Thursday, 10 November 2016

सावकारच्या ताब्यातील जमीन शेतकऱ्यांना परत -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे


उस्मानाबाद दि.10:-जिल्हयातील  खाजगी कर्जाच्या बदल्यात शेतक-यांची जमीन बळकवणा-या सावकाराकडून कळंब तालुक्यातील दोन व भुम तालुक्यातील एक अशा तीन शेतक-यांची पाच एकर जमीन परत मिळवून देण्याचा धाडसी  निर्णय  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकताच घेतला आहे.
               हा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,तसेच  सबंधित शेतकरी उपस्थित होते.
                         गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक सकंटात सापडला  गेल्याने  शेतक-याला  खाजगी  सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. खाजगी सावकाराकडून कर्ज घेताना शेतजमीन गहाण ठेवण्यात येते व आवाच्या सव्वा व्याज आकारण्यात येते त्यामुळे शेतक-याला कर्ज फेडणे शक्य नसते. आपोआपच जमिनी सावकाराच्या ताब्यात जमा झाल्या अनेक शेतक-यांच्या आत्महत्याचे कारण सावकाराचे कर्ज हे प्रमुख कारण दिसून येते, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सावकारीविरोधी विशेष मोहीम घेवून जिल्हयातील तीन शेतक-यांना त्यांच्या जमीन परत मिळवून दिल्या.
                         संजय नवनाथ काटे व श्रीमती सुधामती नवनाथ काटे रा.हिंगोली ता.कळंब, श्रीमती गोदाबाई सतिश वाघमारे रा. बरमगांव ता. कळंब यांच्या जमिनीचे कागदपत्रे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी त्यांना सुपूर्द केली तर श्रीमती महानंदा  उमेश गुळवे रा.जांब ता.भूम यांनाही त्यांच्या  जमिनीची कागदपत्रे दयायची होती,  परंतु त्यावेळेस त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत, या प्रकरणातील सर्व दोषी सावकारांविरोधात  गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.