Wednesday, 26 April 2017

ग्राम विकास लोकअदालतीचा लाभ घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते


उस्मानाबाद.दि.26:-ग्रामविकास विभागाच्या योजनेबद्दल व्यक्तिगत तक्रार किंवा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या ग्राम विकास लोकअदालतीमध्ये तक्रारी दाखल कराव्यात, या तक्रारीचा निपटारा या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी  जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामविकास लोकआदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामविकास लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.नेताजी पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रायते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे, गट विकास अधिकारी श्री.चकोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविताना ज्या नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहिल्या असतील किंवा वैयक्तिक लाभापासून वंचित राहिल्याबाबतच्या तक्रारीचा या ग्रामविकास लोकअदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे, ज्या तक्रारी संदिग्ध आहेत त्या तक्रारी दि.1 ते 31 मे 2017 या एक महिन्याच्या कालावधीत निपटारा करण्यात येईल, असे ही श्री. रायते यावेळी बोलताना म्हणाले.


या कार्यक्रमास उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर येथील पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.