उस्मानाबाद, दि.30 :- राष्ट्रीय विधी
सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई
यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद व जिल्हा विधीज्ञ
मंडळ, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथील बस स्थानक प्रांगणात
शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ याबाबत महामेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश शब्बीर अहमद औटी
हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा सरकारी वकील शरद
जाधवर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष निलेश बारखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचे एकूण 16
स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले होते.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी,
विकास योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात व जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ
व्हावा या मुख्य हेतूने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्यावतीने हा
मेळावा आयोजित करण्यात आला होता.
देशाचा प्रत्येक नागरिक हाच देशाचा उर्जा स्त्रोत आहे.
आपल्या राष्ट्राला सुखी व समृध्द बनवायचे असेल तर प्रथम गरीबी निर्मुलन खूप
महत्वाचे आहे. आर्थिकदृष्टया दूर्बल घटकांसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध
कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कोणत्याही योजनेचा उद्देश समाजातील
प्रत्येक दूर्बल घटकांपर्यत विविध योजना राबवून त्यांना दशनिर्मितीत सामिल करुन
घ्यावयाचे. योजना प्रभावीपणे राबवून
त्याचा फायदा गरजू लोकांपर्यत पोहोचविणे, त्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती उंचावणे
व त्यांना देशनिर्मितीत सामावून घेणे त्यामुळेच देशाचा सर्वांगीण विकास होईल व
आपल्या स्वप्नातील भारत साकार होईल. सन 2022 मध्ये आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे
साजरी करणार आहोत, त्यामुळे त्या पर्वामध्ये आपल्या देशातील अंतीमातील अंतीम
व्यक्ती आनंदाने सामील व्हावा, त्यांचयावरील दूर्बलतेचा शिक्का, दडपण असणार नाही,
तो सामाजिकरित्या सशक्त असेल, आत्मनिर्भर असेल, स्वावलंबी असेल यासाठी प्रयत्न
करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी
न्यायाधिश वरिष्ठ स्तर श्री. एस.बी. देसाई यांनी प्रास्ताविकात केले.
उस्मानाबाद जिल्हयातील नागरीक बऱ्याचअंशी शेती व शेतीवरील
व्यवसायांवर आधारित आहेत. जिल्हा प्रशासन जलयुक्त शिवार, बळीराजा चेतना अभियान
यासारख्या अनेक योजना प्रभावीपणे राबवित आहे. उस्मानाबाद जिल्हयातील अनेक
शेतकऱ्यांनी जरबेरा फुल शेती, दुध उत्पादक कंपनी यासारखे अनेक शेतीपूरक व्यवसाय
सुरु करुन भरघोस उत्पादन घेतले आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून वाटचाल
करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन विविध शासकीय योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून कामकाज करीत आहे, शेतकऱ्यांनीदेखील शासकीय योजनांचा
पुरेपूर लाभ घेवून समृध्द होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलावे असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी केले.
सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क, अधिकार याची जाणीव व्हावी
हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या आपण जाणून
घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेने जास्तीत-जास्त योजनेची माहिती
घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पूढे आले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश
शब्बीर अहमद औटी यांनी केले.
मेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणाकडील सामाजिक कायदे व
योजनांसह सर्व शासकीय विभागातील कल्याणकारी व विकास योजनांची माहिती सविस्तरपणे
देण्यात आली.
जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास, एकात्मिक बाल विकास, महसूल, दूरसंचार,
ग्रामीण विकास, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा रेशीम विकास महामंडळ, पशुसंवर्धन,
कृषी, आरोग्य, कामगार कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र या विभागांचे या मेळाव्यात
स्टॉल्स लावण्यात आले होते.
यावेळी जिल्हा न्यायालयातील
विधीज्ञ, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, पोलीस, नगर परिषदेचे कर्मचारी
यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.