Friday, 7 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींचे शेषशाही अलंकार महापूजा



शारदीय नवरात्र महोत्सव-2016
                             
          उस्मानाबाद,दि.7:शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सातव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला, म्हणून विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान काल रात्री दि.6 ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या दि.8 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.      

Thursday, 6 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेकरिता भाविकांची प्रचंड गर्दी



  
          उस्मानाबाद, दि.6:- शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन मिळत आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पाचव्या माळेपासून  विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.        
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि.7) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.                            ****
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी दिल्या आरोग्यदायी सोयीसुविधा
शारदीय नवरात्रौ महोत्सवात सोलापूर,नळदूर्ग, लातूर आदींसह हैद्राबाद, कर्नाटक, तेलंगणा आदी  ठिकाणाहून भाविक तुळजापूर  येथे दर्शनासाठी येतात . यात महाराष्ट्रासह परराज्यातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने त्यांच्या पायाला इजा होते त्याकरिता त्यांना तात्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे. तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवासाठी देवीजींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांची मोठी गर्दी होत आहे.  त्यामुळे काही अघटित घटना  घडल्यास  जखमी व्यक्तीला तात्काळ  आरोग्य  सेवा मिळावी  या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14 प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
तसेच भाविकांच्या आरोग्याच्या  दृष्टीकोनातून तुळजापूर शहरातील  शुध्द पाणी , स्वच्छता , आहार इत्यादीबाबत  सनियंत्रणासाठी  नोडल ऑफिसर म्हणून  निवासी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. आनंद सोपल  यांची  नेमणूक करण्यात आली आहे . तसेच  रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली आहे.आपत्कालीन  व्यवस्थापन नियोजन  करण्यासाठीही   डॉ. गलांडे,  डॉ. होनमाने,  डॉ. शिंदे , डॉ. डुकरे ,डॉ. रोचकरी  यांची नोडल ऑफिसर म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे . याशिवाय नवीन व जुन्या बसस्थानकावर  येणाऱ्या  वय वर्षे 30 वर्षांपुढील  सर्व भाविकांची  आरोग्य विभागाचे  अधिकारी-कर्मचारी  उच्चरक्तदाब व मधुमेहाची तपासणी करीत आहेत.
 या केंद्रांसाठी 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत . याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्षही येथे सुरु करण्यात आला आहे.या यात्रेमध्ये  देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये  वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहायक श्री. आर.एस. हजगुडे, श्री. एस.व्ही. तीर्थकर,  आरोग्य कर्मचारी श्री. एन.एल. लंगडे, श्री.टी.एस.माळी , श्री.यु.एच.अडसूळ यांचे विशेष सहकार्य भाविकांना मिळत आहे.
आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा भाविक चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा प्रशासन आणि  मंदिर संस्थान यांच्या मार्गदशर्नाखाली आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे  या यात्रेकरिता आलेल्या  भाविकांना उत्तमप्रकारे  आरोग्याच्या  सोयी सुविधा उपलब्ध  करुन देत आहेत .

Wednesday, 5 October 2016

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच-पालकमंत्री डॉ. दीपक सावंत






उस्मानाबाद.दि.5:-जिल्ह्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या  पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी बोलताना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी  आज येथे केले .
जिल्ह्यात  21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2016 या कालावधीत  अतिवृष्टीने  सोयाबीन , तूर , खरीप ज्वारी , बाजरी , मूग , उडीद ,  कापूस , भात , केळी , पपई , भुईमूग , मका , भाजीपाला   इत्यादी  पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त  नुकसान  झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  काल दिनांक 4 ऑक्टोबर  रोजी रात्री  वाशी तालुक्यातील  पारगाव, मलकापूर, हातोला, जेबापिंप्री या गावांमध्ये तर  आज सकाळी  उस्मानाबाद तालुक्यातील  राजुरी , काक्रंबा , लोहारा तालुक्यातील  माकणी ,  उमरगा तालुक्यातील  गुंजोटी  या गावांमधील पाणीसाठा , अतिवृष्टीमुळे झालेल्या  पिकांची व इतर नुकसानीची पाहणी केली. यावेळी माकणी येथे पालकमंत्री श्री. सावंत  यांनी जलपूजनही  केले.
तालुकानिहाय  बाधित शेतकऱ्यांची संख्या, पेरणीलायक क्षेत्र , पेरणी केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे -  उस्मानाबाद 34 हजार 392, 1 लाख 2 हजार 100, 91 हजार 770, तुळजापूर -23 हजार 732, 85 हजार 700,  91 हजार 511 , उमरगा -20 हजार 22 , 76 हजार , 78 हजार 87 ,  लोहारा -21 हजार 791 , 26 हजार 600,  37 हजार 961 , भूम -15 हजार 235 , 37 हजार 200 , 54 हजार 429 ,  परंडा -6 हजार 696 , 22 हजार 400,  40 हजार 777,  कळंब-25 हजार 319 , 80 हजार 900,74 हजार 263  आणि वाशी  10 हजार 564 , 41 हजार 700, 39 हजार 441 . जिल्ह्यात एकूण  जवळपास  5 लाख हेक्टर आर क्षेत्रावर पेरणी झाली होती  मात्र अतिवृष्टीने जवळपास 3 लाख हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे . 
याबाबत पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शेतकऱ्यांना त्यांनी कोणत्याही  प्रकारची चिंता करु नये, शासन  खंबीरपणे  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभे राहील तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला  आवश्यक व योग्य ती  मदत दिली जाईल,असे आश्वासन देवून धीर दिला . 

यावेळी  त्यांच्यासमवेत  आमदार  ज्ञानराज चौगुले  , जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते ,  जिल्हा  कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे,  , जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. एकनाथ माले ,   उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , श्री निलेश श्रींगी ,  उपजिल्हाधिकारी  श्रीमती अर्चना नष्टे , लघुसिंचन  पाटबंधारे  विभागाचे  कार्यकारी अभियंता  श्री. दशरथ देवकर,  तहसिलदार  दिनेश  झांपले ,  उपविभागीय  कृषी अधिकारी  श्री. बिराजदार आदी  उपस्थित होते . 

जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण सोडत जाहीर




उस्मानाबाद,दि.5:- जिल्हा परिषदेच्या  एकूण 55 जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे ते पुढीलप्रमाणे –
अनुसूचित जातींसाठी-9 कानेगाव ता. लोहारा महिला , अंबेजवळगा ता. उस्मानाबाद -महिला , केशेगाव ता. उस्मानाबाद , तेरखेडा ता. वाशी , ईटकूर ता. कळंब-महिला, मंगरुळ ता. तुळजापूर- महिला,पारा ता. वाशी -महिला,गुंजोटी ता. उमरगा, उपळा (मा.) ता. उस्मानाबाद .
अनुसूचित जमाती -01- कोंड ता. उस्मानाबाद -महिला . 
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी -15, सुकटा ता.भूम-महिला , मंगरुळ ता. कळंब-महिला,डिकसळ ता. कळंब-महिला, शिराढोण  ता. कळंब ,  खामसवाडी ता. कळंब-महिला , ढोकी ता. उस्मानाबाद -महिला, पाडोळी (आ.) ता. उस्मानाबाद -महिला ,  वडगांव (सि.) ता. उस्मानाबाद-महिला, जळकोट ता. तुळजापूर ,  शहापूर  ता. तुळजापूर –महिला ,  कवठा ता. उमरगा , येणेगूर ता. उमरगा ,  कदेर ता. उमरगा-महिला , दाळींब ता. उमरगा , पखरुड  ता. भूम .

सर्वसाधारण प्रवर्ग-30, आलूर ता उमरगा , बलसूर ता. उमरगा , जेवळी ता . लोहारा-महिला, सास्तूर ता. लोहारा -महिला ,  काटगांव  ता तुळजापूर –महिला ,  सिंदफळ ता. तुळजापूर,  जवळा (नि) ता. परंडा , शेळगांव ता. परंडा –महिला ,  बेंबळी ता. उस्मानाबाद , सांजा  ता. उस्मानाबाद ,  तेर ता. उस्मानाबाद , पळसप ता. उस्मानाबाद ,  येरमाळा ता. कळंब , मोहा ता. कळंब ,  नायगांव  ता. कळंब,  पारगाव  ता वाशी –महिला ,  आष्टा  ता . लोहारा ,  पाथरुड  ता भूम-महिला ,  काटी ता. तुळजापूर ,  कुनाळी  ता. उमरगा ,  येडशी  ता. उस्मानाबाद-महिला ,  वालवड  ता. भूम –महिला, डोंजा ता परंडा –महिला ,  अनाळा ता . परंडा –महिला,  तुरोरी ता. उमरगा ,  लोणी ता. परंडा –महिला ,  नंदगाव  ता . तुळजापूर , काक्रंबा ता. तुळजापूर –महिला ,  माकणी ता . लोहारा –महिला , आणि अणदूर  ता . तुळजापूर .

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा

शारदीय नवरात्र महोत्सव-2016


         उस्मानाबाद,दि.5:-तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमीनिमित्त श्रीदेवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवामुळे तुळजापूरात महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश व कनार्टक राज्यातूनही आलेल्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे,  तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सुजित नरहरे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.  
            ललित पंचमीनिमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                  
        दररोज श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  यात, उद्या दि. 6 ऑक्टोबर  रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 7 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि.8  ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 9 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (मंगळवारी) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
नवरात्रौत्सवाच्या  निमित्ताने पोलिसांचा बंदोबस्त चोख
         नवरात्रौत्सवाच्या  निमित्ताने  पोलीस  व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख  यांनी सांगितले की ,  देशातील  दहशतवादी  घटनांच्या  पार्श्वभूमीवर  श्री  तुळजाभवानीच्या  मंदिरात  कडेकोट  सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे . देवींच्या  दर्शनासाठी  25 लाखांपेक्षा  जास्त भाविकांची  संख्या ग्राह्य  धरुन  गत 15 दिवसापासून पोलीस  बंदोबस्त  तैनात  करण्यात  आला आहे . भाविकांसह  मंदिराची  तपासणी  करण्यात येत असून  सुरक्षेकरिता बॉम्बशोधक पथकही याठिकाणी सज्ज आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर. जाधव ,पोलीस उप निरीक्षक एस.आर.शिंदे, इतर पोलीस कर्मचारी,   बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख अविनाश शिंदे ,सम्राट माने, मंदिर  संस्थानचे सुरक्षा अधिकारी सदानंद काळे व त्यांची टीम  हे सर्व एकत्रित समन्वयाने उत्कृष्ट भूमिका पार पाडीत आहेत. 
वृध्द, अपंग  भाविकांना  पोलीस कर्मचारी विशेष मदत करीत आहेत. भाविकांना  सुलभ दर्शन  मिळावे यासाठी  पोलीस प्रयत्नशील  असून  भाविकांनी  पोलीस  प्रशासनास  सहकार्य करावे,असे आवाहनही श्री. देशमुख यांनी भाविकांना केले आहे .
            यानुषंगाने  साधारणत: 2 हजार  पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या ठिकाणी  नेमणूक  करण्यात आली आहे . सर्वत्र  पोलिसांचा जागता पहारा आहे . येणाऱ्या व जाणाऱ्या  प्रत्येक भाविकांवर  प्रत्यक्ष  पोलीसांकडून , सामान्य  वेषातील पोलिसांकडून तसेच  सीसीटीव्हीमधून  बारकाईने  लक्ष दिले जात आहे.
            याशिवाय  या यात्रेच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर  उस्मानाबाद  पोलीस दलाच्या  वतीने  पोलीस दलातील  समाजपरिवर्तनात्मक निवडक  फोटोंचे  प्रदर्शन भरविण्यात  आले.  यामध्ये पोलीस दलातील  अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून सामान्य जनतेला  करण्यात  आलेल्या मदतीची छायाचित्रे  छायाचित्र  प्रदर्शनाच्या रुपात  मांडलेली आहेत.याचवेळी केंद्र व राज्य शासनाचे महत्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत  पोहोचविण्याचे काम  करणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या  सर्व  उमेदवारांना  उपयुक्त माहिती देणाऱ्या शासनाच्या  लोकराज्य या मासिकाचे महत्व लक्षात  घेवून  प्रदर्शनाच्या शेवटी  प्रदर्शनास भेट देणाऱ्या  भाविकांना सप्टेंबर 2016 चा  लोकराज्य पोलीस विशेषांक”,   आणि  नाजूक  फुलांनो कणखर बना … ही महिला कायद्यांविषयीची माहिती पुस्तिका भेट स्वरुपात  देण्यात येत आहे .
            याशिवाय  जिल्हा माहिती कार्यालयाच्या  स्टॉलवरुन  पोलिसांबाबत  समाजात  आदर , प्रेम वाढीस लागावे  याकरिता  प्रबोधनात्मक  बाबी संवादपर्व  या उपक्रमातून  सांगण्यात  येत आहेत.

            या विविध  लोकाभिमुख  उपक्रमांसाठी  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख ,  पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली घाटगे ,  सहायक पोलीस अधीक्षक  राजतिलक रोशन ,   पोलीस  निरीक्षक  हरीष  खेडकर , पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे  , गोविंद पवार,  योगेश  सूर्यवंशी  आणि  गजानन जाधव  यांचे अनमोल  सहकार्य  लाभले आहे.

श्री तुळजाभवानीच्या छबिन्यास भाविकांची गर्दी उद्यापासून देवीजींची रथ अलंकार महापूजा

शारदीय  नवरात्र महोत्सव-2016

         उस्मानाबाद,दि.4:-तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची सोमवारी नित्योपचार पूजा करण्यात आली. आज मंगळवार असल्यामुळे देवीजींची नित्योपचार झाल्यानंतर विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
        दररोज श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जात आहेत.  श्री तुळजाभवानी देवींच्या विविध अलंकार पूजेस उद्यापासून (दि.5) पासून सुरुवात होणार आहे.  यात, दि.5 रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 6 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 7 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 8 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 9 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.तत्पूर्वी, काल (सोमवारी) रात्री 10 वाजता  भाविकांच्या अपार उत्साहात श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

            भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवीने रथातून येऊन भक्तांचे संकट निवारण केले होते, त्यामुळे या रथ अलंकार महापूजेला विशेष महत्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. 

Monday, 3 October 2016

“आम्ही झालो लोकराज्य महाविद्यालय” राज्यातील पहिले “लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय” उस्मानाबादचे


उस्मानाबाद,दि,3:- राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा  यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आम्ही झालो लोकराज्य कृषी महाविद्यालय या  उपक्रमास प्रतिसाद देत किणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे “शासकीय कृषी महाविद्यालय या  महाविद्यालयाने राज्यातील पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर  रामराव कांबळे ,  डॉ. भागवत  दंडनाईक , डॉ. विद्यानंद मनवर यांनी विशेष पुढाकार घेतला.
या महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांशी बळीराजा  चेतना अभियान”, स्पर्धा  परीक्षा  मार्गदर्शन  तसेच  व्यक्तिमत्व  विकास या विषयांवर संवाद साधण्यासाठी  परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप ,  शेतकरी आत्महत्यांची    कारणे व त्या रोखण्यासाठीचे शाश्वत उपाय या  विषयावर  काम करणारे श्री. विनायक हेगाणा यांची मार्गदर्शनपर व्याख्याने  आयोजित केली होती. 
यावेळी  आयुष प्रसाद यांनी केंद्रीय  लोकसेवा  आयोगाच्या परीक्षांबद्दल, त्यांच्या नियोजनाबद्दल , अभ्यासाच्या पध्दतींबद्दल , संदर्भांबद्दल ,  आज शासकीय  नोकरीत  कोणत्या  दृष्टीकोनातून  काम करण्याची  गरज आहे  याबाबत  उपस्थित  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले .
शेतकरी  आत्महत्यांची  कारणे व त्या रोखण्यासाठीचे  शाश्वत  उपाय या विषयावर  अभ्यास , संशोधन व प्रत्यक्ष काम करणारे श्री. विनायक हेगाणा यांनी उस्मानाबाद  आणि इतर  काही जिल्ह्यांमध्ये  होणाऱ्या  शेतकरी  आत्महत्या,  त्याची  कारणे  आणि  त्यावरील  शाश्वत  उपाय याबद्दलचे बहुमोल  मार्गदर्शन केले .
त्यानंतर  जिल्हा माहिती  अधिकारी मनोज सानप  यांनी या  विद्यार्थ्यांना  व्यक्तिमत्व  विकास,शासकीय सेवेत लोकाभिमुख काम आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विविध उपक्रम, प्रकाशने, महान्यूज वेबपोर्टल, शासकीय संकेतस्थळे याबाबतची  माहिती विद्यार्थ्यांना दिली.
लोकराज्य मासिकाचे  त्यांनी महत्व  पटवून  देताना श्री. सानप म्हणाले,लोकराज्य या मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या माहितीचा विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी निश्चित उपयोग होणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच  विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.त्यामुळे लोकराज्यचे नियमित वाचन करावे .
 राज्यातील  पहिले लोकराज्य  कृषी महाविद्यालय  बनण्याचा  संकल्प केल्यानंतर प्राचार्य  कमलाकर कांबळे  व त्यांचे  प्राध्यापक  सहकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी या महाविद्यालयात आता यापुढे दररोज  लोकराज्य मासिकातील  एक लेख वाचला जाईल असा निश्चय केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सहायक प्राध्यापक डॉ. संतोष  सुरेश फुलारी  यांनी केले तर आभार सहायक प्राध्यापक डॉ. महेश वाघमारे यांनी मानले .  

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा





         उस्मानाबाद,दि.3:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि.5 पासून सुरुवात होणार आहे. यात, दि.5  रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 6 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.7 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि.8 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.9 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
            तत्पूर्वी, काल (रविवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
                                                        ****

Sunday, 2 October 2016

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद, दि.2 : आपल्या संपूर्ण आयुष्यातील आचरणातून आणि विचारांमधून जगाला शांतता , मानवतावाद , संहिष्णुता , बंधुभाव यांचा संदेश दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे , उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी , तहसिलदार राजकुमार माने, यांच्यासह कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते

शारदीय नवरात्र महोत्सव -2016 नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने प्रशासन अहोरात्र सज्ज



         उस्मानाबाद,दि.2:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह  तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या भाविकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच मंदिर संस्थानासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र तुळजापूरनगरीत पाहायला मिळत आहे.
            श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून  भाविक शिस्तबद्धरित्या दर्शन घेत असल्याचे दृश्य दिसत आहे. राजे शहाजी महाद्वार येथून दर्शनरांग बंद करण्यात आली असून धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगांतील बदल भाविकांना समजण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर जवळपास 2 हजारच्या आसपास अधिकारी-कर्मचारी वर्ग जागोजागी थांबून नियंत्रण ठेवत आहेत. मंदिर व आसपासच्या परिसराची सीसीटीवीद्वारे पाहणी केली जात असून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील 200पोलीस पाटीलही  भाविकांच्या सुरक्षेसाठी नवरात्रौत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत.
भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे  व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.
 आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा चांगल्या प्रकारे लाभ भाविक घेत आहेत.यासाठी जवळपास 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत . याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्षही येथे सुरु करण्यात आला आहे . 
शहरामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी नगरपालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनांच्या होणाऱ्या त्रासापासून चालणाऱ्या भाविकांची सुटका झाली आहे , एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय, त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देणे, त्यांच्यासाठी लॉकर्स, रुम्सची व्यवस्था या बाबींची व्यवस्था करण्यात  आली आहे.
            बाहेरुन येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेची, वाहतूक मार्गात केलेल्या  बदलाची माहिती मिळावी,यासाठी जागोजागी विविध भाषांमधील फलकांद्वारे माहिती दिली जात आहे. मंदिर परिसर आणि शहरातही अधिकाधिक स्वच्छता राहावी, यासाठी नगरपालिका यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील साफसफाई करण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने 280 कर्मचारी कार्यरत असून शनिवारी महाद्वार चौक, आर्य चौक, कमानसेवा यासह अंतर्गत रस्त्यांची तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांकरिता पालिकेकडून कोंडवाड्यांची व्यवस्था करण्यात आली  असून यासाठी अतिरिक्त कामगारांचीही नियुक्ती  करण्यात आली आहे याशिवाय उस्मानाबाद रोड वाहनतळ ते नळदूर्ग रोडवरील गोलाई तसेच लातूररोड ते धारीवाला,शिवाजी पुतळा ते हेलीपॅड आदी ठिकाणचे गवत व झुडपे काढण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मुख्याधिकारी राजीव बुबणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता एम.आर. फारुखी , कनिष्ठ अभियंता अशोक सलगले ,  प्रशांत चव्हाण , अविनाश  राऊत ,  अविनाश काटकर , स्वच्छता निरिक्षक प्रताप कदम, सहायक दत्ता साळुंके,मुकादम राजेंद्र सातपुते,  विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी श्री. मोटे हे नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.

            शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत                श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्षाळ पूजा झाली. यावेळी   प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित नरहिरे,  तुळजापूरचे तहसिलदार  दिनेश झांपले,भूमचे तहसिलदार  सुरेंद्र  देशमुख , मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.       *****