Saturday, 1 June 2019

उस्मानाबादच्या पर्यावरणवृध्दीसाठी प्रशासनाने कसली कंबर वृक्षलागवडीसाठी पहिल्याच मोहिमेत येडेश्वरी मंदीर टेकडीवर केले ८०० खड्डे खोदण्याचे नियोजन


वृत्त क्र.331                                                                                 दि.१ जून २०१९






उस्मानाबादच्या पर्यावरणवृध्दीसाठी प्रशासनाने कसली कंबर
वृक्षलागवडीसाठी पहिल्याच मोहिमेत येडेश्वरी मंदीर टेकडीवर केले ८०० खड्डे खोदण्याचे नियोजन

उस्मानाबाद,दि.१- जिल्ह्यातील विविध टेकड्यांवर यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात श्रमदान व वृक्षारोपण करून जिल्ह्याच्या पर्यावरणवृध्दीसाठी आबालवृद्धांनी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे.
      त्याचाच भाग म्हणून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेनिमित्त दि.१जून रोजी येडेश्वरी मंदिर परिसर,येरमाळा येथे ८०० वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी भल्या पहाटे उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक आगळावेगळा उत्साह ओसंडून वाहत होता.      
      जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या नेतृत्वाखाली  उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.अविनाश आघाव, उपविभागीय वन अधिकारी श्री.पवार, तसेच प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी हजर होते.
      जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर श्रमदान आणि वृक्षारोपण असे उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमध्ये उस्मानाबाद मधील समस्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.
चला तर मग... सर्वजण मिळून आपल्या उस्मानाबादचे...
श्रमदान करू या
वृक्षारोपण करू या!
पर्यावरण घडवूया!


*****

वृत्त क्र.332                                                                                 दि.१ जून २०१९
यश मेडिकल फाऊंडेशनचे शेतीमालावर प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण अभियान
             जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी अभियान मोलाचे ठरेल
--- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद, दि. 1 - यश मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने शेतीमालावर प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण अभियानाचे कळंब तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाचा शुभारंभ येरमाळा येथील येडेश्वरी गुरूकुलम् गोशाळेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या चारा छावणीत  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते शनिवार, दि. 1 जून रोजी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, कळंबचे उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, कळंबच्या तहसिलदार मंजुषा लटपटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी श्री. मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. राजगुरू आदींसह प्रशासनातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळी जिल्हा ही जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते यांनी, या अभियानामुळे शेतकर्‍यांना शेतीपूरक  व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी यश मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे यांनी प्रक्रिया उद्योगाविषयी सविस्तर माहिती दिली. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये सर्व शेतकर्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर डॉ. नवनाथ दुधाळ यांनी पंचगव्यापासून निरनिराळ्या उत्पादनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती जाधव यांनी तर आभारप्रदर्शन अमित जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यश मेडिकल फाऊंडेशनचे कर्मचारी व येडेश्वरी गुरूकुलम गोशाळेचे रंगनाथ दुधाळ व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी येरमाळ्यासह परिसरातील पशुपालक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
वृत्त क्र.333                                                                                    दि. 1 जून 2019    

 जिल्ह्यात 5 जून रोजी मद्य विक्री बंदी आदेश लागू 

उस्मानाबाद,दि.1-जिल्हयात दि. 5 जून 2019  रोजी रमजान ईद साजरी होत आहे.
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून रमजान ईद निमित्त दि. 5 जून 2019 रोजी  या एका दिवशी  जिल्हयातील सर्व किरकोळ मद्य विक्री दुकाने व देशी/ विदेशी/ एफएलबीआर-2/एफएल-4/एफएल-3 परवानाकक्ष अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.
****

Wednesday, 29 May 2019

मंगळवार, 4 जून रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

वृत्त क्र.323                                                        दि.29 मे 2019
  
    मंगळवार, 4 जून रोजी  जिल्हा नियोजन समितीची बैठक
   उस्मानाबाद,दि.29:-पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्‍यविकास आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री श्री.अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवार, दि.4 जून  रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ –मुंडे यांनी कळविले  आहे.
                                                       ****
वृत्त क्र.324

ग्रामीण भागात अजूनही माणुसकीचा झरा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा छावणी चालकांनी दिला मदतीचा हात
उस्मानाबाद,दि.29:- महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. विशेषतः उस्मानाबाद जिल्हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु उस्मानाबादमधील ग्रामीण भागातील तेर या गावात आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून  श्री. सतीशकुमार सोमाणी यांनी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आधार देत चारा छावणीतच दोन शेतकऱ्यांच्या मुला-मुलीचा विवाह लावून देऊन ग्रामीण भागात माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
तेर व परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा  मिळावा म्हणून 21 मार्च रोजी चारा छावणी सुरु करण्यात आली. प्रारंभी 600 जनावरे या छावणीत दाखल झाली होती. आज या छावणीत 1 हजार 700 पेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत. चार छावणीतच शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी दूरदर्शन संचही उपलब्ध करून देण्यात आले  आहेत. परिसरातील 16 गावांचे शेतकरी छावणीतच मुक्काम ठोकून आहे.
या दुष्काळाची दाहकता पाहता   छावणीतील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह पुढे ढकलत असल्याची माहिती  छावणी चालक सतीश सोमाणी यांना समजताच त्यांनी  सामाजिक बांधिलकी जपत छावणीतील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीचा विवाह लावून देण्याची तयारी दर्शविली. यातून ग्रामीण भागात अजूनही माणुसकी शिल्लक  असल्याचे दिसले  व शेतकऱ्यांनी ठरविलेल्या दिवशीच म्हणजेच दि.29 मे रोजी, दुपारी 12.36 वाजता  सोनाली जोतीराम एडके रा. भंडारवाडी व ज्ञानेश्वर पारप्पा देवकर रा. कार्ला तसेच निकिता बाळू देडे

रा. तेर व गणैश वहू गवळी रा. कळंब या दोन शेतकरी कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह लावून दिला.
या विवाह सोहळ्यास खासदार ओमराजे निंबाळकर, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, आयोजक व छावणी चालक सतीशकुमार सोमाणी, माजी सरपंच महादेव खटावकर, तहसिलदार विजय राऊत,  अनिल काळे, नितीन शेरखाने, जि.प.सदस्य बाळासाहेब जाधवर, हनुमंत नागटिळक, बी.एन डोंगरे यांच्यासह हजारो वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला.
****

वृत्त क्र.325                                                 दि.29 मे 2019          
शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड
बँक खात्याशी तात्काळ मॅप करुन घ्यावे
उस्मानाबाद,दि.29:- ज्या पात्र शेतकऱ्यांना हरभरा व तुरीचे अनुदान अद्याप आधार मॅप खात्यावर जमा झालेले नाही, त्यांनी सात दिवसात ज्या सब एजंट संस्थेकडे ऑनलाइन नोंदणी केली त्या ठिकाणी आधार कार्ड बँक खात्याशी मॅप करून त्याची माहिती कळवावी.
ज्या शेतकऱ्यांनी  हंगाम 2017-18 मध्ये हरभरा पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी केली होती मात्र ज्या शेतकऱ्यांना हरभरा व तूर विक्रीसाठी ऑनलाइन मेसेज गेला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे.
ढोकी, उस्मानाबाद, नळदुर्ग, कळंब, वाशी, भूम, लोहारा येथील तूर-हरभरा केंद्रांवर नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी नोंदणी केलेल्या सब एजंट संस्थेकडे 30 तसेच जिल्हा मार्केटिंग कार्यालय, उस्मानाबाद येथे उपलब्ध आहे. आधार मॅप खाते नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान परत जात आहे.
 तालुकानिहाय हरभरा अनुदान वितरित झालेली यादी पाठवलेली आहे. तसेच आधार कार्ड इनऍक्टिव्ह व आधार खात्याशी मॅप नसल्यामुळे अनुदान परत गेलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले आधार कार्ड बँक खात्याशी मॅप करण्याबाबत बँकेत जाऊन तातडीने कार्यवाही करून घ्यावी. सात दिवसात आपल्या आधार मॅप खात्याची माहिती अपेक्षित आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाहीसाठी प्रधान कार्यालयास आपली माहिती कळविण्यात येईल.



तरी सर्व हरभरा-तूर अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आधार मॅपिंगबाबत पूर्तता करून जिल्हा मार्केटिंग कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.   
*****

वृत्त क्र.326                                                    दि.29 मे 2019

उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक नियोजन, ही काळाची गरज
                                               -डॉ. राजेश पुराणिक
उस्मानाबाद,दि.29:- सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे पण त्यातही पाण्याचा दुष्काळ भीषण आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक नियोजन करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद) चे प्रमुख प्राध्यापक  डॉ. राजेश पुराणिक यांनी केले .  
दि.28 मे 2019  रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कार्य हस्तांतरण व लोकसहभागाने देखभाल व दुरुस्ती बाबत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. देशपांडे, डॉ. नारखेडे, श्री. टेकाळे,  जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. ए. कांबळे, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे चे कार्यकारी अभियंता श्री. ए. जगताप, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकारी श्री. गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.शेळके हे उपस्थित होते.या सत्रात सुमारे 185 शेतकरी बांधवांनी व 58 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अमूल्य मार्गदर्शन करीत  शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकाचे नियोजन, व्यवस्थापन करीत त्यासोबत जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालनही करण्याबाबत आग्रह केला.
डॉ. राजेश पुराणिक यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या कामांचे हस्तांतरण व देखभाल दुरुस्ती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर जलसंपत्तीवर येणारा ताण यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सर्व शेतकऱ्यांनी सहकार्याने व जागृतपणे पडलेला पाऊस जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साठ्यामध्ये पुरेपूर अडविण्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन


केले तसेच शेतकरी बंधूंना त्यांच्या आवारात, शिवारात भविष्यात आवश्यक असणारे योजनांची शासन दरबारी वेळोवेळी दखल घेणे आणि मांडणीबाबतही प्रबोधन केले.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांचे अधिकारी श्री. गायकवाड यांनी पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत वेगवेगळ्या खोलीवर व स्तरावर जपण्याच्या प्रक्रियेबद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे प्रतिकूल परिणामांचे विश्लेषणही  केले. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या रिचार्ज शाप्टची  कामे न झाल्याबाबत सांगितले असता त्यांनी भविष्यात त्यांची कामे पूर्ण करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.
जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे यांनी जलयुक्त शिवार अभियान 2015-16, 2016-17,2017-18, 2018-19  या   वर्षांमध्ये झालेल्या सर्व यंत्रणा जसे की कृषी, भूजल सर्वेक्षण, जिल्हा परिषद व जलसंधारण यांनी केलेली सर्व कामे व निर्माण झालेल्या पाणीसाठयाबद्दलची आकडेवारीसह माहिती उपस्थितांना दिली. सर्व शेतकरी बंधूंना या योजना हस्तांतरित करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहनही केले. भविष्यात देखभाल दुरुस्तीसाठी काय काय तांत्रिक समस्या येऊ शकतात, याचेही त्यांनी उदाहरणासहित मार्गदर्शन केले. वेळीच्या  वेळी देखभाल दुरुस्ती केल्यानंतर होणाऱ्या फायद्याबाबतही त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना समाधानकारक माहिती दिली.
जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद येथील प्रा. श्री. टेकाळे यांनी गहू, ऊस, हरभरा व इतर पिकांना त्या त्या कालावधीत आवश्यक असणाऱ्या पाणी देण्याच्या वेळेबाबत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. तसेच या सर्व पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब कसा करावा, पाण्याचे होणारे अनावश्यक बाष्पीभवन होऊ न देता पाण्याची बचत कशी करावी, याबाबतची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी पाण्याच्या ताळेबंदविषयी माहिती सांगताना  जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16, 2016-17, 2017-18 मधील  पूर्ण झालेल्या सर्व कामांची व जलपरिपूर्ण गावांचीही माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. शेळके यांनी केले तर आभार प्रा. नारखेडे यांनी मानले.
****

Monday, 27 May 2019

एस.टी महामंडळामार्फत तुळजापूर मध्ये टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकरने वाटप


वृत्त क्र. 315                                                     दि.27 मे 2019
                                                                                                                       
एस.टी महामंडळामार्फत तुळजापूर मध्ये
टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकरने वाटप
    उस्मानाबाद. दि.27-  बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील दत्तक घेतलेल्या बोरी, कावलदरा व मोर्डा या  गावांना दि.19 मे 2019 पासून पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
  बोरी येथे ग्रामसेवक सतीश शिंदे, उपसरपंच नितीन हावळे व ग्रामपंचायत सदस्य सचिन हावळे, कावलदरा येथे सरपंच मधुकर राठोड व मोर्डा येथे सरपंच राजेंद्र शेंडगे यांच्या हस्ते या गावांसाठी एस. टी. महामंडळामार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकरचे उद्घाटन करण्यात आले.
      यावेळी  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद विभागाचे विभाग नियंत्रक श्री. रा. य. साळवे, श्री. ह. शं. साळुंके ( यंत्र अभियंता चालन ) ,श्री. अ. अ. जानराव (विभागीय वाहतुक अधिकारी श्री. रा. भ. पवार (बांधकाम अभियंता राजकुमार दिवटे (आगार प्रमुख, तुळजापूर हे उपस्थित होते.
                                                            ****

वृत्त क्र  316                                                     

जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे
वाहतूक नियंत्रण व नियमनात्मक आदेश लागू

             उस्मानाबाद.दि.27- जिल्हयात दि.05 जून 2019 रोजी रमजान ईद (चंद्रदर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे ) साजरी होणार आहे.
            तरी वरील उत्सव जिल्हयात शांततेत पार पडावेत, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे व कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी, यासाठी  पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पोलीस उप निरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि.03 जून 2019 रोजी रात्री 12.00 ते दि.07 जून 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत  पुढीलप्रमाणे अधिकारी प्रदान केले आहेत.
         

सडकावरील किंवा सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालावेत, त्यांनी त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहीत करणे.सर्व मिरवणुकीच्या व जमावांचे प्रसंगी व प्रतिमा पूजनाच्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पूजनाच्या वेळी व कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याचे जागी,गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे. सर्व  रस्त्यांवर, नद्यांच्या घाटावर,सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या किंवा कपडे धुण्याच्या ठिकाणी, जागे मध्ये बंदोबस्त सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे,कर्कश वाद्य वाजविणे, यावर नियमन करणे अगर त्यावर नियंत्रण ठेवणे. शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या  कलम 33,34,37, ते 42,45 या कलमान्वये केलेल्या  कोणत्याही नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही नियमनात्मक आदेशाचे अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
जी व्यक्ती  वरील नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल  ती व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील,असे पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी  कळविले आहे.
                                                     ****

वृत्त क्र 317                                                      दि.27 मे 2019
 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक
यांचा  जून 2019 दौरा कार्यक्रम

          उस्मानाबाद.दि.27-जिल्हयातील आजी / माजी सैनिकांना / विधवांना तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांच्या माहे जून 2019 साठी सहामाही बैठकांचे आयोजन संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.या बैठकांमध्ये आजी / माजी सैनिकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
तरी संबंधित तालुक्यातील आजी / माजी सैनिकांनी / विधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित तहसील कार्यालय येथे खाली नमूद केलेल्या तारखेस सकाळी 11.00 वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे.

तालुक्याचे नाव, बैठकीचा दिनांक, वार पुढीलप्रमाणे.. 1. परांडा, दि.17 जून 2019 तिसरा सोमवार, 2. उमरगा, दि.19 जून 2019 तिसरा बुधवार, 3. वाशी, दि.26 जून 2019 चौथा  बुधवार, 4. लोहारा दि. 28 जून 2019 चौथा शुक्रवार 5. उस्मानाबाद दि.25 जून 2019 चौथा मंगळवार.
संबधितांनी या बैठकांसाठी वेळेवर उपस्थित राहावे.तसेच त्यांनी त्यांच्या तक्रारी /अडचणी लेखी स्वरुपात बैठकीमध्ये सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत यांनी केले  आहे.
                                                          ****


वृत्त क्र 318                                                       दि.27 मे 2019


खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजना करिता
इच्छुक पुरवठादारांनी दरपत्रके सादर करावीत

उस्मानाबाद ,दि.27- प्रमुख खरीप हंगामाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पीक पद्धती व पूरक व्यवसाय यांचे मार्गदर्शन करण्याकरिता दि.2 जून ते 5 जून 2019 या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
  जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाच्या आयोजनाकरिता   हॉल, मैदान, मंडप व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वाराची कमान, लाईट व ध्वनीक्षेपण यंत्रणा,जनरेटर व डिझेल व्यवस्था, स्टॉलधारक व शेतकरी यांना पिण्याचे व वापराच्या पाण्याची व्यवस्था, 400 टेबल, 700 खुर्च्या, स्टेज व्यवस्था याकरिता राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या अंतर्गत दोन लाख दहा हजार इतक्या तरतुदीपर्यंत जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
या पुरवठादारास महोत्सव संयोजनाचा अनुभव असावा, या व्यवस्थेकरिता लागणाऱ्या साहित्यांचा पुरावा असावा, कृषी विभागाच्या किमान एका जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाचा अनुभव असावा, असे प्रकल्प संचालक आत्मा श्री. जितेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
ही दरपत्रके दि. 28 मे 2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आत्मा कार्यालय, रामनगर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर, कापसे बिल्डींग, पंजाब नॅशनल बँकेच्या वर,

दुसरा मजला, उस्मानाबाद, पिन कोड क्रमांक 413 501 येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठीही येथेच संपर्क साधावा, असे प्रकल्प संचालक   प्रकल्प संचालक आत्मा श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
                                                ******
वृत्त क्र 319                                                       दि.27 मे 2019

खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजना करिता
इच्छुक पुरवठादारांनी दरपत्रके सादर करावीत
उस्मानाबाद ,दि.27- प्रमुख खरीप हंगामाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पीक पद्धती व पूरक व्यवसाय यांचे मार्गदर्शन करण्याकरिता दि.2 जून ते 5 जून 2019 या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
          जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाच्या आयोजनाकरिता 2 मीटर x 3 मीटर आकाराचे किमान 125 प्री-फॅब्रिकेटेड स्टॉल उभे करणे, आवश्यकतेप्रमाणे बॅरेकेटिंग, महोत्सवाच्या ठिकाणी कार्पेट-चटई इत्यादी व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता व सिक्युरिटीची व्यवस्था, अग्निशमन बंब, खरीप हंगामपूर्व महोत्सवाबाबत  प्रचार व प्रसिद्धी याकरिता राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या अंतर्गत एक लाख नव्वद हजार इतक्या तरतुदीपर्यंत जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
या पुरवठादारास महोत्सव संयोजनाचा अनुभव असावा, या व्यवस्थेकरिता लागणाऱ्या साहित्यांचा पुरावा असावा, कृषी विभागाच्या किमान एका जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाचा अनुभव असावा, असे प्रकल्प संचालक आत्मा श्री. जितेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
ही दरपत्रके दि. 28 मे 2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आत्मा कार्यालय, रामनगर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर, कापसे बिल्डींग, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, दुसरा मजला, उस्मानाबाद, पिन कोड क्रमांक 413 501 येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठीही येथेच संपर्क साधावा, असे प्रकल्प संचालक   प्रकल्प संचालक आत्मा श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
***



वृत्त क्र 320                                                  दि.27 मे 2019

मृद व जलसंधारण विभागामार्फत
एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
उस्मानाबाद ,दि.27- मृद व जलसंधारण विभाग व जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कार्य हस्तांतरण व लोकसहभागाने देखभाल व दुरुस्ती हा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग मृद व जलसंधारण विभाग उस्मानाबाद आणि जल व भूमी व्यवस्थापन वाल्मी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉल येथे मंगळवार, दि. 28 मे रोजी, सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे,असे जलसंधारण विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
****

वृत्त क्र 321                                                      दि.27 मे 2019
     
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिताची
आचारसंहिता संपुष्टात
         उस्मानाबाद.दि.27- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आणण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
                                                  ****