Saturday, 25 April 2026
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
* २३.७५ कोटींच्या निधीतून ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारणी
* ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय – ३६१.५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
* कार्डीयाक कॅथलॅब,MCH विंग व IPHL लॅबमुळे प्रगत उपचार जिल्ह्यातच उपलब्ध
* ग्रामीण भागात नवीन व उन्नत रुग्णालयांची मोठ्या प्रमाणावर उभारणी
* ट्रोमा केअर,CT Scan व MRI सुविधांमुळे आपत्कालीन सेवांना बळ
धाराशिव दि.२५ एप्रिल (जिमाका) जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्याचे मोठे काम सुरू आहे.कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहत असलेल्या रुग्णालये, क्रिटिकल केअर युनिट्स आणि आधुनिक प्रयोगशाळांमुळे केवळ उपचारच नव्हे,तर हजारो रुग्णांना आशा निर्माण होत आहे.ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी,या उद्देशाने ही व्यापक आरोग्य पायाभूत सुविधा उभारणी सुरू आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांच्याअंतर्गत आरोग्य विभागामार्फत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत.प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM) अंतर्गत सुमारे २३.७५ कोटी रुपयांच्या निधीतून ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारले जात असून,८ जानेवारी २०२४ रोजी भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे.या युनिटमध्ये MRI,ICU,HDU,आयसोलेशन वॉर्ड, डायलिसिस,ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन सेवा आणि पॉइंट ऑफ केअर लॅब अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.यापूर्वी जिल्ह्यात उपलब्ध नसलेल्या या सेवा आता स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याने आयसीयू खाटांची कमतरता दूर होणार आहे.
याचबरोबर,धाराशिव येथे १० खाटांचे कार्डीयाक कॅथलॅब उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी सुमारे २३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास येत असून लवकरच हृदयविकार रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच १०० खाटांचे MCH विंग रुग्णालय उभारण्याचे काम २२.२३ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असून मातांसाठी व नवजात बालकांसाठी विशेष आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
प्रयोगशाळा सुविधांमध्येही मोठी भर पडत असून,IPHL (Integrated Public Health Laboratory) साठी १.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या प्रयोगशाळेमुळे डेंग्यू,मलेरिया, AIDS,क्षयरोग तसेच विविध जैवरासायनिक व हिस्टोपॅथॉलॉजी चाचण्या जिल्ह्यातच मोफत उपलब्ध होणार आहेत.बालकांच्या आरोग्यासाठी DEIC (District Early Intervention Center) अंतर्गत जन्मजात दोष,पोषण कमतरता,विकासात्मक अडचणी यांचे निदान व उपचार केले जात आहेत,ज्यामुळे बालकांच्या आरोग्य संवर्धनाला मोठी चालना मिळत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.परंडा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांपर्यंत उन्नत करण्यात येत असून,४३.८६ कोटी रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे.तसेच शिराढोण,भूम,वाशी,वालवड आदी ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
वाशी व अनाळा येथे ट्रोमा केअर युनिट्स उभारण्यात येत असून आपत्कालीन सेवांना बळ मिळणार आहे.ढोकी व येडशी येथेही नवीन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ५०० खाटांचा जिल्हा रुग्णालय प्रकल्पही मंजूर झाला असून,३६१.५ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय तुळजापूर व उमरगा येथे CT Scan सेवा सुरू करण्यात आली असून,MRI सेवा देखील लवकरच सुरू होणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे धाराशिव जिल्हा आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून,ग्रामीण भागातील नागरिकांनाही दर्जेदार उपचार सहज उपलब्ध होत आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमुळे “आरोग्य सेवा आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
*******
Thursday, 23 April 2026
Wednesday, 22 April 2026
Tuesday, 21 April 2026
शक्ती सदन योजना : संकटग्रस्त महिलांसाठी आधार, सुरक्षा आणि नवजीवनाची दिशा”
विशेष वृत्त
वृत्त क्र.३०३
दि.२१ एप्रिल २०२६
शक्ती सदन योजना : संकटग्रस्त महिलांसाठी आधार, सुरक्षा आणि नवजीवनाची दिशा”
धाराशिव दि.२१ एप्रिल (जिमाका) महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सुरक्षित,सन्मानजनक जीवन देण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणारी “मिशन शक्ती” ही महत्त्वपूर्ण योजना आहे.याच मिशनअंतर्गत “शक्ती सदन योजना” ही उपयुक्त व संवेदनशील योजना कार्यरत असून,संकटात सापडलेल्या महिलांसाठी ही एक आशेचा किरण ठरत आहे.
शक्ती सदन योजना ही कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार,बेघरपणा किंवा सामाजिक आधार नसलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा आणि पुनर्वसनाची हमी देणारी योजना आहे.समाजातील दुर्बल व वंचित महिलांना केवळ संरक्षणच नव्हे,तर स्वावलंबनाचा मार्ग दाखविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
धाराशिव जिल्ह्यात सध्या दोन शक्ती सदन कार्यरत असून,त्यामध्ये जिजामाता बहुउद्देशीय महिला मंडळ,लातूर संचलित शक्ती सदन,धाराशिव आणि श्री साई सेवाभावी संस्था संचलित शक्ती सदन, हडको तुळजापूर,ता.तुळजापूर या केंद्रांद्वारे प्रभावीपणे सेवा दिली जात आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १८० पीडित महिलांना आणि त्यांच्या १२ वर्षांखालील मुलांना सुरक्षित निवारा,संरक्षण आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संकटग्रस्त,अत्याचारग्रस्त,बेघर किंवा आधारहीन महिलांना सुरक्षित जीवन देणे.त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करणे.महिलांना स्वावलंबी बनविणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
शक्ती सदन अंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात.
निवारा (Shelter) : सुरक्षित व तात्पुरता किंवा दीर्घकालीन निवास.अन्न व वस्त्र : मूलभूत गरजांची पूर्तता.आरोग्य सेवा : वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचार. समुपदेशन : मानसिक आधार व मार्गदर्शन.कौशल्य प्रशिक्षण : शिलाई, संगणक व इतर प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबन. पोलीस मदत : कायदेशीर सहाय्य व संरक्षण देण्यात येते.
शक्ती सदन योजना ही केवळ निवारा देणारी योजना नसून,महिलांना नव्याने उभे राहण्याची संधी देणारी परिवर्तनाची चळवळ आहे.जिल्ह्यात या योजनेमुळे अनेक महिलांना सुरक्षितता,सन्मान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला आहे. एकूणच,“शक्ती सदन योजना” ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढून नवजीवन देण्यासाठी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
*******
Monday, 20 April 2026
Sunday, 19 April 2026
Subscribe to:
Posts (Atom)