Monday, 11 September 2017

'बळीराजा चेतना अभियान' या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह


उस्मानाबाद,दि.11:- बळीराजा चेतना अभियान या योजनेंतर्गत सामूहिक विवाह ही योजना जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
            एका ठिकाणी कमीत कमी 05 सामूहिक विवाह आयोजित करण्यात यावे. या योजने अंतर्गत मुलीच्या वडीलांना, वडील हयात नसतील तर आईस व दोघेही हयात नसतील तर मुलीस तिच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या  मंगळसूत्र व इतर वस्तुची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे 15 हजार रुपये इतके अनुदान दिले जाईल.  सामूहिक विवाह हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत आयोजित होणे आवश्यक आहे. 
              अधिक माहितीसाठी  जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत रुम न. 10 तळमजला, डावी बाजू, उस्मानाबाद येथे संपर्क फोन नं. 02472-222592 वर साधावा, असे आवाहन जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी श्री.अशोक सावंत यांनी केले आहे.
         अर्जासोबत पुढील सत्यप्रत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमांतर्गत भंग या दाम्पत्य/कुटुंब यांच्याकडून न झालेला नसावा याबाबतचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Affdavit) सादर करणे आवश्यक आहे. (रु. 100 च्या स्टँप पेपरवर), जन्मनोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखला किंवा वैद्यकीय अधिका-याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचा पुरावा, लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधित जमिनीचा सातबारा व त्या गावचे रहिवाशी असल्याबाबत त्या गावचे तलाठी,ग्रामसेवक यांचा दाखला, लाभार्थी शेतमजूर असल्याबाबतचा पुरावा म्हणून संबंधित गावचे तलाठी/ग्रामसेवक यांचा दाखला, वधूच्याआईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र  तहसिलदार/तलाठी, विवाह नोंद प्रमाणपत्र,  वधू- वरांचा लग्नाचा फोटो, वधूच्या आईचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे ,असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.