Friday, 30 December 2016

पाटोदा येथे मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळावा संपन्न





            उस्मानाबाद,दि.30:- प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा ता. उस्मानाबाद येथे दि 30 डिसेंबर 2016 रोजी  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रमांतर्गत बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,   वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी.बिरादार, डॉ. एस.एम. सुतार डॉ. सौ. कदम, श्रीमती संध्या द्वासे , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बोरकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोद्याचे कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे  यांनी आरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित लाभार्थीं, शाळकरी मुले-मुली  यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगले  आरोग्य ठेवण्यासाठी  30 वर्षांपुढील प्रत्येकांनी आजार असेल किंवा नसेल तरीही आरोग्य तपासणी करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची काळजी घेताना परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे, तंबाखु,गुटखा,मावा असे तंबाखूजन्य पदार्थ  खावू  नयेत. तसेच प्रणायाम, योगा यासारखे व्यायाम करावेत.प्राथमिक आरोग्य स्तरावरील सर्व शासकीय योजना व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की , शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेस समुपदेशन करण्यासाठी आरोग्य गट, शेतकरी मदत गट तयार करण्यात यावेत. या गटांनी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेला देण्यात यावी व शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.शासना मार्फत  शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी  बळीराजा चेतना अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, संवाद मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना मानसिक समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून आत्महत्या करू नये, परिस्थितीचा धिराने सामना करावा असेही जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .
           आरोग्य मेळाव्याच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना,  उपक्रम व आरोग्य विषयक माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या मेळाव्यास   करजखेडा येथील न्यु कनिष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर ढमाले तसेच  विद्यार्थी व विद्यार्थीनी,  जिल्हा परिषद प्रशाला , पाटोदा येथील  शाळेतील मुले, मुली, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील महिला, पुरूष, स्थानिक गावकरी आरोग्य तपासणीसाठी मोठया संख्येने उपस्थित होते.
            यावेळी  नायगांवच्या ग्राम मंडळ या संस्थेकडून लोकजागर  या कार्यक्रमांतर्गत  श्री. चव्हाण यांनी    शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी  एक ह्रदयस्पर्शी  एकांकिका सादर केली .  तसेच  बोलक्या  बाहुल्यांच्या कार्यक्रमातूनही जनजागृती करण्यात आली .
            यावेळी कु. ऋतुजा केदारे या विद्यार्थीनीने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारु नये , शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येते यामुळे दुष्काळाचा व संकटांचा धैर्याने सामना करावा अशा भावनाही  तिने आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

******