Saturday, 18 March 2017

आवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संयुक्त समिती


उस्मानाबाद.दि.18:- वादळी वाऱ्यासह झालेल्या आवकाळी पावसाने व गारपिटीने उस्मानाबाद तालुक्यात शेतीपिक, फळपिकांचे नुकसान झाल्याने उस्मानाबाद तहसिलदार आयुष प्रसाद यांनी तालुक्यातील नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांची नुकसान बाबतची पाहणी करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन केली आहे. ही समिती नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके, फळपिके, अन्य नुकसानीची पाहणी करुन तसा वस्तुस्थितीचा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील.

गाव,सज्जा व मंडळ निहाय संयुक्त समिती स्थापन केली असून या समितीचे नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसिलदार यांची नियुक्ती केली आहे. पथक प्रमुख मंडळ अधिकारी ,कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे, तर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे समितीचे हे सदस्य असून या समिती मार्फत आवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या नुकसानीची नेमून देण्यात आलेल्या गावची सर्वे नंबर निहाय तसेच खातेदार निहाय पाहणी करून वस्तुस्थितीचा  पंचनामा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील, असे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उस्मानाबाद तहसिलदार आयुष प्रसाद  यांनी कळविले आहे.