Thursday, 2 March 2017

सर्वांनी मिळून मातृभाषेचा सन्मान वाढवू या -मनोज शिवाजी सानप


उस्मानाबाद,दि.27:-आताच्या स्पर्धेच्या युगात कोणतीही स्पर्धा झाली तरी एकाची हार तर एकाची जीत होणारच आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक नागरिकाने आपल्या मातृभाषेचा गोडवा जपावा,आपल्यासाठी मराठी भाषा आपली मातृभाषा असून आपण सर्वांनी मिळून आपल्या मातृभाषेचा सन्मान वाढवू या, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज  सानप  यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद आणि येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै.सामनाचे तालुका  प्रतिनिधी  बाळासाहेब  जाधवर होते.

मराठी राजभाषा सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलताना मनोज सानप पुढे म्हणाले की, येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूल इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिन आपल्या शाळेत आयोजित करून मराठी भाषेचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मानच केला आहे. आपली आई तशी आपली मातृभाषा होय, आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी मातृभाषेतूनच शिकता येतात म्हणूनच सर्वांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा,असेही ते पुढे म्हणाले.

शेवटी श्री. सानप यांनी यापूर्वी राज्यातील पहिली लोकराज्यशाळा हा बहुमान मिळालेली ही शाळा आता आयएसओ नामांकन प्राप्त झालेली उस्मानाबाद जिल्हयातील पहिली शाळा असून यापुढे या शाळेची उत्तरोत्तर अशीच  प्रगती  होवो, अशी  सदिच्छा  व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प  अर्पण  करून  दीपप्रज्ज्वलन  करण्यात आले.

यावेळी शाळेतील कु. नम्रता देशमुख,सिध्दी गवळी,कु.साक्षी सारंगे यांनी मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले तर याच शाळेतील  विद्यार्थीनींनी मराठी  भाषा  अभिमानपर गीत सादर केले.

यावेळी स्थानिक पत्रकारांचा त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुस्तके देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सा. तेरणाकाठचे  संपादक  दत्ता गायके  यांनी केले. यावेळी सर्जेराव पाटील,सौ.गोडसरे, श्री.मगर यांनीही  आपल्या भाषणातून मराठी भाषेची महती उपस्थिताना सांगितली. या कार्यक्रमास दै.गावकरीचे प्रतिनिधी अशोक‍ शिंदे, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी दत्तात्रय बारकूल, दै.लोकमतचे सचिन बारकूल तसेच शाळेतील विद्यार्थी/ विद्यार्थीनी,नागरिक मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सौ.संध्या ओव्हाळ यांनी केले तर शेवटी शाळेचे मुख्याध्यापक  सचिन  पाटील  यांनी  उपस्थित मान्यवरांचे आभार  मानले.