उस्मानाबाद,दि.30:- कोणत्याही
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूकीमध्ये संबंधित स्वराज्य
संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर
केल्यापासून लोकप्रतिनिधींना त्या स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही, असे निवडणूक
विभागाने आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची
निवडणूक दि.20 मार्च 2017 रोजी संपत असल्याने जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या
अधिकारानुसार त्यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत-दि.21 डिसेंबर 2016 नंतर
कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वेच्छा निधीतून कोणत्याही प्रकारचे आश्वासन देवू नये
किंवा मंजूरीसाठी नव्याने प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू नयेत, स्वेच्छा
निधीतून मंजूर करणाऱ्या, कार्यारंभ आदेश देणाऱ्या किंवा प्रत्यक्ष काम करणाऱ्या
अधिकाऱ्यांनी पुढील बाबीचे कटाक्षाने
पालन करावे, दि 21 डिसेंबर 2016 नंतर कोणत्याही नवीन कामाच्या प्रस्तावास
मंजूरी देवू नये, दि. 21 डिसेंबर 2016 पूर्वी प्रस्ताव मंजूर असेल, पण प्रत्यक्ष
कामास सुरूवात झाली नसेल तर कार्यांरभादेश देऊ नये किंवा कामास सुरूवात करू नये,
दि. 21 डिसेंबर 2016 पूर्वी जर प्रत्यक्ष कामाची सुरूवात झाली असेल तर ते काम सुरू
ठेवावे.
वरील निर्बंध न पाळल्यास, ते काम मतदारांवर
प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे गृहीत धरण्यात येऊन कामास त्वरित
स्थगिती देण्यात येईल, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात
येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. ****