Wednesday, 5 October 2016

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच-पालकमंत्री डॉ. दीपक सावंत






उस्मानाबाद.दि.5:-जिल्ह्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या  पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी बोलताना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी  आज येथे केले .
जिल्ह्यात  21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2016 या कालावधीत  अतिवृष्टीने  सोयाबीन , तूर , खरीप ज्वारी , बाजरी , मूग , उडीद ,  कापूस , भात , केळी , पपई , भुईमूग , मका , भाजीपाला   इत्यादी  पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त  नुकसान  झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  काल दिनांक 4 ऑक्टोबर  रोजी रात्री  वाशी तालुक्यातील  पारगाव, मलकापूर, हातोला, जेबापिंप्री या गावांमध्ये तर  आज सकाळी  उस्मानाबाद तालुक्यातील  राजुरी , काक्रंबा , लोहारा तालुक्यातील  माकणी ,  उमरगा तालुक्यातील  गुंजोटी  या गावांमधील पाणीसाठा , अतिवृष्टीमुळे झालेल्या  पिकांची व इतर नुकसानीची पाहणी केली. यावेळी माकणी येथे पालकमंत्री श्री. सावंत  यांनी जलपूजनही  केले.
तालुकानिहाय  बाधित शेतकऱ्यांची संख्या, पेरणीलायक क्षेत्र , पेरणी केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे -  उस्मानाबाद 34 हजार 392, 1 लाख 2 हजार 100, 91 हजार 770, तुळजापूर -23 हजार 732, 85 हजार 700,  91 हजार 511 , उमरगा -20 हजार 22 , 76 हजार , 78 हजार 87 ,  लोहारा -21 हजार 791 , 26 हजार 600,  37 हजार 961 , भूम -15 हजार 235 , 37 हजार 200 , 54 हजार 429 ,  परंडा -6 हजार 696 , 22 हजार 400,  40 हजार 777,  कळंब-25 हजार 319 , 80 हजार 900,74 हजार 263  आणि वाशी  10 हजार 564 , 41 हजार 700, 39 हजार 441 . जिल्ह्यात एकूण  जवळपास  5 लाख हेक्टर आर क्षेत्रावर पेरणी झाली होती  मात्र अतिवृष्टीने जवळपास 3 लाख हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे . 
याबाबत पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शेतकऱ्यांना त्यांनी कोणत्याही  प्रकारची चिंता करु नये, शासन  खंबीरपणे  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभे राहील तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला  आवश्यक व योग्य ती  मदत दिली जाईल,असे आश्वासन देवून धीर दिला . 

यावेळी  त्यांच्यासमवेत  आमदार  ज्ञानराज चौगुले  , जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते ,  जिल्हा  कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे,  , जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. एकनाथ माले ,   उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , श्री निलेश श्रींगी ,  उपजिल्हाधिकारी  श्रीमती अर्चना नष्टे , लघुसिंचन  पाटबंधारे  विभागाचे  कार्यकारी अभियंता  श्री. दशरथ देवकर,  तहसिलदार  दिनेश  झांपले ,  उपविभागीय  कृषी अधिकारी  श्री. बिराजदार आदी  उपस्थित होते .