Saturday, 17 October 2020

अतिवृष्टी शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत -पालकमत्री शंकरराव गडाख





उस्मानाबाद, दि.17(जिमाका):- जिल्ह्याच्या  सर्व तालुक्यात मागील तीन-चार दिवसात जवळपास दोनशे मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिवृष्टीने हिरावला गेला आहे.तरी राज्य शासनाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने व पीक विमा कंपनीकडून मिळणाऱ्या मदतीसाठी बजाज ऑलिंझ या विमा कंपनीने पुढील आठ दिवसात अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
         लोहारा तालुक्यातील राजेगाव बॅरेज परिसरात पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रसंगी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार ज्ञानराज चौगुले आमदार कैलास घाडगे पाटील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार स्वामी, उमरगा उपविभागीय अधिकारी श्री उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, बजाज अलायन्स विमा कंपनीचे समन्वयक देविदास कोळी, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा चे विभाग प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
          पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यशासन आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या 70 गावांचे प्राथमिक यादी तयार केली आहे त्या सर्व गावातील पंचनामे प्रशासनाने नजर अंदाज पाहणी ने एका दिवसात पूर्ण करून घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
     तसेच पिक विमा कंपनीने अतिवृष्टीने झालेल्या जिल्ह्याच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील आठ दिवसात पूर्ण करून त्याचा प्रस्ताव सादर करावा व शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. एक ही  शेतकरी पंचनामे करण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची खबरदारी विमा कंपनीने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येत नाही त्या ठिकाणी संबंधित कृषी सहायकाकडून ऑफलाईन अर्ज विमा कंपनीने स्वीकारावेत असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.
    यावेळी पालकमंत्री गडाख यांनी येणेगुर, माडज पाटी ता. तुळजापूर, कवठा तालुका उमरगा, राजेगाव बॅरेज तालुका लोहारा व अप्सिंगा तालुका तुळजापूर या या गावातील शेती पिकांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
       यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या धरतीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी केली. तर आमदार चौगुले यांनी शेतकऱ्यांना ऑनलाइन द्वारे तक्रारी करण्यास खूप अडचणी येत असून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत च्या तक्रारी ऑफलाइन स्वीकारल्या गेल्या पाहिजेत असे सांगितले. तर आमदार घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीने कोणत्याही गावात वीज नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांचे ऑफ लाईन अर्ज स्वीकारून सरसकट मदत देण्याची मागणी केली.
      प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात दोनशे तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 
     तसेच जिल्ह्यातील 203 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 53 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
           ******

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- राज्यमंत्री संजय बनसोडे

 




उस्मानाबाद, दि.17(जिमाका):- मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये धीर धरावा राज्य शासन अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल असे ग्वाही सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

        उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री बनसोडे करत होते.त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

यावेळी तहसीलदार गणेश माळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी उमेश घाटगे, गट विकास अधिकारी श्रीमती दिवाने,  भागवत भंडारकर , जगदीश पाटील, जिवन चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर,शरद चव्हाण, यांच्यासह सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

  राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी गौतम सदाशिव चव्हाण यांच्या शेतीची व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. शेतकरी चव्हाण यांच्या शेताचे नाल्याच्या प्रवाहामुळे शेती मधील जमिनीचा थर वाहून गेल्याचे दिसून आले तसेच ठिबक सिंचन सेट तसेच टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सव-2020 
उस्मानाबाद, दि.17(जिमाका): महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले. यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान यशराज मुकूंद कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसुनच घ्यावा असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, श्री अमर कदम, श्री सज्जन साळुंके, श्री अनंत कोंडो तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री सौदागर तांदळे मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी उपस्थित होते.