Monday, 23 March 2026
ग्रामीण शिक्षणाचा झेंडा उंचावला नवोदय प्रवेशात जिल्हा परिषद शाळांचा दबदबा ८० पैकी ६६ विद्यार्थ्यांची निवड
ग्रामीण शिक्षणाचा झेंडा उंचावला नवोदय प्रवेशात जिल्हा परिषद शाळांचा दबदबा
८० पैकी ६६ विद्यार्थ्यांची निवड
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.इयत्ता ६ वीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० जागांपैकी तब्बल ६६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील निवड झालेले आहेत.विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून ८० पैकी ७७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून,हे ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेचे द्योतक मानले जात आहे.
तालुकानिहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे – धाराशिव (२०), तुळजापूर (१८),कळंब (१३), उमरगा (०७),भूम (०७),लोहारा (०७),वाशी (०४) आणि परंडा (०४) असे एकूण ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा वाटा लक्षणीय असून, तालुकानिहाय जिल्हा परिषद शाळांमधील निवड पुढीलप्रमाणे आहे – धाराशिव तालुका २० पैकी १८,तुळजापूर १८ पैकी १६,कळंब १३ पैकी १२,उमरगा ७ पैकी ४,भूम ७ पैकी ४,लोहारा ७ पैकी ५,वाशी ४ पैकी २ तसेच परंडा ४ पैकी ४ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेले आहेत.
मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधून ६३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती,तर यंदा हा आकडा वाढून ६६ वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी धाराशिव जिल्हा परिषदने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये जिल्हा स्वनियोजित निधीतून OMR शीटचा वापर करून दोन सराव परीक्षांचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून,परिणामी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी डॉ.रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांनी विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.
सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे.या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव अधोरेखित झाली असून, भविष्यातही अशाच प्रकारे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे.
*****