिंदे या खेळाडूंचा तर गुणवंत क्रिडा मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण मोहिते, गुणवंत क्रिडा संघटक म्हणून राजकुमार सोमवंशी, हरीतसेना सदस्य नोंदणी उत्कृष्ठ सहभागाबाबत कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. गरड आणि एकता फाऊंडेशनचे अभिलाष लोमटे व अमित कदम यांना पालकमंत्री दिवाकर रावते आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राज्यातील पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय आणि पहिले लोकराज्य शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांचाही पालकमंत्री श्री. रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या समारंभाच्या शेवटी यमगरवाडी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळा,  ग्रीनलँड हायस्कूल व लिटलस्टार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांच्या हस्ते ध्वजारोहण
            उस्मानाबाद, दि.26 :-  येथील  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता  ध्वजारोहणाचा  कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी श्रीमती करमरकर, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहा. जिल्हा नियेाजन अधिकारी श्री. रेड्डी, श्री. पवार, तहसिलदार सुजित नरहरे, राहुल पाटील, अभय मस्के, यांच्यासह  महसूल विभागाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
उस्मानाबाद, दि.26 :-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर  जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजास पोलीस विभागाने सलामी दिली.  
या  ध्वजारोहण समारंभास प्रामुख्याने विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांच्यासह  राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा माहिती कार्यालय, सहकार,वन विभाग, जलसंधारण,नेहरु युवा केंद्र व अन्य विभागाचे अधिकारी -कर्मचारी मोठया संख्येने  उपस्थित होते.  

Thursday, 25 January 2018

अधिकाऱ्यांनी झटून कामे करा, जिल्हयाला निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री दिवाकर रावते





उस्मानाबाद, दि. 25:- परिवहन, खारभूमी विकास  मंत्री  तथा  जिल्ह्याचे दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज  जिल्हा  नियोजन समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात पार पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी झटून कामे करा, जिल्हयाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री. रावते यांनी येथे केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, सर्वश्री आमदार मधुकर चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहुल मोटे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर  हे उपस्थित होते.          
या बैठकीमध्ये सर्वप्रथम  दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी  झालेल्या  जिल्हा  नियोजन समिती बैठकीच्या  इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली,  जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 मधील  सर्वसाधारण, अनुसूचित  जाती उप योजना  व आदिवासी क्षेत्राबाहेरील  उपयोजनांचा माहे डिसेंबर 2017 अखेर  झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. रावते यांनी घेतला.  
सन 2018-19 मधील  जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  क्षेत्राबाहेरील योजनानिहाय  प्रारुप आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना  सर्वसाधारण सन 2017-18 करीता एकूण 14 हजार 813 लक्ष रुपये मंजूर असून आजपर्यंत 5 हजार 02 लक्ष एवढा निधी  खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2017-18 साठी  7 हजार 79 लक्ष एवढा  निधी मंजूर असून त्यापैकी 732.91 लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे तर  जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजना सन 2017-18 साठी 227.02 लक्ष एवढा  निधी जिल्ह्यासाठी मंजूर असून त्यापैकी 57.68 लक्ष निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधारक आडे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे सभागृहासमोर सादर केली.
या सादरीकरणानंतर पालकमंत्री महोदयांनी सर्व विभागप्रमुखांस  मार्च 2018 पर्यंत निधी 100 टक्के खर्च  करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
सन 2017-18 या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला शासनाकडून 30 टक्के कपात करण्यात आलेली आहे, केलेली कपात सन 2018-19 च्या प्रारुप आराखडयात वाढवून देण्यात यावी तसेच 50 टक्के वाढीव निधी देण्यात यावा असा ठराव सदस्य संजय मडके यांनी यावेळी मांडला त्यास सदस्या सक्षेणा सलगर यांनी अनुमोदन दिले. या ठरावाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले.
 जिल्ह्यात विविध विकासकामे हाती घेऊन चांगल्या  प्रकारच्या सुविधा निर्माण  करणे आवश्यक आहे, जिल्हयाला या वर्षी 30 टक्के निधी कपातीला सामोरे जावे लागले आहे परंतु सन 2018-19 च्या जिल्हयाच्या आराखडयात मागील वर्षाचा 30 टक्के वाढीव निधी व 50 टक्के जास्तीचा निधी प्राप्त होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे पालकमंत्री महोदयांनी  यावेळी सांगितले.  
या बैठकीनंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बळीराजा चेतना अभियानावरील लघुपटाचा मुहूर्त पालकमंत्री दिवाकर रावते आणि उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय मुद्रा बँक योजना आणि सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या योजना या विषयावरील लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर घडीपत्रिका आणि माहितीपुस्तिकेचेही प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर लोकराज्य या शासकीय मुखपत्राच्या प्रचार, प्रसिध्दी आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी ज्यांनी विशेष काम केले आहे अशा जिल्हा पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद, जि.प.कें.आदर्श प्रा. शाळा तडवळे (कसबे), विद्यानिकेतन हायस्कूल, येरमाळा, देवधानोरा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय,देवधानोरा, जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कसबे तडवळे, महाराष्ट्र संत विद्यालय,तेर, भाई नारायणराव लोमटे, माध्यमिक विद्यालय,भाटशिरपुरा, ता.कळंब या कार्यालय/शाळा/ महाविद्यालय यांचा लोकराज्य कार्यालय, लोकराज्यशाळा व लोकराज्य महाविद्यालय या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर  अण्णासाहेब सातपुते, सिध्दार्थ सावंत, राहुल जगताप, भारत बळीराम लोंढे, महादेव भंडारे  यांचा लोकराज्य दूत म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती अर्चना राणाजगजिसिंह पाटील, जयश्री रामा खंडागळे,  उषा सुरेश यरकळ, सुनिता गोविंद जाधव, सक्षेणा सिद्राम सलगर, छाया सुनिल काळे, महानंदा सुरेश कोरे, संगीता हनमंत बोराडे, शोभा शामसुंदर तोरकडे, अनिता सुधीर अंबर, संयोगिता संजय गाढवे, अंजली नितिन शेरखाने, सदस्य बाळासाहेब धनराज जाधवर, शेखर गोविंद घंटे, प्रकाश मोतीराम चव्हाण, संदिप गौतम मडके, गौतम रामा लटके, सिध्दार्थ अंगुल बनसोडे, प्रसाद माणिक जोशी, ज्ञानदेव गणपती राजगुरु तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियेाजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, श्री. पवार आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. 

मतदानाच्या मौलिक अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा-जिल्हाधिकारी गमे.






उस्मानाबाद,दि.25- भारतीय मतदाराला संसदीय लोकशाहीने मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे, या अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
    राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महसूल भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रीरंगी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,तहसिलदार सुजित नरहरे हे उपस्थित होते.
     श्री गमे म्हणाले, संसदीय लोकशाहीचा मतदार हा पाया आहे,आणि या मतदारांसाठी सुलभ सुविधा निर्माण करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो, या देशात 18 वर्षावरील प्रत्येकास कोणत्याही प्रकाराचा भेदभाव न बाळगता मतदानाचा अधिकार मिळतो. यामुळेच आपली लोकशाही जगातील सर्वात प्रबळ लोकशाही आहे, असे सांगून ते म्हणाले, आताची मतदार यादी आता परिपूर्ण आहे,आणि मतदान पत्रिकाही सहजसुलभ आहे. त्यामुळे बोगस मतदानालाही आळा बसला आहे. याशिवाय मतदान झाल्यानंतर आपण आपले मत निश्चित कोणाला दिले याचा पुरावाही आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अधिकाराचा सदुपयोग करावा,असेही ते म्हणाले.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री ओमप्रकाश रावत यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जनतेला केलेल्या आवाहनाची चित्रफीत दाखविण्यात आली.
       यानंतर जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा वाचून दाखविली व उपस्थित सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणूक ज्ञान स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या एकंडे सरोज सहदेव,मुंढे यशकुमार अशोकराव, पठाण तनवीर,भागवत तेजश्री,विलास थोरात,तसेच अपंग मतदार सायरत्ता जोहुरोद्यीन सय्सद,मोठे पद्मामाणी, पाटील ऋतुजा प्रकाश, रितेश राजकुमार घुटे,प्रमोद सुभाष चौधरी,येताळ शाम काकासाहेब यांचाही सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी श्री गमे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले तसेच नवमतदारांचा, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.गमे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रीरंगी यांनी केले. सूत्रसंचलन तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले.

     राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने आज शहरात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना जनजागरण रॅली काढून उस्मानाबाद मधील जनतेला मतदान करण्याविषयीचे आवाहनही केले.

आपल्या बँक खात्याविषयीची माहिती इतरांना शेअर करु नका - अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर


उस्मानाबाद, दि 25- सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. याच तंत्रज्ञानाचा काही जणांकडून गैरवापर करण्यात येतो,त्यामुळे सायबर गुन्हें घडतात.मात्र नागरिकांनी थोडीशी सावधानता बाळगली तर अशा घटनाना आळा बसु शकतो. यासाठी  आपल्या बँक खात्यांसह इतर महत्त्वाची  माहिती अनोळखी व्यक्तीना देवू नका त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापरही जबाबदारीने करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी नुकतेच येथे केले.  
     उस्मानाबाद जिल्हा पोलीस व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहात मंगळवार दि.23 जानेवारी रोजी आयोजित सायबर गुन्हे, सुरक्षा जाणीव जागृती या विषयावर  कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी स्थागुशाचे पोनि डी.एम.शेख, सपोनि राजेंद्र बनसोडे यांच्यासह पोलीस अधिकारी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सोशेल मीडियावर कुणाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होईल असा मजकूर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणात एखाद्या विरुध्द गुन्हा दाखल झाला तर त्याला शिक्षा ही ठरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: युवकांनी सोशल मीडियाचा वापर दक्षतेने करावा.                                         
           प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी कार्यशाळा आयोजनाचा हेतू प्रास्ताविकात विषद केला त्यानंतर ॲक्सीस बँकेचे प्रतिनिधा के.एम.पाटील यांनी बँकींग क्षेत्रात सायबर क्राईममधून होणारी ग्राहकांची लूट आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता याची माहिती दिली. तर सायबर सेलच्या प्रमुख सपोनि विरयाणी कदम यांनी उस्मानाबाद ग्रामीण व तुळजापूर ठाण्यातर्गत दाखल गुन्हें, ग्राहकांची झालेली फसवणूक  व त्यानंतर तपासात समोर आलेले मुद्दे व घ्यावयाची दक्षता याची माहिती या कार्यशाळेत दिली.

     शेवटी स्थागुशाचे पोनि डी.एम.शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेत प्रसारमाध्यम प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 22 January 2018

कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेना लाभ घ्यावा



उस्मानाबाद, 22 :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन अर्ज सादर केले आहेत. परंतु बँकेने शासनाला सादर केलेल्या त्यांच्या माहितीशी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांची यादी शासनाने बँकेकडे पाठविलेली आहे ही यादी संबंधित शाखास्तरावर प्रसिध्द केली आहे.
          शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नाव अद्यापपर्यंत शासनाने कर्जमाफी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे यादीमध्ये नाही, अशा शेतकरी सभासदांनी संबंधित बँकेचे शाखेशी त्वरीत संपर्क साधून बँकेने प्रसिध्दी केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्यास आवश्यक कागदपत्रासह योग्य माहिती बँकेच्या शाखेला सादर करावी ज्या आधारे बँकेला पुढील कार्यवाही करता येईल.
          कार्यवाही 8 दिवसाचे मुदतीत करणे आवश्यक असल्याने विनाविलंब ही पूर्तता करुन शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा.

          त्याचप्रमाणे 1 लाख पन्नास हजार पेक्षा जास्त कर्जबाकी असलेल्या ज्या शेतकऱ्यांना शासनाने रु. 1.50 लाखाची कर्जमाफी मंजूर केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडील उर्वरीत कर्जाचे रक्कमेचा भरणा करण्याबाबत बँकेने पत्राद्वारे कळविलेले आहेच, या शेतकऱ्यांनीदेखील त्यांच्याकडील उर्वरीत रक्कमेचा त्वरीत भरणा करुन शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. जगदाळे व जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी केले आहे. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विविध शासकीय योजनांचा मेळावा


उस्मानाबाद, 22 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्यामार्फत दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत उस्मानाबाद येथील बसस्थानक परिसरात विविध शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि जनतेच्या कल्याणकारी विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा समावेश राहणार आहे.
तरी जास्तीत-जास्त जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.आर. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एस.बी. देसाई तसेच विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲङ निलेश बारखेडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
          या मेळाव्यात पशुसंवर्धन, कृषी विभाग, महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, सहाय्यक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, डी.आय.सी., स्वच्छता मिशन, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा पोलीस विभाग हे विभाग सहभागी होणार आहेत.