Tuesday, 27 December 2016

एक पाऊल सशक्त राष्ट्र उभारणीसाठी….!


       दिनांक 7 डिसेंबर 2016 चा तो दिवस नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद मध्ये झालेल्या मासिक बैठकीत आम्हाला युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण या शिबिराची माहिती नेहरु युवा केंद्राचे श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सर्व स्वयंसेवकांना खूप उत्सुकता होती. या प्रशिक्षणांमध्ये आम्हाला काही नवीन शिकण्यासाठी व मिळविण्याच्या प्रशिक्षणाची आमच्या जीवनात आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी चांगलीच मदत होणार होती.
          सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षणाची सुरुवात  बुधवार 14 डिसेंबर  रोजी साधारणपणे ठीक 10.00 वाजता झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाधिकारी श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी केले आणि सकाळच्या सत्रात श्री पांडूरंग मोरे (MCED चे प्रमुख)  यांनी आम्हाला जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. या योजना खूप लाभदायक  आणि फायदेशीर ठरणार आहेत, याची खात्री झाली.  या प्रशिक्षण  वर्गात विविध चार समित्यांची स्थापना करण्यात आली व त्यांच्या कार्याची रुपरेषा आखून देण्यात आली , जलसंधारण-भविष्याची गरज या विषयावर गटचर्चा झाली आणि आम्हाला समजले की, जलसंधारण हे भविष्याच्या दृष्टीने किती महत्वाचे व जरुरीचे आहे. यावरुन आम्हाला समजले की विविध प्रकारे जल पुनर्भरण करता येऊ  शकते. दुसऱ्या दिवशी मिळालेले मार्गदर्शक म्हणजे श्री विनायकजी धेंडे सर (जिल्हा युवा समन्वयक) यांच्याकडून  आम्हाला शिकायला मिळालं की देशाचा जर विकास करावयाचा असेल तर तो आधी आपण स्वत:पासून करायला हवा, त्याचबरोबर त्यांनी सांगितले की,शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये सहभागी नसलेल्या लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम एन.वाय.व्ही (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) चे आहे. त्याचबरोबर त्यांनी  काही स्वानुभव आमच्याशी शेअर केले. त्यातून आम्हाला समजले की , युवकांना जर ध्येय प्राप्ती करावयाची असेल तर कशा प्रकारे जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जायला हवे.
          दुपारच्या सत्राची सुरुवात श्री.सुधीर  कुलकर्णी (कवी-लेखक) यांनी केली, एक कवी मनाचा माणूस जीवनामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज परिवर्तन व मनपरिर्वन कशाप्रकारे करु शकतो, हे कुलकर्णी सरांकडे  पाहिल्यावर आमच्यापैकी काही जणांनाही  वाटलं की आपण ही कविता करायला हवी, कवी व्हावं.
आला विचार मनात कवी व्हावं
आला विचार मनात कवी व्हावं
नंतर समजलं आधी
विचारवंत व्हावं,आधी विचारवंत व्हावं..
          श्री प्रसन्नकुमार कोंडो(भांडार अधिकारी राज्य परिवहन महामंडळ,उस्मानाबाद) यांनी निर्णयक्षमता Decision ,Dream, Decipline, knowledge, presentation प्रक्रिया कशी करावी, आयुष्यात निर्णय चुकतात पण चुकलेले निर्णय सुध्दा ध्येयप्राप्तीकडे घेऊन जातात व चुकलेल्या निर्णयातून सुध्दा शिकायला मिळतं. याबद्दल आमचे  प्रबोधन  केले. अशाप्रकारे दुस-या दिवसाची सांगता झाली.
          युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात प्रा.श्री अशोक गोरे (व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद) यांच्या  मार्गदर्शनातून सामाजिक जाणीव व संवेदनशीलता ही आजच्या तरुणामध्ये कशी असली पाहिजे. प्रत्येक तरूण हा संवेदनशील असायला हवा व सामाजिक बांधिलकी आपणही जपली पाहिजे, आपणही समाजासाठी काही केलं पाहिजे हे शिकायला मिळाले .
          गोरे सरांकडून माहिती मिळाली की, जगात 102 कोटी गरीब जनता आहे त्यातील 34 कोटी जनता ही एकटया भारतात आहे.ही समाजातील दरी आम्हाला जाणवली. नेहरु युवा केंद्राच्या  माध्यमातून आम्ही ही दरी  कमी करण्याचा प्रयत्न निश्चितच करु असा संकल्प यावेळी सर्व  प्रशिक्षणार्थींनी केला .
          श्री राजेंद्र अत्रे(साहित्यिक व कवी) यांनी आम्हाला सांगितले की,
योग कर्मसु कौशल्यमकोणतेही काम करताना काम जाणून करणे , कोणतेही काम नीट केलं पाहिजे व ते वेगात केलं पाहिजे. संध्याकाळच्या सत्रात श्री व्ही.के.देशमुख सरांकडून आम्हाला ज्ञानाची शिदोरी मिळाली, खरोखरच आम्हाला समजलं की , उपदेशाने माणूस कधीच बदलत नसतो तर तो स्व-निरिक्षणाने बदलत असतो. त्यामुळे आम्हांला कळलं की, आपण स्वत:च  स्वत:चे निरीक्षण करायला हवे व झालेल्या चुका सुधारायला हव्यात, त्याचबरोबर इतरांचं मन दुखावेल असं बोलू नये . भले ते सत्य जरी असेल तरी देखील म्हणजेच सत्यम भ्रयात,भ्रयात अप्रियम सत्य अशा प्रकारे अशा  अनोख्या  ज्ञान प्राप्तीने  या दिवसाची सांगता झाली.
          दिनांक 17 डिसें 2016 या प्रशिक्षणाच्या चौ्थ्या दिवशी आम्हाला जे मार्गदर्शक लाभले त्यांचे नाव श्री.गुरुनाथ कुलकर्णी ते जिल्हा सैनिक विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला सैन्य भरती कशा प्रकारे पार पाडली जाते, त्याविषयीचे समज-गैरसमज,भविष्यातील संधी,विविध पदांसाठी असणारी धारणा (पात्रता) व पदे याविषयी विस्तृत अशी माहिती मिळाली. सैन्यात जावून देशाचे व देशातील लोकांचे रक्षण करणे ही एक देशाची व समाजाची सेवा आहे, याबाबत आमचा निश्चय  दृढ निश्चयात परिवर्तीत  झाला .
          यानंतर दुपारच्या सत्रात क्रीडाधिकारी श्री. अशोक बनसोडे यांनी शासनाच्या क्रीडाविषयक विविध योजनांची माहिती आम्हाला दिली जी की,आमच्या दृष्टीने खूप महत्वाची व जरुरीची होती. नंतर याच सत्रामध्ये श्री मनोज  शिवाजी सानप साहेब(जिल्हा माहिती अधिकारी) यांनी राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर आम्हाला सांगितले की,युवक कसा असला पाहिले ? युवक कोणाला म्हणावे?  जो विचारांनी आणि कृतीने तरुण व तत्पर अशा 90 वर्षाच्या लोकांना देखील युवक म्हटले. त्याचबरोबर युवकांच्या विचारात जर स्पष्टता असेल तर बोलण्यात व वागण्यात स्पष्टता येते खूप खेळीमेळीच्या  वातावरणामध्ये  युवक व युवकांची उद्दिष्टेच  काय असली पाहिजेत  हे आम्हाला समजले  सशक्त राष्ट्र उभारणीत  युवकांनी  सर्वच प्रकारे योगदान द्यायला हवे.
          त्याचबरोबर  या सत्रामध्ये श्री शिरीष शेळके(महिला व बालकल्याण अधिकारी) मार्गदर्शन करताना म्हणाले की,  आज समाजात महिला व बालकांवर अत्याचार होतात. मात्र प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाचा आधार घेऊन ते आपल जीवन सावरु शकतात व सुधारु ही शकतात, शेळके साहेबांनी  याबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी सामाजिक योजनांचीही माहिती दिली.
          जिल्हा माहिती अधिकारी  सानप साहेबांनी  आपल्या मार्गदर्शनपर  व्याख्यानात असे  सूचविले होते की ,  आजच्या  या पीढीला शासकीय कार्यालयांचीही माहिती होणे  आवश्यक आहे, जेणे करुन ते स्वत:ला व   इतर गरजूंनाही मदत करु  शकतील . त्याप्रमाणे  आम्ही  विविध विभागांच्या कार्यालयांना भेटी देऊन व कामकाजाची माहिती घेतली. (कृषी विभाग,हिवताप विभाग,वन विभाग,माहिती कार्यालय,कौशल्य भारत विभाग) प्रशिक्षणामधून आम्हाला खूप काही मिळाले,परंतू आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळेस ते मिळतेच असे नाही परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काही तरी मिळत ज्याची कधीच अपेक्षा नसते  तसेच काही या प्रशिक्षणाबद्दल घडले प्रशिक्षणामधून आम्हाला विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या ओळखी व त्या त्या विभागाचे कामकाज कशा प्रकारे चालते हे आम्हाला समजले. कृषी विभागातील श्री जी.टी. गोरे  , जिल्हा निबंधक श्री.के. आर. कुलकर्णी व कौशल्य विकास व रोजगार कार्यालयातील   श्री गुरव व माहिती कार्यालयातील श्रीमती आशा बंडगर यांनी आम्हाला खूप चांगल्या पध्दतीने माहिती दिली . जी आम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.भविष्यामध्ये इतर विभागांशी संपर्क साधून त्या  त्या विभागांचीही कार्य प्रणाली जाणून घेऊन ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत माहिती पुरवण्याचे काम या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थी कडून निश्चितपणाने केले जाईल. समाज सेवेचा हा घेतलेला वसा व मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी ही आमच्या जीवनातील एक अमूल्य ठेवा असणार आहे.
          युवा नेतृत्व सामाजिक विकास प्रक्षिणाचा पाचवा व शेवटचा दिवस होता खरं परंतू आम्हाला ते संपावे असे वाटतचं नव्हते . या दिवशी प्रेरणा घ्या व प्रेरित व्हा या विषयावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांना व विर्द्यार्थ्याना मार्गदर्शन करणारे.श्री अशोक चव्हाण सर यांनी  युवकांना प्रेरित करुन मंत्रमुग्ध केले,या मार्गदर्शनातून आम्हाला समजून आले की,Decission, Dream, discipline , Presentation  हे जर असेल तर युवक यशस्वी नक्कीच होतो.
            प्रशिक्षणाचा समारोप हा आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेब(आमदार विधानपरिषद) यांच्या मार्गदर्शनाने झाला. त्यांनी सांगितले की जीवणात येणाऱ्या आपत्तीचे रुपांतर हे इष्टापत्तीत करता आले पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक काम हे सामाजिक जाणिवेतून केले पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच प्रगती होते व माणूस मोठा होतो,या कार्यक्रमाला श्री नितिनजी काळे, प्रदेश  कार्यकारिणी सदस्य भाजपा , श्री दत्ता कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष्‍ उ,बाद भाजपा हे ही उपस्थित होते. आ. ठाकूर साहेबांच्या हस्ते  प्रशिक्षार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शिबिरातील या पाच दिवसात विविध भागातील 15 मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
            शिबीर यशस्वी करण्यासाठी कु. प्रतिभा जाधव ,अशोक बराते,सायली सलगर,अश्विनी थोरात,  रविकांत सुरवसे,प्रविण माने,वैभव लांडगे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणामध्ये पाचही दिवसांची भोजन,चहा व नाष्टा इत्यादीबाबतची व्यवस्था आयोजकांकडून उत्कृष्ट पध्दतीने करण्यात आली होती. तसेच सर्वानी शिबिराबद्दलचे मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपेश उमरदंड यांनी केले .
            शेवटी या प्रशिक्षणातुन खूप काही मिळालं. सामाजिक जाणीव दृढ झाली  आणि एका सशक्त राष्ट्राच्या  उभारणीसाठी  उस्मानाबाद  जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्राची ही तरुण मुलामुलींची एक फळी सज्ज झाली …
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळलेल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मनेही साफ व्हावी
मोकळया श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी
          कु.सायली शशिकांत सलगर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  , उस्मानाबाद (7038684129)
     कु.रुपेश सुनिल उमरदंड , राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  , उस्मानाबाद (9764047537)
                        
*****