Saturday, 1 June 2019

उस्मानाबादच्या पर्यावरणवृध्दीसाठी प्रशासनाने कसली कंबर वृक्षलागवडीसाठी पहिल्याच मोहिमेत येडेश्वरी मंदीर टेकडीवर केले ८०० खड्डे खोदण्याचे नियोजन


वृत्त क्र.331                                                                                 दि.१ जून २०१९






उस्मानाबादच्या पर्यावरणवृध्दीसाठी प्रशासनाने कसली कंबर
वृक्षलागवडीसाठी पहिल्याच मोहिमेत येडेश्वरी मंदीर टेकडीवर केले ८०० खड्डे खोदण्याचे नियोजन

उस्मानाबाद,दि.१- जिल्ह्यातील विविध टेकड्यांवर यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात श्रमदान व वृक्षारोपण करून जिल्ह्याच्या पर्यावरणवृध्दीसाठी आबालवृद्धांनी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे.
      त्याचाच भाग म्हणून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेनिमित्त दि.१जून रोजी येडेश्वरी मंदिर परिसर,येरमाळा येथे ८०० वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी भल्या पहाटे उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक आगळावेगळा उत्साह ओसंडून वाहत होता.      
      जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या नेतृत्वाखाली  उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.अविनाश आघाव, उपविभागीय वन अधिकारी श्री.पवार, तसेच प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी हजर होते.
      जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर श्रमदान आणि वृक्षारोपण असे उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमध्ये उस्मानाबाद मधील समस्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.
चला तर मग... सर्वजण मिळून आपल्या उस्मानाबादचे...
श्रमदान करू या
वृक्षारोपण करू या!
पर्यावरण घडवूया!


*****

वृत्त क्र.332                                                                                 दि.१ जून २०१९
यश मेडिकल फाऊंडेशनचे शेतीमालावर प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण अभियान
             जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी अभियान मोलाचे ठरेल
--- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद, दि. 1 - यश मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने शेतीमालावर प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण अभियानाचे कळंब तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाचा शुभारंभ येरमाळा येथील येडेश्वरी गुरूकुलम् गोशाळेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या चारा छावणीत  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते शनिवार, दि. 1 जून रोजी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, कळंबचे उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, कळंबच्या तहसिलदार मंजुषा लटपटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी श्री. मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. राजगुरू आदींसह प्रशासनातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळी जिल्हा ही जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते यांनी, या अभियानामुळे शेतकर्‍यांना शेतीपूरक  व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी यश मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे यांनी प्रक्रिया उद्योगाविषयी सविस्तर माहिती दिली. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये सर्व शेतकर्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर डॉ. नवनाथ दुधाळ यांनी पंचगव्यापासून निरनिराळ्या उत्पादनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती जाधव यांनी तर आभारप्रदर्शन अमित जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यश मेडिकल फाऊंडेशनचे कर्मचारी व येडेश्वरी गुरूकुलम गोशाळेचे रंगनाथ दुधाळ व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी येरमाळ्यासह परिसरातील पशुपालक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
वृत्त क्र.333                                                                                    दि. 1 जून 2019    

 जिल्ह्यात 5 जून रोजी मद्य विक्री बंदी आदेश लागू 

उस्मानाबाद,दि.1-जिल्हयात दि. 5 जून 2019  रोजी रमजान ईद साजरी होत आहे.
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून रमजान ईद निमित्त दि. 5 जून 2019 रोजी  या एका दिवशी  जिल्हयातील सर्व किरकोळ मद्य विक्री दुकाने व देशी/ विदेशी/ एफएलबीआर-2/एफएल-4/एफएल-3 परवानाकक्ष अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.
****