Saturday, 20 August 2016

मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारोप उत्साहात साजरा


उस्मानाबाद,दि.20:-स्टेट बँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुलै ते 19 ऑगस्ट 2016 या कालावधीत आयोजित मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारोप कार्यक्रम नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विनायक कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
            यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, उमेद चे शंकर पवार,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, संस्थेचे संचालक मिलिंद सावंत उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय कोठारी म्हणाले की, प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चे उद्योग उभारावेत,  शासन उद्योग व्यवसायासाठी सर्वोतोपरी सहकार्य करील.या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उमेद चे शंकर पवार म्हणाले की, पैशाची किंमत स्वत:च पैसा कमविल्यानंतर कळते,मोबाईल दुरूस्ती उद्योग सुरू करण्यासाठी जास्त्‍ भाग भांडवलाची आवश्यकता नाही, हा उद्योग 1 हजार रूपयातही चालू करता येवू शकतो.तरी प्रशिक्षणार्थींनी कौशल्य वापरून स्वत:चे व्यवसाय सुरू करावेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपली ओळख आपल्या कामाने होते. आपण उद्याचे उद्योजक बनाल, आजूबाजूचा विचार करा,शासकीय योजनांचा,उद्योगांचा विचार करावा,त्यांचा अभ्यास करावा. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास जपा, तोंडात साखर ठेवा, आव्हाने स्वीकारा, सचोटीने काम करणाराच मोठा होतो. कोणाशी तुलना करू नका,स्वार्थी भावना ठेवू नका. आपण उद्याचे यशस्वी उद्योजक निश्चित बनाल, अशा शुभेच्छा देवून
श्री. सानप यांनी प्रशिक्षणार्थ्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे  उपक्रम, लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे  महत्व आणि उपयोगिता  समजावून सांगून संपूर्ण बॅचने 100 टक्के लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले, त्यांच्या या आवाहनाला  स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने व प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद  देवून लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारले.
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत  व्यक्त करताना एक महिन्याच्या प्रशिक्षणातील अनुभवाचा उजाळा देवून कृतज्ञता व्यक्त केली, आम्ही या प्रशिक्षणामुळे स्वत:च्या पायावर उद्योग उभारणीचे प्रयत्न करू असे सांगून  आम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी करू,तसेच त्या माध्यमातून समाजाचा व गावाचा विकास साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असा संकल्प केला.

यावेळी  संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत, लिड बॅंकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर, नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. विनायक कोठारी , उमेद चे श्री. शंकर पवार, प्रशिक्षक श्री. विकास गोफणे, श्रीमती जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, नंदकिशोर सुरवसे, श्री. राऊत  हे उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयात छायाचित्रकारांना शुभेच्छा देवून जागतिक छायाचित्रदिन साजरा


   उस्मानाबाद, दि. 20 :-जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून आज जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हयातील छायाचित्रकारांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या हस्ते शुभेच्छांसह पुष्पगुच्छ देवून उत्साहाने साजरा करण्यात आला. 
             या कार्यक्रमास जिल्हयातील छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सर्व छायाचित्रकारांबरोबर अनौपचारीक चर्चा करुन त्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपक्रम लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे महत्व आणि उपयोगिता समजावून आपणाकडील जिल्हयाविषयीची दुर्मिळ छायाचित्रे तसेच
जिल्हयातील विकासकामांविषयीची छायाचित्रे या कार्यालयाकडे पाठविण्याचे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सर्वच छायाचित्रकारांनी  होकार दर्शवून सहकार्याची भूमिका दाखविली. याआधी जागतिक छायाचित्रदिनानिमित्त उस्मानाबाद प्रेस फोटोग्राफर मित्रपरिवाराच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळा येथे वृक्षारोपण करुन जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
            यावेळी जिल्हयातील छायाचित्रकारांच्या वतीने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना तैलचित्र व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच सद्भावनादिनानिमित्त स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सर्व छायाचित्रकारांनी  सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
            याप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती अशा बंडगर, भिमराव पडवळ, दिलीप वाठोरे, आ.ना. सोनवणे ,सिध्देश्वर कोंपले, अनिल वाघमारे व श्रीमती चित्रा घोडके उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा



उस्मानाबाद,दि.20:- जिल्हाधिकारी कार्यालयात आज माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शपथ घेवून सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

            यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) अरविंद लाटकर, तहसिलदार (महसूल) राजकुमार माने, नायब तहसिलदार ए. पी. जाधव, एन.आर. सूर्यवंशी आणि  कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

उस्मानाबादमधील स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील मोबाईल रिपेरिंग बॅच झाली राज्यातील पहिली लोकराज्य प्रशिक्षण बॅच


उस्मानाबाद,दि.19:-महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची उपयुक्तता लक्षात घेवून राज्यातील या वर्षातील पहिली लोकराज्य प्रशिक्षण बॅच  बनण्याचा मान  उस्‍मानाबादमधील स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील मोबाईल रिपेअरिंग बॅच ने पटकाविला आहे. या बॅचमधील  सर्वच म्हणजे एकूण 30 प्रशिक्षणार्थ्यांनी  तसेच स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या संचालक व  सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी  लोकराज्य चे वार्षिक सभासदत्व स्वीकारले आहे
          उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेत उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना इतर मार्गदर्शनासोबतच माहिती जनसंपर्क विभागाचे  उपक्रम, लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे  महत्व आणि उपयोगिता  समजावून सांगून संपूर्ण बॅचने 100 टक्के लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले, त्यांच्या या आवाहनाला  स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने व प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद  देवून लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारले.
यातील काही प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी करू,तसेच त्या माध्यमातून समाजाचा व गावाचा विकास साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

यावेळी  संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत, लिड बॅंकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर, नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. विनायक कोठारी , उमेद चे श्री. शंकर पवार, प्रशिक्षक श्री. विकास गोफणे, श्रीमती जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, नंदकिशोर सुरवसे  हे उपस्थित होते

Monday, 15 August 2016

सायबर लॅबमुळे जिल्हयातील आधुनिक गुन्हयांना आळा बसेल - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

उस्मानाबाद,दि.15:-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अदययावत  सुसज्ज अशा उस्मानाबाद पोलीस सायबर लॅबमुळे जिल्हयातील आधुनिक गुन्हयांना आळा बसेल अशा विश्वास   राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सायबर लॅब उदघाटन प्रसगी  व्यक्त केला
 या उदघाटन कार्यक्रमास,आमदार मधुकरराव चव्हाण,विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,परिविक्षाधीन युष  प्रसाद, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक  राजतिलक रोशन आदि मान्यवर उपस्थित होते.
            सर्वात प्रथम मंत्रीमहोदयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अदययावत अशा पोलीस सायबर लॅबचे उदघाटन केले पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविला.
श्री.जानकर पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रात उस्मानाबाद यवतमाळ जिल्हयावर शासनाचे विशेष लक्ष आहे.जिल्हयातील सर्वच विभागानी उत्साहाने कामे करून जिल्हयातील सर्वसामान्यांना शासनाच्या जास्तीत जास्त  योजनांचा लाभ मिळवून द्यावा,असे सूचित केले. जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी वाटचालीबदृल त्यांनी  जिल्हाधिकारी डॉप्रशांत नारनवरे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे जाहीर अभिनंदन केले.
             प्रस्ताविक करताना पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख यांनी  उस्मानाबाद पोलीस विभागाची   सायबर लॅब बाबतची माहिती उपस्थितांना  विषद केली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद जिल्हयातील पोलीस विभागाने जिल्हयात विविध कार्यक्रमाद्वारे राबविलेल्या  विविध  उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील, विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले   त्यानंतर कार्यक्रमाची राष्ट्रगीताने  सांगता करण्यात आली.











सर्वजण संकल्प करू या स्वावलंबी शक्तीशाली जिल्हा निर्माणाचा - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

उस्मानाबाद, दि.15- आपण सर्वजण संकल्प करू या एका स्वावलंबी शक्तीशाली जिल्हा निर्माणाचा… भारतीय स्वतंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री  महादेव जानकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला ,त्यावेळी त्यांनी उस्मानाबादमधील जनतेला असे आवाहन केले.
या ध्वजारोहण सोहळयास जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदचे मख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, विधान परिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, जेष्ठ नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होताच मंत्री महोदयांनी हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
            प्रारंभी मंत्री महोदयांनी मराठवाड्यातील पाच स्वातंत्र्यसैनिकांचा महामहिम राष्ट्रपतींनी नुकताच सन्मान केला,असा हा थोर इतिहास आणि वर्तमान असलेल्या मराठवाडा भूमीतील आपणा सर्वांना अभिवादन करतो असे बोलून जिल्हयातील सर्व बंधू-भगिनींना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले की, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखा महत्वाकांक्षी उपक्रम या जिल्हयाने इतका यशस्वी करून दाखविला की, या अभियानाची राजस्थान शासनानेही दखल घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध शासन यंत्रणांमार्फत त्या-त्या विभागांच्या योजना प्राधान्याने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची अंमलबजावणीही जिल्ह्यात धडाडीने सुरु आहे,जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक हातांना काम मिळावे यासाठी मागेल त्याला कामकामावर चला असे उपक्रम राबविण्यात आले. त्यास चांगला प्रतिसादही मिळाला. या मजूरांचे मानधन वेळेवर देणे यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्हयात राबविण्यात आलेली धान्य महोत्सव ही संकल्पना तर संपूर्ण राज्याने स्वीकारली आहे. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून कामगिरीच्या बाबतीत आपल्या जिल्हयाचा आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे असे सांगून ते म्हणाले की, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या आठवडयात आपण महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूल आठवडा राबविला. विविध विभागातील सर्व योजनांचा प्रचार, प्रसार व प्रसिध्दी अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठया प्रमाणावर करण्यात आले होते. याच दरम्यान जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता मोहिम, व्यसनमुक्ती जनजागरण मोहिम राबविण्यात आली.राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे,मुलींचे शिक्षण,आरोग्याचा दर्जा सुधारणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली आहे.
श्री. जानकर सायबर सेलबद्दल बोलताना पुढे म्हणाले की, सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी आज राज्यात एकाच वेळी एकूण 44 सायबर सेल चे उद्घाटन केले जाणार आहे. यात उस्मानाबाद पोलीस कार्यालयातील सायबर सेलचाही समावेश आहे,आधुनिक गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे.
शेतकऱ्यांविषयी बोलताना श्री. जानकर म्हणाले की, जिल्हयात शेतक-यांच्या जीवनात नवी आशा व उमेद पल्लवित करण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कल्पकतेने कृषी क्रांती या उपक्रमाची आखणी  आणि बांधणी केली आहे. उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी कॉमन फार्मर्स फोरम स्थापित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठीचा नियोजित, शिस्तबध्द प्रयत्न म्हणजेच कॉमन फार्मर्स फोरम. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले ,जिल्हयातील 100 टक्के  शेतक-यांच्या 14 हजार 620 गटांची स्थापना झाली आहे आणि या माध्यमातून तब्बल 2 लाख 88 हजार शेतकरी  एकत्रित आले आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणजे जिल्हयात सध्या अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होवून त्यांचे विविध ब्रँडसही प्रसिध्द व लोकप्रिय होऊ लागले आहेत. या जिल्हयातील खवा क्लस्टर, तूर क्लस्टर, कांदा क्ल्स्टर, पपई क्लस्टर, भाजीपाला क्लस्टर, रेशीम क्लस्टर अशा विविध उत्पादनात शेतकरी गटांनी यशाची उंच भरारी घ्यायला सुरूवात केली आहे.
श्री. जानकर यांनी ग्रामउदय से भारत उदय या अभियानादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 5 लाख 49 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्ती 6 लाख 6 हजार 617 इतकी वृक्षलागवड करून जिल्हयाने सर्वांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्त शिवार ही फक्त मोहिम नसून एक चळवळ झाली आहे. यात आपल्या जिल्ह्याने खरोखरीच कमालीचे काम केले आहे असे सांगून लवकरच उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख निश्चितच येत्या काळात बदललेली असेल असा विश्वास  व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, उघडयावरील शौचविधी हद्दपार करण्यासाठी व शौचालयाचा वापर हा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी दि.22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2016 या कालावधीत स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी हे राज्यव्यापी कुटुंबस्तरावर संवाद अभियान राबविले जाणार आहे.
याप्रसंगी राज्यात सर्वात पहिले लोकराज्यग्राम  बनण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल दारफळ गावाच्या सरपंच श्रीमती बालिका सुतार,उपसरपंच ज्योती जाधव, माजी सरंपच बाळासाहेब केशव घुटे, ग्रामसेविका श्रीमती माधवी लोखंडे, आदित्य गोरे यांचा याबरोबरच राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था बनण्याचा मान मिळाल्यामुळे श्री. संत कोकणेबुवा वारकरी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र इंगळे यांचा तर राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य सामाजिक संस्था बनल्यामुळे जानकादेवी  बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, अभिजित देडे यांचा आणि राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था बनण्याचा मान मिळाल्यामुळे सेव्ह फार्मर्स विडोज फाऊंउेशन या महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा, श्रीमती शीला उंबरे या सर्वांचा मंत्री महोदय श्री.महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि लोकराज्य मासिकाचा अंक देवून गौरविण्यात आले. याचबरोबर  माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
शेवटी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग, निवडणूक विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग विविध कामगिरींच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, याबद्दल श्री. जानकर यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळयानंतर श्री. जानकर व इतर मान्यवरांच्या हस्ते बळीराजा चेतना अभियानांतर्गत निकृष्ठ चारा सकस करणे या जनजागृती वाहनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात धान्य वाटप आणि कडबाकुट्टी यंत्रांचेही वितरण करण्यात आले.त्यानंतर मंत्री महोदयांनी स्वातंत्र्यसैनिक,समाजातील प्रतिष्ठित नागरिक,अधिकारी,पत्रकार यांची प्रत्यक्ष भेट घेवून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.