Sunday, 23 April 2017

दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे- -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे



उस्मानाबाद,दि.23-:-उस्मानाबाद जिल्ह्यात दूध उत्पादक व संकलनासाठी उत्तम वाव आहे.  मात्र दूध उत्पादकाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येवून कटिबद्ध होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन  विधानसभा  अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.
          तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित,उस्मानाबाद यांच्या दूध संकलकचा शुभारंभ व दूध उत्पादक मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
          यावेळी सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर, विधानसभा सदस्य आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चना पाटील, नितिन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, नानासाहेब पाटील हे उपस्थित होते.
          श्री. बागडे पुढे म्हणाले, सहकारातून  उभ्या राहिलेल्या बऱ्याच संस्था आज मरणासन्न अवस्थेत आहेत. मात्र यातही चांगल्या संस्थांनी पुर्नजिवित होणे आवश्यक आहे.  त्यासाठी सशक्त, सक्षम सहकारी संस्थांनी अशा मृत मात्र चांगल्या संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  ते म्हणाले, दूध संकलन ही एक सामूहिक प्रक्रिया आहे.  त्यासाठी शिस्तबद्धतेने नियोजनाची गरज असून यात राजकारण न आणता, व्यक्ती न पाहता दूधाची प्रत चांगली असणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर दूध उत्पादकांनी क्लस्टर पद्धतीने, बचतगटाच्या माध्यमातून या व्यवसायात प्रगती साधता आली पाहिजे. या प्रक्रियेत सातत्य हवे व सर्वांनी मार्केटिंगचेही कौशल्य आत्मसात करायला हवे, असेही श्री. बागडे म्हणाले.  शेवटी श्री बागडे यांनी सहकारात गैरमार्गाने  नफा  कमावू नये व चांगल्या मार्गाने कमविलेला नफा सर्व सभासदांना समान वाटप करावा असा कानमंत्रही उपस्थित दूध उत्पादक, संकलकांना दिला.
          सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजाभवानी दूध संघाने नव्या जोमाने पुन्हा सुरुवात केल्याबद्दल  त्यांचे अभिनंदन केले व ते म्हणाले की, राजकीय  झूल बाजूला ठेवून या संघाने आपली पुढील वाटचाल यशस्वी करावी.  सभासद, संस्था, गावचा विकास हाच ध्यास घ्यावा आणि यासाठी सर्वांची दांडगी इच्छाशक्ती ही असावी.  शासनाच्या योजनांचा नीट अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावेत.  तसेच शेतीपूरक व्यवसायावरही लक्ष केंद्रित करावे. जेणे करुन शेती बरोबरीनेच  इतरही बाबी  शेतकऱ्यास सहाय्यकारी ठरतील.
          यावेळी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचा त्यांच्या सहकार क्षेत्रातील कामाबद्दल आणि अमूल दुग्ध उद्योगाचा श्री. देशमुख यांनी विशेष उल्लेख करुन उस्मानाबाद मधील सध्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांची राजुरी गाव व अमूल उद्योग यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही केले.
          या कार्यक्रमाप्रसंगी  प्रभात सहकारी पतपेढीच्या वतीने या दूध संघाला सहकार्य म्हणून रुपये पाच लाखांचा धनादेश उपस्थित मान्यवर व चेअरमन  डॉ. डी.बी. मोरे यांच्या हस्ते  दूध संघाचे  महाव्यवस्थापक एस.आर. नाईकवाडी  यांना देण्यात आला.

          कार्यक्रमाचे  प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी दूध  महासंघाचे महाव्यवस्थापक एस.आर. नाईकवाडी  यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. एस.एस. बोडके यांनी केले. आभार प्रदर्शन हरिभाऊ लोमटे यांनी केले.  शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.