Wednesday, 15 February 2017

सर्व नगरपालिकांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी व 100 टक्के कर वसुलीबाबत प्रयत्न करावेत -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


उस्मानाबाद,दि.15:-नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी व करांच्या 100 टक्के वसुलीबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
            या बैठकीत डॉ. नारनवरे यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करुन जिल्हयातील नागरी क्षेत्र मार्च 2017 अखेर हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना केल्या. जिल्हयातील सर्व नगर परिषद,नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी हे अभियान 100 टक्के यशस्वी करण्याची ग्वाही बैठकीत दिली, अभियानांतर्गत मुरुम नगरपरिषदेने उघडयावरील शौचालयाच्या ठिकाणी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन त्यांचा आदर्श इतर नगर परिषदांनी घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याबाबतच्या सूचना केल्या.
            तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरोघरी शौचालयाची सक्ती केली जात असताना उघड्यावर शौचास बसल्याचे पुरावे आढळले तर संबंधितांचे रेशनकार्ड /मतदान ओळखपत्र रदृ होणार आहे. याबरोबर निवडणुकीस अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. तेव्हा उघडयावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगाण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सरकारला दिले आहेत. ही बाब विचारात घेऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी  केले.
        या नगरपरिषदांच्या विविध करांच्या वसुलीचा आढावा घेताना नगर विकास विभागाच्या दि.1 फेब्रुवारी, 2017 च्या शासन निर्णयानुसार नगर परिषद , नगर पंचायती आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 1 फेबु्वारी  ते 31 मार्च, 2017 या कालावधीत विशेष वसूली मोहीम राबवून नगरपरिषद करांच्या शंभर टक्के वसूलीबाबत कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना देवून या कालावधीत कालबध्द कार्यक्रम आखून थकबाकीदारांना स्मरण देणे, अधिनियमाचे कलम 152 ते 155 च्या तरतुदीनुसार  कार्यवाही  करण्यात व तद्नंतरही थकबाकी वसूली न झाल्यास  अशा थकबाकीदारांविरुध्द  कलम 156 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. उपस्थित सर्व नगरपरिषद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील  नगरपरिषद करांची 100 टक्के वसूली मार्च अखेर  पूर्ण करण्याची हमी यावेळी दिली .
            तसेच नगर परिषद स्तरावर  राबविल्या  जाणाऱ्या  वैशिष्ट्यपूर्ण, नागरी  दलितवस्ती सुधार योजना , नागरी  दलितत्तेर वस्ती सुधार इत्यादी योजनांतर्गत केलेल्या कामाच्या सविस्तर अहवालासह योजनानिहाय  पुढील पाच वर्षांत हाती घ्यावयाच्या कामाचा कृती आराखडा 5 मार्चपूर्वी  सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद स्तरावरील  प्रलंबित  लेखा परीक्षण आक्षेपाची पूर्तता  करण्याच्या दृष्टीने कार्यशाळा  आयोजित करुन  अनुपालन सादर करण्याच्या सूचना दिल्या.

            या बैठकीस जिल्हा प्रशासन अधिकारी  श्री. राजीव बुबणे , समाज कल्याण विभागाचे  श्री.एस.एस. शेळके, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे  श्री. ढाके, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.