Saturday, 20 July 2024
1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त : त्यापैकी 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जांना तालुका समितीची मान्यता
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण
1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त : त्यापैकी 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जांना तालुका समितीची मान्यता
महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
धाराशिव दि 20 (जिमाका) राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील महिला आता मोठ्या संख्येने पुढे येत आहे. या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.दर महिन्याला 1500 रुपये पात्र महिला लाभार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे वर्षासाठी 18 हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यातील 4 लाख 48 हजारापेक्षा जास्त पात्र महिलांना या या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये ऑनलाईन अर्जाची संख्या 38 हजार 779 आणि 12 हजार 472 ऑफलाइन अर्जाचा समावेश आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून तालुका समितीने ग्रामीण भागातील 59 हजार 994 अर्जाना मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 8 तालुक्यात भूम, कळंब, धाराशिव,तेर,तुळजापूर उमरगा,आलूर, परंडा,लोहारा व वाशी येथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय आहे.या कार्यालयअंतर्गत 1885 आणि धाराशिवसह नगरपालिका क्षेत्रात 167 अशा एकूण 2052 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण भागातून 1 लाख 36 हजार 109 आणि शहरी भागातील 8142 महिलांचे असे एकूण 1 लाख 43 हजार 251 अर्ज प्राप्त झाले.यातील ग्रामीण भागातील 34 हजार 915 आणि शहरी भागातील 3864 अशी एकूण 38 हजार 779 महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले.ग्रामीण भागातील 1 लाख 194 महिलांचे आणि शहरी भागातील 4472 महिलांचे असे एकूण 1 लाख 4 हजार 472 ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीने बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या अर्जाला मान्यता दिली आहे,ती पुढीलप्रमाणे भूम- 9292,कळंब -12 हजार 146,धाराशिव व तेर -2904, तुळजापूर- 11 हजार 339,उमरगा व आलूर- 3 हजार,परंडा- 12 हजार 675, लोहारा- 2498 आणि वाशी- 6140 अशा एकूण 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जाना मान्यता दिली आहे.शहरी भागातील किती महिलांच्या अर्जांना मान्यता मिळाली याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेच्या लाभासाठी असलेल्या निकषात बसतात, त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.जास्तीत जास्त महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Tuesday, 16 July 2024
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
15 जुलैपर्यंत 99 हजार महिलांचे अर्ज
79 हजार महिलांचे अर्ज ठरले योजनेसाठी पात्र
10 हजार शहरी तर 69 हजार ग्रामीण महिलांचा समावेश
धाराशिव दि.16 (जिमाका) महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा करण्यासोबतच कुटुंबातील त्यांच्या निर्णयक भूमिकेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील 4 लक्ष 48 हजार 636 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.यामध्ये शहरी भागातील 79 हजार 304 आणि ग्रामीण भागातील 3 लक्ष 69 हजार 332 महिलांना लाभ देण्याचे नियोजन आहे.2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये 12 हजार 215 शहरी आणि 87 हजार 450 ग्रामीण महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.त्यापैकी 79 हजार 445 महिलांचे अर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले.यामध्ये शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.
2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये धाराशिव शहरातील 2064 आणि ग्रामीण भागातील 12 हजार 186, तुळजापूर तालुक्यातील शहरी भागातील 2059 आणि ग्रामीण भागातील 9799,उमरगा तालुक्यातील उमरगा व मुरूम शहरी भागातील 2021 आणि ग्रामीण भागातील 15 हजार 768,लोहारा शहरातील 466 आणि ग्रामीण भागातील 6112,भूम शहरातील 480 आणि ग्रामीण भागातील 4012,परंडा शहरातील 1471 आणि ग्रामीण भागातील 10 हजार 544, कळंब शहरातील 1296 आणि ग्रामीण भागातील 3205, वाशी शहरातील 530 आणि ग्रामीण भागातील 7 हजार 432 असे शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 असे एकूण 79 हजार 445 अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. आतापर्यंत शहरी भागातून 15.40 टक्के तर ग्रामीण भागातून 23.68 टक्के अर्ज प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Monday, 15 July 2024
महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे
#माझी_लाडकी_बहीण_योजना
महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा
- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून योजनेचा आढावा
धाराशिव दि.15 (जिमाका) मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.ग्रामीण व शहरी भागातील या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यास महिलांना मदत करून जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेच्या लाभासाठी प्रोत्साहित करा.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले.
आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कक्षातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय यंत्रणांकडून आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिरी व श्री.गोडभरले, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक तहसील जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून त्यांना अर्ज वितरित करावे.शहरी भागात हे काम वेगाने करावे. लाभार्थ्यांनी अर्ज भरले व पात्र ठरले त्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित कराव्यात.त्यामुळे लाभार्थी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.किती कर्मचाऱ्यांनी किती अर्ज संकलित केले याची माहिती ठेवावी. बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे.शहरी भागात अर्जाला तपासून पात्र ठरविण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना तर ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांना आहे.शहरी भागात या योजनेसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागवावा असे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांच्या पात्र याद्या बघून त्यांना मंजुरी देऊन त्या प्रकाशित कराव्या असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, ऑनलाइन भरलेले अर्जसुद्धा तपासून मंजूर करावे. या कामी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्याव्या.ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्ज भरून घेऊन अर्जाची छाननी करावी.या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात. सर्वांनी या योजनेसाठी प्राधान्याने काम करावे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचा दररोज आढावा घ्यावा. कोणत्या कर्मचाऱ्यांनी शहरी भागात अर्ज जमा केले याची नोंद घ्यावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देता येईल असे डॉ.ओंबासे म्हणाले.
डॉ.घोष म्हणाले,ग्रामीण भागातील योजनेच्या लाभासाठी पात्र असलेली एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवर यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून काम करावे.अंगणवाडी सेविकांनी किती अर्ज भरून घेतले याची नोंद घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुकास्तरीय यंत्रणांनी आणि शहरी भागासाठी काम करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केले,किती महिलांचे अर्ज प्राप्त झाले आणि किती अर्ज पात्र ठरले तसेच योजनेसाठी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी ही माहिती दिली.
Sunday, 14 July 2024
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण
महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना
महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.
" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.
योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविका, नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापक, आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.
ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी
धाराशिव
Subscribe to:
Posts (Atom)






