Monday, 23 March 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर *जिल्ह्यात १८ ते ३१ मार्चपर्यंत* *जमावबंदी व शस्त्रबंदी लागू*
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर
*जिल्ह्यात १८ ते ३१ मार्चपर्यंत*
*जमावबंदी व शस्त्रबंदी लागू*
धाराशिव दि.१८ मार्च (जिमाका) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश काढण्यात आले आहे.त्यानुसार १८ मार्च रोजी रात्री १ पासून ते 31 मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत.जिल्ह्यात १९ मार्च रोजी गुढी पाडवा,२१ मार्च रोजी रमजान ईद, २६ मार्च रोजी रामनवमी,२७ मार्च रोजी तुळजाभवानी चैत्री यात्रा (तुळजापूर) ३० मार्च रोजी येडेश्वरी चैत्री यात्रा (येरमाळा) आणि ३१ मार्च रोजी महावीर जयंती असे विविध धर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.
या सण-उत्सवांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच सध्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात विविध समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून धरणे,मोर्चे,आंदोलन,उपोषण, बंद,रास्तारोको,तालाठोको अशा आंदोलनात्मक कार्यक्रमांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार,शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना शस्त्र,काठी, तलवार,बंदूक,लाठ्या किंवा शारीरिक इजा होऊ शकतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच दगड,फेकावयाची साधने किंवा तत्सम वस्तू साठवणे,तयार करणे किंवा बाळगणे यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय आवेशपूर्ण भाषणे करणे, प्रक्षोभक घोषणा देणे,असभ्य वर्तन करणे, समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रतिमा, फलक किंवा चिन्हांचा वापर करणे, संविधानविरोधी कृती करणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यक्ती,मृतदेह किंवा त्यांचे प्रतीकात्मक प्रदर्शन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र येण्यास,मोर्चा किंवा मिरवणूक काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणतीही सभा, मोर्चा किंवा निवडणूक प्रचार कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान,अंत्ययात्रा,धार्मिक विधी, लग्नसमारंभ,सामाजिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम तसेच सिनेमागृह व रंगमंच यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.तसेच शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी यांनाही या आदेशातून वगळले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
**************