Sunday, 16 August 2026

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव धाराशिव दि.१५ ऑगस्ट (जिमाका) आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी,लाभार्थी आणि व्यक्तींचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज, महिला सक्षमीकरण,सामाजिक न्याय, शेतकरी कर्जमाफी तसेच पोलिस दलातील प्रदीर्घ व निष्कलंक सेवेसाठी हा सन्मान देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले.एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील मूल्यांकनात ९०० पैकी ५०८.७२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सतीश हरिदास यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालय,धाराशिवला महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२५-२६ या वर्षाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.या कामगिरीबद्दल जिल्हा कार्यालयाचा सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील ज्योती संतोष खुणे, रमाबाई राजकुमार वंजारे आणि विलास अच्युत खंडागळे यांना जमीन वाटपाचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रांचे वितरणही पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.मुकुंद लोमटे,अमोल जाधव आणि ओंकार पवार यांना या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पोलिस दलातील प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अखंडित व निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक तानाजी महादेव माळी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच १५ वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावल्याबद्दल पोलिस निरीक्षक विनोद इज्जतवार,पोलिस हवालदार स्वप्नील ढोणे,प्रदीप वाघमारे आणि दीपक लाव्हरे पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव हा त्यांच्या कार्याला मिळालेली दाद असून,इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची उपस्थिती होती. ******