Friday, 11 November 2016

चलनी नोटांच्या व्यवहाराकरिता जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांनी जनसामान्यांत समाधान


उस्मानाबाद,दि.11:-  अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 5001000 रुपयांच्या नोटा रद्द  करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. जिल्हयातील ग्राहकांस व सर्वसामान्य नागरिकांस चलनी नोटांच्या आर्थिक व्यवहारासाठी जिल्हयातील सर्वच राष्ट्रीयीकृत, जिल्हा,नागरी बॅंक व संबंधित सहकारी बँकांनी सहकार्याची भूमिका ठेवून व्यवहार करावेत,  अशा सूचना  जिल्हा प्रशासनाने  बँकांना  दिल्या होत्या .  त्या पार्श्वभूमीवर  रिझर्व्ह बँक ऑफ  इंडियाचे अधिकारी  आणि जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांची बैठक  नुकतीच जिल्हाधिकारी  कार्यालयात  पार पडली .  यावेळी  निवासी  उपजिल्हाधिकारी सुनिल यादव , उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे हेही उपस्थित  होते .
या बैठकीत  केंद्र शासन व रिझर्व्ह  बँकेने  दिलेल्या  सूचना ,  जिल्हा प्रशासनाने , पोलीस प्रशासनाने  केलेल्या उपाययोजना  याचा ऊहापोह  घेण्यात आला .
या परिस्थितीत सर्व बँकांनी आपआपल्या बँकांचे अतिरिक्त काऊंटर्स सुरू करावेत. जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच प्रत्येक व्यक्तीस सामंजस्याने वागणूक द्यावी, बँकेत गर्दी वाढणार आहे, लॉकर ऑपरेशन, लोड वाढू शकतो,हे लक्षात घेवून बँक व्यवस्थापकांनी योग्य ती काळजी घ्यावी ,प्रत्येक ग्राहकास पावती देण्यात यावी, ग्राहकांचे ऑनलाईन व्हेरीफिकेशन करुन घ्यावे, राष्ट्रीयीकृत बँकांनी सी.डी. एम. चालू ठेवावेत, पेट्रोल पंपचालकांचे पैसे बँकेने स्विकारावेत तसेच ग्राहकांनी आर.टी.जी.एस व एन.एफ.टी व्दारे आर्थिक व्यवहार करावेत, गरज पडल्यास पेट्रोल पंप, पोस्ट ऑफीस व बँकांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. स्टेट बँक हैद्राबाद एक कॅश व तीन रिसिप्ट  काऊंटर्स  चालू ठेवावेत. स्टेट बॅक ऑफ इंडिया एक कॅश व दोन रिसिप्ट काऊंटर्स  चालू ठेवावेत, महाराष्ट्र  बँक एक कॅश व  दोन रिसिप्ट काऊंटर्स चालू ठेवावेत.  उर्वरित बॅकांनी ग्राहकांसाठी काऊन्टर्स वाढवावेत अशा  सूचना प्रशासनाकडून  संबंधित  सर्व यंत्रणांना  देण्यात आल्या  होत्या . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी  डॉ. नारनवरे हे संपूर्ण  सर्व परिस्थितीवर  बारकाईने लक्ष ठेवून आहेत .
            संपूर्ण जिल्ह्यात  प्रशासनाने  केलेल्या  नियोजित  प्रयत्नांना  चांगलेच यश मिळत आहे ,  नागरिकांना  सर्वत्र  योग्य ते सहकार्य  संबंधित  सर्वच यंत्रणांकडून  मिळत आहे ,  कुठेही  कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न  निर्माण  झालेला नाही , लोकांना  त्यांचे बँकेतील व्यवहार  सुरळीतपणे पार पाडता येत आहेत आणि  जिल्हा  प्रशासनाने  केलेल्या  उपाययोजनांमुळे  सर्वसामान्य  नागरिकांमध्ये  प्रशासनाबद्दल  सर्वत्र  समाधान व्यक्त  करण्यात येत आहे