Saturday, 31 March 2018

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करणार -केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल








उस्मानाबाद दि.31:-  केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून मागास जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असून यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज येथे केले.
कन्व्हर्जन्स इंटीग्रेशन ॲन्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस् 2019 ते 2022 या कालावधीत जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाचा आढावा केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आज घेतला. यावेळी  ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री श्री.गोयल यांचे खाजगी सचिव प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न क्षेत्र, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रातील निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी या निर्देशांकावर आधारित आराखडा  संबंधित यंत्रणांनी तयार केला आहे, त्याचा आढावा केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी यावेळी घेतला. हा आढावा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे या बैठकीत सादर केला.
जिल्हयातील शाळा डिजीटल करुन वेब कनेक्टींग करुन सी.सी.टि.व्ही.कॅमेऱ्याने शाळांचे परिक्षण व नियंत्रण करणे तसेच सौरउर्जेचा वापर इत्यादी बाबींचा सविस्तर अहवाल आयोगाकडे पाठवावा. शिक्षण क्षेत्रात उस्मानाबाद पॅटर्न निर्माण करुन देशात नावलौकिक होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. गोयल पुढे म्हणाले की, जिल्हयातील विविध लोकप्रतिनिधी तसेच सीएसआर फंडाच्या माध्यमातून जिल्हयाच्या विकासासाठी  निधी उपलब्ध करुन देण्यासाठी माझ्याकडून तसेच केंद्रशासनाकडून निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
या बैठकीस जिल्हयातील विविध प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालयप्रमुख, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रींगी, तहसिलदार सुजीत नरहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, श्री. निपाणीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे, उपसंचालक श्री. चोले, कृषी विकास अधिकारी श्री. चिमणशेट्ये, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. विजयकर, राष्ट्रीय सूचना केंद्राचे श्री. कोंडेकर, प्रकल्प संचालक आत्मा श्री मलगुंडे, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री. थोरात, श्री. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव आदींची  मोठया संख्येने उपस्थिती होती.  

Tuesday, 27 March 2018

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेने हाती घेतला वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम

उस्मानाबाद दि.27:- जागतिक उष्णतापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, दुष्काळ, पाण्याचे दूर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असल्याची बाब जागतिक स्तरावर मान्य  झाली आहे.
राज्यातील वनक्षेत्र 20 टक्यावरुन 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र हा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना ही योजना लागू करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत वर्षभरात शुभेच्छा वृक्ष अंतर्गत गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करण्यात यावा. त्या कुटुंबाने मिळालेल्या झांडांना आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून त्यांचे संवर्धन करावे. शुभमंगल वृक्ष अंतर्गत दरवर्षी गावातील ज्या तरुणांचे विवाह होतात, त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभाशिर्वाद द्यावेत. आनंदवृक्ष अंतर्गत दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण होतात, गावातील ज्या तरुण/तरुणींना नोकऱ्या मिळतात आणि गावातील जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतात, अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडांची रोपे देऊन पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद द्यावेत. माहेरची झाडी अंतर्गत गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात त्या सासरी गेलेल्या असतात, त्यांना सासरी जावून झाडाचे रोप देणे अवघड असते. म्हणून या विवाहित कन्यांच्या माहेरच्या लोकांनी फळझाडांची रोपे देऊन त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत. आपल्या लेकीप्रमाणेच माया देऊन त्या झाडाची संबंधित कुटुंबाने संगोपन करावे, स्मृती वृक्ष अंतर्गत एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तींचे वर्षभरामध्ये निधन होते, त्या कुटुंबाला फळझाडाचे रोप देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी. हे कुटुंब झाडाच्या रुपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करेल, अशा प्रकारे हा उपक्रम राबविण्यासाठी समाजातील पर्यावरण प्रेमी व्यक्ती, दानशूर लोक आणि सीएसआर यांच्याकडुन देणगी  रुपाने फळझाडे मिळविता येतात, तसेच वन सामाजिक वनीकरन आणि एफडीसीएम यांच्यामार्फतदेखील वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दराने रोपांची उपलब्धता करुन घेता येईल. याशिवाय खासगी रोपवाटिकांमधुन देखील रोपांची उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आवश्यक असणारा निधी ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून भागवावा. तसेच ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीमधून देखील हा खर्च भागविण्यास निधी उपलब्ध करुन घेता येईल.
मागील वर्षाचा दि. 1 जुलै ते चालू वर्षाचे 30 जून हे वर्ष गृहीत धरुन जन्म, विवाह आणि देवाज्ञा या प्रसंगाचे औचित्य साधून किती झाडांची रोपे वाटावे लागतील, याचा अंदाज ग्रामपंचायतींनी घ्यावा, त्यानुसार दि. 1 जुलै रोजी वर्षातून एकदाच रोपांचे वाटप करण्यात यावे.
वृक्षदिंडी अंतर्गत ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना वृक्षदिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी करुन घ्यावे.
दि 1 जुलै रोजी सभास्थानी वृक्षदिंडी आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात यावे. रोपांचे वाटप करण्यापूर्वी ज्या कुटुंबास रोपांचे वाटप करावयाचे  असेल, त्यांना किमान 4 ते 6 दिवस आधी टोकन दिले जावे. त्यामुळे कमी वेळात व्यवस्थितरित्या रोपांचे वाटप होऊ शकेल. संबंधीत कुटुंबांनी अशी झाडे दि. 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत लावल्याबाबत योग्य ती नोंद ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये वृक्ष नोंदवहीमधील फॉर्म क्र. 33 मध्ये ठेवावी.
याप्रमाणे योजना राबवून कुटुंबातील सुख दु:खाची आठवण वृक्षारोपण, संरक्षण, देखभाल व संवर्धनाव्दारे जपणे आणि त्यातून समृध्द पर्यावरण निर्मितीच्या दिशेने काम केले जावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अजिंक्य पवार यांनी केले आहे.    

अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानाची मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप

उस्मानाबाद दि.27:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता  बचतगटांना  90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादीचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे.
या योजनेसाठी सन 2017-2018 मधील उस्मानाबाद जिल्हयातील पात्र स्वयंसहायता बचतगटांना  शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ देण्याकरिता दिनांक 3 मार्च 2018 रोजी सामाजिक न्याय भवन उस्मानाबाद  येथे लकी ड्रॉ व्दारे 40 बचतगटांची लहान मुलींच्या हस्ते  चिठ्या काढून निवड करण्यात आली.  
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती मते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक, इतर कर्मचारी तसेच सर्व बचतगटांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
निवड झालेल्या सर्व 40 स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांचे सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती मते आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी अभिनंदन केले.