Saturday, 21 April 2018

महसूल कर्मचाऱ्यांचे कावलदरा येथे महाश्रमदान









उस्मानाबाद, दि. 20:- सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता उस्मानाबाद तालुक्यातील महसूलच्या विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारीही उतरले असून ग्रामस्थांच्या बरोबरीने त्यांनीही हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदान केले.   
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे, राहूल पाटील, अभय मस्के, राजकुमार माने, नायब तहसिलदार एन. बी. जाधव, संतोष पाटील, प्रियंका लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.       
तालुक्यातील कावलदरा येथे शनिवारी महाश्रमदान घेण्यात आले. पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे 92 गावांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. यापैकी कावलदरा तांडा येथील डोंगर माथा ते पायथ्यावर दि. 21 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांसमवेत महाश्रमदान करण्याचे नियोजन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार सुजित नरहरे, राहूल पाटील तसेच पाणी फाउंडेशनचे उस्मानाबाद समन्वयक उमेश मडके, विलास येवले, अशोक कदम व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  

   उस्मानाबादच्या महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्व तलाठी व कर्मचारी ग्रामस्थांसमवेत सकाळपासून श्रमदानाचे चांगले काम केले आहे, पुढील काळातही ग्रामस्थांसमवेत एकत्र येऊन जिल्हयातील जास्तीत-जास्त गावात विविध शासकीय विभागांच्या वतीने श्रमदानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी प्रतिपादन केले.

कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांच्यासह या विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही श्रमदानात भाग घेतला होता. कावलदरा येथे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे हजारांवर श्रमदात्यांनी डोंगरमाथा ते पायथा पाणीदार करण्यासाठी श्रमदान करून सहभाग नोंदवला. यामध्ये लहान-मोठे सलग समतल चर, दगडी बांध आदी कामे करण्यात आली.

रविवार दि. 21 एप्रिल रोजी तालुक्यातील खेड गावात पंचायत समिती उस्मानाबाद चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. खेड येथील ग्रामस्थ, त्यांचे नातेवाईकांना, मित्र परिवारास या महाश्रमदानात सहभागी करून घ्यावे. यातून जलसंधारणाचे मोठे काम उभे राहणार आहेच, शिवाय मनसंधारणातून गावाच्या विकासालाही चालना मिळेल, असे आवाहन प्रांताधिकारी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी केले आहे.

 कालवदरा तांडा येथील डोंगर माथा ते पायथा महाश्रमदानाच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, गावचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनीही श्रमदान केले.

Thursday, 19 April 2018

सर्वांच्या एकत्रित विचार मंथनातून आणि श्रमदानातून जिल्हयात चांगले काम होईल -शांतिलालजी मुथ्था







उस्मानाबाद, दि. 19:- जिल्हा प्रशासन, जिल्हयातील सर्व पदाधिकारी, गावातील सरपंच आणि सर्वांनी मिळून एकत्रित विचार मंथन करुया, श्रमदान करुया आणि उस्मानाबाद जिल्हा सुजलाम् सुफलाम् करुया असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था यांनी आज येथे केले.
नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी नाटयगृहात आयोजित जलयुक्त शिवार, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना, मागेल त्याला शेततळे आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कांचनमाला संगवे, पाणी फाऊंडेशनचे संतोष शिनगारे, अनुलोमचे गणेश कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.   
श्री. मुथ्था पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयाचं आणि माझं नातं खूप जुनं आहे, भूकंपाच्या काळात मी या भागात काम केले असल्याने मला उस्मानाबाद जिल्हयाच्या परिस्थितीची ओळख आहे. उस्मानाबाद जिल्हयातील दुष्काळ संपविण्यासाठी तसेच सर्वांनी मिळून प्रत्येक गावातील श्रमदानाचा टप्पा पूर्ण करा, श्रमदानाचा टप्पा ज्या गावाचा पूर्ण होईल त्या गावाला पाहीजे तितका वेळ जेसीबी, पोकलेन सारख्या मशीन पुरविण्याची जबाबदारी माझी राहील. तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्हा भारतीय जैन संघटनेच्यावतीने ज्या प्रमाणे दुष्काळमुक्त करण्याचे काम करण्यात आले त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हयाचा दुष्काळ संपविण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगीतले.
जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, जेसीबी, पोकलेन सारख्या यंत्रसामुग्रींना आवश्यक असणाऱ्या डिझेलची सर्व जबाबदारी शासनाकडून आणि इतर संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल.  शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डिझेलसाठी जिल्हयास्तरावरील प्रशासकीय व तांत्रीक मान्यतेबाबतच्या प्रक्रियेत सुधारणा करुन लवकरात – लवकर ही प्रक्रिया पूर्ण व्हावी याकरीता तालुकास्तवरील संबंधित अधिकाऱ्यांनाच यापुढे प्रशासकीय व तांत्रीक मान्यता देण्याचे अधिकार देण्यात येतील. त्यामुळे डिझेलचे पैसे मिळण्यासाठी सोईचे होईल.  तसेच जिल्हयातील आत्महत्येचे प्रमाण आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी  सर्वांनी श्रमदान करुन जिल्हा दुष्काळमुक्‍त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कांबळे यांनी उस्मानाबाद जिल्हयात असलेल्या तलावांची आणि जवळपास 20 ते 25 लाख क्युबीक मिटर गाळ काढावा लागणार असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
उस्मानाबाद जिल्हयातील 201 गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असून सर्वच गावात श्रमदान करण्यासाठी www.jalmitra.panifoundation.in या संकेतस्थळावरील एक फार्म भरुन श्रमदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी केले.
या बैठकीस जिल्हयातील संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.