Friday, 29 December 2017

सर्वांनी मिळून मोठया प्रमाणावर वृक्षलागवड करु या, झाडे जगवूया -अर्चनाताई पाटील



         उस्मानाबाद,दि.29:- उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून पुसायची असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मोठया प्रमाणवर वृक्षलागवड करायला हवी आणि झाडे जगविण्याचीही जबाबदारी घेतली पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती.अर्चनाताई पाटील यांनी आज येथे केले.
            विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग व वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र उस्मानाबाद, कळंब, भूम यांच्या वतीने 13 कोटी वृक्षलागवड, ग्रीन आर्मी सभासद नोंदणी तसेच राष्ट्रीय हरित सेना उपक्रम असे एकदिवसीय प्रशिक्षण आळणी येथिल मध्यवर्ती रोपवाटिका येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबादचे बांबूचे जनक आणि प्रगतशील शेतकरी राजशेखर पाटील हे उपस्थित होते.
            श्रीमती.पाटील पुढे म्हणाल्या की, उस्मानाबाद मधील जनतेने आपापल्या उपलब्ध जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्षलागवड करुन ती सांभाळायला हवीत.रोपवाटीकांची माहिती घेवून जास्तीत जास्त रोपे रोपवाटीकेतून घेवून जावीत.अशा प्रकारे मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासणा केल्यास उस्मानाबाद हरित उस्मानाबाद म्हणून नक्कीच ओळखला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण श्री.अशोक घुले यांनी केले. या शिवाय प्रगतीशील वनशेती शेतकरी आणि उस्मानाबाद मधील बांबूचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्री.राजशेखर पाटील आणि 13 कोटी वृक्षलागवड व राष्ट्रीय हरित सेना उपक्रम या विषयावर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण कु.प्रियंका गंगावणे यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना करण्यात आले.
            या कार्यक्रमास उस्मानाबाद, कळंब, भुम आणि वाशी या भागातील सामाजिक वनीकरण शाळा, राष्ट्रीय हरित सेनेचे सभासद तसेच वन विभागाचे अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.