Friday, 23 March 2018

समृध्दी शेतकरी अभियानांतर्गत यांत्रिकीकरण घटकाखाली निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप



उस्मानाबाद 23 :- कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मौजे मेडसिंगा व उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत यांत्रकीकरण घटकाखाली निवड झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणाने ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.  
महेश लाकाळ (भिकारसारोळा), सूर्यकांत चंद्रकांत कदम(मेडसिंगा), बापू सोपान शित्रे (मेडसिंगा), अंगद महादेव शित्रे(मेडसिंगा) या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
 या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे, कृषी उपसंचालक एस.आर.चोले, तालुका कृषी अधिकारी ए.जी.देशमुख, सरपंच सौ. संगिता दत्तात्रय आगळे, उपसरपंच श्री. सुधीर शिवाजी पाटील, मेडसिंगा पॅटर्नचे जनक, नितीन राऊत , दत्तात्रय आगळे इतर ग्रामस्थ हजर होते.  

महाआरोग्य शिबिरातील गरजू रुग्णांच्या शस्रक्रिया नियोजनास प्रारंभ येत्या 26,27 मार्च रोजी गरजू रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा




उस्मानाबाद दि.23:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.  
आता पुढील नियोजनाची आखणी करण्याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेतील इतर अधिकारी यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव, डॉ. निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्या रुग्णांची तपासणी महाआरोग्य शिबिरात करण्यात आली आहे,आता त्यांच्या पुढील उपचारासाठीचे शस्त्रक्रियेबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्णांनी किंवा त्यांना तेथे जाणे शक्य नसल्यास त्यांच्या जवळच्या जबाबदार नातेवाईकाने आपल्या जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि.26 मार्च आणि मंगळवार दि.27 मार्च रोजी आपल्या रुग्णतपासणीबाबतचे केसपेपर आणि संबंधित फाईलसह जावे.त्यानंतर त्यांना पुढील नियोजन व वेळापत्रक कळविण्यात येईल.या दोन दिवशी जी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, त्या दिवशी तज्ञ डॉक्टरर्सही तेथे उपस्थित राहणार आहेत, याची सर्व गरजू रुग्णांनी  व त्यांच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी केले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिरांतील गरजू रूग्णांना पुढील शस्त्रक्रियादी उपचारांना मदत व्हावी, म्हणून महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेंतर्गत अधिक अदयावत सुविधा निर्माण करणे तसचे विविध खाजगी रूग्णालयात असलेल्या धर्मदाय खाटांसाठी खाजगी रूग्णालयांना शासकीय पोर्टल पुढील 2 महिने वापरू देण्याची परवानगी वैदयकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे लाखो रूग्णांना लाभ प्राप्त होणार असून, या संपूर्ण प्रक्रियेत गरीब आणि गरजू रूग्णांना लाभ मिळतो आहे की नाही, यावर वैद्यकीय अधिकारी देखरेख ठेवतील असाही निर्णय झाला आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खापर्डे, धनंजय कुलकर्णी, श्री. गर्गे, नितीन काळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य आदींची उपस्थिती होती.

Thursday, 22 March 2018

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


उस्मानाबाद दि.22:- शनिवार दिनांक  14 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,दिवाणी प्रकरणे तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे,भू-संपादन प्रकरणे,कौटुंबिक आणि वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची वरील प्रकारची प्रलंबित असणारी प्रकरणे या लोकराष्ट्रीय अदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावेत आणि न्यायालयात खर्ची पडणारा स्वत:चा बहूमूल्य वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एस.बी.देसाई यांनी केले आहे. 

क्रीडा शिक्षकांचा प्रशिक्षण शिबिरास उत्साही प्रतिसाद



उस्मानाबाद दि.22:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,उस्मानाबाद तर्फे जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन ,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अन्वये खेळातील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षणार्थी पध्दती,नवीन खेळ,खेळाची शास्त्रीय माहिती वेळोवेळी क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने जिल्हास्तर क्रीडा शिक्षकांचे आठ दिवसाचे निवासी जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये दहा खेळाचे अद्ययावत प्रशिक्षण  दिले जाणार आहे.1. फूटबॉल 2. हॉकी 3. कुस्ती 4. खो-खो 5. ॲथलॅटिक्स 6. धर्नुविद्या 7. हॉलीबॉल 8. बास्केटबॉल 9. बॅडमिंटन 10. कबड्डी 
          या शिबिरासाठी एकूण 100 क्रीडा शिक्षकांची निवड केली जाणार असून यासाठी पात्रता निकष 1. जिल्हयातील ज्या शाळेचे अधिक संघ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रावीण्य मिळवत असणाऱ्या शाळांचे शिक्षक 2. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले शिक्षक 3. तसेच उच्चतम क्रीडा अर्हता प्राप्त शिक्षक (एन.आय.एस,एम.पी.एड.,बी.पी.एड.) इच्छुक क्रीडा शिक्षकांनी दि. 23 मार्च पर्यंत आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील अभिनव खोज स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयाने सहभागी होण्याचे आवाहन



      उस्मानाबाद, दि.22 मार्च- चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या भन्नाट कल्पक आयडीया मागितल्या आहेत. 31 मार्च पर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन आपल्या संकल्पना जिल्हा प्रशासनाला देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील या अभिनव स्पर्धेत देशातील व महाराष्ट्रातील सर्व कल्पक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            महाराष्ट्राचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या अभिनव स्पर्धेचे जिल्हा प्रशासनाने आयोजन केले आहे. यापूर्वी सामान्य जनतेच्या प्रशासनातील अडचणी सोडवता याव्यात, यासाठी मोबाईलवरुन प्रशासनाशी संवाद साधणारी‘हॅलो चांदा’ हा उपक्रम जिल्हयात कमालीचा यशस्वी ठरला आहे. यामुळे प्रशासनाची गती वाढली असून जबाबदार प्रशासनाचा जनतेला प्रत्येय येत आहे. खोज अर्थात शोध नाविण्याचा ही स्पर्धा देखील शेती, उपजिवीका विकास, पर्यटन व प्रशासन सुधारणा यामध्ये प्रशासनाने काय बदल करावेत, याच्या संकल्पना मागवणारी आहे. सामान्य व्यक्तीकडे अनेक भन्नाट कल्पना असतात. अशा अफलातून कल्पनांमुळे क्षणात मोठे बदल संभवतात. अशा बदलांना प्रशासनात उपयोगी आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रथमच एखादया जिल्हयामध्ये असा प्रयोग होत असून सर्वदूर जनतेने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर या संदर्भातील लिंक देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबपोर्टलवरही याबाबतच्या सूचना व लिंक देण्यात आली आहे. सर्वात सुलभ माध्यम म्हणजेwww.maharashtra.mygov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील पत्रकार, विचारवंत, डॉक्टर, वकील व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 1 लाख 2 हजार रुपयांचे रोख बक्षिस ठेवण्यात आले आहे. यासाठी हॅलो चांदा या टोल फ्री क्रमांक 1800-266-4401 वर माहिती उपलब्ध आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ व माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रचारासाठी जिल्हयात फिरणार मोबाईल व्हॅन




उस्मानाबाद दि.22:- उस्मानाबाद जिल्हयात आठ तालुक्यांमध्ये पुढील 15 दिवस बेटी बचाओ बेटी पढाओ व माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या प्रचारासाठी मोबाईल व्हॅन फिरणार आहे. या व्हॅनचे नुकतेच जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सखुताई पवार, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके, रमेश पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) बी.एच. निपाणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तुळजापूर तालुक्यातील कात्री गाव संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने सन्मानित



उस्मानाबाद दि.22:- येथील तुळजापूर तालुक्यातील कात्री गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस संत तुकाराम वनग्राम योजना सन 2016-17 चे मराठवाडा प्रशासकीय विभागाचे प्रोत्साहनात्मक पारितोषिक घोषित झाले असून समिती सदस्यांना दि. 21 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप 1 लाख 51 हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.  हा कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला.
कात्री गावच्या शिवारात सुमारे 40 हेक्टर वनजमीन असून वन विभागाकडून वृक्षलागवडीसह जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली आहेत. गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी मिळून वनाचे जतन केले, त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जागतिक वनदिनाचे औचित्य साधून गौरविण्यात आले.
यावेळी कात्री संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई जांबुवंत कदम, सचिव परशुराम रामचंद्र राठोड, सदस्य जयदेव भागवत गोंडगिरे, प्रविण त्र्यंबक कदम, सरपंच किशोर पांडुरंग गोंडगिरे, विभागीय वन अधिकारी आर.ए. सातेलीकर, सहाय्यक वनसंरक्षक आर.जी. मुद्दमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.पी. पवार, वनपाल आर.एम. शिंदे हे उपस्थित होते. 

Tuesday, 20 March 2018

21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यासाठी उस्मानाबाद झाले सज्ज !



जिल्हयाला 27 लक्ष 67 हजाराचे उद्दिष्ट
उस्मानाबाद दि.20:-  राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण 20% असल्याने लक्षणीय वाढ करणे प्रकरणी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
          हरित सेनेची नोंदणी करण्‍यामध्ये महाराष्ट्र राज्यात, आज रोजी उस्मानाबाद जिल्हा 3 लाख 99 हजार 513 एवढ्या सदस्य नोंदणीसह राज्यात व्दितीय क्रमांकावर आहे ही गोष्ट निश्चितच अभिमानास्‍पद आहे.
          वित्त, नियोजन व वने मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासनाचे सन 2016 साली 2 कोटी व सन 2017 साली 4 कोटी वृक्षलागवड यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. आता सन 2018 च्या पावसाळ्यात राज्यस्‍तरावर 13 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
          सन 2018 च्या पावसाळ्यात उस्मानाबाद वन विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यात वनविभागामार्फत 13 लक्ष, ग्रामपंचायतींमार्फत 6 लक्ष 77 हजार तर वनेत्तर इतर शासकीय विभागामार्फत 7 लक्ष 90 हजार असे एकूण 27 लक्ष 67 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत आवश्यक कामे प्रगतीपथावर आहेत.
          आपण सर्वजण मिळून आज 21 मार्च, आंतर्राष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने, सन 2019 अखेर महाराष्ट्रात 50 कोटी वृक्षलागवड करुन, वृक्ष संरक्षण व संगोपन करण्याचा संकल्प करुन 33% वनासह हरित महाराष्ट्राच्या दिशने वाटचाल करुयात, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि विभागीय वन अधिकारी, राजेश्वर सातेलीकर (म.व.से.) यांनी केले आहे.

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त रॅली संपन्न




उस्मानाबाद दि.20:- विचार मुखाचा, विचार आरोग्याचा  या घोषवाक्याला अनुसरुन दि. 20 मार्च 2018 रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीस सुरुवात करण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ. डी.के. पाटील, डॉ. प्रताप शिंदे, श्रीमती सरस्वती थोरात, मेट्रन तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारीही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निवासी अधिकारी (बा.स.) डॉ. प्रताप शिंदे यांनी डिसेंबर 2017 महिन्यामध्ये केलेल्या जनजागृतीबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली. तसेच लहान मुलांना 20 दात असतात परंतु मोठे झाल्यावर 32 दातांना तंबाखू सेवनाची सवय लागल्याने युवा पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. त्याकरीता सर्वांनी तंबाखू सेवनापासून दूर राहून इतरांना तंबाखू सेवनापासून दूर ठेवावे असे सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी मार्गदर्शन करताना विचार मुखाचा, विचार आरोग्याचा या घोषवाक्याला अनुसरुन वाघासारखे तोंड उघडा, स्वत: तंबाखू सारखे पदार्थ सेवन न करता इतरांना सेवनापासून दूर ठेवा व आपण स्वत:चे परिक्षण करुन इतरांचे परिक्षण करावे. तसेच जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांनी आपापली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी अधिकारी (बा.स.) डॉ. प्रताप शिंदे यांनी केले तर आभार जिल्हा सल्लागार एन.टी.सी.पी. तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.सी.डी. विभाग डॉ. विक्रांत राठौर यांनी मानले.
या रॅलीमध्ये जिल्हा रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, डॉ. शिवाजीराव घोगरे नर्सिंग स्कूल, के.टी. पाटील नर्सिंग कॉलेज, आस्था नर्सिंग कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, संजीवनी नर्सिंग कॉलेज, नवीन नर्सिंग कॉलेज व जीवनज्योती नर्सिंग कॉलेज मधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते. 

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



उस्मानाबाद दि.20:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या मार्फत 10 दिवसांचे निवासी जिल्हा युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 21 ते 30 मार्च रोजी श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निवासी शिबीर आहे.
यामध्ये जीवन कौशल्य, रोजगार मार्गदर्शन, शासकीय योजना, कायदेविषयक माहिती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा इतिहास, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, पर्यावरण व इतर अनुषंगीक विषयांचा समावेश आहे.
यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची नावे मागविण्यात येत आहेत. तरी नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस, जिल्हयातील युवा संस्था व शाळा महाविद्यालये यांनी त्यांच्याकडील इच्छुक प्रशिक्षणार्थींची सहभागी होण्यासाठी युवक व युवतींनी आपले नाव, जन्मदिनांक, पत्ता, मोबाईल नंबरसह त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिनांक 20 मार्च 2018 पर्यंत पाठवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांनी कळविले आहे.  

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत विवाह योजनेचे धनादेश वितरण संपन्न



उस्मानाबाद दि.20:- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियानांतर्गत नोंदणीकृत विवाह योजनेत शेतकरी, शेतमजूर, अल्प उत्पन्न गटातील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विवाहबध्द झालेल्या 27 जोडप्यांना प्रती 15 हजार रुपये  प्रमाणे धनादेश वाटपाचा कार्यक्रम दि. 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमास  जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत, तहसिलदार सुजित नरहरे, नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे आदी मान्यवर व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

Monday, 19 March 2018

ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांनी समन्वयकाच्या भूमिकेने काम करावे -जिल्हाधिकारी श्री.गमे





उस्मानाबाद दि.19:- प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असतेच, मात्र सर्वांना ग्राहक म्हणून आपले अधिकार, हक्क याची जाणीव नसते म्हणून याबाबत जागरुकता वाढावी यासाठी ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांनी समन्वयकाच्या भूमिकेने काम करावे,असे प्रतिवादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
          जागतिक ग्राहक हक्क दिना निमित्त जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, तहसिलदार सुजित नरहरे, नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती मुंबईचे सदस्य संपतराव जळके, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सहसंघटक प्रा. हेमंत वडणे, श्रीमती मेघा कुलकर्णी हे  मान्यवर उपस्थित होते.
          श्री. गमे पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते मग फसवणूक का होते? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शोधणे गरजेचे आहे. यासाठी आपण ग्राहक असताना व नसतानाही आपली भूमिका स्पष्ट असणे आवश्यक आहे, अंतर्मुख होवून आपण आपली भूमिका योग्य प्रकारे निभावतो का याचा विचार करणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले.
          समाजात वावरताना आपण प्रत्येकाने आपण देत असलेली सेवा ही सर्वोत्तम असावी याकडे कटाक्ष द्यावा, तसेच कंज्युमर क्लब स्थापित करुन शाळा-कॉलेजेसमधून ग्राहक संरक्षण आणि त्यासंबंधीच्या माहितीबाबत जनजागृती मोठया प्रमाणावर करावी. आपण स्वत: जागरुक व्हावे, इतरांनाही जागरुक करावे, आपापल्या क्षेत्रात अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी केले.
          ते पूढे म्हणाले, शासनाने सेवा हमी कायदा, माहितीचा अधिकार, आपले सरकार या माध्यमातून जनतेसाठी जास्तीत-जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेच, त्याचा लाभ आपण घ्यावा आणि इतरांनाही घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
          यावेळी संपतराव जळके, अनिल पाटील, हेमंत वडणे, मेघा या मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती करमरकर यांनी केले तर आभार तहसिलदार सुजित नरहरे यांनी मानले. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले.