Friday, 31 August 2018

हमाली व तोलाईच्या प्रचलित दरात वाढ करण्याबाबतच्या हरकती/आक्षेप नोंदवाव्यात -- जिल्हा उपनिबंधक


         जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांचे पत्र जा.क्र.पणन/हमालीवतोलाई/दरनिश्चित/2018 दिनांक 19 जुलै 2018 नुसार उस्मानाबाद जिल्हातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमाली व तोलाईच्या प्रचलित दरात वाढ करणे बाबत जिल्हयातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती यांना सदर दर निश्चिती बाबत अवगत करुन दरवाढी बाबत बाजार समित्यांकडून हरकती/आक्षेप मागविले आहेत.
 जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समिती यांना खालील प्रमाणे हमाली व तोलाईचे प्रचलित दरात वाढ करणे बाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी दरनिश्चिती केलेली आहे. या निश्चिती प्रमाणे हमालीचे प्रचलित प्रति 100 किलो रु.5.63/- असून अनुज्ञेय 25 % वाढी प्रमाणे वाढीव दर प्रति 50 किलो रु.3.51% प्रस्तावित आहे. त्याच प्रमाणे तोलाईचे प्रचलित दर प्रति 100 किलो रु.2.81/- असून अनुज्ञेय 25 % वाढी प्रमाणे वाढीव दर प्रती 50 किलो रु.1.75/- प्रस्तावित आहे. त्याबाबत बाजार समित्यांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. तरी बाजार समित्यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2018 पर्यंत आपले हरकती/आक्षेप जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद या कार्यालयात नोंदवाव्यात  असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी केले आहे.

Thursday, 30 August 2018

जिल्ह्याच्या आकांक्षापूर्तीसाठी संधी म्हणून सर्वांनी मिळून काम करूया -- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


               उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या अभ्यासानुसार आकांक्षीत जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता या क्षेत्रातील काम चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे.म्हणूनच येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच जनतेनेही या गोष्टीकडे एक संधी म्हणून पाहावे, जेणेकरून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
           जिल्हा प्रशासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 व 30 ऑगस्ट या दोन दिवशी "उस्मानाबाद जीवन रेखा एक मुक्त चर्चा" या कार्यशाळेचे नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाधिकारी श्री.नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, श्री. निपाणीकर, शिक्षणाधिकारी डॉ.शेख,जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार उपस्थित होते.
            श्री.गमे. यांनी यावेळी उस्मानाबाद जिल्हा नेमका आकांक्षीत जिल्हा म्हणून कसा निवडला गेला,या जिल्ह्याच्या कोणत्या घटकांवर विशेष काम करणे आवश्यक आहे, या बाबींवर उत्तम असे सादरीकरण केले.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची पाणी टंचाई, जमिनीची प्रत,भौगोलिक स्थान, पडणारा पाऊस या बाबींचा समावेश होता.
                  जिल्हाधिकारी श्री गमे यांनी सांगितले की, येथील शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यातही पडणाऱ्या पावसाचे बरेचसे पाणी म्हणजे जवळपास 58 टक्के पाणी कृष्णा पात्रात तर 42 टक्के गोदावरी पात्रात जाऊन मिळते.त्यापैकी इथे जवळपास 16 टक्के पाण्यावरच शेती होते. त्यातही जास्तीत जास्त पाणी उसाच्या शेतीला वापरले जाते.या जिल्ह्यात जवळपास 7 लाख 50 हजार हेक्‍टर शेती क्षेत्र आहे परंतु फक्त चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्राला हे 16 टक्के पाणी वापरायला मिळते. 16 लाख 57 हजार 576 इतकी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात 728 गावे तर 621 ग्रामपंचायती आहेत. येथे स्थलांतरणाचेही प्रमाण जास्त आहे.गेल्या पंधरा वर्षांत सात वेळा दुष्काळ या जिल्ह्याने अनुभवला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आयोगाच्या 115 आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत आपला जिल्हा 51 व्या क्रमांकावर आहे.एक गोष्ट स्पष्ट आहे की, निती आयोगाने केलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा करावयाची असल्यास एकाक्ष होऊन फक्त कामच करावे लागेल,याला दुसरा पर्याय नाही त्यासाठी कामात सुधारणा करून जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्याचे आवाहन शेवटी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी उपस्थितांना केले.
             या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना युनिसेफच्या अपर्णा देशपांडे यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. हनुमंत वडगावे यांनी केले. 
         या दोन दिवसीय कार्यशाळेत युनिसेफच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून स्वच्छता, आरोग्य,शिक्षण, महिला व बालकल्याण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असून तद्नंतर गटागटाने शासकीय
अधिकारी,कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या गटचर्चा करणार आहेत. या गटचर्चेतून आपल्या दैनंदिन कामात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणता येतील,लोकांचे प्रश्न कसे सोडविता येतील याबाबत विचारमंथन होऊन प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
      या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, युनिसेफचे तज्ञ मार्गदर्शक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 27 August 2018

जिल्हा प्रशासन आणि युनिसेफच्या वतीने “उस्मानाबाद जीवनरेखा-एक मुक्त चर्चा” चे आयोजन

             
           उस्मानाबाद जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. या प्रक्रियेत आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता, शिक्षण या प्रमुख बाबींवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्रात जास्तीत जास्त चांगली कामे करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
           त्या अनुषंगाने समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींनी, सर्वसामान्यांनी, तज्ञांनी खुली चर्चा करून उस्मानाबादच्या विकासासाठी आपले अमूल्य योगदान दयावे, या हेतूने दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपरिषद, उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जीवनरेखा- एक मुक्त चर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
           तरी या खुल्या  चर्चेच्या माध्यमातून वरील विषयांवर चर्चा होऊन ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून उस्मानाबादच्या उज्वल भवितव्यासाठी आपले सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व युनिसेफच्या वतीने करण्यात आले आहे.

उस्मानाबादची क्रांतिवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था झाली जिल्ह्यातील पहिली लोकराज्य सामाजिक संस्था


          

          महाराष्ट्र शासनाचे मुखपृष्ठ असलेल्या लोकमान्य लोकराज्य मासिकाची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हयातील या वर्षातील पहिली लोकराज्य सामाजिक संस्था बनण्याचा मान क्रांतिवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गौर , ता.कळंब   या संस्थेने पटकाविला आहे. या संस्थेच्या एकूण 101 सभासदांनी लोकराज्यचे वार्षिक सभासदत्व स्वीकारले  आहे.
याप्रसंगी क्रांतिवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक लंगडे पाटील म्हणाले की, या संस्थेमार्फत जिल्ह्यात विविध लोककलांचे प्रदर्शन, सादरीकरण, व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता आणि आरोग्य विषयक बाबींवर जनप्रबोधन अशा विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक कार्य केले जाते. बळीराजा चेतना अभियानांतर्गत आमच्या संस्थेने गावोगावी अनेक कार्यक्रमही केले आणि अजूनही कार्यक्रम करीत आहोत.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी लोकराज्य मासिकाचे महत्त्व आम्हाला समजावून सांगितले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही संस्थेसाठी वार्षिक सभासदत्व घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमच्या संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.संध्या पाटील यांचाही तितकाच सहकार्याचा वाटा आहे. आमची संस्था ही जिल्ह्यातील पहिली लोकराज्य सामाजिक संस्था झाली आहे याचा आम्हाला निश्चितच खूप आनंद झाला आहे.  
खरेतर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी या मासिकातील माहितीबाबत आम्हाला सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळेच आमची संस्था आम्ही लोकराज्य करू शकलो. यापुढे आम्ही ज्या गावांमध्ये कार्यक्रम करून त्या त्या ठिकाणी लोकराज्य मासिकाची माहिती  ,माहिती व जनसंपर्क विभागाचे विविध उपक्रम तसेच विविध शासकीय विभागांच्या विविध योजना यांची माहिती आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.