Tuesday, 20 December 2016

सर्वरोग निदान शिबिराचा 3 हजार 500 रूग्णांनी घेतला लाभ


उस्मानाबाद, दि. 20:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, 20 डिसेंबर रोजी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात केशेगाव व परिसरातील साडेतीन हजार रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, तेरणा वैद्यकिय महाविद्यालय व आशा सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन लोमटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
तेरणा वैद्यकिय महाविद्यालयातील 10 तज्ञांच्या पथकाने सर्व रूग्णांची तपासणी केली. रूग्णांना शिबिरस्थळी प्रयोगशाळा, औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थ्यांचीही यावेळी आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. दिवसभरात साडेतीन हजार रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. दरम्यान शिबिरास आरोग्य सभापती सुधाकर गुंड यांनीही भेट देवून पाहणी केली. 
या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. अर्चना पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, डॉ. दीपक मेंढेकर, डॉ. सरोज आडे, विजय माकुवार, डॉ. राजकुमार तळवेकर, डॉ. विजय द्विदी, डॉ. शैलेंद्र सिंह, डॉ. स्वप्नील गोहोकार, स्वप्नील गणेशपुरे, डॉ. हेमंत येवगे, डॉ. सिग्नास मेहता, डॉ. प्रियंका उरणकर, डॉ. नेहल दोडीया आदींनी परिश्रम घेतले.