Monday, 13 February 2017

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद 1170 प्रकरणे निकाली तर 11 कोटी 19 लाख 31 हजार रुपयांची वसूली




उस्मानाबाद,दि.13:- जिल्हयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी 7 हजार 75 न्यायप्रविष्ठ आणि 1 हजार 226 वादपूर्व प्रकरणे लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटविण्याकरीता ठेवण्यात आले होते, पैकी 1 हजार 120 न्यायप्रविष्ठ तर 50 वादपूर्व अशा मोठया संख्येने प्रकरणे मिटविण्यात आली आहेत.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्याकडून देशभरात एकाच दिवशी दि.11 फेब्रुवारी 2017 रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले हेाते. यामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. आर.आर. देशमुख, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या  मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये मोटार अपघात/ कामगार नुकसान भरपाईचे 38 प्रकरणे निकाली निघून रुपये 1 कोटी 79 लाख 88 हजार 361 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. भु-संपादनाच्या 159 प्रकरणांमध्ये पक्षकार व भू-संपादन अधिकारी  तसेच कार्यकारी अभियंता यांचे सहकार्य व प्रतिसादामुळे 9 कोटी 8 लाख 59 हजार 180 इतक्या  मावेजाचे  वाटप करण्यात आले. धनादेशाची 48 प्रकरणे निकाली निघून रुपये 11 लाख 17 हजार 936 रक्कमेची तडजोड करण्यात आली. वैवाहीक वादाची 19 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली यामध्ये 6 लाख रुपये आपशी समझोत्याने देण्यात आले. तडजोड पात्र फौजदारी   86 प्रकरणात तडजोड होवून रुपये 5 हजार 400 इतका दंड करण्यात आला. बँकाची 4 दावे निकाली निघून   13 हजार 179 रक्कमेचा भरणा करण्यात आला व उर्वरित रक्कमेस हप्ते पाडून देण्यात आले. दिवाणी स्वरूपाचे  741 प्रकरणे व 25 वसूलीच्या  दरखास्ती निकाली काढण्यात आल्या.
वादपूर्व प्रकरणांमध्ये नगर परिषदेचे थकीत पाणीपट्टी 15 प्रकरणे मिटवून रुपये  10 लाख 59 हजार 410 रुपयांचा भरणा करण्यात आला. बँकांचे थकीत कर्ज आणि धनादेश अनादराची 35 प्रकरणे मिटून रुपये 2 लाख 87 हजार 600 रुपयाचा भरणा करण्यात आला.

पक्षकार संबधित विधीज्ञ, महसूल अधिकारी, संपादन मंडळ, विमा कंपनीचे अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी,नगर परिषदेचे अधिकारी,बँकाचे व्यवस्थापक आदींचा या लोक अदालतीमध्ये मोठया संख्येने प्रकरणे मिटविण्यात सक्रीय सहभाग होता. सर्व तालुका विधीज्ञ मंडळ आणि अध्यक्ष विधीज्ञ मंडळ श्री. अजित खोत व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर )श्री. एस.आर. पडवळ यांनी लोकअदालतीचे आयोजन केले. प्रमुख जिल्हा  न्यायाधीश श्री. आर.आर. देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि सर्व न्यायिक अधिकारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोठया संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे .