Tuesday, 6 September 2016

जमाना बदल रहा है…! समूहगट करणार गाव हागणदारीमुक्त


आयुष प्रसाद … नुकतेच परिविक्षाधीन जिल्हाधिकारी म्हणून उस्मानाबाद जिल्हयात रूजू झालेले एक उमदे अधिकारी. विविध बैठका, कार्यक्रम,उपक्रम या निमित्ताने आमची बऱ्यापैकी ओळख झाली.उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या जिल्हयात दुष्काळी परिस्थिती असतानाही जलयुक्त शिवार, कृषी क्रांती, समूहगट शेती ,शेतकरी कंपन्या या अत्यंत लोकोपयोगी संकल्पना कल्पकतेने राबवून यशस्वी करून दाखविल्या.त्याच धर्तीवर आयुष प्रसाद यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्साही सकारात्मक मार्गदर्शनाखाली एक नवी संकल्पना राबविण्याचे मिशन हाती घेतले.
मग काय झाली सुरूवात….. दि.3 सप्टेंबर 2016 रोजी बरोबर पुढील एका महिन्याचे ध्येय समोर ठेवून मिशन हागणदारीमुक्त गावला सुरूवात झली. त्यासंदर्भातील पहिली बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला व खामसावाडी आणि तुळजापूर तालुक्यातील कुंभारी ,शिराढोण या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. बैठक सुरू झाली ….सुरूवातीला जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशनचे संवाद सल्लागार श्री.हनुमंत गादगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख गावकऱ्यांना करून दिली, त्यानंतर आयुष प्रसाद यांनी गावकऱ्यांशी जमेल तसा थोडासा हिंदीत, थोडासा मराठीत संवाद साधायला सुरूवात केली.गाव हागणदारीमुक्त म्हणजे काय, नेमके काय करायला हवे,आपली सर्वांचीच म्हणजेच प्रत्येक गावकऱ्यांची,त्याचबरोबर गावाबाहेरील लोकांचीही हे मिशन यशस्वी करण्यासाठी काय आणि कशी जबाबदारी आहे, हे त्यांनी सविस्तर समजावून सांगितले. जिथे त्यांचा हिंदीतील संवाद उपस्थित ग्रामस्थांना समजायला अवघड जात होता तिथे मी स्वत: गावकऱ्यांशी माझ्या शैलीत संवाद साधत होतो, गावकऱ्यांना प्रोत्साहीत करीत होतो. आमच्याबरोबर यावेळी गटविकास अधिकारी आर.सी. चकोर, क्षमता बांधणी सल्लागार श्रीमती शोभा टेकाळे,जिल्हा व्यवस्थापन उपजीविकाचे शंकर पवार हेही उपस्थित होते.
आयुष प्रसाद यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सामुहिक गटशेती ही संकल्पना आपल्या जिल्हयात अत्यंत यशस्वी ठरली असून आता त्याच धर्तीवर आपण हागणदारीमुक्त गाव ही मोहिमही यशस्वी करून दाखविणार आहोत.त्यासाठी सर्वप्रथम गावकऱ्यांचे गट बनविले जातील,या गटात सुशिक्षित बेरोजगार,गवंडी,बिगारी, प्लंबर, सेल्समन आणि एक महिला प्रतिनिधी यांचा समावेश असेल.या गटाची जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशनच्या कार्यालयात नोंदणी होईल, त्यांना नोंदणी क्रमांक व  नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, तदनंतर या गटाने गटाच्या नावाने बँकेत खाते उघडावयाचे आहे.पुढे गावात सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाकडे शौचालय नाही याची माहिती संकलित करावयाची आहे, त्यानंतर शौचालय बांधून देण्याच्या कामात ज्या बांधकाम व्यावसायिकांना स्वारस्य असेल अशा सर्वांची गटाने बैठक घ्यावयाची आहे.या बैठकीत कामाचे स्वरूप,कालावधी, दर आदी बाबींची सर्वांनुमते निश्चिती करण्यात येईल,मग निश्चित झालेले दर, शौचलयाचे नमुने घेवून गटातील सेल्समन ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाची भेट घेवून कामाची निश्चिती करेल, निश्चिती झाली की, ग्रामसेवकामार्फत बँकेकडे कर्ज मागणीची व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, बँकेकडून 60 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गट बांधकाम साहित्य पुरवठादाराकडून बांधकाम साहित्य खरेदी करेल,एक काम सुरू झाले की,शौचालय नसलेल्या दुसऱ्या कुटुंबाकडून निश्चिती घ्यावयाची, तोपर्यंत पहिले काम समाधानकारक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि लाभार्थी यांच्याकडून घ्यावयाचे,ते प्रमाणपत्र बँकेत जमा करून उर्वरित 40 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा करावयाची, असे सांगून श्री. प्रसाद यांनी अशा प्रकारे 20 सप्टेंबर पर्यंत गटनिर्मिती, 30 सप्टेंबर पर्यत गट नोंदणी व इतर तयारी आणि शेवटी 2 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शौचालय बांधणीला सुरूवात करू या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
        हे समजावून सांगितल्यानंतर ग्रामस्थांच्या शंकाचे समाधान करण्यात आले,त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.पुन्हा एकदा ग्रामस्थांकडून हे मिशन कसे राबवायचे,काय काय करायचे याची उजळणी करून घेतली. एक विलक्षण आत्मविश्वास सर्वांमध्ये दिसून येत होता.

जमाना बदल रहा है,They really want to develope, एकीचे बळ मिळते फळ या सर्व गोष्टी लोकांना पटत आहेत आणि आजची बैठक व या बैठकीतील ग्रामस्थांचा उत्साही प्रतिसाद ही त्याचीच प्रचिती आणून देणारा होता. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार, कृषी क्रांती, समूहगट शेती ,शेतकरी कंपन्या या माध्यमातून जिल्हयाची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहेच,ऐन दुष्काळातही या संकल्पनांमुळे शेतकऱ्याला मानसिक,आर्थिक बळ मिळाल्याचे विविध उदाहरणांमधून सिध्द झाले आहे.
        आता संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करून समृध्द सामाजिक,निरोगी जिल्हा म्हणून ओळख मिळविण्यासाठी उस्मानाबादकर जनता आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. तेव्हा चला आपणही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उस्मानाबादकरांना त्यांच्या या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा देवू या ! All the best to Osmanabad ……!  

                                                                        (मनोज शिवाजी सानप)
                                                                        जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                उस्मानाबाद

Monday, 5 September 2016

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथालय कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकरिता कार्यशाळा संपन्न


उस्मानाबाद, दि.5:- उस्मानाबाद जिल्हयात एकूण 436 मान्यताप्राप्त ग्रंथालये असून त्यातील ग्रंथालय कार्यकर्ता, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी, याकरिता जिल्हा ग्रंथालयामार्फत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा छायादीप लॉन्स दिलीप देशमुख नगर येथे दि.3 सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
        कार्यशाळेची सुरूवात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता चे महासंचालक डॉ.अरूण चक्रवर्ती यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर धिरूभाई अंबानी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पाहुण्यांचे स्वागतगीताने स्वागत केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे व विशेष अतिथी म्हणून कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. क्षीरसागर, लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. गजभारे,ग्रंथालय कार्यकर्ता श्री. संजय लोखंडे  हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय अधिकारी श्री.अनंत वाघ यांनी राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.या सत्रात औरंगाबाद सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री.अ.मा. गाडेकर व उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य श्रीधर पवार हे सहभागी झाले होते तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम व नियम या विषयावर माजी सहायक ग्रंथालय संचालक डॉ. रा.शं. बालेकर यांचे व्याख्यान झाले व या सत्रात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. व.ग.सूर्यवंशी हे सहभागी झाले होते.
        कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे यांनी केले.

यावेळी अक्रुर सोनटक्के, सौदागर दादा, प्रवीण अणदूरकर, संजय जेवळीकर, उत्तम शिंदे,ह.रा. डेंगळे, हि. भ. बिराजदार, श्री. लोमटे,श्री.चव्हाण, श्री. देवगुडे यांच्यासह जिल्हयातील ग्रंथालय पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठया संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते.  

Sunday, 4 September 2016

उस्मानाबादमध्ये वृत्तपत्र छायाचित्रकारांचा अनोखा उपक्रम


उस्मनाबाद,दि.3:- प्रसारमाध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक फोटोंचे प्रथमच प्रदर्शन भरल्याने जिल्ह्याला नवी मेजवानी मिळाली आहे. आम्हा राजकीय मंडळींनाही या फोटोतून निखळ आनंद मिळाला, अशी प्रांजळ भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
जागतिक फोटोग्राफरदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर संघटनेच्या वतीने शहरातील लेडीज क्लबजवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या सभागृहात फोटोप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे शनिवारी, दि.3 सप्टेंबर 2016 राजी  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, महेश पोतदार, ज्येष्ठ छायाचित्रकार कालिदास म्हेत्रे,उस्मानाबाद जिल्हा संपादक संघाच्या अध्यक्षा शीला उंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले,उस्मानाबादमधील प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर्सची उत्तम कलाकृती एकाच दालनामध्ये पहायला मिळाली, ही आनंदाची बाब आहे. आम्हा राजकीय नेत्यांना केवळ वृत्तपत्रातून हे फोटो पहायला मिळत होते. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील काही दुर्मिळ फोटो आणि पेंटिंग्जचे प्रदर्शन सगळ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. उस्मानाबादमधील प्रेस फोटोग्राफर असोसिएशनने अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला आहे. आगामी काळात मराठवाडास्तरीय विभागीय फोटोंचे प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न करावा, आम्ही सर्व राजकीय मंडळी त्यासाठी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तत्पूर्वी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले,  महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मी सेवा बजावली, मात्र, अशाप्रकारे प्रेस फोटोग्राफरचे स्वतंत्र फोटोप्रदर्शन मी कुठेही पाहिले नाही. आपली व्यवसायिक स्पर्धा बाजूला ठेवत प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर आणि वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन यांनी एकत्र येऊन घेतलेला हा कार्यक्रम उत्कृष्ठ आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर्सनी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी अधिकाधिक फोटो पाठवावेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी केले. ते म्हणाले, अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन भरविण्यासाठी जिल्ह्यातील फोटोग्राफर्सनी पुढाकार घेतला हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कालिदास म्हेत्रे, इस्माईल सय्यद, सुखदेव गायके, आरिफ शेख, बाळासाहेब अणदूरकर, सुजित शिंदे, अजिंक्य माने, अक्षय धाकतोडे, राहूल कोरे, भीमराज सरवदे, शंकर भूसे, किशोर माळी, सुहास कांदे, लक्ष्मीकांत बनसोडे, गौरव धावारे, लक्ष्मीकांत घोडके, नितीन गुंडाळे,गणेश तोडकरी,अमित आडे, सिध्दार्थ बनसोडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दौलत निपाणीकर यांनी केले आभार सुहास कांदे यांनी मानले.

चला एकजुटीने,समूहाने गाव हागणदारीमुक्त करू या -आयुष प्रसाद


उस्मानाबाद,दि.4:उस्मानाबाद जिल्ह्यात समूह गट शेती ही संकल्पना दुष्काळी परिस्थितीतही यशस्वी ठरली हे सर्वांनीच अनुभवले आहे, याच धर्तीवर आता जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानातही आघाडीवर येण्याचा संकल्प केला आहे, याअनुषंगाने मग चला तर एकजुटीने गाव हागणदारीमुक्त करू या,असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या संदर्भात दि.3 सप्टेंबर रोजी काही शेतकरी गट,पंचायत समिती आणि स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी आर.सी. चकोर, स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) चे  संवाद सल्लागार हनुमंत गादगे,क्षमता बांधणी सल्लागार श्रीमती शोभा टेकाळे,जिल्हा व्यवस्थापन उपजीविकाचे शंकर पवार हे उपस्थित होते.

सुरूवातीस श्री. आयुष प्रसाद यांनी उपस्थित शेतकरी, महिला यांची ओळख करून घेतली. त्यानंतर आपले गाव, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी काय करावे लागेल याबाबतचे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सामुहिक गटशेती ही संकल्पना आपल्या जिल्हयात अत्यंत यशस्वी ठरली असून आता त्याच धर्तीवर आपण हागणदारीमुक्त गाव ही मोहिमही यशस्वी करून दाखविणार आहोत.त्यासाठी सर्वप्रथम गावकऱ्यांचे गट बनविले जातील,या गटात सुशिक्षित बेरोजगार,गवंडी,बिगारी, प्लंबर, सेल्समन आणि एक महिला प्रतिनिधी यांचा समावेश असेल.या गटाची जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशनच्या कार्यालयात नोंदणी होईल, त्यांना नोंदणी क्रमांक व  नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, तदनंतर या गटाने गटाच्या नावाने बँकेत खाते उघडावयाचे आहे.पुढे गावात सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाकडे शौचालय नाही याची माहिती संकलित करावयाची आहे, त्यानंतर शौचालय बांधून देण्याच्या कामात ज्या बांधकाम व्यावसायिकांना स्वारस्य असेल अशा सर्वांची गटाने बैठक घ्यावयाची आहे.या बैठकीत कामाचे स्वरूप,कालावधी, दर आदी बाबींची सर्वांनुमते निश्चिती करण्यात येईल,मग निश्चित झालेले दर, शौचलयाचे नमुने घेवून गटातील सेल्समन ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाची भेट घेवून कामाची निश्चिती करेल, निश्चिती झाली की, ग्रामसेवकामार्फत बँकेकडे कर्ज मागणीची व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, बँकेकडून 60 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गट बांधकाम साहित्य पुरवठादाराकडून बांधकाम साहित्य खरेदी करेल,एक काम सुरू झाले की,शौचालय नसलेल्या दुसऱ्या कुटुंबाकडून निश्चिती घ्यावयाची, तोपर्यंत पहिले काम समाधानकारक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि लाभार्थी यांच्याकडून घ्यावयाचे,ते प्रमाणपत्र बँकेत जमा करून उर्वरित 40 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा करावयाची, असे सांगून श्री. प्रसाद यांनी अशा प्रकारे 20 सप्टेंबर पर्यंत गटनिर्मिती, 30 सप्टेंबर पर्यत गट नोंदणी व इतर तयारी आणि शेवटी 2 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शौचालय बांधणीला सुरूवात करू या, असे आवाहन उपस्थितांना केले.


या बैठकीस उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला, खामसवाडी आणि तुळजापूर तालुक्यातील कुंभारी व शिराढोण या गावांतील शेतकरी गट, ग्रामस्थ तसेच स्वयं शिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेचे काका अडसूळ,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गोपाळ गोरे आदि उपस्थित होते.