Monday, 23 March 2026
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका) : जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते, तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
मृदा व जलसंधारण विभाग, धाराशिव व मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान २.० अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, धाराशिव सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पुढे म्हणाले की, पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. पूर्वी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत होते, मात्र आज ‘हर घर जल’ योजनेमुळे अनेक गावांमध्ये घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. ही सकारात्मक बदलाची दिशा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री.पुजार म्हणाले.
जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे, बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या घराजवळ सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. नीती आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रिचार्ज शाफ्टसारखी कामे करून पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असून, यामुळे भविष्यात दुष्काळमुक्ती साध्य होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
श्री.पुजार पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती असून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. आज जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढून २ लाख १० हजार रुपये झाले आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला पाण्याचे योग्य व्यवस्थापन जोडले तर समृद्धीचा मार्ग अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.श्री.घोष म्हणाले की, मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा दुष्काळी स्वरूपाचा असून २०२४ मध्ये अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. अशा परिस्थितीत दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पाण्याची जबाबदारी केवळ महिलांवर सोपविणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामसभा आणि नागरिकांनी एकत्रितपणे या प्रश्नावर उपाय शोधणे गरजेचे आहे. ग्रामसभेत महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्यास समस्यांचे प्रभावी निराकरण होऊ शकते. दुष्काळामुळे मुला-मुलींना पाणी आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, ज्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जलव्यवस्थापनात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे असे ते म्हणाले.
पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शोषखड्डे, जलतारा, वृक्षारोपण यांसारख्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे असे सांगून डॉ.श्री.घोष म्हणाले की, प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा अडतो, त्यामुळे पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.केंद्रे म्हणाले की, नागदरवाडीसारख्या दुष्काळी गावाला ग्रामस्थांच्या सहभागातून पाणीदार बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वी पाच किलोमीटर दूरवरून पाणी आणावे लागणाऱ्या गावात आज जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. ग्रामस्थांनी स्वतःवर काही नियम घालून घेतले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब गावातच मुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले. महिलांनी या कामात मोठा पुढाकार घेतला असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे गावातील जलसंधारण चळवळ अधिक सक्षम झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडो-जर्मन वॉटरशेड प्रकल्पाच्या माध्यमातून १०१४ हेक्टर क्षेत्रावर विविध कामे करण्यात आली आहेत असे सांगून श्री.केंद्रे म्हणाले की, पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावाने जलसमृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. गावाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे.केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काम करण्याची भावना जोपासल्यासच जलसमृद्ध गावांची निर्मिती शक्य होईल,असे त्यांनी आवाहन केले.
श्री.गोडसे म्हणाले की,गोड पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.जलसाक्षरता वाढविणे ही काळाची गरज आहे. सूक्ष्म सिंचन पद्धती जसे की ठिबक, तुषार, मिनी स्प्रिंकलर यांचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. शेतीत आच्छादन (मल्चिंग) केल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि उत्पादन वाढीस मदत होते.“शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात” ही संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जलसाठा वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमती घुगे म्हणाल्या की,महिलांचा पाण्याशी दिवसभर संबंध येत असल्यामुळे त्यांनी पाण्याचे नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे. धाराशिव जिल्हा आकांक्षीत व दुष्काळी असल्यामुळे जलव्यवस्थापनावर विशेष भर देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक समृद्ध होऊ शकते. यासाठी पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
पाणलोट व्यवस्थापन ही काळाची गरज असून प्रत्येक गावात या दृष्टीने काम केले पाहिजे असे सांगून श्रीमती घुगे म्हणाल्या की,जलदूत महिलांच्या माध्यमातून जलसंधारण चळवळ अधिक बळकट होऊ शकते. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच जिल्हा पाणीसमृद्ध होऊ शकतो. प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करून पुढील पिढ्यांसाठी संसाधने सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जल पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती सायली जाधव यांनी केले.
*******





