Friday, 23 October 2020

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020






            उस्मानाबाद,दि.24 : शारदीय नवरात्र महोत्सवात  शनिवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

            श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.  

वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती

 

                 आज श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यामध्ये पहाटे 2 वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. व सकाळी 7 वा. 05 मि. पूर्णाहुती करण्यात आली. नंतर कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहार मध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे अनंत कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. कोल्हापूर संस्थानच्या वतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती, मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला. यावेळी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम नंदीबुवा, श्रीकृष्ण नंदीबुवा, श्रीराम नंदीबुवा, सुनील लसणे, भालचंद्र पाठक, बंडोपंत पाठक, सुमेध पाठक, शैलेश पाठक, महेश प्रयाग, मकरंद प्रयाग, प्रल्हाद पैठणकर, प्रसाद लसणे, अशोक ओवरीकर, शरद कांबळे, बाळासाहेब शामराज, संजय पाठक, रवी पाठक, नागेश शितोळे, श्री भोसले, हे उपस्थित होते,

उद्या (दि. 25 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.   

 

****

Thursday, 22 October 2020

श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020





         

उस्मानाबाद,दि.22: शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

****

Wednesday, 21 October 2020

सर्व शक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 





उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो  असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्व शक्तीपणाला  लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा  विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांशी संवाद साधताना दिला.

तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.21 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली आणि गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतच्या प्रागंणात  संवाद साधुन त्यांची आसवे पुसत त्यांना धीर दिला. यावेळी  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे,  अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे,उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सद्या ताबडतोबीने काय करायचे ? आम्ही  या भागातील कुठून व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे हे पाहीले असल्यामुळे  एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी व्यवस्थीतरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही  त्यांनी दिले.

 

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात  प्रत्येकी  30 हजार रूपयांचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुख्यमत्रयासह सर्व मंत्री महोदयांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला

***

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या बाहेरूनच घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन

 





 उस्मानाबाद/तुळजापूर, दि.21(जिमाका):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पीक नुकसानीच्या पाहणीसाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर आले असताना श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच श्री तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले व तुळजाभवानी मातेला शेतकरी बांधवावर आलेले संकट दूर करण्याचे साकडे घातले. 

    यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, श्री मिलिंद नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

***

शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 



 *शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार*

*मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव सादर करावेत*

*पावसाचा पॅटर्न बदलत आहे, त्याप्रमाणे प्रशासनाने तयारी ठेवावी*

*उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व पुरामुळे 128 लोकांचे जीव वाचवल्याबद्दल मुख्यमंत्र्याकडून प्रशासनाचे कौतुक*


उस्मानाबाद, दि.21(जिमाका):- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु आज येथील शेतकरी बांधवांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना समाधान मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत च्या आढावा बैठकीत केले.

         या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद चे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे -पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी कौस्तुभ

 

दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे.  त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

      मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही काम निहाय क्रम कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाय योजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

       संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव तालुका तुळजापूर येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल असेही सांगितले.

      सोयाबीन गंजी च्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या

 

काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचून जीवित हानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

           राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविड चा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाच वेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोविडची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविड चा प्रतिबंध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

     यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर ऊस कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल असे सांगितले तसेच रोहियो तुन पाणंद व शेत रस्ते घेता येतील असेही त्यांनी सूचित केले.

     पालकमंत्री शंकराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यतील 3 लाख 74 हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक होते व अतिवृष्टीने या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असून आतापर्यंत 50 ते 60 टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या

 

समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यातील पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली.

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी ची माहिती देऊन ऑक्टोबर महिन्यात दोनशे मिलिमीटर पाऊस  झाल्याचे सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 56 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासन आतापर्यंत एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पंचनामे पूर्ण केलेले आहेत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

        प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले. 

*काटगाव तालुका तुळजापूर येथील पीक नुकसानीची पाहणी*

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसान या पाहणी ची सुरुवात काटगाव तालुका तुळजापूर येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी देऊन यामुळे  सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले यावेळी हरिदास माळी व इतर शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तसेच काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा तालुका तुळजापूर या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली.

Tuesday, 20 October 2020

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020



         उस्मानाबाद, दि. 20 :- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्री देवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. 

          ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                 

दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  यात, उद्या दि. 21 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 22 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (सोमवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

          तत्पूर्वी रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.

 

 ***

Monday, 19 October 2020

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020




 

         उस्मानाबाद,दि.19: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ.

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर (उद्या) पासून सुरुवात हो आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

            तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात अश्व वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.

*****

Sunday, 18 October 2020

राज्याचे मंत्री देशमुख,बनसोडे यांच्यासह खा.शरद पवार यांनीनुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी संबधितांना पंचनामे करण्याचे दिले निर्देश






उस्मानाबाद दि. १८ (जिमाका) -  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह  काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे  जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत असते. मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेलेली  असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा शेती वाहीत करण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आपत्ती असून अशा वाईट व अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा. आम्ही निश्चित शेतकऱ्यांना व गावांना उभे करण्यासाठी धोरण ठरवून त्यांना नक्कीच मदत मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यामातून प्रयत्न करू असे प्रतिपादन  माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना संबोधित करताना केले.

 खा. शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा  तालुक्यातील अवकाळी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. 

प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200 तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

     तसेच जिल्ह्यातील 223 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  आ. ज्ञानराज चौगुले, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उमरगा उपविभागीय अधिकारी उमेश उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जे. चिमणशेटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, आडवा ऊस पडल्यामुळे त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. कारण तोडणी सुरू केली तरी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ते नाहीत. माती वाहून गेल्यामुळे एका वर्षाचे नुकसान झाले नसून या संकटाला तोंड देऊ या असे आवाहन करून ते म्हणाले की, अशा अस्मानी संकटाच्या काळात राज्य सरकार तर निश्चितच मदत करील. मात्र या मदतीसाठी राज्यावर मर्यादा असल्यामुळे केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.   त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येणार असून  पुढील दहा दिवसात दिल्लीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत भरीव मदतीची मागणी  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे जे अतोनात नुकसान झाले आहे ते भरपाई देण्यासाठी राज्याचे कायमस्वरूपी धोरण ठरवावे लागेल ? तसेच पीक, जमीन, गुर-ढोर, घर व घरातील सामान वाहून गेले आहे. त्याची नुकसान भरपाई तुमच्या पदरात टाकली जाईल असे  आश्वासन देऊन ते म्हणाले की, भूकंपाच्या वेळी हजारो माणसे गेली त्या संकटावर  आपण मात केली आहे. तशीच मात या संकटावर ही  करा असे भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

यावेळी जीवनराव गोरे म्हणाले की, भूकंपावेळी ज्याप्रकारे आपले पुनर्वसन केले त्याच धरतीवर यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच जलसंधारणाचे बांध वाहून गेल्यामुळे त्यासाठी विशेष निधी द्यावा शेती वाहून गेल्यामुळे ते दुरूस्त करण्यासाठी विशेष निधी दयावा, आमदार चौगुले म्हणाले की शेतकर्‍यांना जीवदान देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा नदी पात्रात नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची तर सास्तूर चौक, लोहारा व लोहारा खुर्द,माकणी, सास्तुर शिवार, एकोंडी (लो), राजेगाव, कवठा (खु), औसा तालुक्यातील आशिव, उजनी व उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा व करजखेडा या ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी व शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत संवाद साधत त्यांची निवेदने देऊन त्यांना धीर दिला.

पाहणी दौऱ्यानंतर खा.शरद पवार यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. राहुल मोटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200, तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

     तसेच जिल्ह्यातील 223 बंधाऱ्या पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेली असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

*****

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020



          उस्मानाबाद,दि.18: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.   श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर पासून सुरुवात हो आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

            तत्पूर्वी, काल (शनिवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

Saturday, 17 October 2020

अतिवृष्टी शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत -पालकमत्री शंकरराव गडाख





उस्मानाबाद, दि.17(जिमाका):- जिल्ह्याच्या  सर्व तालुक्यात मागील तीन-चार दिवसात जवळपास दोनशे मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिवृष्टीने हिरावला गेला आहे.तरी राज्य शासनाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने व पीक विमा कंपनीकडून मिळणाऱ्या मदतीसाठी बजाज ऑलिंझ या विमा कंपनीने पुढील आठ दिवसात अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
         लोहारा तालुक्यातील राजेगाव बॅरेज परिसरात पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रसंगी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार ज्ञानराज चौगुले आमदार कैलास घाडगे पाटील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार स्वामी, उमरगा उपविभागीय अधिकारी श्री उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, बजाज अलायन्स विमा कंपनीचे समन्वयक देविदास कोळी, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा चे विभाग प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
          पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यशासन आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या 70 गावांचे प्राथमिक यादी तयार केली आहे त्या सर्व गावातील पंचनामे प्रशासनाने नजर अंदाज पाहणी ने एका दिवसात पूर्ण करून घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
     तसेच पिक विमा कंपनीने अतिवृष्टीने झालेल्या जिल्ह्याच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील आठ दिवसात पूर्ण करून त्याचा प्रस्ताव सादर करावा व शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. एक ही  शेतकरी पंचनामे करण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची खबरदारी विमा कंपनीने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येत नाही त्या ठिकाणी संबंधित कृषी सहायकाकडून ऑफलाईन अर्ज विमा कंपनीने स्वीकारावेत असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.
    यावेळी पालकमंत्री गडाख यांनी येणेगुर, माडज पाटी ता. तुळजापूर, कवठा तालुका उमरगा, राजेगाव बॅरेज तालुका लोहारा व अप्सिंगा तालुका तुळजापूर या या गावातील शेती पिकांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
       यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या धरतीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी केली. तर आमदार चौगुले यांनी शेतकऱ्यांना ऑनलाइन द्वारे तक्रारी करण्यास खूप अडचणी येत असून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत च्या तक्रारी ऑफलाइन स्वीकारल्या गेल्या पाहिजेत असे सांगितले. तर आमदार घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीने कोणत्याही गावात वीज नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांचे ऑफ लाईन अर्ज स्वीकारून सरसकट मदत देण्याची मागणी केली.
      प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात दोनशे तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 
     तसेच जिल्ह्यातील 203 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 53 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
           ******

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- राज्यमंत्री संजय बनसोडे

 




उस्मानाबाद, दि.17(जिमाका):- मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये धीर धरावा राज्य शासन अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल असे ग्वाही सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

        उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री बनसोडे करत होते.त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

यावेळी तहसीलदार गणेश माळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी उमेश घाटगे, गट विकास अधिकारी श्रीमती दिवाने,  भागवत भंडारकर , जगदीश पाटील, जिवन चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर,शरद चव्हाण, यांच्यासह सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

  राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी गौतम सदाशिव चव्हाण यांच्या शेतीची व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. शेतकरी चव्हाण यांच्या शेताचे नाल्याच्या प्रवाहामुळे शेती मधील जमिनीचा थर वाहून गेल्याचे दिसून आले तसेच ठिबक सिंचन सेट तसेच टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सव-2020 
उस्मानाबाद, दि.17(जिमाका): महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले. यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान यशराज मुकूंद कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसुनच घ्यावा असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, श्री अमर कदम, श्री सज्जन साळुंके, श्री अनंत कोंडो तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री सौदागर तांदळे मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी उपस्थित होते.

Friday, 26 June 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वृत्त क्र. 404                                                                                               दि. 26 जून, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी
डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे
                                      -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- कोवीड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोरीने प्रयत्न करीत आहे.मात्र रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने ती भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले असून त्यांनी खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना कोवीड -19 च्या अनुषंगाने  रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात घ्यावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य
मंत्री अमित देशमुख  यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोवीड-19 आढावा बैठकीचे आयोजन ना.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, तहसिलदार गणेश माळी,न.प.उस्मानाबादचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे  आदी उपस्थित होते.
       वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद येथे कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी लॅब मध्ये मशीन लवकरच बसविण्यात येणार असून ती येण्यापूर्वी संबंधित तज्ञांना प्रशिक्षणासाठी लातूर किंवा सोलापूर येथे पाठविल्यास मशीन बसविल्यानंतर तपासणी करण्यास वेळ वाया जाणार नाही.तसेच हे मशीन बसविण्यासाठी डॉ.लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो बायोलॉजिकल तज्ञाची नियुक्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
      जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू आहेत की नाही याबाबत खात्री करावी व त्या रुग्णालयातून आवश्यक आरोग्यसेवा रुग्णांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसेच उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता प्रशासनाने तात्काळ करावी अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या. 
      कोरोना च्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडे औषधीचा पुरेसा साठा असणे गरजेचे आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने औषधीचा मुबलक साठा करून ठेवावा. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण व होम कोरंटाईन ची परिस्थिती कशी आहे याची माहिती घेऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांची नियमित तपासणी करावी.तसेच होम कोरानटाईन केलेल्या व्यक्तींशी ही आशा वर्कर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून संपर्कात राहावे, असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले.
    यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील जिल्हयातील आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मंत्री महोदयाच्या निर्देशनास आणुन दिल्या. 
      प्रारंभी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या लॉक डाऊन पासून ते आज पर्यंत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे यांनी कोरोना बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक गावस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
*********


Wednesday, 22 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमाल वाहतुक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन


विशेष लेख क्र.02                                       दि.21 एप्रिल 2020

   
             कोरोनाच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर,देशपातळीवर व राज्यस्तरावर आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे आपल्या देशात व संपूर्ण राज्यात लॉक डाउन जाहीर केलेले आहे. या परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा सोडल्या तर घराबाहेर पडता येत नाही.या लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे.त्यापैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समीकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.
      दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत.याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.
    शेती मालाची काढणी व विक्री नियोजन
सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे  नियोजन गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतीमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करून आवश्यरकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.
     शेतकरी उत्पादक संघ/ गटामार्फत विक्री- केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/ गटामार्फत शेतमालाची विक्री ई-नाम द्वारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
     तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाट्सअॅप इत्यादी साधनांचा वापर करावा. यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकीय संस्था, सामाजिक संस्था यांचा समावेश करण्यात यावा.सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रचार आणि जागृतीसाठी आकाशवाणी, एफ. एम., दूरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.
       ज्या उत्पादनासाठी (उदा. पीठ, डाळी, तेल इत्यादी) शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरून जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.
    शेतमाल वाहतुकीचे नियोजन
    शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणाऱ्या वाहनांस पूर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीद्वारे नियोजित केले जाऊ शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येऊ शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही

मोठ्या प्रमाणात गर्दी नियंत्रणात येऊ शकते. हे नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.
       निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन
       आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीद्वारे नियोजित केले जाऊ शकते. यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.
       कर्ज पिकाची उपलब्धता- आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती पूर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणार आहे. या व्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबत योग्य व्यवस्थापन करणे हे महत्वाचे आहे.
       जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर  मालाची योग्य साठवणूक करता येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जाऊ शकतो.
 याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी नितांत आवश्यकता आहे.
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत फळांची हाताळणी विषयी मार्गदर्शन:-
1. द्राक्ष- घडांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
2. काढणी केल्यानंतर घड जास्त वेळ शेतात/बागेत ठेवू नयेत.
3. घड वायुविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरून पेट्या बंद कराव्यात.
4. पेटया थंड तापमानास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेच 0 ते 2 अंश सेल्सीयस  तापमान व
     85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात (कोल्डस्टोरेज  दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.)
5. द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.
6. थॉम्पसन सिडलेस,तास-ए-गणेश, सोनाक, मणिक चमन इत्यादी जाती बेदण्यासाठी उत्तम
     आहेत.
2.आंबा- 1.पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळांची काढणी देठासहीत सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
2.फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.
3. थंड पाण्यात ठेवून फळांची पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.
4.द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे कायूविजन असलेल्या सीएफबी पेटयामध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात.
5.कच्च्या आंब्यापासून लोणचे,आमचूर व पन्हे तयार करता येते.
6.पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर(पल्प) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.
3. चिकू- 1.काढणीस तयार झालेले फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा संध्याकाळी काढावेत.
2. फळे सावलीत आणून ठेवावीत.
3.फळे थंड झाल्यावर क्रेटमध्ये किंवा 0.2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.
4.पिशवी बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.
5.पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कू पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिकूपासून पावडर तयार करता येते.
4.केळी-1.केळाला गोलाई येवून लागल्यावर,इजा न करता सकाळी किंवा संध्याकाळी काढावीत.
2.घड सावलीत आणल्यानंतर  इजा न करता फण्या वेगळ्या कराव्यात.
3. फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण+ 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिटबुडवून ठेवाव्यात.
4. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर क्रेटामध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व
     85 टक्के आद्रेतेत शीतगृहात तीन आठवडयापर्यंत साठविता येतात.
5.केळीपासून वेफर्स,सुकेळी व पावडर तयार करता येते.
5.कागदी लिंबू-1.फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी
      काढावीत.2.काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
3. फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
4.द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0.2 टक्के वायूविजन असलेल्या
     150 गेजव्या पॉलिथीनच्या पिशाविमध्ये भरावीत किंवा क्रेटमध्ये भरावीत.
5.या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येतात.
6.कागदी लिंबापासून लोणचे,गोड चटणी,कॉर्डियल सिरप इ.पदार्थ तयार करता येतात.
6.मोसंबी:-1.फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता ठेवून देठ ठेवून  सकाळी किंवा संध्याकाळी काढावेत.2.फळे पिरगाळून काढू नयेत.3. फळे सावलीत  आणल्यानंतर हवेशीर व मोकळ्या जागेत पसरून ठेवावीत.4.कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक टक्के मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5. द्रावणातून काढून द्रावण सुटल्यावर फळे क्रेटमध्ये भरावेत.
6. क्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात  एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.7. मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड,रस,सिरप व काबॉनेटेड शीत पेय तयार करता येतात. कोरोना पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे काढणी पश्चात नियोजन:- 1.धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन


धान्यातील ओलाव्याचे प्रमाण  10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
2. बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असेल तर अशा धान्य पिकांची काढणी वेगळी करुन व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
3.तृणधान्य पिकापासून वेगवेगळ्या पदार्थ जसे पीठ, रवा, नाचणी,सत्व,कुरडया, पापड,चकली, बिस्किटे इत्यादी तयार करून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करून पुरवठा करावा. 4.कडधान्या पिकापासून डाळी,पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करून पुरवठा करावा.
5. तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार  तेल काढून  वेष्टण      करुन पुरवठा करावा.
6. कांदा काढण्यासाठी आला असल्यास काढणी करून शेतात 3 ते 4दिवस सुकवावा नंतर पात  कापून  2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी  करून कांदा  चाळीमध्ये हवेशीर साठवावा.
7.लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुड्या बांधून हवेशीर निवाऱ्याला बांधून ठेवाव्यात.
8. करोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणीनुसार कमीत कमी हाताळणी करून वेष्टण करून पुरवठा करण्यात यावा.
9. फळांची काढणी योग्य परिपक्वतेला  करून योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.
10. काही फळांचे बाजारपेठेच्या आवश्यकते नुसार लगदा,रस,सिरप,स्ववॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यांमध्ये साठवून पुरवठा करावा.
11.काही फळांपासून लोणची कॅण्डी,वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन  व्यवस्थित साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
12. आंबा पिकापासून आमचूर,लोणचे, मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
13. द्राक्षांपासून बेदाणा तयार करून शीत कक्षामध्ये साठवावा.
14. बटाटा  व केळी यासारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करून वाळवून साठवावीत.
15. काही फळेभाज्यांचे तुकडे करून वाळवावीत,भुकटी करावी  व साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
16. भाजीपाला तसेच मेथी ,कडीपत्ता,पालक कोथिंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.
17.लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.
18.आवळा, शतावरी ,गवती चहा,अश्वगंधा, हिरडा,बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करून
      साठवावी.
19. हळद काढणीला आली असल्यास शिजवून,वाळवून,पॉलीश करुन साठवून ठेवावीत.
20.करोनाच्या  परिस्थितीमुळे शहरांमध्ये फळे व भाजीपाल्यांचा  मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोशल माध्यमांच्या जसे व्हॉटसॲप, फेसबुक इत्यादीचा वापर लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे आणि भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकापर्यंत पोहचवावेत.
 *फळे व भाजीपाल्यांपासून  व्यापारी दृष्ट्या बनविण्यात येणारी प्रक्रियायुक्त पदार्थ खालील प्रमाणे -फळांचे नाव, व्यापारी दृष्टया महत्वाचे पदार्थ
1.आंबा-कच्च्या आंब्यापासून निरनिराळया प्रकारचे लोणचे, आंब्याच्या फोडी, खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी,आमचूर,पन्हे,स्क्वॅश,सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासून आंबा पोळी (पापड) बर्फी,जॅम,नेक्टर,आंबा पाक,टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हवाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.
2.केळी-सुकेची,भुकटी, वेफर्स, केळीचा पल्प,गोड वेफर्स इत्यादी.
3. लिंबू- लिंबू लोणचे,स्क्वॅश, सरबत, लिंबूपाक,कॉर्डियल.
4. अंजीर-सुके अंजीर,जॅम,अंजीर फळांचे हवाबंद डबे(कॉनिंग), अंजीर फळे पाकविणे (कॅन्डी). 5.आवळा- चवनप्राश,मोरावळा,लोणची, आवळा सुपारी आवळा,कॅन्डी,सरबत,पल्प,आवळा चहा.
6.चिंच-काबोनेटेड पेय,जेली, चिंचोका काढून वाळवलेला  गर,चिंचेचा पल्प.
7.डाळिंब- जेली,रस, सरबत,नेक्टर, डाळिंब पाक,आनारदाना,चुर्ण,फ्रोजनदाणे, डाळिंबाच्या सालीची वाळवलेली भुकटी.
8. पेरु- सरबत,पेरुगर,जेली, चॉकलेट(टॉफी)पेरु वडी.
9. चिकू-कच्च्या चिकूपासून लोणचे,मध्यम पिकविलेल्या चिकुपासून मुरांबा आणि कॅन्डी,पिकलेल्या  चिकू फळांपासून सरबत,स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकू भुकटी,मिल्क शेक.
10. जांभूळ- रस, सरबत,स्क्वॅश,जॅम, बियांची भुकटी.
11.पपई- कच्च्या पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम,सरबत पेपेन.
12.बोर- बोर खजूर,सुकविलेली फळे,बोरकुट,लोणचे,मुरब्बा,सरबत,जॅम,सिरप.
13.संत्रा- सरबत,मार्मालेड,जेली,जॅम,सिरप,संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्र्याच्या सालीपासून वाळवलेली भुकटी.
14.द्राक्ष-किसमीस,मनुका,रस,सरबत,सिरप.
15.स्ट्रॉबेरी- जॅम डोली, सरबत,सिरप.
16. मोसंबी –रस, सरबत, सिरप.
17. सिताफळ- पल्प काढून कमी तापमानाला साठवणे,आईस्क्रीम, मिल्क शेक.
18.टोमॅटो- केचप,सॉस,पेय,चटणी,पल्प भुकटी,पेस्ट.
19.मिरर्च (लाल)- वाळवलेली मिरची,लालमिरची पावडर, लोणचे, चटणी.

20.मिरर्च(होरवी)- पावडर, लोणचे,सॉस चटणी.
21. कोथिंबीर- वाळवलेली कोथिंबीर,भुकटी.
22.पालक-वाळवलेली मेथी.
23. मेथी-वाळवलेली मेथी.
24.बटाटा- वेगवेगळे वेफर्स,पावडर,वाळवलेले बटाटा फोडी.
25.वांगे-वाळलेल्या वारीक फोडी.
26.कांदा- पेस्ट पावडर, वाळलेल्या चकत्या.
27.आले- पेस्ट,सुंठ,पावडर,लोणचे.
28.कोबी व फ्लॉवर- वाळवलेले तुकडे/चकत्या.
29.कढीपत्ता- वाळवलेले कढीपत्ता,पावडर.
30.गाजर- गाजर हलवा, वाळलेले बारीक तुकडे.
31. वटाणा- गोठवलेला वाटाणा, वाळलेला वाटाणा.
32.कारली- लोणचे,भुकटी,रस.
33.भोपळा- पावडर,रस, हलवा.
                          
                                                                             श्री.सुनिल सोनटक्के
                                                                           जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                           जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                    उस्मानाबाद.