Saturday, 20 May 2017

तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी नियुक्त


उस्मानाबाद, दि. 20:- बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ग्रामस्तरीय समिती मार्फत निवडल्या जाणाऱ्या त्रस्त कुटुंबाच्या अनुषंगाने तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत.)उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या कार्यशाळे मध्ये नरेगा,बळीराजा चेतना अभियान व शेतकरी कर्ज पुरवठा या वरील मुद्याच्या अनुषंगाने संबंधित खातेप्रमुख समन्वयाने आयोजन करणार आहेत.

तालुका निहाय कार्यशाळेच्या समन्वयासाठी देखरेख व कार्यशाळेच्या आयोजना नंतरचा सविस्तर फलनिष्पती अहवाल सादर करण्यासाठी तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी म्हणुन पुढील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद तालुक्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास), तुळजापूर -उपजिल्हाधिकारी (रोहयो), उमरगा -उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प क्र.2), लोहारा-जिल्हा पुरवठा अधिकारी,भूम-उपजिल्हाधिकारी (सा.प्र.),परंडा- जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कळंब-अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.),वाशी तालुक्यासाठी कृषी विकास अधिकारी आदी नेमणूक करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 

"दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा



उस्मानाबाद, दि. 20  :- "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" शनिवार दि.20 मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यातआला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी श्री.अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,उपजिल्हाधिकारी (पुरवठा) अरविंद लाटकर आदीसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सेवा हमी कायदयांतर्गत शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे - संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दी.कुलथे



उस्मानाबाद,दि.20:- सेवा हमी कायदयांतर्गत शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.
            उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते.यावेळी श्री.कुलथे बोलत होते.यावेळी विभागीय सहसचिव रामचंद्र खंदारे,राज्य संघटक मधुकर डोईफोडे, डॉ.मधुकर गिरी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी तथा कार्याध्यक्ष  मनोज शिवाजी सानप, अप्पर कोषागार अधिकारी आप्पासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना श्री.कुलथे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना अधिकारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहील, संघटनाची एकजूट चांगली आहे,रिक्त पदे भरण्याबाबत संघटना सतत आग्रही आसून महासंघाच्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा चालू आसून मुख्यमंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीत राज्यातील  कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सेवा निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करावे त्याच प्रमाणे 5 दिवसाचा आठवडा, महिला संबंधित बालसंगोपन रजा या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी ग.दि. कुलथे यांनी अधिकारी  महासंघाच्या मुंबईतील बांद्रा येथील कल्याण केंद्र इमारतीच्या उभारणी संदर्भात माहिती दिली व अधिकारी कल्याण केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी पाच हजार रुपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा आणि विभागीय राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी व  राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.

Thursday, 18 May 2017

उन्नत शेती समृध्द शेतकरी सन 2017-18 योजनेंतर्गत ऑनलाईन केलेले ठिबक/तुषार अर्ज स्वीकारणे सुरु


उस्मानाबाद.दि.18:- उन्नत शेती समृध्द शेतकरी  योजनेंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेखाली सन 2017-18 मध्ये ठिबक/ तुषार संच घेणेसाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे. तरी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज प्रत, सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, चतु:सीमा इत्यादी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयात जमा करावी.
             ठिबक,तुषार संचाचे सन 2017-18 चे अनुदान प्राप्त होताच आपणास पूर्व संमती देण्यात येईल. पूर्वसंमती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या मुदतीत ठिबक,तुषार मान्यता प्राप्त्‍ कंपनी, डिलर कडून खरेदी करून सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा.

            सादर केलेल्या प्रस्तावाची दहा दिवसात मोका तपासणी करुन अनुदानाची अदायगी करण्यात येईल.तरी ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांनी पूर्व संमतीसाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.ए.जी. देशमुख यांनी केले आहे.

राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हा / तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांकात बदल


उस्मानाबाद.दि.18:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणा-या शिक्षक प्रशिक्षणासाठी ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्ष पूर्ण व 24 वर्ष पूर्ण झालेली आहे तसेच जे वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणास पात्र आहेत, अशा सर्व अर्हता प्राप्त शिक्षकांसाठी दिनांक 01 जून 2017 ते 10 जून 2017 या कालावधीत वरिष्ठश्रेणी प्रशिक्षण तर दिनांक 01 जून 2017 ते 10 जून 2017 या कालावधीत निवडश्रेणी प्रशिक्षण विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेले होते.

           सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करणा-या तज्ज्ञांचे विभागस्तराचे प्रशिक्षण दिनांक 28 ते 30 मे 2017 या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. तर विभागास्तराच्या तज्ज्ञांना मार्गदर्शन करणा-या प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण राज्यमंडळामार्फत दिनांक 19 ते 21 मे 2017 या कालावधीत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, कुसगांव बु. लोणावळा, ता. मावळ जि. पुणे येथे आयोजित केलेले आहे. माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणात प्रशासकीय कारणास्तव प्रशिक्षणाचे आयोजनात काही तांत्रिक बदल होत असल्यामुळे उपरोक्त कालावधीत आयोजीत केलेली राज्यस्तरीय , विभागस्तरीय तसेच प्रत्यक्ष जिल्हा / तालुकास्तरीय प्रशिक्षणे उपरोक्त दिनांकास होणार नाहीत याची नोंद घ्यावी. माध्यमिक वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाचा सुधारित नियोजनाचा कार्यक्रम यथासमय जाहीर करण्यात येईल. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणे ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत होतील, याची नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी अशासकीय संस्थेने प्रस्ताव सादर करावेत


उस्मानाबाद.दि.18:- जिल्हयात विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी अशासकीय संस्थेकडून अधिस्विकृती आणि सहायक अनुदानाकरीता सन 2017-18 या वित्तीय वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील इच्छूक अशासकीय संस्थांनी प्रस्ताव दि.30 मे 2017 पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी केले आहे.
            जिल्हयात सन 2017-18 मध्ये विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी एका अशासकीय संस्थेचा प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या शिफारशीने महाराष्ट्र राज्य विधी सेवा पा्रधिकरण, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.

             प्रस्तावासोबत सहायक अनुदान व संपूर्ण भरलेला अधिस्विकृती फॉर्म असावा, अशासकीय संस्था निती आयोग पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे असाधारण ओळख (Unique) असणे आवश्यक आहे, अशासकीय संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अशासकीय संस्थेचा स्थापना  लेख व अधिसंघ नियमावलीची प्रत,मागील तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल,संस्थेचा मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक, अशासकीय संस्थेस विधी साक्षरता शिबिरामध्ये काम करीत असल्याचा अनुभव कागदपत्रे, सन 2017-18 मध्ये जिल्हयात घेण्यात येणाऱ्या शिबिराचे ठिकाण आदी कागदपत्रासह तीन प्रतीमध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.विधी सेवा प्राधिकरणाकडून विधी साक्षरता शिबिर घेण्यासाठी प्रत्येक वर्षी अशासकीय संस्थेस अनुदान देण्यात येते, अधिक माहिती, प्रस्तावासंबंधी नियमावलीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असे ही कळविण्यात आले आहे.

Tuesday, 16 May 2017

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक संपन्न



उस्मानाबाद.दि.16:- पगार,भत्ते,बढत्या,आदी रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच, बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तेवढयाच तत्परतेने करतात.तरीही, अधिकारी बांधवांबाबत जनमाणसात जी नकारात्मक भावना दिसून येते, ती विचारात घेता, आपली कार्यपध्दती आणि कार्यशैलीचे आत्मपरिक्षण करण्याची गरज महासंघाने स्वत:हून लक्षात घेतलेली आहे. 'कार्यसंस्कृती' अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून, राज्याच्या विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनासाठी महासंघाने अभ्यासपूर्वक 'पगारात भागवा' हे 'जनताभिमुख' अभियान सुरु केले आहे.
            या अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या दालनात आज संपन्न झाली.यावेळी महासंघाचे विभागीय सरचिटणीस तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, राज्य संघटक मधुकर डोईफोडे, विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब शेलार,कार्याध्यक्ष मनोज शिवाजी सानप,सचिव डॉ.शितलकुमार मुकणे हे उपस्थित होते.
            गुरुवार दि.18 मे रोजी सकाळी 10.30 वाजता महासंघाचे मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हयातील वर्ग 1 व 2 राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात होणार आहे.या बैठकीच्या पूर्व तयारीकरिता आज ही बैठक संपन्न झाली. दि.18 मे रोजी होणाऱ्या बैठकीला अधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही  यावेळी करण्यात आले आहे.
            या बैठकीत महासंघाच्या सकारात्मक व विधायक कार्याची दखल घेऊन, राज्य शासनाने महासंघास बांद्रा (पूर्व) येथे 1381 चौ.मी. आकाराचा भूखंड, महासंघाचे कल्याणकेंद्र बांधण्यासाठी दिला आहे.त्या ठिकाणी राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी हे मुंबई येथे शासकीय कामकाजानिमित्त आल्यानंतर त्यांच्या निवासाची व विश्रामाची सोय करण्याकरिता तसेच, महासंघाच्या सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण व मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्याकरिता ' कल्याण केंद्र '  उभारण्याचा महासंघाचा मनोदय आहे, या विषयावरही या बैठकीत  विस्तृत चर्चा होणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या उस्मानाबाद शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

गावनिहाय लाभ प्रदान करण्यात आलेल्या त्रस्त कुटुंबप्रमुखाची यादी पाहण्यास उपलब्ध



उस्मानाबाद.दि.16:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणे बाबत महसूल गावातील ग्रामस्तरीय समितीस दिलेल्या वार्षिक रुपये एक लाख रक्कमेच्या खर्चाबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यानुसार त्रस्त कुटुंबास पेरणी, बियाणे करीता, गरीब कुटुंबास आकस्मिक खर्चासाठी व 2-3 महिन्याकरिता बिनव्याजी कर्ज इत्यादीकरीता वैयक्तिक लाभ प्रदानाच्या बाबीसाठी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व महसूली गावांमधील लाभ प्रदान करण्यात आलेल्या त्रस्त कुटुंबप्रमुखांच्या नावाची यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे,असे ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविण्यात आले आहे.